उगवतीचे रंग
तस्मात उत्तिष्ठ कौंतेय...
अर्जुन रात्री बराच वेळ टीव्ही पाहत बसला होता. त्याच त्या रटाळ बातम्या पाहून त्याला फारच वैताग आला होता. पण मीडिया त्यांना हव्या तशा सोयीस्कर बातम्या दाखवतच राहणार याचे त्याला भान नव्हते. मीडियाला ना लोकांच्या हिताशी देणेघेणे, ना राष्ट्रहिताशी. त्यांच्या निष्ठा वेगळ्याच. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उगीचच जागा राहिलेला अर्जुन सकाळचे सात वाजले तरी अंथरुणात लोळतच पडला होता. एवढ्यात त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. कुठून तरी बासरीचे सूर कानी येत होते. त्या सुरांमध्ये एवढी ताकद होती की अर्जुन काही वेळ आपले देहभान विसरला. तोच त्याला एक आवाज ऐकू आला. ' पार्था, अरे ऊठ. ही झोप फार वाईट बरं. झोपलास की संपलास. तू निद्रेवर विजय मिळवला होतास म्हणून महाभारतात तुझा उल्लेख गुडाकेश असा आहे. तेव्हा अशी निद्रा तुला शोभत नाही.'
खरं तर उलटच झालं होतं. सकाळी लवकर जागं होऊन केशवाला जागं करायचं आणि ' जागो मोहन प्यारे..' असं आपण म्हणायचं तर तो मोहनच येऊन अर्जुनाला जागं करीत होता. अर्जुनाच्या डोळ्यापुढे एक दिव्य प्रकाश प्रकटला. त्यात त्याला काही दिसेना. अर्जुन स्वतःशीच म्हणाला, ' हे काय झालं ? मला तर काहीच दिसत नाही. ' तोच त्याला केशवाचा सुमधुर आवाज ऐकू आला. ' पार्था, अरे नीट बघ. मी आलोय. तुला दोन गोष्टी युक्तीच्या सांगाव्यात असे वाटले. महाभारत काळात तुझ्या डोळ्यांवर आपल्याच आप्तेष्टांचा संमोहाचा पडदा होता. त्यावेळी आपले हातपाय गाळून आणि कर्तव्य विसरून तू बसला होतास. आज तुझ्या डोळ्यांवर अज्ञानाचा आणि विस्मृतीचा पडदा आहे. ' उघडा डोळे, बघा नीट ' असं नुसतं म्हणून चालत नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते. ती दृष्टी नसेल तर ते दाखवतील तेच नीट बघावं लागतं. म्हणून म्हणतो जागा हो. '
' केशवा, तू काय बोलतोस ते मला काही म्हणजे काही कळत नाही. जरा नीट उलगडून सांगशील का ? 'अर्जुन म्हणाला.
' सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐक. पाच हजार वर्षांपूर्वी मी गीता सांगितली होती. त्यातील शिकवण तू विसरलास. तू म्हणजे तुम्ही सारे. नुसतेच गीता हा श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे असे म्हणून चालत नाही. त्यातील शिकवण आचरणात आणावी लागते. तुम्ही लोक एक वेळ गीतेचा उपदेश विसरलात ते मी समजू शकतो पण अरे इतिहासही तुम्ही विसरता. इतिहासापासून काहीतरी धडा घ्यायचा असतो. जी माणसे आपल्या इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांचे अध:पतन होते ही काळ्या दगडावरची रेघ आहे रे पार्था. '
' अहिंसा परमो धर्म : ' हे वचन अगदी बरोबर आहे पण केव्हा ? जेव्हा तुम्ही सामर्थ्यवान असता तेव्हा. दुर्बळांच्या तोंडी हे वचन शोभत नाही. क्षमा हे वीराचे भूषण आहे असे तुम्ही म्हणता त्याचा अर्थ हाच आहे. तुमचा धर्म संकटात आहे आणि तुम्ही ' अहिंसा परमो धर्म : ' चा जप करत बसलात तर तुम्ही संपून जाल. स्वधर्मे निधनं श्रेय : । पर धर्मो भयावहः ।। हे लक्षात ठेव.
तुम्हाला तुमचे सण समारंभ साजरे करायचे असतील, तर सुरक्षित आणि निर्भय वातावरण हवे. तसे निर्भय वातावरण कायम राहील याची काळजी तुम्ही सर्वांनी नागरिक म्हणून घ्यायला नको का ? शत्रूला ओळखायला शिका. आज शत्रू दारापर्यंत आला आहे. उद्या तो तुमच्या घरात शिरेल. मग काय हातावर हात धरून बसणार का ? तुमच्या सगळ्या देवदेवतांच्या हातात कुठलं ना कुठलं तरी शस्त्र आहे. ते शत्रूचा निःपात करण्यासाठीच. ते काही शोभा म्हणून त्यांनी हातात धरलं नाही.
सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे शब्द म्हणजे केवळ मखलाशी आहे. तुम्हीच का धर्मनिरपेक्ष असायचे ? त्यांना कधी वाटते का आपणही धर्मनिरपेक्ष असावे म्हणून ? जे तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करतात, ते कधी त्यांनाही हा उपदेश करतात का ? नियम तर सर्वांना सारखेच लागू करायचे असतात. ते कधी तुमच्या उत्सवात, आनंदात सामील झाले ? तुम्ही मात्र त्यांच्यात जाता आणि आपला धर्म विसरता.
मी मघा जे म्हणालो की शत्रू ओळखायला शिका ते नीट समजून घे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच हा धोका ओळखला होता. त्यांच्या राज्यात मावळा एक झाला होता. आज मावळ्यांमध्ये फूट पडलीय. मावळा जातीजातीत विभागला गेलाय. मग स्वराज्य कसे टिकवणार ? समर्थ रामदासांनी सांगितले की ' मराठा तितुका मेळवावा ' त्याचा अर्थ हाच आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापले भेद विसरून एकत्र यायला हवे. United we stand, divided we fall या इंग्रजी वाक्याचा अर्थ ठाऊक आहे ना ? की ते फक्त बोलण्यापुरतेच वापरायचे ?
खरोखरच तुम्ही लोक इतिहास विसरता. जेव्हा शत्रू बाहेरचा असतो तेव्हा पाच पांडव आणि शंभर कौरव एकत्र येतात आणि आम्ही एकशे पाच म्हणतात. पण तुम्ही शंभर आणि पाच असे वेगवेगळे राहिलात तर पुन्हा वेगळे महाभारत होईल. यावेळी पाचांचा विजय होईलच असे नाहीत. संख्येने जे जास्त असतील ते जिंकतील. म्हणून सावध हो.
भूतकाळात तुम्हाला प्रिय असलेल्या देवतांच्या मंदिरांचा विनाश शत्रूने केलाच ना ? तुम्ही एक नसल्याने आणि आपले स्वत्व गमावल्याने हे घडले. तुमची सुंदर मंदिरं, लेण्या तोडून छिन्न्नविछिन्न करण्यात आल्या. ज्या रामाने दुराचारी रावणाचा वध केला, त्याचं मंदिर व्हायला पाचशे वर्षे जावी लागली. नालंदा, तक्षशिला विद्यापीठे आणि तेथील अपार ग्रंथसंपदा आक्रमकांनी नष्ट केली. एवढा शूर आणि उदार पृथ्वीराज चव्हाण पण त्याच्या औदार्यामुळे त्याच्या हातून मोठी चूक घडली. क्रूर आक्रमक अशा मोहंमद घोरीला त्याने सोळा वेळा सोडून दिले. त्याच घोरीने विजय मिळताच पृथ्वीराजाला कैद केले. त्याने औदार्य नाही दाखवले. तुम्ही विसरता हा इतिहास. या आक्रमकांच्या हल्ल्यात तुमच्या मायबहिणी सुरक्षित राहिल्या नाहीत. अनेक स्त्रीलंपट आक्रमकांमुळे राणी पद्मिनीसारख्या हजारो तेजस्वी स्त्रियांना जोहार पत्करावा लागला. अकबर जोधाच्या प्रेमाचे कसले गोडवे गाता ? अकबराच्या जनानखान्यात तीनशेच्या वर स्त्रिया होत्या. हाच अकबर स्वतःला गाझी म्हणवून घेत होता. गाझी म्हणजे जो अल्लाला मानत नाही त्याचा वध करणारा. अकबर आणि हेमू यांच्या युद्धात बेशुद्ध झालेल्या हेमू उर्फ हेमचंद्राचे शीर अकबराने तलवारीने धडावेगळे केले आणि स्वतःला गाझी म्हणवून घेतले.
तुम्हा हिंदूंना अनेक देशातून परागंदा व्हावं लागलं आहे, ते तुमच्यात एकी नसल्यामुळे आणि परकीयांचा धोका वेळीच न ओळखल्यामुळे. पाकिस्तानातून, काश्मीरमधून अनेक हिंदू आपलं घरदार सोडून गेले किंवा त्यांना घालवलं गेलं. अनेक महिलांवर अत्याचार झाले. हा तर ताजा इतिहास आहे. यातूनही तुम्ही काही शिकला नाहीत. हे असंच सुरु राहिलं तर उद्या पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणांहूनही तुम्हाला घालवलं जाईल. म्हणून म्हणतो ' तस्मात उत्तिष्ठ कौंतेय. ' आजच्या काळात तुम्हाला तलवार, बंदुका हाती घेण्याची गरज नाही. तुमच्या हातात नागरिक म्हणून काही अधिकार संविधानाने दिले आहेत. त्याचा यथायोग्य वापर करा. एक सजग नागरिक म्हणून आपल्या देशाप्रतीचे आपले कर्तव्य पार पाडा. धर्मो रक्षति रक्षित: हे लक्षात ठेवा.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१९/११/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा