तुम पुकार लो...
' तुम पुकार लो...'हे गीत कानावर पडलं की आठवण येते ती सदाबहार गीते देणाऱ्या हेमंतकुमारची. या आवाजात एक वेगळाच गोडवा आणि खुमारी आहे. साथ सत्तरच्या दशकात हेमंतकुमारच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. बीस साल बाद, खामोशी, नागीन, कोहरा यासारख्या त्यांच्या चित्रपटातील गाण्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. एखाद्या कार्यक्रमात एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला गायला सांगितले तर हेमंतकुमारांच्या चित्रपटातील गाणी त्यांच्या सहजच ओठांवर येत. अशी प्रचंड लोकप्रियता मिळवणारा संगीतकार आणि गायक विरळा.
त्या काळात तरुण गायकांवर त्या वेळच्या प्रसिद्ध गायक असलेल्या कुंदनलाल सैगल यांचा जबरदस्त प्रभाव होता. कोणत्याही गायकाला आपण के एल सैगल यांच्यासारखे गावे , त्यांच्यासारखी लोकप्रियता मिळवावी असे वाटत असे. हेमंतकुमार देखील त्याला अपवाद नव्हते. साधारणपणे चाळीसच्या दशकात हेमंतदा मुंबईत आले आणि त्यांची भेट झाली ती प्रख्यात संगीतकार नौशाद यांच्याशी. सैगल यांचा प्रचंड प्रभाव असलेल्या हेमंतदा यांनी काही गाणी नौशाद यांना म्हणून दाखवली. हेमंतदा यांच्या गायकीवर नौशाद फिदा झाले आणि त्यांनी लगेच त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी दोन गाणी गाऊन घेतली. ' शबाब ' चित्रपटातलं ' चंदन का पलना रेशम की डोरी ' आणि ' इन्साफ की डगर पे‘ बच्चों दिखाओ चलके...’ हे ‘
१६ जून १९२० रोजी जन्मलेल्या हेमंतदांचे बालपण बंगालमधील एका खेडेगावात गेले. संगीताची आवड हेमंतदांच्या रक्तातच होती. लहानपणी गावात येणारी नाटके, संगीताचे, लोकगीतांचे कार्यक्रम म्हणजे त्यांच्यासाठी मेजवानीच असायची. अभ्यासात उत्तम गती असलेल्या हेमंतदांनी कोलकात्यात इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. साहित्य क्षेत्रातही त्यांना रस होता. नाटक, कथा, कविता लेखनही त्यांनी केले. पण संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. ईश्वरदत्त प्रतिभेमुळे संगीत आणि गाणं त्यांच्या रोमारोमात होतं. शिक्षणात त्यांचं मन लागेना. संगीताच्या वेडापायी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि आपलं आयुष्य संगीतासाठी वाहून घ्यायचं ठरवलं. असं कुठलं तरी वेड डोक्यातघेतलेली माणसेच आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. हेमंतदांचा हा संगीताला आपले आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय योग्य ठरला हे पुढे काळाच्या कसोटीवर त्यांनी सिद्ध केलं. हेमंत मुखोपाध्याय आपल्या पुढील आयुष्यात रसिकांचा लाडका हेमंतकुमार, हेमंतदा बनला.
संगीत जरी हेमंतदांच्या रोमरोमात होते आणि ईश्वरदत्त प्रतिभेची देणगी लाभली होती, तरी पुढील वाटचालीसाठी शास्त्रीय संगीत शिकणे आवश्यक होते. उस्ताद फैयाज खान यांच्या शिष्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीताचा साज चढवला. गायक म्हणून गाणीही गायली. हेमंतदांच्या तोडीचा कोणी गायक बंगाली चित्रपटसृष्टीत झाला नाही असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. मुंबईला सुप्रसिद्ध संगीतकार यांच्या सहवासात आल्यावर हेमंतदांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवायला सुरुवात केली. जन्मजात संगीत आणि गायकीची प्रतिभा लाभलेले हेमंतदा आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीत लवकरच एक प्रतिष्ठित संगीतकार म्हणून उदयास आले.
त्यांनी गायिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी तरुणाईच्या मनात रुंजी घालत असत. त्या गीतांमध्ये तरुणाईला जणू आपल्याच प्रेमाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत असे वाटे. तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है..., जाने वो कैसे लोग थे..., ये नयन दरे दरे, ना तुम हमे जानो यासारखी त्यांची गाणी तरुणाईच्या ओठांवर होती. ' तुम पुकार लो ...' या गाण्याची सुरुवात हेमंतदांनी ' हमिंग साउंड ' ने केली आहे. ही त्यांची अनोखी सुरुवात कमालीची लोकप्रिय तर ठरलीच पण पुढे हेमंतदांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती हेमंतदांची ' सिग्नेचर स्टाईल ' बनली. ' ममता ' चित्रपटातलं त्यांनी लतादीदींबरोबर गायिलेले ' छुपा लो दिल में यूं प्यार मेरा...' हे गीतही रसिकांनी डोक्यावर घेतलं.
सुप्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांनी हेमंदांच्या गाणी आणि आवाजाबद्दल फार सुंदर उद्गार काढले आहेत. ते म्हणतात, ' परमेश्वराला जर कधी गायची इच्छाच झाली, तर तो हेमंतदांच्या आवाजात गाईल. ' लतादीदी हेमंतदांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या, ' हेमंतदांचं गाणं म्हणजे मंदिरात बसून एखादा साधू किंवा पुजारी गाणं गातो आहे असं वाटतं. असा हा भावविभोर करणारा पवित्र स्वर आहे ! ' थोडक्यात सांगायचं तर हा ईश्वरी आवाज आहे.
१९६२ सालची गोष्ट आहे. लतादीदी प्रचंड आजारी होत्या. त्यांना दीपथेरिया नावाचा घशाचा आजार झाला होता. त्यातून त्या बाहेर पडतील की नाही आणि बाहेर पडल्या तरी पुन्हा पूर्वीसारखे गाऊ शकतील की नाही अशी भीती लतादीदींसह सर्वांच्याच मनात होती. निर्मात्यांचे चित्रपट लतादीदींच्या गाण्यांआभावी रखडले होते. लतादीदींनी स्वतःशी गाऊन पाहिले. सूर तर चांगला लागत होता. पण चित्रपटगीत रेकॉर्ड होताना तो तसाच लागेल का, आपल्याला पुन्हा गाता येईल अशा अनेक शंका दीदींच्या मनात होत्या. अशा सुमारास हेमंतदा लतादीदींच्या घरी गेले. त्यांनी दीदींना धीर दिला आणि तुम्ही पुन्हा पहिल्यासारख्या गाऊ शकाल अशी हिंमत दिली. एवढेच नव्हे तर माईंना सांगीतले, ' मी दीदींना माझ्यासोबत स्टुडिओत घेऊन जातो आणि मी स्वतःच त्यांना परत घेऊन येईन. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. ' हेमंतदा दीदींना आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांनी दीदींना गायला सांगितलं. दीदी नेहमीप्रमाणे गायल्या. मग त्या म्हणाल्या, ' आता करायचं का गाणं रेकॉर्ड ? ' हेमंतदा म्हणाले, ' गाणं तर केव्हाच रेकॉर्ड झालंय दीदी. ' ते गीत होतं बीस साल बाद या चित्रपटातलं. ' कहीं दीप जले कहीं दिल...' हे गीत प्रचंड लोकप्रिय झालं.
१९४७ च्या सुमारास हेमंतदाना उत्तम ब्रेक मिळाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर ' आनंदमठ ' या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी हेमंतदांवर सोपवली होती. हेमंतदांनी या संधीचे सोने केले. या चित्रपटातील 'वंदे मातरम ' हे लतादीदींच्या आवाजातील गीत कमालीचे लोकप्रिय झाले. आजही हे गीत विशेष प्रसंगी खास म्हणून गायलं जातं. अंगावर रोमांच उभे करण्याची ताकद या गीतात आहे. गुरुदत्तनिर्मित ' जाल ' चित्रपटातील ' ये रात, ये चांदनी फिर कहाँ ..' हे त्यांचं गीत लोकप्रिय झालं. सोपवली. नंतर गुरुदत्त यांचा ' प्यासा ' चित्रपट आला. या चित्रपटातील त्यांनी गायिलेले ' जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला ' हे गीत रसिकांच्या ओठांवर खेळू लागले.
' नागीन ' चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली. त्यातील ' तन डोले मेरा मन डोले ...' या गाण्यातील पुंगीचा आवाज रसिकांचे मन मोहून गेला. पण खरं तर हा पुंगीचा आवाज नव्हता. ही हेमंतदांनी लढवलेली एक क्लुप्ती होती. त्यांच्या प्रतिभेचा एक अनोखा अविष्कार होता. क्ले व्हायोलिन वाजवणारे संगीतकार कल्याणजी आणि हार्मोनियमाच्या सुरांचे जादूगार मास्टर रवी यांच्याकडून त्यांनी ही संगीताची धून तयार करून घेतली होती. असे प्रयोगशील संगीतकार होते हेमंतदां. गुरुदत्त निर्मित ' साहिब, बीबी और गुलाम ' या चित्रपटाला हेमंतदांनी संगीत दिले आणि या चित्रपटाची गाणीही अफाट गाजली. या चित्रपटात त्यांनी गायिका आशा भोसले, गीतादत्त यांना संधी दिली. त्यांनीही त्या संधीचे सोने केले. त्या काळात संगीत आणि चित्रपट क्षेत्रात हेमंतदांइतका व्यस्त असणारा क्वचितच कोणी संगीतकार होता. हेमंतदाना बहुतेक वेळा कोलकाता ते मुंबई असा विमानप्रवास दररोज करावा लागे. एअर इंडियाने तर त्यांना ' डेली पॅसेंजर ' हा किताब बहाल केला होता.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा