मुख्य सामग्रीवर वगळा

' रंगसोहळा ' या पुस्तकासाठी मनोगत

' रंगसोहळा ' या पुस्तकासाठी मनोगत 

' रंगसोहळा ' या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच या पुस्तकात आपल्या विविध रंगांचे विषय आढळतील. विविध रंगांचे ललित लेख आढळतील. काही वैचारिक असतील, तर काही काल्पनिक. पण वैचारिक वा काल्पनिक असले तरी त्यांना वर्तमानाची, वस्तुस्थितीची पार्श्वभूमी नक्कीच असते. एखादा चित्रकार जसा विविध प्रकारची चित्रे काढतो आणि रंगांच्या विविध छटांचा वापर करून त्यात रंग भरतो,  तसेच काहीसे लेखकांचे, कवींचे काम असते मला वाटते. चित्र हे शब्दांविना बोलते तर कविता, लेख इ वाङ्मयप्रकार शब्दांचा वापर करून त्यात रंग भरतात. 

या पुस्तकातील विविध विषय विविध वेळी वेगवेगळ्या कारणाने सुचले आहेत. नीरक्षीरविवेक हा लेख ' तान्हाजी : द अनसंग हिरो ' हा चित्रपट पाहून सुचला. श्रेयस की प्रेयस हा लेख ' विष्णुपुराण ' ही टीव्हीवरील मालिका पाहताना सुचलेला आहे. माझ्या घरासमोर झोपलेल्या एका वृद्ध, निराधार व्यक्तीला पाहून ' नित्य नवा दिस जागृतीचा ' हा लेख लिहिला गेला. ऊन, वारा, पाऊस, प्राणी, पक्षी, निसर्गरम्य ठिकाणे आदींनी माझ्या ' निसर्गायन ' लिहिण्याला चालना दिली आहे. प्रत्येक लेखासाठी काहीतरी वेगवेगळे निमित्त घडले आहे. अर्थात लेख वाचताना सुज्ञ वाचकांच्या ते लक्षात येईलच. लेखासाठी एखादी घटना ही निमित्त असते. त्यानिमित्ताने मनात जे वेगवेगळे विचार येतात, विचारमंथन घडते, ते आपल्यासमोर या लेखांमधून मांडले आहे.

यातील काही लेख ऋतुपर्ण, सज्जनगड, भालचंद्र यासारख्या मासिकातून तर काही लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या माध्यमांवर हे लेख वाचकांच्या पसंतीला उतरले आहेत. यातील काही लेखांचे सादरीकरण रेडिओ विश्वास या नाशिक येथून प्रसारित होणाऱ्या एफ एम चॅनेलवर झाले आहे. 

 प्रत्येक घटनेला वेगळा रंग असतो. लेखांनाही तो रंग आपसूकच प्राप्त होतो. ' मला आवडणारी त्रिमूर्ती ' या लेखात मला आवडलेल्या आणि भेटलेल्या तीन व्यक्तिमत्त्वांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, पाया, सुंदरता आणि कुरूपता, सिद्धी आणि प्रसिद्धी, सवय  यासारखे लेख त्या त्या विषयावरील मी केलेले मूलभूत चिंतन आहे असे मला वाटते. तर ' बुद्धिमतां वरिष्ठम ', युगानुयुगांचा दीपस्तंभ -श्रीराम ' यासारखे लेख पौराणिक पात्रांचे महत्व सांगणारे आहेत. काही लेख समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्याबद्दल आहेत. तर काही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि येसू वहिनी यासारख्या विषयाला वाहिले आहेत. अगदी ' हास्यरंग ' ही आपल्याला येथे आढळेल. असा हा विविधरंगी ' रंगसोहळा. ' वाचकांना निश्चितच आनंद देईल असा विश्वास आहे. 

या पुस्तकासाठी ' दीपस्तंभ फाउंडेशन ' चे प्रमुख आणि सर्वांसाठीच एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असणारे आदरणीय श्री यजुर्वेंद्र महाजन सर यांनी अत्यंत व्यस्त असतानाही केवळ माझ्या एका शब्दाखातर प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर, त्यांच्या सहकारी असलेल्या पूनम बैचे, प्रीता कानिटकर, चैताली नाचणेकर या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नसते. उदयोन्मुख वास्तुशिल्पकार आणि चित्रकलेची असामान्य आवड असणाऱ्या प्रथमेश नाझरकर याने माझ्यावरील प्रेमाखातर ' रंगसोहळा ' मुखपृष्ठावर साकारला. या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 












 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...