मुख्य सामग्रीवर वगळा

' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकासाठीचे मनोगत

' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकासाठीचे मनोगत 

माझ्या ललित लेखांवर आधारित विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे हे चौथे पुस्तक. या मनोगतात सर्वात आधी मी माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना उदंड धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळेच माझे लिखाण मी सुरु ठेवू शकलो. 

 ' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकात आपल्याला विविध विषयांवर आधारित असे चाळीस  लेख वाचायला मिळतील.  प्रत्येकाच्या जीवनात संकटं आणि दुःख तर पाचवीला पुजल्यासारखी असतातच. पण ती पचवूनही इतरांसाठी आनंदाचा गाव उभा करणाऱ्या राहुल देशमुख, अविनाश आणि नंदिनी बर्वे हे दाम्पत्य, ज्या गोष्टी शिकण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील अशा गोष्टी एकाच जन्मात शिकणाऱ्या डॉ शारदा बापट, भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ अभिजित सोनवणे या सगळ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या कथा आपल्याला प्रेरणा देतील.  ' अनंत अमुची ध्येयासक्ती ' या लेखातून स्वतः अंध असणाऱ्या पण डोळसांनाही लाजवेल असे कार्य करणाऱ्या सेब्री टेंबरकेन यांच्या असामान्य जिद्दीची कहाणी आपल्याला वाचायला मिळेल. स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलून इतरांसाठी सावली, आश्रय देणाऱ्या आधारवडासारखीच ही माणसे. 

या पुस्तकात आपल्याला रामदास सराफ, माळी गुरुजी यांच्यासारखी सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वे ' एक आधुनिक रामदास ' , ' जैसी गंगा वाहे...' यासारख्या लेखातून वाचायला मिळतील. ' देगा उसका भला ' या लेखात दारावर भिक्षा मागण्यास येणाऱ्या एका फकिराचे चित्रण आपल्याला खूप काही सांगून जाईल. या पुस्तकातील ' ध्येयनिश्चितीच्या मार्गावर ' आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या सर्वांना उपयोगी आणि मार्गदर्शक होईल अशी खात्री आहे. इतरही अनेक विषयांवर आपल्याला भावतील आणि आनंद देतील अशा प्रकारचे लेख या पुस्तकात आपल्याला आढळतील. सगळ्याच लेखांबद्दल या ठिकाणी सांगण्यापेक्षा आपली उत्सुकता कायम ठेवून आपण ते सगळे लेख मुळातूनच वाचावे अशी नम्र विनंती. माझे हे पुस्तक या लेखांच्या रूपाने माझ्या सगळ्या प्रिय वाचकांना ' आनंदाच्या गावा जावे...' ची अनुभूती देईल असा विश्वास वाटतो. 

या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी जी सुंदर प्रस्तावना लिहून दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक समस्या असतानाही त्यांनी माझ्यासाठी वेळ देऊन ही अनुभवसिद्ध हातांची, शब्दांची प्रस्तावना लिहिली त्यांचे ऋण शब्दात कसे व्यक्त करता येईल ? मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. 

विश्वकर्मा प्रकाशनाचे हे माझे चौथे पुस्तक. विश्वकर्मा प्रकाशनाचे सीईओ विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर, पूनम बैचे, प्रीता कानिटकर, चैताली नाचणेकर आदी सर्वानी मला सहकार्य केले असे म्हणण्यापेक्षा  सोनी सरांच्या शब्दात सांगायचे तर माझ्या लेखनावर प्रेम करणारी ही माणसे आहेत. त्यांनी माझे नेहमीच प्रेमाने आणि अगत्याने स्वागत केले आहे. प्रथमेश नाझरकर याने या पुस्तकासाठी अतिशय देखणे असे मुखपृष्ठ तयार करून दिले. त्याचेही मनापासून आभार. माझी गृहस्वामिनी सौ श्रद्धा, मुलगा, मुलगी, सून या सर्वांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन आणि मदत दिल्यामुळेच हा लेखनप्रपंच सांभाळता आला. 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...