उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ३३
रवींद्रनाथांची पत्रे...
रवींद्रनाथ यांनी आपल्या सुमारे ८० वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक पत्रे लिहिली. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की त्यांच्या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत. जेवढी पत्रे त्यांनी अति महत्त्वाच्या व्यक्तींना लिहिली, आहेत तेवढीच पत्रे सर्वसामान्य व्यक्तींना आणि अगदी लहान मुलांना देखील लिहिली. त्यांची पत्रे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशा अनेक प्रकारांमध्ये मोडतात. रवींद्रनाथांच्या साहित्यामध्ये आपल्याला वास्तवता आणि कल्पकता यांचे सुंदर मिश्रण आढळते. परंतु वास्तवता हे त्यांच्या साहित्यातील प्रमुख वैशिष्ट्य आहे. तेच वैशिष्ट्य त्यांच्या पत्रांमध्ये देखील आपल्याला आढळते. पण पत्र लेखनात सुद्धा वास्तवतेची कास धरताना त्यांनी सत्य आणि सुंदर ही मूल्ये जपली आहेत. त्यांचे साहित्य मग ते कथा, कविता, नाटक किंवा कादंबरी कोणतेही असो आजही ताजे वाटते. तसेच त्यांची पत्रे देखील आजच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला कालसुसंगत वाटतात आणि मार्गदर्शक ठरतात.
रवींद्र नाथांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि विश्वकवी म्हणून ते मान्यता पावले. त्यानंतर तत्कालीन माध्यमांनी त्यांच्या पत्रांना भरभरून प्रसिद्धी दिली. रवींद्रनाथ कितीही व्यस्त असले तरी पत्रलेखन स्वतः करीत. जेवढ्या गांभीर्याने ते राजकीय व्यक्तींना पत्र लिहीत, तेवढ्याच गांभीर्याने आणि आपुलकीने एखाद्या लहान मुलीला देखील पत्र लिहून तिच्याशी संवाद साधत.
रवींद्रनाथ आपल्या वागण्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला कायमचे आपलेसे करून घेत असत. त्या व्यक्तींमध्ये चांगले गुण शोधून त्याची तारीफ करीत असत. त्यामुळे प्रत्येकाला रवींद्रनाथांशी आपले संबंध असावेत, त्यांच्याशी आपली ओळख असावी असे वाटत असे आणि एकदा त्यांच्या संपर्कात आलेला माणूस कायमचा त्यांच्याशी जोडला जात असे. देश विदेशातील नेते, मित्र, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, कलाकार, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर आणि सामान्यातील सामान्य माणसे सुद्धा त्यांच्या मित्र परिवाराचा एक भाग होते. अशा विविध व्यक्तींना ते पत्र लिहीत असत किंवा त्यांच्या पत्रांना न चुकता उत्तरे देत असत. ' भानूसिंहेर पत्रावली, ' पथे वो पथेर पांत्रे ', ' चिठ्ठीपत्र ' ' छिन्नपत्र 'या आणि इतर नावाने त्यांचे पत्रसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आपली पत्नी मृणालिनी देवी यांना लिहिलेली पत्रे चिठ्ठीपत्र या संग्रहात आहेत. आपली पुतणी इंदिरा चौधरी हिला तसेच राणी मुखर्जी या लहान मुलीला लिहिलेली पत्रे देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्रांमधील बरीचशी पत्रे त्यांनी आपले जमीनदारीचे काम शिलाइदह येथे राहून करीत असताना लिहिली आहेत. अशी त्यांची अनेक प्रकारची प्रक्रिया असली तरी प्रामुख्याने त्यांच्या पत्रांचे वर्गीकरण औपचारिक आणि व्यक्तिगत अशा प्रकारे केले जाते.
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होऊन दोन गट पडले. या दुफळीने रवींद्रनाथ उद्विग्न झाले होते. त्यांनी त्यावेळी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांना१९०८ मध्ये लिहिलेले हे पत्र काही संदर्भ वगैर तर आजच्या परिस्थितीत सुद्धा जसेच्या तसे लागू पडते. ते आपल्या पत्रात म्हणतात,
" ( काँग्रेसमधील ) उभय पक्ष आता एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यात दिवस रात्र मग्न झाले आहेत. फाटाफुटीच्या जखमांवर उभयपक्षांकडून व्यवस्थित मीठ चोळले जात आहे. कोणीही झाले गेले विसरायला तयार नाही आणि कोणी कोणाला क्षमा करायला तयार नाही. आत्मीयतेला परके बनवण्याच्या म्हणून ज्या ज्या तऱ्हा आहेत, त्या त्या साऱ्यांचे अवलंबन होते आहे. राजसत्तेबद्दल असंतोषाच्या, क्रोधाच्या, रोषाच्या वाऱ्याची दिशा आता बदलली आहे. स्वतःच्या घराला आग लावून ती अधिकाधिक भडकवण्याकडे त्या वाऱ्याचा उपयोग होत आहे. ' वंदे मातरम ' पत्रात स्वातंत्र्याच्या अभयमंत्राने भरलेले चैतन्यपूर्ण लिखाण आजवर आढळायचे पण कित्येक दिवसात तसे वाचायला मिळाले नाही. अथपासून इती पर्यंत भांडणाच्याच हकीकतीने आजकाल ते भरून गेलेले आढळते. आतापर्यंत देशात दोनच पक्ष होते. आता जहाल, मवाळ व मुसलमान असे तीन पक्ष झाले आहेत. आणखीही एक चौथा पक्ष आहे. गव्हर्मेंट हाऊस मध्ये बसून उपहासाने हसणाऱ्यांचा. भाग्यवानांचा भार भगवान वाहत असतो. आम्हाला नष्ट करायला दुसऱ्या कोणाची आता जरुरी नाही. मोर्लेचीही नाही किंवा किचनेरचीही नाही. स्वतःचा स्वतःच व्यवस्थित नाश करून घेणार आम्ही ! ' वंदे मातरमचा ' घोष करत आम्ही परस्परांना जमीन दोस्त करणार. "
हे त्यांचे पत्र पुरेसे बोलके आहे आणि त्यातील बराचसा मजकूर आजही लागू पडतो. ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१०/१२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा