उगवतीचे रंग
माणसं तशी चांगली असतात...
माणसं तशी चांगली असतात
थोडीफार वांगली असतात.
परवा माझ्या घराजवळून जाताना
दोन माणसं बोलत होती
ती कोणाबद्दल बोलत होती
त्याला कोणता संदर्भ होता
काहीच नव्हते मला ठाऊक.
एक जण दुसऱ्याला सांगत होता
' बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले
मी त्याला म्हटले तुला काही हवे का ? '
एवढेच शब्द माझ्या कानावर पडले
मी म्हटले खरेच आहे
दुसऱ्याचे अश्रू यांना दिसतात कारण
माणसे तशी चांगली असतात. ।। १ ।।
जगात वाईट वागणाऱ्यांची कमी नाही
तसे चांगले वागणारेही थोडे नाहीत
खरी गोष्ट एवढीच असते की
वाईट वागणाऱ्या माणसांनाही
त्यांचे वागणे मनातून खटकते
पण असला विचार ते दडपून टाकतात
नाहीतर माणसे तशी चांगली असतात. ।। २ ।।
महाभारतात श्रीकृष्णाने दुर्योधनाला
न्याय काय अन्याय काय खूप समजावले होते
दुर्योधनाला ते पटलेही होते
तो म्हणाला तू म्हणतोस ते पटते
पण मला तसे करण्याची बुद्धीच होत नाही.
स्वार्थामुळे त्यांचे निर्णय बदलत असतात
नाहीतर माणसं तशी चांगली असतात. ।। ३ ।।
धृतराष्ट्राला नेत्रहीन असेलही
भल्याबुऱ्याची जाण होती.
सगळ्या चांगल्या गोष्टी कळत असतात
आपल्या निर्णयाचे परिणामही दिसत असतात.
स्वार्थापोटी सगळ्या गोष्टी घडतात
मनातून त्यालाही पांडव प्रिय असतात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।।
सीतेला पळवून नेताना रावणालाही
आपल्या पापाची जाण होती
आपल्या अंतरातील आवाज
परस्रीची अभिलाषा वाईट हे ही त्याला ठावे होते
सगळे माहीत असूनही माणसे वाईट गोष्टी करतात
पण अंतरात कुठेतरी बोचणारे सल असतात कारण
माणसे तशी चांगली असतात.
भ्रष्टाचार करणाऱ्यांना सुद्धा
भ्रष्टाचार वाईट हे कळत असते.
कधी तरी पकडले जाऊ
भीती मनाला खात असते
देवधर्म, दानधर्म मग करतात
कारण माणसे तशी वाईट नसतात.
प्रत्येकाच्या मनात दुर्योधन असतो
तसा युधिष्ठिरही असतो
राम असतो तसाच रावणही असतो.
वाईट गोष्टी तेव्हाच घडतात
जेव्हा मनातल्या दुर्योधनाचे रावणाचे गुण
युधिष्ठिरापेक्षा, रामापेक्षा जास्त भरतात.
नाहीतर माणसे तशी चांगली असतात.
कोणाचे ऐकायचे कोणाचे नाही
सांगतो नेहमी आतला आवाज
वाईट गोष्टींचे एक मात्र असते
दिसायला ती सुंदर दिसते
सुंदर स्त्रीचे रूप घेऊन
भुलविणाऱ्या राक्षशिणीसारखी
ती तुम्हाला मोहात पाडते.
चांगल्या गोष्टी नसतीलही आकर्षक
कारण त्या वेष बदलून येत नाहीत
त्या करायला थोडे कष्ट पडतात
पण देतात खात्री
सुखी समाधानी आयुष्याची, शांत निद्रेची
श्रेयस आणि प्रेयस यातील त्याच गोष्टी
श्रेयस असतात बाकीच्या साऱ्या प्रेयस असतात.
माझा माणसांवर विश्वास आहे कारण
माणसे तशी चांगली असतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा