मुख्य सामग्रीवर वगळा

एक सोहळा :आगळावेगळा...

 उगवतीचे रंग 

एक सोहळा :आगळावेगळा... 

२० मे २०२२ रोजी पुण्यात एका छोटेखानी हॉलमध्ये एक आगळावेगळा सोहळा पार पडला. हा सोहळा होता व्रतबंध किंवा मुंजीचा. हा व्रतबंध सोहळा होता माझा अतिशय गोड नातू चि. स्वराज याचा. पण मुंजीबद्दल बोलण्याआधी माझी मुलगी चि सौ सारिका हिच्या सासरच्या मंडळींची पार्श्वभूमी सांगणे मला आवश्यक वाटते.  सारिकाने आंतरजातीय विवाह केला. तिच्या आनंदाखातर आम्हीही तो आनंदाने करून दिला. तिच्या सासरकडील मंडळी माळी समाजाची. पण तिच्या लग्नापासूनच ही तिच्या सासरकडची माणसे आणि आमच्यामध्ये एवढे प्रेमाचे ऋणानुबंध निर्माण झाले की जातपात हा विचार कुठल्याकुठे पळून गेला. 

सारिकाच्या सासरकडील मंडळी मूळ विदर्भातील खामगावची. खामगाव, शेगाव याठिकाणी त्यांचा समाज, नातेवाईक. तिच्या लग्नानंतर काही निमित्ताने या नातेवाईकांना भेटण्याचा योग आला, त्यांच्या घरी जाणे झाले. या सगळ्या मंडळींच्या मनाच्या मोठेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. त्यातील काहींची आर्थिक परिस्थिती उत्तम तर काहींची अगदी साधारण. काहींची घरे लहान तर काहींची मोठी. पण त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे मनाचा मोठेपणा. आपल्याकडे आलेल्याचे भरभरून अगत्याने स्वागत करणे, त्यांचा प्रेमाने पाहुणचार करणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. त्या सगळ्यात एक प्रकारचा अकृत्रिमपणा होता. उत्स्फूर्तपणे प्रेमपूर्वक केलेले स्वागत आणि औपचारिक स्वागत आपल्याला सहज लक्षात येते. 

चि सौ सारिकाच्या घरची सगळीच माणसे अतिशय प्रेमळ आणि धार्मिक. आल्यागेल्याचे मनापासून स्वागत करणारी. सारिकाचे यजमानही तिच्यासारखेच सी ए. सासरे कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले. दीर उच्चशिक्षित आणि अत्यंत बुद्धिमान. नणंद डॉक्टर. नणंदेचे दीर, यजमान यांनी स्वतःचा उद्योग सुरु करून आजमितीला एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक कमावला आहे. अशा या परिवारात माझी मुलगी सून म्हणून गेली. यथावकाश चि स्वराजचा जन्म झाला. पण लवकरच तिच्यावर एक गंभीर प्रसंग ओढवला. पोटदुखीच्या आजारातून तिला कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अशा वेळी तिचे यजमान आणि सासरकडील सगळीच   मंडळी तिच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्याने आणि प्रयत्नांनी ती सगळ्या दिव्यातून बाहेर पडली आणि आज ती तिचे सगळे काम नियमितपणे करते आहे. 

चि स्वराज जेव्हा आठ वर्षांचा झाला, तेव्हा सारिकाला साहजिकच असे वाटले की आपल्या या मुलावर उपनयन संस्कार व्हावा. खरे तर पूर्वी समाजातील सर्वच वर्गात मुलांचा उपनयन विधी किंवा संस्कार केला जात असे दाखले सापडतात. उपनयन संस्कार झाल्यानंतर मुलगा गुरुगृही शिक्षणासाठी जात असे. केवळ मुलांचाच उपनयन संस्कार होत नव्हता तर मुलींवर देखील हा संस्कार केला जात असे. मुलींना देखील सर्व शिक्षण दिले जात असे. पण काळाच्या ओघात काही चांगल्या गोष्टी मागे पडल्या. उपनयन संस्कार हा ब्राह्मण समाजातील मुलांपुरताच मर्यादित राहिला आणि मुलींबद्दल तर बोलायलाच नको. मुलींचा व्रतबंध तर दूरच पण त्यांना शिकवण्याची देखील समाजाची मानसिकता राहिली नव्हती. चूल आणि मूल हेच जणू तिचे कार्यक्षेत्र असे समाजाने ठरवून टाकले होते. अशा परिस्थितीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर यांच्यासारख्या थोर समाजसेवकांमुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला.  

सारिकाने जेव्हा चि स्वराजवर उपनयन संस्कार व्हावा अशी कल्पना तिच्या मिस्टरांजवळ मांडली तेव्हा त्यांनी त्यासाठी त्वरित सहमती दर्शवली. आता प्रश्न होता घरातील माणसांचा म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांचा. त्यांना ही कल्पना कितपत पसंत पडते अशी शंका होती. पण ही सगळीच मंडळी सुधारित विचारांची आणि मोठया मनाची. त्यांनीही त्वरित होकार दिला. आणि हा उपनयन सोहळा प्रत्यक्षात येऊ शकला. या सोहळ्याचे पौरोहित्य करण्यासाठी श्री जांभेकर गुरुजी यांनी आनंदाने आणि त्वरित होकार दर्शवला. त्यांनी या सोहळ्याचे विधिवत पौरोहित्य करून त्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्व सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगितले. हा सगळाच कार्यक्रम अगदी दृष्ट लागावी इतका देखणा झाला. या सोहळ्याला सारिकाच्या सासरकडील जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि आमच्याकडील सर्व नातेवाईक मंडळी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती. या अर्थाने हा सोहळा आगळावेगळा. 

या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना उपनयन विधी करण्यासाठी तत्कालीन कर्मठ ब्रह्मवृदांनी दिलेला नकार, त्यांचा झालेला छळ सगळे सगळे आठवले. ही गोष्ट तेराव्या शतकातली आणि आज आपण आहोत एकविसाव्या शतकात. काळाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. समाजात अनेक वाईट प्रथा काळाच्या ओघात निर्माण झाल्या. माणूस महत्वाचा राहिला नाही. जात, भाषा, धर्म, पंथ इ सारखे भेद माणसाला माणसापासून तोडू लागले. ज्ञानेश्वर माउली पासून अनेक संतांनी समाजप्रबोधन केले. अनेक समाजसुधारकांच्या पिढ्या यात खर्ची पडल्या. पण समाजमन हळूहळू बदलते आहे. जातीपातींची बंधने काहीशी सैल होताहेत. २८ मे रोजी पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना त्यांनी इतर समाजातील काही मुलांच्या झालेल्या उपनयन विधीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वा सावरकरांना देखील अशाच प्रकारचे बदल समाजात अपेक्षित होते असे प्रतिपादन त्यांनी केले. 

आणखी एक उदाहरण आपल्यासमोर मांडतो. १७ एप्रिल २०१६ रोजी औरंगाबाद येथे ३० मुली आणि सात मुलांवर उपनयन संस्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासात शेकडो वर्षानंतर प्रथमच मुलींवर उपनयन संस्कार करण्यात आल्याचे हे उदाहरण असावे. आश्चर्याची आणि समस्त महिला वर्गाच्या दृष्टीने अभिमानाची ठरावी अशी आणखी एक गोष्ट घडली. या उपनयन सोहळ्याचे पौरोहित्य एका महिला विदुषीने केले. त्यांचे नाव आचार्या नंदिता शास्त्री चतुर्वेदी. या सोहळ्यासाठी त्या खास वाराणसी येथून आल्या होत्या. मुलींना उपनयन संस्कारांचा अधिकार आहे याचे दाखले प्रत्येक वेदात आढळून येतात असे प्रतिपादन त्यांनी केले. नंदिता शास्त्री या वाराणसी येथील वेद विद्यालयाच्या प्रमुख अध्यापिका असून त्यांना चारही वेद मुखोद्गत आहेत.आपल्या हिंदू संस्कृतीतील सोळा संस्कारातील हा अत्यंत महत्वाचा संस्कार आहे.  प्रत्येक व्यक्तीवर आपल्या मातापित्यांचे, गुरूंचे आणि समाजाचे ऋण असते. उपनयन संस्कारानंतर प्रत्येक व्यक्तीला माता-पिता, गुरु आणि समाज ऋण फेडण्याचा अधिकार प्राप्त होतो असे समजण्यात येते. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

४/७/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...