उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १९
रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी
गेल्या काही भागांपासून रवींद्रनाथांच्या काव्यसृष्टीचाआढावा घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. हा आढावा म्हणजे टागोरांच्या काव्यसृष्टीला केलेला केवळ स्पर्श आहे याची मला जाणीव आहे. एखाद्या मोठया प्रासादात विविध दालने असावीत आणि त्यातील काही दालनेच पाहता यावीत, त्यानेच डोळे दिपून जावेत तसे माझे झाले आहेत. त्याची काव्यसृष्टी म्हणजे सागर आहे. कितीही वेळा खोल बुडी मारली तरी प्रत्येक वेळी मौल्यवान रत्ने, मोती हाताला लागतील.
टागोरांनी जवळपास दोन अडीच हजार कविता लिहिल्या. नुसत्या कविताच लिहिल्या असं नाही तर त्यातील बऱ्याच कवितांना चाली दिल्या. रवींद्रनाथ थोर साहित्यिक असले तरीही त्यांचा जीव जडला होता तो कविता या साहित्यप्रकारावर. कवितेशी त्यांचं नातं अतूट होतं, आजन्म होतं. आपल्या पुतणीला लिहिलेल्या एका पत्रात ते आपलं आणि कवितेचं नातं स्पष्ट करतात.
" कविता ही माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या ( रवींद्रनाथाचा मुलगा रथींद्रनाथ )वयाचा होतो तेव्हाच तिच्याशी माझा वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणीच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धूसर पण अपूर्व अशी अवस्था समजून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन - की त्या काळी माझं कवितेबरोबरच शुभमंगल झालं होतं. पण ह्या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊ दे, पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते, पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतुन हृदपिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनं एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणण्याची सोय नाही. तरीसुद्धा माझं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ' साधने 'त लिहितो, जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला बसतो, त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगलं ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधीच खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे आश्रयस्थान. "
' स्वातंत्र्याचा स्वर्ग ' Heaven of Freedom ' ही त्यांची कविता मला फार आवडते. या कवितेत परमेश्वराकडे जी मागणी रवींद्रनाथांनी केली आहे, तिची कधी नव्हे तेवढी आवश्यकता आजच्या घडीला आहे. ही कविता म्हणजे रवींद्रनाथांनी देशाच्या संदर्भात पाहिलेले सुंदर स्वप्नच आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागितले, तशाच प्रकारची मागणी रवींद्रनाथ या कवितेत परमेश्वराकडे करताना दिसतात. आपल्या देश नुसता स्वतंत्र व्हावा असं ते म्हणत नाहीत, तर तो ' स्वातंत्र्याचा स्वर्ग ' व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.
अनेकांना ही कविता म्हणजे निव्वळ आदर्शवाद वाटेल. अशा तऱ्हेचं जग अस्तित्वात येणं शक्यच नाही असंही वाटेल. पण तशा प्रकारचा विचार, तशी मागणी परमेश्वराकडे करायला काय हरकत आहे ? स्वप्न पाहायचीच असतील तर ती उदात्त, भव्यदिव्य पाहायला हवीत. रवींद्रनाथांच्या जीवनात आणि कल्पनेत क्षुद्र कल्पनांना स्थान नव्हते. ते आनंदयात्री आणि सौंदर्ययात्री होते. ' सत्य, सुंदर मंगलाची नित्य आराधना ' करणारा हा महाकवी होता.
या कवितेची अनेक जाणकारांनी भाषांतरे केली आहेत. प्रा. नरेंद्र जाधव यांनी या कवितेचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे. या कवितेला सुंदर चाल देऊन संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलं आहे. मूळ इंग्रजीतील कविता अशी आहे -
Where the mind is without fear and the head is held high;
Where knowledge is free;
Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls;
Where words come out from the depth of truth;
Where tireless striving stretches its arms towards perfection;
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead habit;
Where the mind is led forward by thee into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.
या कवितेचा प्रा नरेंद्र जाधव यांनी केलेला हा भावानुवाद बघा
भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा,
मम देशही जागृत होवो या मुक्त स्वर्गी आता.
हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा
गर्भातूनी सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता
अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता
रूढींना नाही थारा, विचारी अखंड निर्मलता
तव प्रेरणेमुळे ही नव-उन्मेषी व्यापकता
या कवितेचा आनंद घेण्यासाठी रवींद्रनाथांचा काळ आपल्याला समजून घ्यावा लागेल. रवींद्रनाथ ज्या काळात जन्मले, वाढले तो काळ परकीय राजवटीचा होता. ब्रिटिशांची अनिर्बंध सत्ता आपल्या आणि इतर अनेक देशांवर होती. इंग्रजी सत्तेविरुद्ध आपली स्वतंत्र मते मांडण्याचा, लिहिण्याचा अधिकार प्रजेला नव्हता. प्रजेला त्यांच्या जुलूम, दडपशाहीला सामोरे जावे लागत होते. भारतीय संस्कृती, धर्म, तत्वज्ञान इ. गोष्टी शिक्षणातून हद्दपार होऊन ब्रिटिशाना हवे तसेच शिक्षण देण्यावर भर होता. शरीराने भारतीय पण मनाने इंग्रज असे तरुण त्यांना राज्यकारभार करण्यासाठी हवे होते. हे लक्षात घेतले की सुरुवातीच्या काही ओळींचा अर्थ स्पष्ट होतो. लोक रूढी, परंपरांच्या बेड्यात अडकले होते. स्वतंत्र विचार करणे, अविरत प्रयत्न करीत राहणे आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करणे लोक विसरले होते.
या कवितेच्या सात ओळी आहेत. मी म्हणेन की हे इंद्रधनुषी सप्तरंग आहेत. या कवितेच्या पहिल्या ओळीत ते म्हणतात
' भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा '
जगण्याचे स्वातंत्र्य असे असावे की तेथे मन निर्भय म्हणजे भयशून्य असावे. गर्वाने माथा सदैव उन्नत हवा. जिथे भीती असते, लाचारी असते, तिथे माना खाली असतात. माझा देश स्वातंत्र्याचा असा मुक्त स्वर्ग हवा. अशा वातावरणात माझा देश जागृत व्हावा.
हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा
ज्ञान हे मुक्त असले पाहिजे, त्यावर कोणतीही बंधने नकोत. ते सर्वांना हवे, सर्वांसाठी हवे. त्या ज्ञानाला नियम, मर्यादांच्या भिंती घालून त्याला संकुचित करता उपयोगी नाही. आज निरनिराळ्या भिंती घालून आपण जगाचे म्हणजे पर्यायाने माणसांचे विभाजन केले आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत इ. अनेक गोष्टींनी माणसामाणसातील मुक्त संबंधाच्या नात्यांना शृंखलांमध्ये बांधून ठेवले आहे. रवींद्रनाथांना कोणतीही बंधने नसलेले मुक्त जग अपेक्षित होते. अर्थातच मुक्त म्हणजे चांगल्या अर्थाने. कारण जेथे हक्क असतात, तेथे कर्तव्यही अपेक्षित असते. पसायदानात ज्ञानेश्वर माउलींना जी संतांची मांदियाळी अपेक्षित आहे, तशीच इथे रवींद्रनाथांना असावी.
गर्भातूनी सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता
जे काही बोलले जाईल त्याला सत्याचा आधार असावा. त्यातूनच शब्दांना सौंदर्य प्राप्त व्हावे. सत्याचा आधार नसलेले शब्द म्हणजे केवळ पोकळ शब्दांचे बुडबुडे. जेव्हा रवींद्रनाथांना अपेक्षित असलेला स्वातंत्र्याचा स्वर्ग या भूमीवर अवतरेल, तेव्हा त्यात सत्य, शिव आणि सुंदर ही मूल्यं असतीलच. अशा या जगात शब्द जेव्हा सत्याचा आधार घेऊन येतील, तेव्हा ते सुंदरच असतील यात शंका नाही.
अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता
अशा स्वातंत्र्याचा स्वर्ग असलेल्या या जगात मानव सततच्या प्रयत्नांनी परिपूर्णतेकडे वाटचाल करील. परिपूर्णतेचा ध्यास त्याला असेल. त्यासाठी अविश्रांत मेहनत, परिश्रम तो करील. त्यातूनच तो स्वतःला आणि भोवतालच्या जगाला सुंदर आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न करील.
रूढींना नाही थारा, विचारी अखंड निर्मलता
या जगात निरर्थक, जुनाट झालेल्या रूढी परंपरांना थारा असणार नाही. त्यातील अयोग्य, अमंगल असलेले टाकून चांगले तेवढे स्वीकारार्ह असेल. अंधानुकरण, वाईट विचारांना थारा नसेल. नदीच्या पात्रात घाण, गाळ अडकला की तिची प्रवाहितता खंडित होते, पाणी दूषित होते. पण तो गाळ, ती घाण काढून टाकली की पाणी पुन्हा निर्मळ आणि प्रवाही होते. त्याचप्रमाणे एकदा का हे वाईट, अमंगल, रुढींचे अंधानुकरण करणारे विचार काढून टाकले की निर्मळ विचारांचा प्रवाह अखंड वाहू लागेल.
तव प्रेरणेमुळे ही नव-उन्मेषी व्यापकता
रवींद्रनाथ परमेश्वराला म्हणतात, अशा या जगात तुझ्या कृपेने, प्रेरणेने आमचे विचार आणि कृती सतत विशाल आणि उदात्त होत जातील. म्हणजे जे काही आमच्या हातून निर्माण होईल, ते सुंदर आणि उदात्तच असेल. अखिल मानवजातीच्या हिताचे असेल.
रवींद्रनाथ आपल्या कवितेची सुरुवात where या शब्दाने करतात. शेवटची ओळ वगळता कवितेच्या सगळ्या ओळींची सुरुवात याच ' where ' शब्दाने झालेली आहे. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा स्वर्ग म्हणजे अशी जागा, असा देश अपेक्षित आहे, की जिथे त्यांनी प्रत्येक ओळीत अपेक्षिलेल्या गोष्टी असतील. आणि शेवटच्या ओळीत परमेश्वराला प्रार्थना आहे की, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजेच हे परमेश्वरा, माझा देश असा स्वातंत्र्याचा स्वर्ग होऊ दे अशी प्रार्थना ते त्याला करतात. ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात विश्वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी जे मागणे मागितले आणि शेवटी विनंती केली की
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ।।
अगदी तशाच प्रकारचे मागणे रवींद्रनाथांनी देवाकडे केले आहे. शब्द वेगळे असतील, पण अंतरीच्या भावना त्याच आहेत. म्हणूनच या कवितेत ते शेवटी परमेश्वराला विनंती करतात
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.
असा स्वातंत्र्याचा स्वर्ग आपला देश व्हावा अशी रवींद्रनाथांसोबत आपणही परमेश्वराकडे प्रार्थना करू या. निदान त्या दृष्टीने प्रयत्न करू या. त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करू या.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
५/१०/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा