मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सत्तावीस

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग सत्तावीस 

आमचे संगीत लतादीदींमुळेच बहरले - लक्ष्मीकांत प्यारेलाल 

लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलालजी शर्मा. दोघंही अगदी ' एक दुजे के लिये '.  या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात विक्रमी योगदान दिलं आहे. १९६३ पासून १९९८ पर्यंत या जोडीने एकत्रित काम केलं. १९९८ ला मात्र लक्ष्मीकांत यांचं निधन झाल्याने प्यारेलालजी एकटे पडले. या दोघांमध्ये इतकी एकवाक्यता होती की प्यारेलालजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं आणि लक्ष्मीकांतजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं हे सांगता यायचं नाही. एक गमतीदार प्रसंग आहे. एकदा अंघोळ करताना प्यारेलालजींना एका गाण्याची चाल सुचली. नंतर त्यांची आणि लक्ष्मीकांतजींची भेट झाली. त्यांनीही गाण्याच्या चालीवर विचार केला होता. आश्चर्य म्हणजे दोघांची चाल एकसारखीच होती. 

प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा प्रसिद्ध ट्रम्पेटवादक होते. त्यांना सगळे बाबाजी म्हणत. प्यारेलाल यांची संगीताची गोडी त्यांच्या वडिलांकडूनच आली. गोरखपूर- बडोदा-्कलकत्ता-कराची-मुंबई-पुणे असा प्रवास करत करत बाबाजी मुंबईत स्थायिक झाले. बाबाजींच्या  काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशन लेखनाची विद्या त्यांच्या संपर्कातील सर्वाना दिली. प्यारेलाल यांना तर त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच नोटेशन कसे करायचे ते फक्त अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी जिद्दीने दिवसरात्र सराव करून नोटेशन लेखनाचे तंत्र आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले.

प्यारेलालजींना मुंबईतील रणजित स्टुडिओमध्ये व्हायोलिन वादक म्हणून नोकरी मिळाली. याच ठिकाणी मेंडोलिन वाजवणाऱ्या लक्ष्मीकांत कुडाळकर या मराठमोळ्या तरुणाशी त्यांचा परिचय झाला. दोघांचे मैत्रीचे सूर जुळले आणि मग पुढे आयुष्यभरासाठी संगीताचेही. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी प्यारेलालजींनी खैय्याम संगीत दिग्दर्शन करीत असलेल्या ' फिर सुबह होगी ' या चित्रपटासाठी संगीत संयोजनाचे काम केले. इथूनच चित्रपट संगीताचा अनुभव त्यांच्या गाठी जमा होण्यास सुरुवात झाली. व्हायोलिन वादक असणाऱ्या प्यारेलालजींचे मन मात्र चित्रपट संगीतात रमत नव्हते. त्यांच्या मनात आस्ट्रियातील व्हिएन्ना येथे जाऊन वेस्टर्न क्लासिकल सिम्फनी चे शिक्षण घ्यावे आणि तेथील सिम्फनी सम्राट यहुदी मेन्यूहीन यांच्याप्रमाणे नाव कमवावे असे होते. त्यासाठी जाण्याची त्यांची तयारीही  त्या तयारीला ब्रेक लावला तो लक्ष्मीकांत यांनी. ते त्यांना म्हणाले, ' परदेशात ७/८ वर्षे घालवून तू असं काय मोठं मिळवणार आहेस ? त्यापेक्षा आपल्याला इथंच खूप काम आहे. आपण जोडीनं काम करू आणि संगीतकार म्हणून नाव कमवू. प्यारेलालजींनी आपल्या मित्राचा सल्ला ऐकला आणि मग पुढचा सारा चित्रपट संगीताचा इतिहास त्यांच्या हातून घडला. 

लतादीदींनी त्या काळात या दोघांना मोठेच प्रोत्साहन दिले. शंकर जयकिसन, मदन मोहन यांच्यासारख्या नामवंत संगीतकारांबरोबर गाणी गाणाऱ्या दीदी या दोघांसोबतही अनेक गाणी गायल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी नामवंत निर्माते, संगीत दिग्दर्शक यांनाही या जोडीचे नाव सुचवून त्यांच्या संगीत कारकिर्दीची चांगली सुरुवात करून दिली. ' पारसमणी ' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्या गायल्या. या चित्रपटातली सगळी गाणी सुपरहिट झाली. संपूर्ण मंगेशकर परिवाराशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. 

लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचे नाव संगीतकार म्हणून देशभर प्रसिद्ध झाले. काही लोकांना तर लक्ष्मीकांत प्यारेलाल ही एकच व्यक्ती असावी असंही वाटत होतं. याचा एक गमतीदार किस्सा स्वतः प्यारेलाल यांनीच एकदा सांगितला. त्यांचे लग्न ठरले होते तेव्हाची ही गोष्ट. त्यांच्या पत्नीला कोणी विचारले की ' तुम्हारी शादी किस के साथ हो रही हैं ? ' तेव्हा त्या म्हणत, ' लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याशी.' पूर्वी गाणी काळ्या रंगाच्या तबकडीवर रेकॉर्ड केली जात. या तबकड्यांवर त्या जर जास्त कालावधीच्या असल्या तर एल पी म्हणजे लॉंग प्लेयिंग रेकॉर्ड्स असे लिहिलेले असे. पण बऱ्याच लोकांना एल पी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल असं असावं असं वाटत असे एवढी त्यांची लोकप्रियता होती. 

लतादीदींसोबतच राजकपूर यांच्याशीही त्यांचे घरोब्याचे संबंध होते. राजकपूर यांचा मूड असला तर ते रात्री एक वाजताही गप्पांसाठी प्यारेलाल यांचे दार ठोठावत. राजकपूर यांनी आपले महत्वाचे चित्रपट या जोडीला दिले. त्यात ' बॉबी ', ' प्रेमरोग ','  सत्यम शिवम सुंदरम ' हे चित्रपट सामील होते. त्यातील सर्वच गाणी हिट झाली. राजकपूर यांना संगीताची चांगली जाण होती. ते संगीत दिग्दर्शकांनाही अनेक सूचना करत. बॉबी चित्रपटाच्या वेळी ते असेच काही गाण्यांचे मुखडे घेऊन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे आले. त्यावेळी या दोघांनी आम्हाला आमचे काम करू द्या असे राजकपूर यांना स्पष्टपणे सांगितले. राजकपूर यांनी अर्थातच ते मान्य करून त्यांच्या कामात ढवळाढवळ केली नाही. 

संगीतकार म्हणून १९६३ ते १९९८ या पस्तीस वर्षांच्या वाटचालीत या जोडीला लोकप्रिय करण्यात दीदींचा निश्चितपणे मोठा वाटा आहे. राजकपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा, शक्ती सामंता, मदन मोहन, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई, या सारख्या नामवंत निर्मात्यांकडे काम मिळाले. 'छलियाँ मेरा नाम' या गाण्यानं अरेंजर म्हणून नाव झालं आणि 'प्यार किये जा', 'दो रास्ते', 'खिलौना', 'अच्छा तो हम चलते है', डफलीवाले, जिंदगी हर कदम... अशी गाणी आणि या सिनेमांनी लोकप्रियता मिळून दिली. पं. शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरासिया या सारख्या दिग्गज कलाकारांची साथसंगत त्यांनी मिळवली. फर्ज, शागीर्द सारखे अनेक चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट झाले. ' मिलन ' चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७९ मध्ये आलेल्या ' सरगम ' चित्रपटातील डफलीवाले डफली बजा ' हे गाणं तर एवढं लोकप्रिय झालं की लोक थिएटरमध्ये पडद्यावर पैशांची उधळण करीत असत. 

 प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या सर्वात जास्त गाण्यांची संख्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आहे. त्यांनी  एकूण २५० चित्रपटांसाठी  एकत्र काम केलं. या साऱ्यातून हिंदी चित्रपट संगीताचा एक मोठा इतिहासच घडत गेला. या सर्व वाटचालीत दीदींच्या अमृतमय स्वरांची साथ त्यांना लाभली.  इंडियन क्लासिकल, वेस्टर्न म्युझिक, फोक, डिस्को असे सारे प्रकार या जोडीने हाताळले.  सावन का महीना (मिलन), दिल विल प्यार व्यार (शागीर्द), कैसे रहू चूप (इंतकाम), जो मैं चली (जल बिन मछली), एक प्यार का नगमा है (शोर, मुकेश साथ), चाबी खो जाय (बॉबी), डफलीवाले (सरगम), तेरे मेरे बीच में (एक दुजे के लिये), यशोदा का नंदलाला (संजोग), मैं तेरी दुश्मन (नगीना) अशी दीदींचीअनेक अवीट गोडीची गाणी त्यांच्याबरोबर आहेत. लतादीदींनी या संगीतकार जोडीसाठी सर्वात जास्त म्हणजे सुमारे सातशेच्या वर गाणी गायली आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांनी कोणताही चित्रपट किंवा गाणं कधीही नाकारलं नाही. त्यांनी जसे उत्तम दर्जाचे चित्रपट केले, तसे सुमार दर्जाच्या चित्रपटांनाही संगीत दिलं. काही रसिकांचं म्हणणं आहे की बॉबी चित्रपटानंतर त्यांच्या संगीताचा दर्जा पूर्वीसारखा राहिला नाही. पण क्लासेस आणि मासेस अशी दोन्ही प्रकारच्या रसिकांना भावतील अशी गाणी त्यांनी दिली. लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि प्रेमगीतांपासून विरहगीतांपर्यंत अफाट रेंज असलेली शेकडो विविधरंगी गाणी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं वैशिष्ट्य. 

 सती सावित्री (१९६४), लुटेरा (१९६५), इंतकाम (१९६८), शराफत (१९७०), अभिनेत्री (१९७१), मेरा गांव मेरा देश (१९७१), जल बिन मछली, राजा जानी (१९०२), बॉबी (१९७३), सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के लिए....अशा अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत देऊन रसिकांना अजरामर गाणी दिली. प्यारेलालजी म्हणतात की लता मंगेशकर या आवाजाला पेलवणार नाही अशी चालच नाही, उलट त्यांची क्षमता,त्यांच्या आवाजाची रेंज एवढी विलक्षण आहे की ती रेंज पाहून आमच्यासारख्या संगीतकारांनी अनेक प्रयोग केले. एरवी जी गाणी जन्माला आलीच नसती अशी शेकडो गाणी केवळ लता मंगेशकरांमुळे जन्माला आली आहेत. संगीत बदलत गेलं, लोकांची रुची बदलत गेली, परंतु अनेक वर्षे गाण्यांमध्ये लताजींचा स्वर मात्र कायम राहिला. लता मंगेशकर, मो. रफी, किशोरकुमार, मुकेश  यासारख्या गायकांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचं सोनं केलं. प्यारेलालजींनी व्हायोलिन वादनाचे धडे सुरुवातीच्या काळात अँथनी गोन्साल्विस यांच्याकडून घेतले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून ' अमर अकबर अँथनी ' चित्रपटातलं ' माय नेम इज अँथनी गोन्साल्विस ' हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. आज प्यारेलालजी ८० वर्षांचे झाले आहेत. पण त्यांची तब्येत उत्तम आहे. या वादक, संगीतकार, सिम्फनी अरेंजर, संगीत संयोजक आदी अनेक गुणांनी मंडित हे असलेलं व्यक्तिमत्व साधे, मनमोकळे आणि मितभाषी आहे. 

त्यांची काही लोकप्रिय गाणी पुढे देत आहे. 

हसता हुवा नूरानी चेहरा ( पारसमणी ), सुनो सजना ( आये दिन बहार के ), उडके पवन के ( शागीर्द ), सावन का महिना ( मिलन ), बिंदिया चमकेगी  ( दो रास्ते  ), आ जाने जा ( इंतकाम  ), मन क्यूँ बहका  ( उत्सव ), अखियों को रहने दे ( बॉबी ), इक प्यार का नगमा हैं ( शोर ), अच्छा तो हम चलते हैं ( आन मिलो सजना  ), सोला बरस की बाली उमर ( एक दुजे के लिये ), सत्यम शिवम सुंदरम ( सत्यम शिवम सुंदरम ), ढल गया दिन ( हमजोली ), शिशा हो या दिल हो ( आशा ), हाय हाय ये मजबुरी ( रोटी कपडा और मकान ), कोयल बोली दुनिया डोली ( सरगम ), हम बने तुम बने ( एक दुजे के लिये ), दिल विल प्यार ( शागीर्द ), ना जा  कहीं अब न जा ( मेरे हमदम मेरे दोस्त ), भोर भये पनघट पे ( सत्यम शिवम सुंदरम ), झिलमिल सितारों का आंगन होगा ( जीवन मृत्यू )

( क्रमशः पुढील भाग बुधवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१६/०५/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 



 








 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...