मुख्य सामग्रीवर वगळा

कधी कधी मला वाटतं...

उगवतीचे रंग 

कधी कधी मला वाटतं... 


 कधी कधी मला वाटतं 

विद्यार्थी व्हावं अन 

विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं 

' कोणाकडून काय घ्यावं..' 

ते त्यांनी शिकवावं. 

वर्गातून बाहेर पडताना  

विंदांची कविता घ्यावी 

आयुष्यभरासाठी अखंड 

गुणगुणत राहावी. ।। १ ।।


कधी कधी मला वाटतं 

साने गुरुजींच्या वर्गात बसावं 

श्यामची आई लिहिणाऱ्या 

श्यामला अनुभवावं. 

त्यांच्या डोळ्यातलं 

अपार प्रेम, माया अनुभवावी. 

' खरा तो एकची धर्म'

 शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।


कधी कधी मला वाटतं 

बोरकरांच्या वर्गात बसावं 

त्यांचे सागरासारखे 

गहिरे डोळे अनुभवावे 

' जीवन त्यांना कळले हो '  

 ते मलाही शिकवाल का 

विचारावं. ।। ३ ।। 


कधी कधी मला वाटतं 

कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं 

कशास आई भिजविसी डोळे 

त्यांच्याकडून ऐकावं 

रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची 

आशा जागवीत निघावं. 

पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा 

' लढ रे पोरा...' ऐकताना 

' कणा ' ताठ व्हावा. ।। ४ ।। 


कधी कधी मला वाटतं 

 शांताबाईंकडे जावं 

ऋतू हिरवा, ऋतू बरवा 

कुठे भेटला जाणून घ्यावं  ।। ५ ।। 


फिरता फिरता एक चक्कर 

पाडगावकरांच्या वर्गात मारावी 

त्यांच्या चष्म्याआडच्या 

प्रेमळ, मिश्किल डोळ्यात

खोल खोल डोकावून बघावं 

' शतदा प्रेम करावे ' चं 

रहस्य समजून घ्यावं.  ।। ६ ।। 


कधी कधी मला वाटतं 

ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं 

' कळा ज्या लागल्या जिवा... '

त्या जीवाला भेटावं 

दिवसभर त्यांच्या जवळ राहावं 

पहाटे त्यांच्याकडून 

' घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला ' बघावं 

' ते दूध तुझ्या त्या घटातले ' चा गोडवा 

त्यांच्याकडूनच अनुभवावा. 

सायंकाळी त्यांच्यासोबत 

' मावळत्या दिनकराला ' प्रणाम करावा. 

' तिन्ही सांजा सखे मिळाल्या...'

ऐकताना पुन्हा भेटण्याचं 

' देई वचन मला...' म्हणावं.  ।। ७ ।। 


कधी कधी वाटतं 

जावं बालकवींच्या गावा 

पाय टाकुनी जळात बसलेला 

तो ' औदुंबर ' अनुभवावा.

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे 

आनंदी आनंद गडे  च्या सड्यात 

न्हाऊन निघावे.  ।। ८ ।। 


कधी कधी वाटतं 

सुरेश भटांना गाठावं 

' चांदण्यात फिरताना '

त्यांच्याशी संवाद साधावा 

दुभंगून जाता जाता 

मी अभंग कसा झालो 

त्यांच्याकडून ऐकावं.  ।। ९ ।। 


कधी कधी मला 

असं खूप काही वाटतं 

कवी आणि कविता यांचं प्रेम 

हृदयात दाटतं. 

कवी असतात 

परमेश्वराचेच दूत 

घेऊन येतात प्रतिभेचं लेणं 

तुमच्या माझ्यासाठी 

ते असतं 

नक्षत्रांचं देणं.  ।। १० ।। 


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०९/०२/२०२२

प्रतिसादासाठी ९४०३७४९९३२

( कृपया कविता नावासह शेअर करावी )














 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...