मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थ नवा

 उगवतीचे रंग 


अर्थ नवा... 


एका प्रसन्न सकाळी घरासमोरील बागेत मला जास्वंदीच्या झाडावर एक सुंदर फुल उमललेलं दिसलं. ते जणू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतं. मी थोडावेळ तिथंच थांबलो. त्या फुलानं माझ्या विचारांना गती दिली. ते विचार तुमच्यासमोर मांडतोय. रचना म्हटली तर गद्यात, म्हटली तर पद्यात. पण रचनेपेक्षा मनातील भाव महत्वाचा, काहीसा काव्यात्मकच ! 


अर्थ नवा.. 


हे फुला, तू इतका सुंदर उमलला आहेस की 


असं वाटतं तुझ्यापासून क्षणभरही दूर जाऊ नये. 


किती लालभडक रंग तुझ्या त्या पाकळ्यांचा !


पाकळ्यांची नाजूकता तरी केवढी ! 


जणू उलगडलेली रेश्माची लडी !


सांगशील का मला तुझ्या जन्माचे रहस्य 


आलास तू कुठून कसा, घेऊन हे सुहास्य ?


फांदी हिरवी, पाने हिरवी, खोड सावळ्या रंगाचे 


तरी लाभले कुठून तुला रे हे लेणे प्रसन्न वर्णाचे ? 


काल पाहिली तुझ्याच जागी नाजूक एक कळी ती कोमल. 


कळी कसली ती ?  मजला वाटे एक चिमुकली गोड परी.


हिरवे हिरवे वस्त्र तिचे अन् ओठांवरती नाजूक लाली. 


ऐकले होते कधी कुठे मी, जीवनात अपुल्याही येते परी 

आणि जाताना देऊन जाते भेट तिची सुंदर न्यारी.


तशीच ही कळी परी भेटली होती मजला, 


पण कसे कोण जाणे ओळखले होते मी तिजला. 


परी आली आणि गेली सकाळी कुठेतरी पळून 


पण जाताना गेली जागी तिच्या सुरेख लाल पुष्प ठेवून. 


काय दिले होते त्या गोड परीने मला ? 

 जणू मला ती सांगून गेली, सल्ला लाख मोलाचा एक भला.


 आयुष्य असतं अल्प, एक दिवसाचं देणं 

म्हणून का सोडायचं असतं आतून उमलून येणं ? 


अरे, येतच असतात जीवनात वारा वादळं 

संघर्षातच असते जीवन, घे समजून सगळं. 


जीवन म्हणजे असतो उत्सव 

निमंत्रण त्या निर्मात्याचं 

सामील व्हावे हसत खेळत

करण्या सार्थक जन्माचं.  


डोळे उघडून जरा पहा मजकडे 

नसे सुगंध वा रूप देखणे मजपाशी 

कधी असते भुईवर, कधी गजाननाच्या पायाशी. 


फिकीर मजला नसे जराही 

अनिश्चित त्या भवितव्याची.  

ऐक ऐक जरा तुला म्हणून सांगते,

अंतरीचे भाव तुझ्याजवळ मांडते. 


जे जवळी आहे अपुल्या, यावे त्यातच पूर्णपणे उमलून 

जगणं व्हावे इतके सुंदर की द्यावं आयुष्य उधळून ! 


दुःख ठेवूनी अंतर्यामी, वाटत जावी हास्यफुले 


अर्थ जगण्याचा असे नवा हा धरून मनी तू चाल पुढे.  


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 


३/१०/२०२४


प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२


( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...