मुख्य सामग्रीवर वगळा

मुंगीताई मुंगीताई…

 

मुंगीताई मुंगीताई


मुंगीताई मुंगीताई थांब ना थोडं

सोडवतेस का जरा मला पडलेलं कोड

एवढासा जीव, एवढेसे पाय 

जातेस कुठं, तुझं काम तरी काय  ? ।। १ ।। 


जायचं असो कुठेही 

खाली अथवा वर 

कशाची नाही फिकीर 

चालतेस किती भरभर ! ।। २ ।।


भिंतीवरून चालताना, छतावरून पळताना 

तू पडत नाहीस कशी ? 

खाली पडण्याची भीती 

तुला अजिबात नाही कशी ? ।। ३ ।।


जाताना शाळेत तू दिसली नाहीस कधी 

पण शिस्त पाळण्याची घाई तुला आधी. 

कितीही असो गर्दी, कितीही असो घाई 

रांगेची शिस्त तू कधी मोडतच नाही. ।। ४ ।।


दिवस असो वा रात्र,  नाही तुला विश्रांती 

दीर्घोद्योगानेच होते का जीवनात क्रांती ? 

ऐकून सारे प्रश्न माझे 

मुंगीताई थांबली क्षणभर. ।। ५ ।।


म्हणाली, ऐक बाळा, अरे जीवन हीच आमची शाळा. 

जीव असला छोटा, तरी पाळतो आम्ही शिस्त 

कार्यरत राहण्यावरच असते आमची भिस्त. 

उद्योगातच जगणे रमणे, जीवन आमचे मस्त ! ।। ६ ।।


कणाकणाने करतो संचय, क्षणक्षणाचा करून वापर 

आयुष्याचे सूत्र असे हे, व्यर्थ न दवडा कण वा क्षण 

जगणे म्हणजे असे लढाई, प्रति क्षण प्रति क्षण 

धैर्याने लढा लढाई, सफल होतसे तरीच जीवन.  ।। ७ ।।


वारूळ म्हणजे घर आमचे 

राहतो असतो जमिनीखाली 

बोलत होती मुंगीताई, एवढ्यात हाक ती आली 

अग चिंगे, थांबलीस कुठे, जायचं ना खाली ?  ।। ८ ।।


एवढं बोलून मुंगीताई गेली सुद्धा भराभरा 

पण सांगून गेली मला जाताना,  तिच्या जीवन जगण्याची तऱ्हा. 

ठरवून टाकलं मीही आता,  राहावे कार्यरत नित्य निरंतर 

शिस्त आणि उद्योगाला  कधीच नाही द्यायचे अंतर. ।। ९ ।। 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१७/९/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया कविता नावासहित अग्रेषित करावी ) 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...