मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग संगीतकार मदन मोहन

 उगवतीचे रंग 

संगीतकार मदन मोहन 

गझलोका बादशहा असे बिरुद सार्थपणे मिरवणारा संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन. मदन मोहन यांनी तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्याकडून अनेक अविस्मरणीय अशा गझला गाऊन घेतल्या आहेत. पुर्वाश्रमात एक सैनिक असलेल्या मदन मोहन यांच्या भाग्यात एक सुप्रसिद्ध संगीतकार होण्याचे संकेत नियतीने आधीच दिले होते. बंदूक हाताळणाऱ्या हातांना वाद्ये वाजवणे अधिक आवडत होते. संगीताची जाण आणि आवड रक्तातच घेऊन हे बाळ जणू जन्मले होते. २५ जून १९२४ मध्ये बगदाद मध्ये त्यांचा जन्म झाला. 

मदन मोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली  हे बॉंबे टॉकीजचे मालक होते. पण फिल्मिस्तान मध्ये असलेल्या या पित्याला आपला पुत्र मात्र या क्षेत्रात यावा असे अजिबात वाटत नव्हते. पण नियतीच्या मनात या त्यांच्या मुलाला सर्वोत्कृष्ट संगीतकार करण्याचे जणू ठरलेलेच होते.  हा ' बडे बापका बेटा ' नंतर आपण निवडलेल्या मार्गानेच गेला. तो ही ' बडा ' झाला पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर. एक संगीतकार, गझलांचा बादशहा म्हणून त्याने जो लौकिक मिळवला, तो भल्याभल्यानाही अप्राप्य होता. 

सुरुवातीला मदन मोहन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन वर्षे सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून नोकरी केली. पण मनातली संगीताची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. लष्करातल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते लखनौ आकाशवाणीवर सहायक म्हणून काम करू लागले. या ठिकाणी त्यांचा परिचय बेगम अख्तर, उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, तलत महमूद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी आला. मदन मोहन यांनी तसं पाहिलं तर शास्त्रीय संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण आकाशवाणीवरील कार्यक्रमांना ते संगीत देऊ लागले. याच काळात शास्त्रीय संगीतातील राग, बंदिश, गजला इ मधील बारकावे त्यांनी सहज निरीक्षणातून आत्मसात केले. त्यांचा आवाजही चांगला होता. याच काळात त्यांनी आपल्या आपल्या आवाजात काही गजल ध्वनिमुद्रित केल्या.

काही काळाने त्यांनी आपल्या आकाशवाणीवरील नोकरीचाही राजीनामा दिला आणि संगीत क्षेत्रात आपलं असं वेगळं काहीतरी करून दाखवावं असं त्यांच्या मनानं घेतलं आणि ते मुंबईला आले. मरीन लाईन्स ला त्यांच्या घराजवळ प्रख्यात अभिनेत्री नर्गिस हिची आई आणि त्या काळातील प्रसिद्ध गायिका जद्दनबाई यांचे घर होते. मदन मोहन रोज संध्याकाळी जद्दनबाईंची गाणी ऐकायला जात असत. त्यांची संगीतविषयक जाण आणि आवड तिथे आणखी विकसित झाली. मदनमोहन म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते. क्रिकेट, टेनिस यासारख्या खेळांची त्यांना प्रचंड आवड होती. आपल्या हाताने उत्तम स्वयंपाक करणे, निरनिराळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे याचीही त्यांना आवड होती. 

 प्रख्यात संगीतकार गुलाम हैदर यांच्या सांगण्यावरून त्यांनी लतादीदींसोबत एक युगलगीतही गायलं. पण दुर्दैवाने या गीताचा चित्रपटात समावेश होऊ शकला नाही. पण त्याच वेळेला लतादीदींच्या आवाजाने ते प्रभावित झाले होते. पुढे त्यांनी संगीत दिलेला ' आँखें ' हा पहिला चित्रपट आला. पण  इच्छा असूनही काही कारणांमुळे दीदींना त्यातील गीतं गाता आली  नाहीत. पण त्यानंतर मदन मोहन दीदींकडे गेले. त्यांना त्यांनी म्हटलं, ' आपण म्हटलेलं पहिलं गाणं भावाबहिणाच्या नात्याचं होतं, आपण आता यापुढे भाऊ बहीण म्हणूनच राहू या. ' दीदींनी आनंदाने होकार दिला. मदन मोहन दिदींचे प्रिय मदन भैय्या झाले. दोघांनीही आयुष्यभर हे नातं जपलं. चित्रपट सृष्टीच्या मोहमयी, बेगडी दुनियेत असं निखळ, शुद्ध प्रेमाचं नातं जपणाऱ्या व्यक्ती अभावानेच आढळतील. रक्षाबंधनाच्या दिवशी मदन मोहन न चुकता दीदींकडे जात असत. 

संगीतकार मदन मोहन यांच्याबरोबर लतादीदींनी त्यांची सर्वोत्कृष्ट गाणी गायली आहेत असं म्हटलं जातं. मदन मोहन यांच्यासोबत गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या २१० आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ' आपकी नजरोनें समझा प्यार के काबील मुझे..' या अनपढ चित्रपटातल्या गाण्याचा हा किस्सा आहे. ' अनपढ ' चित्रपटातील एका गाण्यासाठी मदन मोहन अनेक महिने रियाज करत होते. चाल लावण्याचा प्रयत्न करत होते. मोहन कुमार हे या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांना काही केल्या या गीताची चाल पसंत पडेना. शेवटी गीतकार राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन यांनी केवळ दहा मिनिटात एक गाणे तयार केले. आणि ते गाणं होतं ' आपकी नजरोनें समझा ...' या गाण्यानं लोकप्रियतेचा कळस गाठला. लतादीदींना या गाण्यासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळालं. ज्यांच्या व्यक्तिमत्वाला दैवी प्रतिभेचा परिसस्पर्श झाला आहे अशी ही सगळी मंडळी..!  जे हातात घेतलं, त्याचं सोनंच केलं. महान संगीतकार नौशाद यांनी मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताबद्दल म्हटलं होतं, ' ये गीत अगर मुझे मिल जाए तो इस गीत पर मेरा सारा संगीत न्योछावर हैं . ' याचाच अर्थ मदन मोहन यांचं संगीतकार म्हणून असलेलं मोठेपण त्यांनी मान्य केलं होतं. 

मदन मोहन हे गजलांचे सर्वश्रेष्ठ कम्पोजर मानले जातात. संगीतविश्वातील महान संगीतकार देखील त्यांचं हे मोठेपण मान्य करतात. त्यातील नौशाद यांचं उदाहरण वर आलेलंच आहे. संगीतकार खैय्याम त्यांच्याबद्दल म्हणतात, ' संगीतातील साऱ्या विविधतांचे त्यांना ज्ञान होते. त्यांच्या संगीत रचना म्हणजे श्रोत्यांसाठी अनमोल खजिनाच ! ' लतादीदी तर त्यांना ' गजलोंका बादशहा ' म्हणत. लतादीदींबरोबर त्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा गजल आहेत. १९५८ मध्ये आलेल्या ' अदालत ' चित्रपटातील ' यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिये...' या गीताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ' अनपढ ' मधील ' आपकी नजरोनें समझा ...', ' हैं इसीमे प्यार की आबरू..' या सारख्या गजल कोण विसरू  शकेल  ? ' मेरा साया ' मधील ' नैनो में बदरा छाये...', तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..' ही गाणी तर  ब्लॉकबस्टर ठरली. १९६७ मध्ये एकदा दीदींना विचारलं गेलं की त्या वर्षी त्यांनी गायिलेली सर्वोत्कृष्ट गाणी कोणती ? त्यांनी ज्या गाण्यांची नावं सांगितली त्यात दोन गाणी फक्त एकाच संगीतकाराची होती. ती दोन गाणी होती, ' लग जा गले के फिर ये हंसी रात ..' आणि ' बैरन नींद न आये..' ही गाणी होती मदन मोहन यांची. अन्य संगीतकारांच प्रत्येकी एखादे दुसरे गाणे होते. 

' वो कौन थी ' मधील ' लग जा गले के फिर ये हसीं रात ... ' आणि  ' नैना बरसे रिमझिम रिमझिम...' या गाण्यांनी तर लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्यांसाठी रसिकांनी चित्रपट डोक्यावर घेतला. दीदींचा गोड कोवळा आवाज एखाद्या प्रेमिकेला साजेसा होता. काही रसिक तर गमतीने असं म्हणू लागले की पडद्यावरील भुतांना सुद्धा लताचाच आवाज चालतो. दुसरा आवाज त्यांना सुटच होत नाही. या अप्रतिम गीतांबद्दल मदन मोहन यांना फिल्मफेअर वा अन्य पुरस्कार मिळणे अपेक्षितच होते. पण दुर्दैवाने तो मिळाला नाही. मदन मोहन हे अत्यंत स्वाभिमानी होते. कोणापुढे पुरस्कारासाठी झुकणे वा लाचार होणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ते आपल्या पुढील कामात गढून गेले. लतादीदींनी त्यांना फोन केला आणि म्हणाल्या, ' मदन भैय्या, ' वो कौन थी ' ची गाणी इतकी सुंदर झाली की तुम्हाला पुरस्कार मिळेलच असे मला वाटले होते. ' त्यावर मदन मोहन उत्तरले, ' माझ्या दीदीला असं वाटलं ना की मला पुरस्कार मिळायला हवा होता, मग मला मिळाला. अन्य पुरस्काराची जरूर नाही. ' 

रेडिओ लखनौवर काम करताना मदन मोहन यांचा संबंध बरकत अली आणि बेगम अख्तर यांसारख्या गायकांशी आला होता. त्यांच्या शैलीचा प्रभाव मदन मोहन यांच्यावर होताच. ' मैने रंग दी आज चुनरिया ', ' जिया ले गयो जी मोरा सांवरिया ', नैनों मी बदरा छाये ' या सारख्या गाण्यांवर बरकत अलींचा प्रभाव दिसून येतो. तर ' उनको ये शिकायत हैं ', आज सोचा तो आंसू भर आये ', आपकी नजरोने समझा ', हैं इसीमे प्यार की आबरू ', हम प्यार में जलने वालों को..' या गाण्यांवर बेगम अख्तर यांच्या गायकीचा प्रभाव दिसून येतो असं म्हटलं जातं. त्यांच्या ' भाई भाई ' या चित्रपटातील 'कदर जाने ना...' या गीताने तर बेगम अख्तर इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी दूरध्वनी ( तेव्हा ट्रंककॉल ) करून मदन मोहन यांचे अभिनंदन केले. 

मदन मोहन हे आपल्या गाण्यांबद्दल आणि संगीताबद्दल आग्रही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांची मते ठाम असत. लैला मजनू या चित्रपटात ऋषी कपूरसाठी किशोरकुमार यांचा आवाज वापरावा यासाठी सगळे आग्रही असताना या चित्रपटातील गीते मोहम्मद रफीच गातील आणि त्या अटीवरच मी संगीत निर्देशन करीन असे त्यांनी सर्वांना ठणकावून सांगितले. आणि पुढे खरोखरच लैला मजनू या चित्रपटाची गीते सुपरहिट ठरली. 

लतादीदी आणि मदन मोहन यांचे भावाबहिणीचे नाते मदन मोहन यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिले. वीर झारा हा यश चोपडांचा चित्रपट २००४ मध्ये आला. मदन मोहन यांचे निधन १४ जुलै १९७५ ला झाले. वीर झारा चित्रपटात एकूण अकरा गाणी आहेत. त्यातील आठ गाण्यांना लतादीदींचा आवाज आहे. या गाण्यांना संगीत आहे मदन मोहन यांचे ! आश्चर्य वाटलं ना... ! तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे ? मदन मोहन गेल्यानंतर चक्क तीस वर्षांनी त्यांचं संगीत ? होय, पण हे खरं आहे. मदन मोहन यांनी त्यांना सुचलेल्या शेकडो धून टेपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्यांचा मुलगा संजीव कोहली याची इच्छा होती की आपल्या वडिलांनी अशा एखाद्या चित्रपटाला संगीत द्यावे की ज्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे महान कलाकार असतील. पण मदन मोहन असताना त्याची ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. यश चोपडा जेव्हा नवीन चित्रपट निर्मिती करत आहेत हे त्याला समजले, तेव्हा तो आपल्या पित्याच्या रेकॉर्ड केलेल्या काही धून, रचना घेऊन त्यांच्याकडे गेला. त्यांना त्या ऐकवल्या. त्यांनाही त्या पसंत पडल्या. त्यातील काही रचनांचा वापर त्यांनी या चित्रपटात केला. या चित्रपटातील गाण्यांसाठी मदन मोहन यांना मरणोत्तर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मदनभैय्याना पुरस्कार मिळावा अशी दिदींची इच्छा होती. ती अशा प्रकारे पूर्ण झाली. या चित्रपटात दीदींच्या आवाजातील गाणी अशी आहेत ' तेरे लिये..', ' दो पल ..', ' तेरे कुर्बान जावा ', तुम पास आ रहे हो..', ' ऐसा देस हैं मेरा..', ' हम तो भाई जैसे है..', ' जाने क्यों ..', ' ये हम आ गये ..'

तसं तर मदन मोहन आणि लतादीदींची सगळीच गीते गाजलेली आहेत. पण काही गीते नमुन्यादाखल या ठिकाणी आपण पाहू -
बैरन नींद न आये.. ( चाचा झिंदाबाद )
सपने में सजन से दो बातें ( गेट वे ऑफ इंडिया )
उनको ये शिकायत हैं  ( अदालत )
हम प्यार में जलने वालों को ( जेलर )
मेरी आँखोंसे कोई नींद .. ( पूजा के फुल )
आपकी नजरोनें समझा ( अनपढ )
वो भुली दास्तां ( संजोग )
जरा सी आहट होती हैं  ( हकीकत )
वो चूप रहे तो.. ( जहाँआरा )
त्यांची काही युगल गीतं पण नमुन्यादाखल - 
प्रीतम दरस दिखाओ  ( चाचा झिंदाबाद ) मन्ना डे यांच्यासोबत 
तेरी चमकती आँखों के आगे ( छोटे बाबू ) तलत महमूद 
ऐ सनम आज ये कसम खाये ( जहाँआरा ) तलत महमूद 
तेरी आँखो के सिवा ( चिराग ) मो. रफी 
दिल ढुंढता हैं ( मौसम ) भूपेंद्र 
दो घडी वो पास बैठे ( गेट वे ऑफ इंडिया ) मो. रफी 

मदन मोहन यांनी तलत महमूद यांच्याकडून पुढील अजरामर गीते गाऊन घेतली. ' फिर वही शाम वही गम वही तन्हाई है, मै 'तेरी नजरोंका सुरूर हूं, 'तेरी आंख के आंसू, हम से आया न गया. तर मो. रफी या गुणी गायकाकडून ' एक हसीन शाम को, किसी की याद में, आपके पहलु में आ कर, तेरे दर पे आया हूं. ये दुनिया ये महफिल, 'तेरी आंखो के सिवा , कर चले हम फिदा या सारखी अप्रतिम गाणी गाऊन घेतली. तर मन्ना डे यांनी त्यांच्या संगीत निर्देशनात ' कौन आया मेरे मन के द्वारे, तुम बिन जीवन कैसा जीवन यासारखी गाणी गायिली. दिल की राहे या चित्रपटातील त्यांचे लतादीदींनी गायिलेले ' रस्मे उल्फत के निभायें ' हे तर रसिकांनी डोक्यावर घेतले. मो. रफी, मन्ना डे, तलत महमूद आणि भूपेंद्र या चार गायकांनी गायिलेले ' होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा...' हे हकीकत चित्रपटातील गाणे तर चित्रपट रसिकांचे अतिशय आवडते झाले. 

या गुणी संगीतकाराने १४ जुलै १९७५ रोजी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या गीतांच्या रूपाने ते कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/७/२०२३
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 
 


One attachment • Scanned by Gmail
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...