मुख्य सामग्रीवर वगळा

दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग दोन

 उगवतीचे रंग 

दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग दोन 

दक्षिण भारतातील या मंदिरांचा बाह्य भाग जेवढा आकर्षक दिसतो, तेवढाच आकर्षक आतील भाग आहे. आतील मुर्त्या, कोरीव काम, नाजूक पण सुंदर अशी गुंतागुंतीची नक्षी मन मोहून टाकते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहात आपल्याला भगवान विष्णूंची अतिशय सुंदर अशी मूर्ती दृष्टीस पडते. या गर्भगृहाच्या वर अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं मकर तोरण आहे. त्याच्या मध्यभागी लक्ष्मी आणि विष्णूंचे शिल्प आहे तर  खाली दोन्ही बाजूला भगवान विष्णूंचे द्वारपाल आहेत. या द्वारपालांच्या मूर्ती देखील इतक्या रेखीव आणि प्रमाणबद्ध आहेत की त्या जिवंत वाटतात. द्वारपालांनी परिधान केलेले अलंकार लक्षवेधक आहेत. या द्वारपालांच्या पाठीमागे देखणी प्रभावळ आहे. द्वारपालांच्या हातात शंख आणि गदा ही आयुधे धारण केलेली आहेत. हे द्वारपाल जणू सूचित करतात की गर्भगृहाच्या आत कोणीही अपवित्र व्यक्ती जाता कामा नये. व्यक्ती मनाने आणि शरीराने पवित्र असावी. सोवळे नेसूनच आत प्रवेश करता येतो. 

गर्भगृहात दोन प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे  काळ्या पाषाणातून घडवलेली सहा फुटांची भगवान विष्णूंची मूर्ती आणि दुसरी म्हणजे पूजेसाठी वापरली जाणारी धातूची मूर्ती. या मूर्तींना अनुक्रमे अचल आणि चल मूर्ती म्हटलं जातं. पूजेसाठी जी वापरली जाते ती चल मूर्ती. ती धातूची असून रथोत्सवासारख्या विशेष प्रसंगी बाहेर काढली जाते. पाषाणातून घडवलेली आणि प्रतिष्ठापना केलेली ती अचल मूर्ती. विष्णू मूर्तीच्या प्रभावळीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले दिसतात. येथे फोटो काढण्यास मनाई असल्याने भगवंताचे रूप डोळ्यात आणि मनात साठवावे हेच उत्तम ! 

भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेतात ते मंदिरातील स्तंभ. इतके आकर्षक स्तंभ अन्य कुठे क्वचितच बघायला मिळतात. प्रत्येक स्तंभ, त्यावरील नक्षीकाम वेळ काढून बघत राहावं इतकं अप्रतिम आहे. एरव्ही कागदावर काढण्यासही कठीण असं नक्षीकाम या दगडांवर कोरलेलं आहे.आजच्या काळात एखाद्या अत्याधुनिक लेथ मशीनवर घासून गुळगुळीत केल्यासारखे हे स्तंभ वाटतात. त्यामुळे एक हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचा परिणाम त्यांनी कसा साध्य केला असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक स्तंभावर एकावर एक असे रचलेले पाच थर आहेत. ते एकमेकांशी इंटरलॉक पद्धतीने जोडलेले आहेत. हे लॉकींग एवढं मजबूत आहे की शेकडो वर्षानंतर त्यांचा भक्कमपणा आजही कायम आहे. असे तब्बल ४८ स्तंभ या मंदिरात आहेत. असं म्हणतात की विजयनगर साम्राज्याच्या काळात इ.स. १३८१ मध्ये या मंदिरावर आक्रमण होऊन त्याचा काही भाग नष्ट झाला होता. या मंदिराच्या पडणाऱ्या भागाला सावरून धरण्यासाठी, आधार देण्यासाठी या स्तंभांची निर्मिती केली गेली. 

या स्तंभांमध्ये दोन स्तंभ विशेष करून बघावे असे आहेत. त्यातील एक म्हणजे नरसिंह स्तंभ आणि दुसरा म्हणजे मोहिनी स्तंभ. नरसिंह स्तंभावर नाजूक अशी १०८ शिल्पे कोरलेली आहेत. पायापासून ते वर छतापर्यंत या स्तंभावर कोरीव काम केलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्तंभावरील शिल्पात एक अगदी हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराचे छोटे शिल्प आहे. हे शिल्प एका नंदीचे आहे. त्याच्याच बाजूला थोडीशी जागा रिक्त ठेवली आहे. पुढे कोणी एवढया क्षमतेचा शिल्पकार आला तर त्याने त्या जागी तसेच सूक्ष्म शिल्प निर्माण करावे असे आव्हानही त्यातून सूचित होते. हे सगळं पाहिल्यावर आपल्या पूर्वजांच्या कलाकुसरीचे, नवनिर्माणाचे आणि कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. या मंदिरातील काही स्तंभांवर मदनिका कोरलेल्या पाहायला मिळतात. प्रत्येक मदनिकेची भावमुद्रा वेगवेगळी आहे. असे सांगितले जाते की येथील हा नरसिंह स्तंभ पूर्वी हाताने फिरवता येत होता पण मंदिराचे छत खाली आल्याने तो त्यात दबला गेला आणि फिरेनासा झाला. 

या मंदिरातील सभामंडप अत्यंत विशाल आहे. त्यातून ६० मार्गिका निघतात. या मंदिरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे तिथे असलेला मोहिनी स्तंभ. भगवान विष्णूंनी भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनी अवतार धारण केला होता. त्या मोहिनी रूपातील अत्यंत सुंदर शिल्प या स्तंभावर पाहायला मिळते. मोहिनी मूर्तीच्या दोन्ही बाजूला विष्णूंचे वाहन गरुड आणि चौरीवाहक आहेत. 

गर्भगृहाजवळच एक घुमट असून त्याच्या अष्टकोनी छतावर अप्रतिम असे नक्षीकाम आहे. त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंडपातील चार स्तंभांच्या वरच्या बाजूला नृत्य सरस्वती आहे. एक नाट्य मुद्रेतील सुंदरी आहे. स्त्रीला मयुराप्रमाणे सुंदर नृत्य करता यायला हवं अशी अपेक्षा आपल्या पूर्वजांची होती. आणखी एका सुंदरीच्या शिल्पामध्ये तिच्या हातावर पोपट बसलेला दाखवला आहे. ती पोपटाशी संवाद करते आहे अशा प्रकारची तिची भावमुद्रा आहे. पूर्वी ज्याप्रमाणे संदेशवहनासाठी कबुतरांचा उपयोग केला जायचा त्याचप्रमाणे पोपटांचाही वापर केला जात असे. या स्तंभावर असलेल्या सुंदरींपैकी एक सुंदरी नुकतीच सुस्नात होऊन आलेली दिसते. ती आपल्या केसातील पाणी झटकत आहे. शिल्पाचे बारकाईने निरीक्षण केले तर तिच्या केसांवर असलेले जलबिंदू देखील आपल्याला दिसू शकतात, एवढी सजीवता या शिल्पांमध्ये आहे. या सुंदरींनी परिधान केलेले दागिने देखील पाहत राहावेत इतके अप्रतिम आहे. एका सुंदरीच्या हातातील बांगडया तर गोल फिरवता येतात. या मंदिरातील आणखी एक स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यावर सर्व देवदेवतांच्या प्रतिमा आणि सुरसुंदरी कोरल्या आहेत. मुख्य मंदिरातील पूजा झाल्यानंतर पुजारी या स्तंभाची देखील पूजा करतात आणि त्याचीही प्रदक्षिणा करतात. या स्तंभाची प्रदक्षिणा मंदिराच्या प्रदक्षिणेइतकीच महत्वाची मानली जाते. 

भगवंताला आपल्याप्रमाणेच सजीव मानून दोन प्रकारे त्याची सेवा केली जात असे. रंगभोग आणि अंगभोग सेवा. रंगभोग म्हणजे भोजनोत्तर भगवंतासाठी गाणे बजावणे आणि करमणुकीची सेवा देणे. येथील गाभाऱ्यासमोर जो मंडप आहे, त्याला नृत्यमंडप असे म्हणतात. या ठिकाणी गाणी, नृत्य आणि इतरही काही कलाप्रकार सादर केले जात. राजघराण्यातील स्त्रिया याठिकाणी आपली गानसेवा, नृत्यसेवा देत असत. भरतनाट्यम सारख्या नृत्यात या स्त्रिया प्रवीण असत. अंगभोग म्हणजे भगवंताच्या मूर्तीला स्नान, उटणे, सुगंधी जलाभिषेक आदी सेवा अर्पण करणे. 

मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी प्रवेशद्वाराजवळचे एक शिल्प आपले लक्ष वेधून घेते. हे शिल्प होयसळ राजांच्या वंशातील एका शूरवीराचे आहे. तो वीर सिंहाला मारतो आहे असे दाखवले आहे. या शिल्पातील प्रमाणबद्धता आणि रेखीवपणा अप्रतिम आहे. मंदिराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला महाभारतातील प्रसंग कोरलेले आपल्याला दिसतात. 

याच मंदिर परिसरात इतरही तीन मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे मुख्य मंदिराशी साम्य दर्शवणारे चेन्नगरय मंदिर, वीरनारायण मंदिर आणि सौम्यानायकी मंदिर. ईशान्य दिशेला पायऱ्या असलेले वसुदेवतीर्थ म्हणून पाण्याचे एक कुंड आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अतिशय सुरेख असे कोरीव काम असून अनेक प्रसंग, देवदेवता आणि प्राणी बघायला मिळतात. मंदिराच्या तळाशी असणाऱ्या बाहेरच्या आडव्या रांगेत वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती कोरलेले आहेत. काही शांत, तर काही आक्रमक.हे गजराज म्हणजे समृद्धी, स्थैर्य आणि ताकदीचे प्रतीक आहेत. त्याच्याच वरच्या पट्ट्यात नक्षीकाम, सिंहमुखे, विविध प्रकारची नाजूक आणि आकर्षक नक्षी, नारी, यक्ष आदींचे रेखीव शिल्पकाम बघायला मिळते. मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीवर विविध भावमुद्रेतील घोडेस्वार दाखवले आहेत. काम करणारे कारागीर आपापल्या हत्यारांसह कोरलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रेमी युगुले, रामायण-महाभारतातील प्रसंग, धर्म, अर्थ, काम आदी गोष्टी दर्शवणारे दैनंदिन जीवनातील प्रसंग, नर्तक, वादक अशा खूप काही गोष्टी बघायला मिळतात. त्या काळातील इतिहास जणू जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो.  बारकाईने पाहावीत अशा खूप गोष्टी या मंदिरात आहेत. सर्वांचेच वर्णन करणे इथे शक्य नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी एकदा तरी या मंदिराला अवश्य भेट द्यावी. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

४/१२/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...