उगवतीचे रंग
माणसं तशी चांगली असतात...
परवा मी दोन माणसांना
माझ्या घराजवळून जाताना पाहिलं
दोघं आपसात बोलत चालली होती.
एक दुसऱ्याला म्हणत होता...
' त्याच्या डोळ्यात पाणी आलं
मी त्याला म्हटलं तुला काही हवं का ? '
त्या माणसांचं एवढंच बोलणं मला ऐकू आलं
ती कोणाबद्दल बोलत होती
मला काहीच माहीत नव्हतं.
पण एवढं मात्र कळलं होतं की
माणसं तशी चांगली असतात. ।। १ ।।
मला आठवला दुर्योधन
महाभारतातला खलनायक
कळत होतं त्यालाही की
करतो आहोत आपण पांडवांवर अन्याय.
तसा कृष्णाला म्हणालाही होता एकदा
मी काय करू तूच सांग
तू बोलतोस ते कळतंय रे मला
पण मला तशी बुद्धीच होत नाही.
दुर्योधनालाही आपल्या चुका कळत असतात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। २ ।।
धृतराष्ट्राचे तरी काय वेगळे होते
त्याच्याकडे तर सत्ता, संपत्ती, विवेक,विचार सगळे होते
पांडुपुत्र त्याचे देखील होतेच ना कोणीतरी
नेत्रहीन असला तरी नव्हते का कळत सगळे !
दुर्योधन शकुनीला जरी असे स्वार्थापायी मूक संमती
द्रौपदीच्या आर्त हाका त्याचेही हृदय भेदतात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।।
रावण काय फक्त दुष्ट होता ?
तो तर होता ज्ञानी, गुणी, शूर आणि पराक्रमी
सीतेला उचलून नेताना तिच्या आर्त हाकांनी
नसेल का त्याचे मन द्रवले !
मला तर नक्कीच वाटते की
रावणासारख्या महापुरुषालाही करत असाव्यात
अपराधीपणाच्या भावना अस्वस्थ
असे विचार उगीचच मनात येऊन जातात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।।
वाल्ह्या कोळीही करत होता वाटमारी
निष्पापांची लुटालूट आणि हत्येची सदैव तयारी
कुटुंबासाठी जरी होती व्यवस्था सारी
पण ठाऊक होते त्यालाही की
निष्पापांची हत्या ही गोष्ट नाही बरी.
नारदांनी सांगतात त्या गोष्टी
वाल्ह्याला मनापासून पटतात.
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ५ ।।
एखादी किरण बेदी करते
तुरुंगातील कैद्यांसाठी काम
तुरुंगातील वाट चुकलेल्या कैद्यांना
एखादे विनोबा सांगतात समजावून
आणि पाजतात गीतेचे मधुघट
तुरुंगातील कैदी विनोबा आणि बेदींचं ऐकतात
कारण माणसं कुठेतरी चांगली असतात. ।। ६ ।।
सतत सुरु असते माणसांच्या मनात
युद्ध चांगल्या आणि वाईट विचारांचे
श्रेयस आणि प्रेयसचे
जी माणसं ऐकतात
आपल्या मनाचा आतला आवाज
आणि करतात वाईट गोष्टींचा त्याग
चांगल्या विचारांचाच आसरा ती घेत असतात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ७ ।।
वाईट गोष्टी असतात तशा दिसायला आकर्षक
सुंदरीचे रूप घेणाऱ्या चेटकिणीसारख्या
आणि चांगल्या गोष्टी असतात साध्यासुध्या
दिसायला नसतीलही आकर्षक
पण अंतिमतः आपले हितच करतात
बरीच माणसे त्याच करतात
कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ८ ।।
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०२/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया कविता नावासहित शेअर करावी )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा