उगवतीचे रंग
एक गोष्ट सांगू... ?
मंडळी, एक गोष्ट सांगू..? असं म्हटलंय खरं. पण मी गोष्ट वगैरे काही सांगणार नाहीये. म्हणजे आपली अशी म्हणण्याची पद्धत आहे हो ! आपल्या कोणाबरोबर तरी गप्पा सुरु असतात. मध्येच समोरची व्यक्ती म्हणते 'एक गोष्ट सांगू का ? ' म्हणजे ती व्यक्ती काही खरोखरोच गोष्ट सांगणार नसते. तिला आपल्याला काही तरी सांगायचे असते. बोलताना अशा खूप गमती जमती घडतात. पण अशी वाक्ये बोलण्याचा एक उद्देश हा असतो की समोरच्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे.
घराघरातून कानावर पडणारे ' अहो, ऐकलं का...' हे वाक्यही आपणा सर्वाना परिचित असेलच. मी बऱ्याच वेळा गमतीनं ' नाही ' असं म्हणतो कारण मी त्या आधी काही बोललं गेलेलंच नसतं. तो फक्त आपल्याला बोलावण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी ठेवावी म्हणून केलेला इशारा असतो. ' अहो, ऐकलं का...' या तीन अक्षरी संबोधनात खूप मोठा अर्थ भरलेला असतो हे मला अनुभवाने कळलं आहे. प्रत्येक वेळा परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळा संदर्भ असतो. उदा. ' अहो, ऐकलं का ? तेवढा फळीवरचा डबा काढून देता का पासून तर त्या अमुक एका दुकानात साड्यांचा सेल लागला आहे, सोन्याचे भाव कमी झालेत म्हणे..! यासंदर्भात अनुभवी आणि जाणकार व्यक्ती अधिक सांगू शकतील. तर फोनवर बोलताना काहींना ( विशेषतः भगिनी वर्गाला ) ' ऐक ना किंवा ऐका ना..' असे शब्द बोलण्याची सवय असते. आता अर्थात आपण जेव्हा फोनवर बोलत असतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचे ऐकतच असतो. त्यातूनही आणखी ' ऐक ना किंवा ऐका ना...' म्हणजे काही तरी व्हेरी इम्पॉर्टन्ट असावे...! ( आणि तुम्ही त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, नाही तर काही खरं नाही...! )
आमचे एक शिक्षक मित्र होते. ते आपण गप्पा मारीत असलो की म्हणायचे, ' मला काय म्हणायचं...? ' मी ते ऐकल्यावर मनातल्या मनात म्हणायचो की अरे बाबा, तूच बोलतो आहेस. त्यामुळे ' मला काय म्हणायचं ' हे वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यांना आपलं उगीचच असं वाटत असावं की आपल्या म्हणण्याकडे हे लक्ष देताहेत की नाही. राजकीय पार्ट्यांच्या प्रवक्त्यांच्या गमतीजमती आणि कोलांट्याउड्या तर वेगळ्याच ! एखाद्या विषयावर आपलं मत तर मांडायचं. पण पुन्हा कोणी काही म्हणेल या भीतीनं ' हे माझं वैयक्तित मत आहे ' असं नंतर म्हणण्यासारखे आहे. म्हणजे आपण नेमके काय बोलतो आहोत याबद्दल त्यांना तरी नीट कळलेले असते की नाही कोणास ठाऊक ! त्याच्यातही पार्टीतला एखादा वाचाळवीर भलतंच काही बोलून गेला तर बिचाऱ्या पक्षप्रमुखाची फार अडचण होते. मग अशा वेळी ' ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. ती पार्टीची अधिकृत भूमिका नाही ' असा काहीतरी खुलासा करतात. संबंधित व्यक्तीला पण कानफटात मारल्यासारखे होते. मग अशा वेळी ते फार सुंदर खुलासा करतात. ' मला तसे म्हणायचेच नव्हते. माझे म्हणणे मोडून तोडून मांडले गेले. संदर्भ सोडून मांडले गेले वगैरे. ( सध्या प्रत्येक पक्षात असे वाचाळवीर आहेत. पक्षप्रमुखांना त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागते. असे ' नाना ', संजय, विजय आदी मंडळी आहेत. बऱ्याच वेळा एखादा प्रवक्ता नेमका कोणत्या पार्टीचा आहे हे समजणेही कठीण होते. असो. आपला विषय बोलण्यातील गमतीजमती हा आहे. राजकीय विषयाकडे अजिबात वळायचे नाही. )
हल्ली काही काही शब्द बोलण्याचा ट्रेंडच झाला आहे. एखाद्याला काही विचारलं तर तो सुरुवात करतो ' ऍक्च्युअली ' शब्दापासून. प्रत्येक वेळी खुलासा करताना ऍक्च्युलीची ऍक्च्युली काही गरज आहे का ? तर काही व्यक्ती आपलं मतप्रदर्शन करताना ' खरं सांगू का... ? ' या शब्दांचा वापर करतात. एखाद्या वेळी ' खरं सांगू का ठीक आहे. पण प्रत्येक वेळी ' खरे सांगू का...? ' असे म्हणणे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही खरे सांगत नाही असा होतो. (' खरे सांगू का 'असं म्हणतात त्यावेळी तरी ते खरं बोलत असावेत असं गृहीत धरू... ) एखाद्याला एखादी गोष्ट विचारावी तर तो म्हणतो, ' एक काम करा...' म्हणजे ज्याला काही सांगावं किंवा विचारावं तोच आपल्याला ' एक काम करा ' असा सल्ला देत असतो आणि तो देताना आपण खूप काही कठीण गोष्ट सोपी करून सांगितली आहे असा आव आणत असतो. अरे बाबा, मला ते काम करता आले असते तर कशाला तुला विचारायला आलो असतो... ! ( जाऊ द्या, एक काम करा. त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. )
आमचे एक प्राध्यापक होते. विद्वान होते. आम्हाला तत्वज्ञान विषय शिकवायचे. त्यांना बोलता बोलता एक दोन वाक्ये झाली की ' असो ' हा शब्द म्हणायची सवय होती. विद्यार्थ्यांना त्यांची ही सवय चांगलीच परिचयाची होती. एकदा ते शिकवत असताना त्यांची दोनचार वाक्ये बोलून झाली. ते किंचित थांबले. वर्गातला एक खोडकर विद्यार्थी मागून हळूच पण सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात ' असो ' म्हणाला. सरांनीही ते ऐकले. आता सर रागावतील आणि काहीतरी भयंकर घडेल अशा भीतीने सगळे चिडीचूप होते. पण सरांनीच या शांततेचा भंग केला आणि हसून म्हणाले, ' असो ' आणि वर्गातील तणावाचे वातावरण क्षणार्धात निवळले आणि हास्याचा एकच स्फोट झाला. ( असो )
आमचे एक मित्र होते त्यांना असं बोलायची सवय होती. म्हणजे जे काही बोलायचं ते सगळं चालू वर्तमानकाळात. ( बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं ना की वर्तमानात जगा. हा सल्ला बोलताना तरी त्यांनी पुरेपूर अमलात आणला होता. ) ते बोलताना असं बोलायचे, ' मी काय सांगत आहे, तुम्ही ऐकत आहे का ? मी काल त्याच्या घराकडे जात आहे तर तो तिकडून येत आहे आणि मला म्हणत आहे की मी तुझ्याकडेच येत आहे. ' यावेळी मला क्रिकेट कॉमेंट्रीची आठवण होते. सगळं कसं लाईव्ह... ! ' चेंडू तेंडुलकरकडे येत आहे. तेंडुलकरने धावत चेंडू पकडला आहे. आता तो फलंदाजाकडे धावत त्याच्या दिशेने गोलंदाजी करतो आहे. अचूक गोलंदाजी. त्रिफळा उडाला आहे. गोलंदाज बाद झाला आहे. ' वगैरे.
टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात बातम्या देणाऱ्या वार्ताहरांचा शब्दसंग्रह फार मर्यादित असावा असं मला बऱ्याच वेळा वाटतं. कारण त्याच त्या विशेषणांचा, शब्दांचा वापर ते करत असतात. सध्या कोरोनामुळे ' सोशल डिस्टंसिंग ' हा शब्द सगळ्यांना माहित झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाची बातमी देताना त्या ठिकाणी गर्दी असली की ' सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला ' असेच शब्द ते वापरतात. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही किंवा त्याची वाट लागली त्यासाठी आपल्या समृद्ध मराठी भाषेत ' फज्जा उडाला ' एवढेच शब्द असावेत की काय असे मला वाटले. गंमत म्हणजे मी गुगलवर ' फज्जा उडणे ' म्हणजे नेमके काय हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुगलने मला त्याचा अर्थ न सांगता समान उच्चार असणारे शब्द ' कज्जा, मज्जा, सज्जा आदी शब्द दाखवले. आणि आणखी गंमत म्हणजे पुढे अशा सगळ्या बातम्या दाखवल्या की ज्यात गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा ' फज्जा ' उडाला होता. अशी ही ' फज्जा ' ची मज्जा... !
तर बराय मंडळी. 'एक गोष्ट सांगू का ' असं म्हणत बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या, नाही का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा