उगवतीचे रंग
जे तुझ्याचसाठी होते...
काही गाणी मनाला स्पर्शून जातात. तसेच हे गीत. ' जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले, वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले. ' परवा सहज रेडिओ लावला आणि हे गीत कानावर पडले. यापूर्वीही मी हे गाणं ऐकलं होतं. पण ते पुन्हा खूप दिवसांनी ऐकायला मिळालं. पूर्वी मला त्यातली न जाणवलेली गोडी, आर्तता, तरल भावना सगळं सगळं काही मनाला स्पर्शून गेलं. मंगेश पाडगावकरांची ही अवीट गोडीची रचना. त्या शब्दांना जिवंत केलं आहे उषा मंगेशकर यांनी. या गीताला संगीताची सुरेल साथ आहे संगीतकार विश्वनाथ मोरे यांची.
कविता नसती तर मानवी जीवन किती निरस झाले असते ? या अशा सुंदर गीतातून स्रवणारा मकरंद कधी चाखायला मिळाला असता ? गीत आणि संगीत आणि साहित्य म्हणजे मानवाला मिळालेलं दैवी वरदानच आहे. एका उच्च प्रकारच्या आनंदाची अनुभूती देण्याचं सामर्थ्य त्यात आहे. मानवी भावना, जाणिवा समृद्ध करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. ' वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले...' या गीताचे शब्दच फार गोड आहेत. कधी कधी आपल्याला खूप आवडणारी एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते. आपण नकळतच अशा व्यक्तीवर प्रेम करायला लागतो. पण अशा व्यक्तीला त्याची खबरबात सुद्धा नसावी ? ही प्रीती ( प्रेमापेक्षाही आणखी सुंदर तरल भावना हा शब्द व्यक्त करतो ) अबोल असते. व्यक्त करता येत नाही. सगळ्यांना सांगता येत नाही. यात असते ते केवळ समर्पण ! हृदयातील देव्हाऱ्यात मांडलेली आपल्या देवाची अबोल पूजा. पहिल्या दोन ओळीत ती विरहिणी आपली व्यथा मांडते, ते शब्द इतके बोलके आहेत की हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत.
जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले.
एखादं फुल परमेश्वराच्या चरणीच अर्पण होण्यासाठी उमलावं. तेच त्याचं जीवनध्येय आणि जीवनातील इतिकर्तव्यता असावी. तशीच ही एकतफी, अबोल प्रेम करणारी प्रेयसी. जणू तिचा जन्मच त्याच्यावर प्रेम करण्यासाठी झाला ! त्याला त्याची जाणीव असो वा नसो, ती त्याच्यावर प्रेम करत राहणार. ती म्हणते, ' वाटेत तुझ्या मी फुल ठेवुनी गेले ' हे फुल म्हणजे तिच्या हृदयाचं प्रतीक.
पुढे ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते
रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दूर एकटी, माझे डोळे ओले...
त्या प्रसिद्ध व्यक्तीवर ज्याच्यावर तिचे मनापासून प्रेम आहे, त्याचं जीवन ऐश्वर्यसंपन्न आहे. त्याची वाटचाल, त्याचा मार्ग वेगळाच आहे. त्या मार्गावर सगळेच त्याचा जयघोष करताहेत. हिच्याकडे लक्ष कसे जाणार ? ती तर दूर एकटी एका कोपऱ्यात उभी आहे. जिने आपल्या जीवनाचं फुल त्याच्या पायी ठेवलं, त्याला त्याची जाणीव नाही. जाणीव होण्याचीही शक्यता नाही. या तिच्या अबोल भावना त्याच्यापर्यंत कशा पोहोचणार ? तिच्या डोळ्यात पाणी आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना ती म्हणते
त्या फुलासारखीच अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा माझ्या या हृदयात
नच ओठांवरती नाव तुझे कधी आले
फुल काही बोलते का ? त्याला तर फक्त समर्पण माहिती असते. आपल्या पूर्ण शक्तीनिशी, सौंदर्य लेवून ते उमलते, ते अर्पण होण्यासाठीच. तशीच प्रीतीची अबोल पूजा या विरहिणीच्या मनात सुरु आहे. ज्याच्यावर ती प्रेम करते, ती एवढी प्रसिद्ध, मोठी व्यक्ती आहे की आपल्या ओठांवर त्याचे नावही ती कधी घेऊ शकत नाही.
या कवितेच्या शेवटच्या कडव्यात ती म्हणते
तुज कसे कळावे ? देवा नाही कळले !
मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे हृदय ठेवुनी गेले.
माझी अबोल प्रीत तुला कशी समजावी ? माझ्या अंतरीच्या या भावना तुझ्यापर्यंत कशा पोहोचाव्या हे मलाच समजले नाही. मी मात्र दूरच, एकाकी. मी कशी आहे ? त्यासाठी कवीने फार सुंदर शब्द योजला आहे. ' अलक्षित ' हा शब्द खूप काही सांगून जातो. अबोल प्रीत, अबोल पूजा, अबोल समर्पण आहे. आपल्या प्रीतीचं उघड, बोलकं प्रदर्शन तिला करता येत नाही. कदाचित म्हणूनच ती ' अलक्षित ' आहे. पण तिचा समर्पण भाव ? तो अनमोल आहे. त्याची किंमत करता येणार नाही. म्हणून ती फक्त आपल्या प्रीतीचं फुल त्याच्या वाटेवर ठेवून त्यात धन्यता मानणारी आहे.
या गीतात दुसराही एक अर्थ आहे. या गीतात जशी अबोल प्रीत दडलेली आहे, तशीच परमेश्वरावरील अबोल भक्ती सुद्धा. त्याची अबोल पूजा तिच्या हृदयात आहे. तिच्या हृदयाचं फुल तिनं त्याला अर्पण केलं आहे. ते केवळ त्याच्यासाठीच फुललं आहे. समर्पणभाव असाच असतो. त्याला फक्त देणं माहिती असतं. परतीची अपेक्षा नसते. अशा या सुंदर, तरल भावना मंगेश पाडगावकरांनी आपल्या शब्दातून मांडल्या आहेत. उषा मंगेशकरांनी त्या शब्दातील आर्तता, भावना जणू जिवंत केल्या आहेत. एक अजरामर असं भावगीत रसिकांना त्यांनी जणू अर्पण केलंय.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२६/०४/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा