उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग एक
स्वरसम्राज्ञी, गानसम्राज्ञी अशा बिरुदांनी मिरवावं ते लता दीदींनी. मास्टर दीनानाथांनी लावलेलं रोपटं आकाशाला स्पर्श करतं झालं. वेल गगनाला भिडला. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगायचं तर ' मोगरा फुलला. ' या मोगऱ्याला एवढा बहर आला की त्याची खाली पडलेली फुलं वेचता वेचता झाडावरच्या कळ्या फुलतच राहिल्या. हा सुगंध दशदिशांना पसरत राहिला. जो जो या झाडाच्या सान्निध्यात आला, तो तो या दिव्य सुगंधाने मोहरून गेला. भारतीय आणि जगभरातील रसिक या दिव्य सुरांचा आस्वाद अनेक पिढयांपासून घेत आहेत. हा कल्पवृक्ष अनेक वर्षांपासून अव्याहतपणे रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. त्याची जागा कोणीही घेतली नाही आणि घेऊ शकत नाही.
लतादीदी या नावाने संगीत सृष्टीत, चित्रपट सृष्टीत ख्यातकीर्त असणारं हे गाणारं झाड. तसा लौकिक अर्थानं दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. स्वर्गलोकीचे सूर दीदींच्या रूपाने धरतीवर अवतरले. जन्मतःच गळ्यात सुरांचे दैवी चांदणे घेऊन आलेली ही लता पाहता पाहता आभाळाइतकी उंच झाली. त्या आभाळातून सुरांची बरसात होऊ लागली. ही बरसात रसिकांना चिंब भिजवू लागली. लतादीदींच्या या सुरात काय नव्हते ! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर ' जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते... ' हे सगळे घेऊन दीदींचा स्वर आला आहे. शारदेच्या वीणेचा झंकार, श्रीकृष्णाच्या बासरीचे माधुर्य, गंधर्वांच्या ताना हे सगळं सगळं दैवी लेणं लेऊन आलेल्या दीदींच्या स्वरांची श्रीमंती काय वर्णावी ...! गेल्या अनेक वर्षांपासून हा दैवी आवाज अनेकांना जगण्याचा बळ देत आला आहे. आपली दिवसाची सुरुवात होते ती लतादीदींच्या मधुर सुरांनी आणि दिवसाचा शेवटही त्याच सुरांनी होते. हे स्वर आपल्याला पहाटे जाग आणतात आणि दिवसभर आपली प्रसन्न सोबत करतात. रात्री त्याच सुरांचा रेशमी मोहमयी शेला आपल्या अंगावर पांघरून आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. कल्पना करा की लतादीदींचा सूर आपल्या जीवनात नसता तर...! त्या नीरस आयुष्याची कल्पनाही करवत नाही.
आचार्य अत्रे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. अनेक दिग्गजांना आपल्या लेखणीच्या फटकाऱ्याने ताळ्यावर आणणारे आचार्य अत्रे. पण ते जेव्हा लतादीदींबद्दल लिहितात, तेव्हा त्यांच्या लेखणीलाही जणू अलौकिकाचा दिव्य स्पर्श होतो. ते म्हणतात, ' स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताला केवळ लोखंडाच्या निफेतून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिच्या चरणाखाली जाड्याभरड्या गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूंमध्ये भिजवून बनवलेल्या शाईनं, कमलतंतूच्या लेखणीनं आणि वायुलहरींच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखांवर लिहिलेलं मानपत्रच गुलाबकळीच्या करंडकातून तिला अर्पण करायला हवं. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनिसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीची साद हे सर्व एकवटून विधात्याने लताचा कंठ घडवला असला पाहिजे. '
लता दीदींवर लिहिणं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य लेखकाला शिवधनुष्य पेलण्याइतकं कठीण काम आहे. पण माझे रसिक वाचक इतके सुज्ञ आहेत की माझ्या साध्या शब्दांनाही ते गोड करून घेतील. माझ्या लेखनात काही गोडवा जाणवला, काही चांगले आढळले तर त्याचे श्रेय या दैवी व्यक्तिमत्वाचे. त्यात काही हिणकस आढळले तर ती जबाबदारी माझी. आज एवढेच...!
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा