उगवतीचे रंग
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस
हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेलांनी राजस्थानातील विविध राज्यांचे एकीकरण घडवून आणले. या राजपुताना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा प्रदेश विशाल होता. या प्रदेशात बहुतांशी रजपूत राजांची राज्ये होती. हे राजे शूर आणि परंपरांचा अभिमान असणारे होते. पण त्यांच्यात आपापसात भांडणे, हेवेदावे असल्यामुळे ही राज्ये जणू एकमेकांची शत्रू असल्यासारखी वागत होती. ही एकूण एकोणीस राज्ये होती. त्यांच्या एकीकरणासाठी सुमारे साडेआठ वर्षांचा कालावधी लागला. या एकीकरणाची प्रक्रिया १८ मार्च १९४८ रोजी सुरु झाली आणि एक नोव्हेंबर १९५६ ला पूर्ण झाली. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याची या राजांची इच्छा होती. त्याचे कारणही साहजिकच होते. एखाद्या मोठ्या राज्यात आपले राज्य विलीन करणे म्हणजे आपली स्वायत्तता गमावणे हा त्याचा अर्थ होता. आपली परंपरागत सत्ता गमावण्याची या राजांची तयारी नव्हती. राजस्थानातील या राज्यांमध्ये जयपूर, उदयपूर, बिकानेर, जोधपूर इ. प्रमुख राज्ये होती.
जीनांना भारतातील काश्मीर, हैदराबाद यांच्याबरोबरच राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आदी राज्ये पाकिस्तानात सामील झाल्यास हवीच होती. पण सरदार पटेलांनी त्यांचा हा डाव आधीच ओळखून मुत्सद्देपणाने आणि युक्तिप्रयुक्तीने राजस्थानातील या सर्व राज्यांचे एकीकरण घडवून आणले. रजपूत राजांमधील आपापसातील वैर देखील या एकीकरणामुळे संपुष्टात आले. खरं तर या सगळ्या राजांना एकत्र आणणे ही अत्यंत अवघड आणि नाजूक कामगिरी होती. पण पटेलांनी ही किमया घडवून आणली. त्यामुळे राजस्थानच्या एकीकरणाचे आणि भारतातील विलीनीकरणाचे श्रेय हे निःसंशय पटेलांचेच आहे.
एका समारंभात एकत्र आलेल्या या राजस्थानातील राजांना पटेलांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या छोटेखानी पण प्रेरणादायी भाषणाने उपस्थित राजे आणि तेथील जनता भारावून गेली. या भाषणात पटेलांनी महाराणा प्रताप यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उपस्थित राजांना उद्देशून ते म्हणाले, ' आज तुम्ही सर्वांनी मिळून महाराणा प्रताप यांचं स्वप्न साकार केलं आहे. ' राणा प्रतापांचा गौरवपूर्ण उल्लेख सरदार पटेलांच्या तोंडून ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इंग्रजांनी भारतात राज्य करताना भारतातील राजांमध्ये, जातीजमातींमध्ये फुटीची बीजे पेरली होती. ' Divide and rule ' ही त्यांची नीती होती. सरदार पटेलांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी ही राज्ये एकत्र तर केलीच शिवाय भारतातही त्यांचा समावेश करून भारताला बलशाली केले. विशेष म्हणजे हे करताना त्यांची आपापसातील भांडणे मिटवली. या राजांवर पटेलांच्या व्यक्तिमत्वाचा एवढा प्रभाव होता की त्यांच्यापैकी अनेक जण त्यांचे कायमचे मित्र, चाहते आणि भक्त बनले.
अशाच त्यांच्या चाहत्यांमध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सिंदिया राजांचा समावेश होता. सरदार पटेलांचा देशासाठी एवढा प्रचंड त्याग असताना पटेलांच्या मृत्यूनंतरही १९५४ पर्यंत संसदेत त्यांचे तैलचित्र लावण्यात आलं नव्हतं. १९५४ मध्ये जेव्हा मौलाना आझाद यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं तैलचित्र पं नेहरूंनी संसदेत ताबडतोब लावण्याची व्यवस्था केली. पटेलांची झालेली ही उपेक्षा पाहून सिंदिया राजेंना अतिशय वाईट वाटले. त्यांनी स्वतः सरदार पटेलांचे तैलचित्र संसदेत भेट दिले, तेव्हा कुठे ते संसदेत लावण्यात आले.
जी राज्यं आणि संस्थानं भारतात विलीन होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागेल असा इंग्रंजांचा अंदाज होता, ती राज्ये सरदार पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे स्वातंत्र्यानंतर केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत भारतात सामील झाली. हा चमत्कार केवळ पटेल आणि पटेलच करू शकत होते. वर्षानुवर्षे आपल्याच तोऱ्यात जगणारे राजे महाराजे पटेलांपुढे आदराने झुकले होते. पटेलांनी केलेली ही एक प्रकारची रक्तविहीन क्रांतीच होती. या क्रांतीच्या ज्वाला दहन करणाऱ्या नव्हत्या तर नवनिर्मितीची विधायक स्वप्ने साकार करणाऱ्या होत्या. या ज्वालांनी स्वतंत्र भारताची पहाट उजळून निघाली होती. स्वतंत्र भारताच्या भवितव्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. पाकिस्तानचे घातक मनसुबे मात्र या ज्वालांनी भस्मसात केले होते. ( पुढील लेख या सरदार पटेलांवरील लेखमालेतील शेवटचा भागअसेल. तो आपल्याला बुधवारी वाचता येईल )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३१/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )
************************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एकवीस ( अंतिम )
आजच्या या शेवटच्या भागात सरदार पटेल यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण पाहणार आहोत. सरदार पटेल म्हणजे भारताला लाभलेले एक महान व्यक्तिमत्व. सामान्य माणसाला, शेतकऱ्याला आपलेसे वाटेल असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. धोतर, झब्बा आणि जाकीट असा त्यांचा साधा पोशाख असायचा. त्यांच्या पोशाखात किंवा व्यक्तिमत्वात बडेजाव कुठेही नव्हता. भारतात विखुरलेली ५६५ संस्थाने भारतात एकहाती विलीन करूनही त्यांचे श्रेय त्यांनी स्वतःकडे स्वतःहून कधीच घेतले नाही. त्याचे श्रेय त्यांनी त्या त्या राजांना त्या त्या वेळी दिले हा त्यांचा केवढा मोठेपणा. नाटकीपणा, पुढे पुढे करणाऱ्यांची त्यांना चीड होती.
पटेलांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक अजब रसायन होतं. साधेपणा आणि भारदस्तपणा, कमी बोलणं आणि स्पष्टवक्तेपणा, मुत्सद्दीपणा आणि मनाची निष्कपटता या गुणांचं अजब मिश्रण म्हणजे सरदार पटेल. मनाचा निर्धार, प्रचंड आत्मविश्वास, ठाम कृती या त्यांच्या जमेच्या बाजू. कुठलाही प्रश्न रेंगाळत न ठेवता त्यावर काहीतरी तात्काळ निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव. त्याचबरोबर त्यांच्या निर्णयाबाबत कोणी काही मतभेद व्यक्त केले तर ते ऐकून आपल्या निर्णयात बदल करण्याची सुद्धा त्यांची तयारी असायची. पण त्यांच्या सगळ्या निर्णयात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य असायचे.
म गांधी आणि पं नेहरू यांचे वर्णन आपण धर्मनिरपेक्ष नेते म्हणून करतो. पण सरदार पटेलही धर्मनिरपेक्षच होते. पण त्यांची धर्मनिरपेक्षता सर्व धर्मीयांना समान न्याय देणारी होती. त्यांची धर्मनिरपेक्षता अल्पसंख्याक म्हणून गांधी किंवा नेहरूंसारखी कुणा विशिष्ट समाजाला झुकते माप देणारी नव्हती. राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची होती. त्यांनी लखनौ येथे १९४८ मध्ये एका प्रसंगी मुस्लिम समुदायासमोर केलेलं भाषण त्यांच्या भूमिकेची साक्ष देतं. हे त्यांचे विचार आजही अनुकरणीय आहेत. ते म्हणतात, ' काही लोक माझं वर्णन मुस्लिमांचा शत्रू म्हणून करतात. पण मी मुस्लिमांचा मित्रच आहे. मात्र मी जे काही बोलतो ते स्पष्ट आणि देशहिताचं असतं. मी आपल्याला आवाहन करतो की या कठीण काळात आपण भारतावर केवळ निष्ठा न दाखवता आपल्या वागण्याबोलण्यातून तसं दाखवून दिलं पाहिजे. पाकिस्तान घुसखोर टोळ्यांच्या माध्यमातून भारतावर जे भ्याड हल्ले करतो, त्याचा तुम्ही जाहीर निषेध का करत नाही ? आताच पार पडलेल्या तुमच्या परिषदेत तुम्ही काश्मीर प्रश्नावर एकही शब्द का बोलला नाहीत ?
' ज्यांना पाकिस्तानात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं आणि तिथे शांततेत राहावं. आम्ही इकडे राहून भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहू. भारतात जे मुस्लिम बांधव राहू इच्छितात त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला आता हिंदू आणि इतर धर्मियांसोबतच एकाच जहाजात प्रवास करायचा आहे. जगायचे असेल तर ते बरोबरच आणि मरायचे असेल तर तेही एकमेकांसोबतच. तुम्हाला एकाच वेळी दोन घोड्यांवर स्वार होता येणार नाही. आता तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. '
भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला मालमत्तेतील हिस्सा म्हणून ५५ कोटी रुपये भारताने द्यायचे होते. या गोष्टीला पटेलांचा विरोध होता. पण हे पैसे पाकिस्तानला देऊन आपण मुस्लिमांमध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करावा अशा मताचे गांधीजी होते. गांधीजी केवळ एवढे सांगून थांबले नाहीत तर हे पैसे द्यावेत म्हणून त्यांनी उपोषण सुरु केले. साहजिकच गांधीजींसारख्या मोठ्या नेत्याने उपोषण केल्यामुळे त्यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला. पटेलांवर आणि मंत्रिमंडळावर हे पैसे देण्यासाठी दबाव येऊ लागला. पटेलांनी आपला आग्रह सोडला. पण या गोष्टीमुळे अत्यंत व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला. पण पटेलांसारखा प्रभावी नेता गमावून चालणार नव्हते म्हणून माऊंटबॅटन आणि गांधीजी यांच्या आग्रहामुळे पटेलांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही.
पटेल एक कुशल प्रशासकही होते. आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी ते पूर्ण स्वातंत्र्य देत आणि त्यांच्यावर विश्वास टाकत. त्यांचे आपल्या अधिकाऱ्यांना आणि सचिवांना नेहमी सांगणे असायचे की मंत्री नाराज होतील म्हणून आपले म्हणणे सांगण्याचे टाळू नका. तुमचे मत स्पष्टपणे व्यक्त करा. जर आपले मंत्री नाराज होतील किंवा रागावतील या भीतीपोटी जर तुम्ही तुमचं प्रामाणिक मत मांडलं नाही, तर सरकारला योग्य निर्णय घेणं कठीण जाईल. असे करण्यापेक्षा तुम्ही राजीनामा दिलेला बरा. पटेल यांचा हा मोलाचा सल्ला आजही मंत्री आणि अधिकारी यांनी विचार करावा असा आहे.
देशासाठी कणाकणाने झिजणाऱ्या या महान नेत्याची प्रकृती आता साथ देईनाशी झाली होती. सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला होता. आतड्याच्या जुन्या विकाराने पुन्हा उचल खाल्ली होती. तशातच त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी आता त्यांना दिल्लीहून मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांची कन्या मणिबेन त्यांच्याजवळ सावलीसारखी उभी राहून त्यांची सेवा करत होती. प्रकृतीत सुधार होताना दिसत नव्हता. १४ डिसेंबरची रात्र त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारी ठरली. १५ डिसेंबर १९५० चा दिवस उजाडला, तो या लोहपुरूषाला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी. हृदयविकाराचा तीव्र झटका त्यांना आला. सकाळी साधारणपणे साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पटेलांच्या निधनाची बातमी देशात पसरताच एकच हलकल्लोळ उडाला. लोकांना आपल्या लाडक्या नेत्याचा हा वियोग चटका लावून गेला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत सर्व लहानथोर नेत्यांनी, चाहत्यांनी एकच गर्दी केली. मृत्यूने त्यांना आपल्यापासून हिरावून नेले होते पण या लोहपुरूषाची दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र शेवटपर्यंत कायम होती. मृत्यूही ती हिरावून घेऊ शकला नाही. मृत्यूसमयी त्यांच्या चेहऱ्यावरचा करारीपणा आधीसारखाच झळकत होता. सरदार पटेल लोकांच्या मनामनावर कायम राज्य करत राहतील. त्यांचा जन्मदिवस ३१ ऑक्टोबर आपण ' राष्ट्रीय एकता दिवस ' म्हणून साजरा करतॊ. १९९१ मध्ये या भारतमातेच्या महान सुपुत्राचा ' भारतरत्न ' देऊन गौरव करण्यात आला. गुजरातमधील नर्मदा धरणाच्या परिसरातील केवाडिया येथील त्यांचा भव्य पुतळा ' द स्टॅच्यू ऑफ युनिटी ' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले सुपुत्र आणि थोर मूर्तिकार राम सुतार यांच्या सर्जनशील हातातून द स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखी कलाकृती साकार झाली आहे ही आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०३/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )
![]() |
| मणिबेन आणि सरदार पटेल |
*************************************
उगवतीचे रंग
आधीं केलें मग सांगितले ।
मानेल तरी पाहिजे घेतलें ।
कोणी येकें ।।
उगवतीचे रंग
उगवतीचे रंग
भारतरत्नावली
अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )
अटलजींसारखा नेता म्हणजे भारतमातेला लाभलेलं दुर्मिळ रत्न..! राजकारणातल्या दलदलीत राहूनही हे कमळ फुलत राहिलं. त्यांचं सगळं जीवन म्हणजे कमलपत्रासारखं निर्लेप, निर्मोही. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, चिखल, दलदलीत राहूनही त्या सगळ्यांपासून अलिप्त. केवळ आनंद देणं हेच त्याचं काम. हे कमलपुष्प भारतमातेच्या चरणी जन्मापासूनच अर्पित झालं होतं, म्हणून तर अटलजी आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य या महापुरुषाने भारतमातेच्या सेवेत व्यतीत केलं.
अनेकांच्या जीवनात चढउतार येतात, अपयशाचे कडू घोटही घशाखाली रिचवावे लागतात. तसे अटलजींनीही रिचवले. अनेकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणिबाणीसारख्या प्रसंगी कारागृहात राहावे लागले. या काळात तब्येतीच्या अनेक तक्रारींनाही तोंड द्यावे लागले. 'की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे हे सतीचे वाण त्यांनी हेतुपुरस्सर स्वीकारले होते, त्यामुळे कधी पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही.
परिस्थितीच्या मागणीनुसार १९७७ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण जनता पक्षात करण्यात अटलजींचा पुढाकार होता. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झाले, त्यात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. या काळात त्यांनी या पदावर अतिशय प्रभावीपणे काम करून आपल्या नेतृत्वशैलीची वेगळी छाप उमटवली. परंतु ज्या पद्धतीने जनता पक्षाचे राजकारण आणि कामकाज सुरु होते, त्यावर अटलजी नाराज होते. त्यामुळे १९८० मध्ये त्यांनी जनता पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ते अध्यक्ष झाले. अटलजींनी फार थोड्या कालावधीत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवले. अर्थात त्यांच्या जोडीला लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, पं दिनदयाळजी उपाध्याय यांसारखे दिगग्ज नेते होते. पण अटलजींच्या नेतृत्वावर सर्वांचीच मदार होती. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पं दिनदयाळजी उपाध्याय यांच्यानंतर त्यांची पोकळी भरून काढणारा एकमेव ध्येयवादी, समर्पित नेता म्हणजे अटलजी.
अटलजी एकंदर तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र त्यांचा सुरुवातीचा म्हणजे पहिल्या पंतप्रधानपदाचा काळ अल्पजीवी ठरला. त्यांनी सरकार चालवण्यासाठी किंवा सत्तेला चिकटून राहण्यासाठी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. हे सरकार त्यामुळे फक्त तेरा दिवस चालले. पुन्हा दुसऱ्या वेळी अटलजी १९९८ मध्ये पंतप्रधान झाले. हे सरकार तेरा महिने पदावर होते. पण नियतीने पुन्हा तेरा ऑक्टोबर १९९९ मध्ये अटलजींना पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. यावेळी मात्र त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. पंतप्रधान म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे त्यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच बिगर काँग्रेसी सरकार होते. या काळात अटल सरकारने अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांचा उल्लेख पुढे येईलच. पण त्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना, परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतात. त्यातील एकदोन गोष्टी पाहणे महत्वाचे आणि रंजक ठरेल.
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेत मदतीसाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे जेव्हा अटलजींना कळले, तेव्हा ते विचारात पडले. ते उद्गारले, ' प्रभू रामचंद्रानंतर श्रीलंकेत सेना पाठवणारे राजीवजीच निघाले. पण हे त्यांचं धोरण मला दूरदर्शीपणाचं वाटत नाही. ' अटलजींचे उदगार सार्थ होते हे नंतर सिद्ध झालं. भारत श्रीलंका संबंध सुधारले तर नाहीतच, पण या निर्णयापोटी राजीव गांधींना आपल्या प्राणांचं मोल चुकतं करावं लागलं. पण राजीव गांधींच्या अकाली निधनाने कवीमनाचा हा नेता हळहळला. ते म्हणाले, ' जन्म के साथ मरण जुडा है. लेकिन जब मृत्यू सहज नही होती... भरी जवानी में किसी जीवनपुष्प को चिता के राख मे बदल देती है... एक षडयंत्र का परिणाम होती है, तो परिवारवाले किस तरह से उस वज्रपात को सहें '?
नरसिंहराव पंतप्रधान असतानाची एक घटना आहे. काँग्रेसच्या काही खासदारांनी काँग्रेसच्याच चार मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तसे पत्र नरसिंहरावांना पाठवून पक्षाला घरचा आहेर दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांना सरकारला कोंडीत पकडण्याची ही नामी संधी आहे असे वाटले आणि ते अटलजींकडे आले. अटलजींना ही बातमी सांगून त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा अशी विनंती केली. पण अटलजींनी त्याला नकार दिला. ते खासदार आश्चर्यचकित झाले. अटलजी असे का म्हणत आहेत हे त्यांना कळेना. संसदेतील शून्य प्रहराला अजून काही अवधी बाकी होता. अटलजी त्या खासदारांना म्हणाले, ' ज्यांनी त्या मंत्र्यांवर आरोप केले, त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटतो का ते पहा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकडून त्या पत्राची प्रत मिळवा. ' परंतु त्या खासदारांना ना ते आरोप करणारे खासदार भेटले ना त्या पत्राची प्रत मिळू शकली. एखादी बातमी केवळ वृत्तपत्रात आली म्हणून ती खरी मानून चालणाऱ्यांपैकी अटलजी नव्हते. म्हणूनच त्यांच्या शब्दाला विश्वासार्हता आणि वजन प्राप्त झाले होते. ( अंतिम भाग रविवारी )
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
११-१२-२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
*********************************************
उगवतीच रंग
भारतरत्नावली
अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग पाच - अंतिम )
मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत - पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले
गुंजी हिंदी विश्वमें
स्वप्न हुआ साकार
राष्ट्रसंघ के मंचसे
हिंदी की जयकार !
अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.
19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा.ए.सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.
देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली.आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.
अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस...राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात
जन्म मरण का अविरत फेरा
जीवन बंजारो का डेरा
आज यहाँ कल कहाँ कुच है
कौन जानता किधर सवेरा...
भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.
हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आँखो से ओझल
वर्तमान के मोहजाल मे
आनेवाला कल न भुलाए
आओ फिरसे दिया जलाएँ...
आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.
दांव पर सब कुछ लगा है
रुक नही सकते, टूट सकते
है मगर हम झुक नही सकते...
ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात
’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल.’’
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३-१२-२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे भाग चार
कोणतीही संस्था चालवण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी पैसा आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज असते. कर्व्यांच्या संस्थांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळू लागला. त्या चालवण्याकरिता आवश्यक तेवढा पैसाही वेळोवेळी उभा राहिला. पण हे सगळे कार्य चालवण्यासाठी निस्वार्थ आणि समर्पित कार्यकर्त्यांची गरज होती. असे कार्यकर्ते घडवण्यासाठी कर्व्यांनी ‘ निष्काम कर्म मठाची ‘ स्थापना केली. या मागे भगवद गीतेतील निष्काम कर्मयोगाची कल्पना कर्व्यांच्या डोळ्यांसमोर होती. पण काही काळातच ही संस्था बंद करावी लागली. कारण पुरेशा समर्पित कार्यकर्त्यांचा अभाव होता. शिवाय लोकांनाही या मठाच्या उपयुक्ततेबद्दल शंका होती. अण्णांची मठ स्थापन करण्यामागे जी उदात्त कल्पना होती ती लोकांना समजू शकली नाही. अण्णांच्या मनात आणि आचरणात सुद्धा असलेला निष्काम कर्मयोग समजून घेण्यात समाज कमी पडला. पण अशा गोष्टींमुळे अण्णा विचलित होत नसत. कोणत्याही परिस्थितीत ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची एक विलक्षण जिद्द आणि चिकाटी अण्णांजवळ होती. आणि या सगळयांच्या पाठीमागे होती ती स्त्रियांच्या उद्धाराची तळमळ. त्यामुळे पुढे आश्रम, मठ आणि महाविद्यालय यांचे एकत्रीकरण करून ‘ महिलाश्रम ‘ ही वेगळी संस्था निर्माण करण्यात आली. त्यावेळी अण्णा म्हणाले, “ या त्रिवेणी संगमाने कार्याचे महत्व वाढून हे एक तीर्थस्थान ठरो व यातून बाहेर पडणाऱ्या हजारो मानसकन्या स्वतःचा व आपल्या मातृभूमीचा उद्धार करण्यास सहाय्यभूत ठरोत. “
याच सुमारास जपानी महिला विद्यापीठाचे एक माहितीपुस्तक योगायोगाने अण्णांच्या हाती पडले. आणि ते वाचून त्यांच्या विचारांना चालना मिळाली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे, त्यांची जाचक रुढींतून मुक्तता करणे आदी गोष्टी म्हणजे स्त्रियांवर उपकार करणे समजले जात होते. पण स्त्रियांना शिक्षण देणे, आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे हे आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे अशी अण्णांची भावना होती. स्त्री दास्य मुक्ती आम्हाला मान्य नाही. उलट स्त्रीचे मुक्तक्षेत्र हे तिचे घर आहे. या तिच्या कार्यक्षेत्रात पत्नी, माता म्हणून तिचा योग्य सन्मान झालाच पाहिजे. या विचारात स्त्रियांना आपल्या घरापुरातेच सीमित करण्याचा अण्णांचा मुळीच हेतू नव्हता. तर तिला शिक्षण घेऊन स्वावलंबी होता यावे, तिने स्वतःची प्रगती करावी आणि समाजाकडून आणि कुटुंबातील इतर घटकांकडून तिला मानाचे स्थान मिळावे असे अण्णांना वाटत होते. या विचारात अण्णांचे द्रष्टेपण आपल्याला दिसते. अण्णा केवळ स्त्रियांचे उद्धारकर्ते होते असे नव्हे तर ते स्त्रियांना व्यक्ती म्हणून स्वतंत्र स्थान देणारे, स्वतःच्या पायावर उभे करणारे एक मूर्तिमंत विद्यापीठ होते.
अण्णांनी आपली महिला विद्यापीठाची कल्पना लोकांसमोर मांडली. त्यांच्या या कल्पनेवर सुद्धा अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. पण अण्णा दृढनिश्चयी होते. एकदा जे ठरवले त्यापासून ते कधीही मागे हटत नसत. आणि त्यांच्या जिद्दीला फळ आले. ३ जून १९१६ ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाचा अभ्यासक्रम मातृभाषेतून ठरवण्यात आला. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी अण्णांच्या या कर्तृत्वाची प्रशंसा केली.
अण्णांनी महिला विद्यापीठाची स्थापना तर केली पण या विद्यापीठाचा अभ्यासक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांची गरज होती. अण्णांनी त्यासाठी पुण्याला महिला पाठशाला सुरु केली. सुरुवातीला या पाठशालेत फक्त ५ विद्यार्थिनी होत्या. लवकरच तेथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली. विद्यापीठाला मात्र अजून सरकारकडून मान्यता मिळाली नव्हती. पण लौकरच एक दुग्धशर्करा योग जुळून आला. मुंबईतील एक दानशूर उद्योगपती अण्णांच्या मदतीला धावून आले. ते नुकतेच जपान महिला विद्यापीठाचा दौरा करून आले होते. त्यांना स्त्री शिक्षणाविषयी तळमळ वाटे. आणि त्यांनी अण्णांच्या महिला विद्यापीठासाठी पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्या काळात १५ लाख रु. म्हणजे फार मोठी मदत होती. या विद्यापीठाला भारतीय स्त्री विद्यापीठाचे नाव बदलून त्यांच्या आईंचे म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतीय स्त्री विद्यापीठ असे नाव देण्यात आले.
याच सुमाराला पुण्यामध्ये आश्रमाच्या सहाय्याने एक कन्याशाळा चालवण्यात येत होती. तिचे सारे काम श्री गो म चिपळूणकर हे ध्येयवादी आणि समर्पित वृत्तीचे गृहस्थ पहात होते. ही कन्या शाळा, महिला पाठशाला आणि विद्यापीठ यांचे एकत्रीकरण करण्यात आले. या तिन्ही संस्थांचा अण्णांच्या महिलाश्रामाशी कोणताही संबंध राहणार नव्हता. अण्णांची वृत्ती एखाद्या फकीरासारखी निरिच्छ होती. आपण सामान्य माणसे आपल्या एखाद्या किरकोळ गोष्टीवर हक्क सांगण्यासाठी किती आटापिटा करतो ! पण अण्णा त्यातून सहज बाजूला झाले. पुढे या विद्यापीठातून हजारो मुली आणि महिला शिक्षणाची तेजस्वी ज्योत घेऊन बाहेर पडू लागल्या आणि महिलांच्या जगतातील अन्याय, अत्याचाराचा अंधःकार दूर करू लागल्या. अण्णा मात्र या सगळ्या गोष्टींसाठी चंदनासारखे झिजत राहिले. आता अण्णांचे आणि विद्यापीठाचे नाव साऱ्या भारतात प्रसिद्ध झाले. पण इथे थांबतील आणि स्वस्थ बसतील ते अण्णा कसले ? आता त्यांना ध्यास लागला होता आपल्या विद्यापीठाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा आणि विद्यापीठासाठी अधिक निधी मिळवून त्याची आणखी प्रगती करण्याचा !
या करिता ते जगप्रवासाला निघाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे सत्तर वर्षे ! पण एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी उमेद त्यांच्याकडे होती. या दौऱ्यात अण्णांनी युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. अनेक शिक्षण तज्ज्ञांबरोबर भेटी घेऊन चर्चा केली. बर्लिनमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईन बरोबर त्यांनी चर्चा केली. पुढे ते जपानमध्ये गेले. तेथे त्यांनी महिला विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठातील अभ्यासक्रम, उपक्रम इ ची माहिती त्यांनी यावेळी घेतली. नंतर अनेक आशियायी देशात ते गेले. या सगळ्या देशातून आपल्या विद्यापीठासाठी मोठा निधी त्यांना मिळाला. अण्णांचे चिरंजीव डॉ शंकरराव कर्वे हे आफ्रिकेत स्थायिक झाले होते. आता अण्णांनी आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथील अनेक शहरांना भेटी देऊन त्यांनी विद्यापीठासाठी मदत मिळवली. यावरून कोणाचा असा समज होण्याची शक्यता आहे की अण्णा फक्त मदतीसाठी परदेशात फिरत होते. पण त्यांना आपल्या विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची होती. महिलांच्या शिक्षणाविषयी जागृती करणे, महिलांना अधिक स्वावलंबी बनवणे आणि त्यासाठी समाजमन अनुकूल करून घेणे हा त्यांचा उद्देश होता.
( पुढील आणि अंतिम भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
**************************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे,चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग पाच - अंतिम )
परदेशातून मिळालेल्या या सगळ्या निधीचा चोख हिशेब अण्णांनी ठेवला. अण्णा केवळ मदत घेणाऱ्यातले नव्हते. अण्णांची वृत्ती देणाऱ्याची होती. विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ‘ त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या संस्थाना तर मदत केलीच पण कोठेही चांगले काम दिसले की अण्णांचा हात देण्यासाठी पुढे असायचा. आता अण्णांचे वय झाले होते ७८ वर्षांचे. आपल्या संस्थांचे कौतुक पहात, आपली स्तुती ऐकण्यात आणि आराम करण्यात घालवावे असे हे वय. पण स्वस्थ बसणे हा अण्णांचा स्वभाव नव्हता. या वयात शिक्षण प्रसाराचा एक नवीन उपक्रम अण्णांनी हाती घेतली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार व्हावा, मुलांनी शिकावे म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ नावाची संस्था काढली. खेडी शिक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावीत. खेड्यातील लोकांनीच पैसे जमवून शाळा बांधावी, शिक्षकांचा पगार द्यावा अशी त्यांची कल्पना होती. त्यानुसार ज्या गावात शाळा नसेल तेथे शाळा काढण्यास त्यांच्या या संस्थेने मदत केली. पण पुढे सरकारनेच या शाळांना मदत करण्याचे ठरविल्यामुळे अशा मंडळांची गरज राहिली नाही. समाजात जातीभेद, वर्णभेद आदी भिंती नसाव्यात. समाजात एकोपा नांदावा, समता राहावी म्हणून त्यांनी समता संघाची स्थापना केली. तसेच या संघातर्फे ‘ मानवी समता ‘ नावाचे वर्तमानपत्र सुरु केले.
अशा या समाजासाठी चंदनासारखे झिजणाऱ्या अण्णांना १०४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. या काळात आपण सुरु केलेल्या संस्था बहरलेल्या पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांनी लावलेल्या ‘ इवलेसे रोपाचा ‘ वेलू आता गगनावरी गेला होता. त्यांच्या एक्काहात्तरीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. तो आज कर्वे रोड म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा ९१ वा वाढदिवस डॉ जयकरांच्या अध्यक्षतेखाली पुणेकरांनी मोठ्या थाटात साजरा केला. पूर्वी त्यांच्यावर कधी काळी टीकेचा वर्षाव करणारे आता त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू लागले होते. या सगळ्यात त्यांची पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची अनमोल साथ त्यांना लाभली. त्यांची ही सहधर्मचारिणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या काळात त्यांनाही अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले,अवहेलना वाट्याला आली पण त्यांनी कमालीच्या सोशिकपणे सगळे सहन करून अण्णांना साथ दिली.त्यांनी ‘ माझे पुराण ‘ या आपल्या आत्मचरित्रात आपले सगळे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. त्यांनी केवळ आश्रमाकडे लक्ष दिले असे नाही तर आपल्या मुलांनाही उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन घडवले. अण्णांचे मोठे चिरंजीव आणि प्रथम पत्नीचा पुत्र प्रा रघुनाथ कर्वे यांनी अण्णांचा वारसा पुढे चालवून संततिनियमनाचा प्रसार आणि प्रचार केला. या कामात त्यांनाही प्रचंड कष्ट, यातना आणि मानहानी सोसावी लागली. पण तेही अविचल निष्ठेने अण्णांप्रमाणे कार्यरत राहिले. अण्णांचे दुसरे चिरंजीव हे डॉक्टर असून ते आफ्रिकेत स्थायिक झाले होते. तिसरे चि. डॉ दिनकरराव कर्वे हे अत्यंत विद्वान प्राध्यापक होते. ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या पत्नी डॉ इरावती कर्वे या प्रसिद्ध लेखिका आणि संशोधक होत्या. अण्णांचे चौथे चिरंजीव भास्करराव आणि त्यांची पत्नी कावेरीबाई यांनी अण्णांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या संस्था सांभाळल्या.
अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डी लिट पदवी बहाल केली. डॉ राजेन्द्रप्रसाद, पंडित नेहरू, म गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वा. सावरकर या सारख्या थोर व्यक्तींनी त्यांच्या आश्रमाला भेटी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. महर्षींचा शंभरावा वाढदिवस तर संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. हा सोहळा ब्रेबोर्न स्टेडियम वर झाला. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले एक पोष्टाचे तिकीट जारी करण्यात आले. या वेळी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना ‘ भारतरत्न ‘ हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले.
सेवेचा अखंड तेवणारा हा नंदादीप ७ नोव्हेंबर १९६२ रोजी केवळ पोटदुखीचे निमित्त होऊन शांत झाला. अण्णा कधी कोणाला कटू बोलले नाहीत. कोणाबद्दल अपशब्द उच्चारले नाहीत. सतत एखाद्या योग्यासारखे कार्यरत राहिले. स्वतः जळत राहून अनेकांची आयुष्ये त्यांनी प्रकाशमान केली. स्त्रीशिक्षणाचे डोंगराएवढे महान कार्य केले. पण कुठेही याचा गर्व नव्हता. करून सवरून नामानिराळे ! मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा लाजवेल असे हे वागणे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला प्रणाम ! ‘ तेथे कर माझे जुळती ! ‘
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग तीन
आपल्या अभियंतेपदाच्या कारकिर्दीत विश्वेश्वरैया यांनी अनेक कामे केली. या सगळ्या कामांवर कार्यपद्धतीचा ठसा उमटला आहे. पुढे त्यांनी काही काळासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. विश्वेश्वरैया हे शिस्त आणि वक्तशीरपणा या गोष्टींचे अतिशय कटाक्षाने पालन करणारे होते. त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील एक किस्सा सांगण्यासारखा आहे. ते अमेरिकेत असताना त्यांना एका ठिकाणी एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचे होते. ते स्टेशनवर आले असताना त्यांना कळले की आपल्याला ज्या गाडीने जायचे ती गाडी अचानक रद्द झाली आहे. ते लगेच जाऊन स्टेशनमास्तरला भेटले. त्यांना सांगितले की मी या देशात भारताचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. माझी साडेदहा वा मिटिंग आहे. आपण गाडी रद्द केल्याने मी मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही. मला मीटिंगला जाण्यापासून रोखणे म्हणजे मी माझ्या देशाचा अपमान समजतो. या संदर्भात मला आपल्या देशाच्या अध्यक्षांशी बोलावे लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर स्टेशनमास्तर हादरले. त्यांनी त्वरित विश्वेश्वरैयासाठी एका डब्याच्या स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था केली.
विश्वेश्वरैयाच्या या विविध देशांच्या दौऱ्यातही तेथील नवनवीन गोष्टी पाहणे, त्यांचा वापर आपल्या देशासाठी आपल्या कामात करून घेणे या धोरणावर त्यांनी भर दिला. या दरम्यान हैदराबाद शहरात इसी आणि मुसी नदीच्या पुरामुळे हाहाकार माजला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी एकच योग्य व्यक्ती होती. ती म्हणजे सर विश्वेश्वरैया. कोणत्याही समस्येवर मुळापासून विचार करून ती सोडवणे ही त्यांची खासियत होती. इंग्रज सरकार आणि इंग्रज अधिकारी याना सुद्धा विश्वेश्वरैया यांचे मोठेपण मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. विश्वेश्वरैयाना परदेश दौऱ्यावरून खास निरोप पाठवून बोलावून घेतले गेले. इसी आणि मुसी नदीवर विश्वेश्वरैयान्च्या देखरेखीखाली दोन मोठी धरणे बांधली गेली. हैदराबाद शहराची पुनर्रचना त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . हैदरबादकरांवरील पुराचे संकट टळले. हैदराबादचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला.
१९्०९च्या सुमारास हैद्राबाद संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीवरून त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे स्वीकारली. १९१२ ते १९१८ या कालावधीत ते म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी अक्षरशः प्रचंड काम केले. विश्वेश्वरैय्या हे व्यासंगी व्यक्तिमत्व होते. एक गोष्ट त्यांनी जाणली होती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातली ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची कधीही आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. त्याची प्रगती व्हायची असेल तर दोन गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे शेतीला हमखास पाणी मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे. शेती परवडण्यासाठी शेतीवर अवलंबून राहणारी कुटुंबे किंवा व्यक्ती यांची संख्या कमी केली पाहिजे. त्यासाठी नवनवीन उद्योगधंद्यांची निर्मिती, शेतीला पूरक उद्योग यांची निर्मिती झाली पाहिजे.
या सर्व गोष्टी आपल्याकडच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळाल्याशिवाय साध्य होणार नाहीत. त्यासाठी खात्रीचे दर्जेदार आणि मोफत प्राथमिक शिक्षण सर्वाना मिळाले पाहिजे. म्हणून शैक्षणिक क्रांतीचे ते अग्रदूत बनले. मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सुविधा त्यांनी निर्माण केली. मुलींनी शिकले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृहाची निर्मिती केली. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. त्याचप्रमाणे भारत हा शेतीप्रधान देश लक्षात घेऊन तरुणांसाठी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. बंगलोर येथील सुप्रसिद्ध संस्था ' इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ' उभारणीत आणि जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
वृंदावन गार्डन उभारून मैसूर शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर घातली. म्हैसूर बँकेची स्थापना केली. विश्वेश्वरैया यांना केवळ शैक्षणिक आणि अभियांत्रीकीचेच ज्ञान नव्हते. त्यांच्यात एक कुशल आणि कल्पक उद्योजक सुद्धा दडलेला होता. म्हैसूर सॅंडल सोप फॅक्टरी, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, रेशीम निर्मिती अशा विविध उद्योगांना त्यांनी चालना दिली. रेल्वेमार्गाचाही विकास त्यांनी घडवून आणला.
म्हैसूर राज्याच्या विकासात असे विविध प्रकारे योगदान दिल्यानंतर १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेतून ते निवृत्त झाले. तोट्यात चालणारा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स हा कारखाना त्यांनी त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि जिद्दीने नफ्यात आणून दाखवला.
हैद्राबादप्रमाणेच त्यांनी ओरिसा राज्यातील महापूराचे नियंत्रण केले. म्हैसूरजवळील कावेरी नदीवरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. ते आजही त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देते. या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना या पाठीमागे त्यांचेच योजनाबद्ध नियोजन होते. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. एकाच व्यक्तीने केलेले हे विविध प्रकारचे कार्य पाहून अक्षरशः स्तिमित व्हायला होते.
याखेरीज विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचे कार्य केले आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला. याशिवाय देशभरातील विविध नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. विश्वेश्वरैयानमध्ये एक उत्तम लेखकही दडलेला होता. त्यांनी लिहिलेली ' रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया ', प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तके आजही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ' सर ' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी लिट ही पदवी देऊन गौरविले.
विश्वेश्वरैयाना भारताचा सर्वोच्च सन्मान देण्याचे भारत सरकारने ठरवले. त्यासाठी त्यांची संमती घेणारे पत्र सरकारने त्यांना पाठवले. त्या पत्राला विश्वेश्वरैय्यानी दिलेले उत्तर पुरस्कारासाठी धडपडणाऱ्या सर्वांनी मनन करावे असे आहे. सरकारला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, " देशाचा सर्वोच्च 'किताब देऊन तुम्ही माझा बहुमान करू इच्छिता त्याबद्दल धन्यवाद ! मात्र अशी पदवी दिल्यानंतर तुमच्या सरकारने जे काम केले असेल ते चांगले आहे म्हणून मी त्याची स्तुती करावी अशी जर तुमची इच्छा असेल, तर ते घडणार नाही. मी सत्याला सत्य म्हणणारा माणूस आहे. I am the man of facts. तेव्हा मला वाटले तर मी तुमच्यावर टीकाही करीन. हे तुम्हाला चालणार असेल तरच ही पदवी मला द्या. "
सुदैवाने त्यावेळी त्यांच्यासारख्या तत्वनिष्ठ व्यक्तीला समजून घेणारे पं नेहरू पंतप्रधान होते. त्यांनी विश्वेश्वरैय्याची ही अट मान्य केली आणि २४ जून १९५५ रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ' भारतरत्न ' देऊन सन्मान करण्यात आला. १५ सप्टेंबर १९६० या दिवशी त्यांचा १०० वा वाढदिवस पं नेहरूंच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वेश्वरैय्यानी पुढील काही वर्षात देशाच्या विकासाची दिशा काय असावी यावर आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे या शंभराव्या वर्षी ते उभे राहून सभेत बोलले. त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा त्यांच्या सन्मानार्थ ' अभियंता दिन ' म्हणून साजरा केला जातो. देशातल्या लाखो इंजिनिअर्सचा गौरव यानिमित्ताने त्या दिवशी केला जातो.
विश्वेश्वरैय्या हे अभियंत्यांचे रोल मॉडेल आहेत. पण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व केवळ इंजिनिअर्सचे रोल मॉडेल म्हणजे आदर्श राहून चालणार नाही. ते तुम्हा आम्हा सर्व भारतीयांचे आदर्श आहेत. राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या विधायक आणि सर्जनशील हातानी केवळ देशाच्या प्रगतीचाच ध्यास घेतला होता. स्वतःसाठी एखादे साधे घरही या व्यक्तीने बांधले नाही. त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आणि मनन करण्यासारखे आहेत. ते म्हणतात, " मी वेळेवर काम करतो. नियमित व्यायाम करतो. क्रोधापासून शेकडो कोस दूर राहतो. म्हातारपण जेव्हा मला भेटायला येते, तेव्हा त्याला सांगतो की अजून मी कार्यरत आहे. अजून वेळ आहे. पुन्हा कधीतरी ये. कष्ट करा, काम करा. कष्ट केल्याशिवाय जेवणाचा आम्हाला अधिकार नाही. मेहनत करण्यातच देशाचे हित आहे. त्याशिवाय आमचा देश पुढे जाऊ शकणार नाही. आळशीपणामुळे आम्ही मागे पडलो आहोत. अमेरिका आणि जपानसारखे देश आमच्या कितीतरी पुढे गेले आहेत, कारण तेथील लोक उद्योगी, मेहनती आहेत. "
महाराष्ट तर या विश्वेश्वरैयाना कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या सेवेतील महत्वाचा आणि मोठा कालखंड महाराष्ट्रातच व्यतीत झाला. धुळे शहरात त्यांच्या गौरवार्थ आणि स्मृतिप्रीत्यर्थ ' सर विश्वेश्वरैय्या संग्रहालय ' उभारण्यात आले आहे. जिज्ञासूंनी अवश्य भेट देऊन बघावे असे ते ठिकाण आहे. शेवटपर्यंत अखंडपणे कार्यरत राहून १४ एप्रिल १९६२ मध्ये या महापुरुषाने आपली इहलोकीची यात्रा संपवली. या आधुनिक भगीरथास प्रणाम !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.
रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.
ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.
विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले.
***************************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग चार ( अंतिम )
विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचे कार्य केले आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला. याशिवाय देशभरातील विविध नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. विश्वेश्वरैयानमध्ये एक उत्तम लेखकही दडलेला होता. त्यांनी लिहिलेली ' रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया ', प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तके आजही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ' सर ' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी लिट ही पदवी देऊन गौरविले.
विश्वेश्वरैयाना भारताचा सर्वोच्च सन्मान देण्याचे भारत सरकारने ठरवले. त्यासाठी त्यांची संमती घेणारे पत्र सरकारने त्यांना पाठवले. त्या पत्राला विश्वेश्वरैय्यानी दिलेले उत्तर पुरस्कारासाठी धडपडणाऱ्या सर्वांनी मनन करावे असे आहे. सरकारला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, " देशाचा सर्वोच्च 'किताब देऊन तुम्ही माझा बहुमान करू इच्छिता त्याबद्दल धन्यवाद ! मात्र अशी पदवी दिल्यानंतर तुमच्या सरकारने जे काम केले असेल ते चांगले आहे म्हणून मी त्याची स्तुती करावी अशी जर तुमची इच्छा असेल, तर ते घडणार नाही. मी सत्याला सत्य म्हणणारा माणूस आहे. I am the man of facts. तेव्हा मला वाटले तर मी तुमच्यावर टीकाही करीन. हे तुम्हाला चालणार असेल तरच ही पदवी मला द्या. "
सुदैवाने त्यावेळी त्यांच्यासारख्या तत्वनिष्ठ व्यक्तीला समजून घेणारे पं नेहरू पंतप्रधान होते. त्यांनी विश्वेश्वरैय्याची ही अट मान्य केली आणि २४ जून १९५५ रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ' भारतरत्न ' देऊन सन्मान करण्यात आला. १५ सप्टेंबर १९६० या दिवशी त्यांचा १०० वा वाढदिवस पं नेहरूंच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वेश्वरैय्यानी पुढील काही वर्षात देशाच्या विकासाची दिशा काय असावी यावर आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे या शंभराव्या वर्षी ते उभे राहून सभेत बोलले. त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा त्यांच्या सन्मानार्थ ' अभियंता दिन ' म्हणून साजरा केला जातो. देशातल्या लाखो इंजिनिअर्सचा गौरव यानिमित्ताने त्या दिवशी केला जातो.
विश्वेश्वरैय्या हे अभियंत्यांचे रोल मॉडेल आहेत. पण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व केवळ इंजिनिअर्सचे रोल मॉडेल म्हणजे आदर्श राहून चालणार नाही. ते तुम्हा आम्हा सर्व भारतीयांचे आदर्श आहेत. राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या विधायक आणि सर्जनशील हातानी केवळ देशाच्या प्रगतीचाच ध्यास घेतला होता. स्वतःसाठी एखादे साधे घरही या व्यक्तीने बांधले नाही. त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आणि मनन करण्यासारखे आहेत. ते म्हणतात, " मी वेळेवर काम करतो. नियमित व्यायाम करतो. क्रोधापासून शेकडो कोस दूर राहतो. म्हातारपण जेव्हा मला भेटायला येते, तेव्हा त्याला सांगतो की अजून मी कार्यरत आहे. अजून वेळ आहे. पुन्हा कधीतरी ये. कष्ट करा, काम करा. कष्ट केल्याशिवाय जेवणाचा आम्हाला अधिकार नाही. मेहनत करण्यातच देशाचे हित आहे. त्याशिवाय आमचा देश पुढे जाऊ शकणार नाही. आळशीपणामुळे आम्ही मागे पडलो आहोत. अमेरिका आणि जपानसारखे देश आमच्या कितीतरी पुढे गेले आहेत, कारण तेथील लोक उद्योगी, मेहनती आहेत. "
महाराष्ट तर या विश्वेश्वरैयाना कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या सेवेतील महत्वाचा आणि मोठा कालखंड महाराष्ट्रातच व्यतीत झाला. धुळे शहरात त्यांच्या गौरवार्थ आणि स्मृतिप्रीत्यर्थ ' सर विश्वेश्वरैय्या संग्रहालय ' उभारण्यात आले आहे. जिज्ञासूंनी अवश्य भेट देऊन बघावे असे ते ठिकाण आहे. शेवटपर्यंत अखंडपणे कार्यरत राहून १४ एप्रिल १९६२ मध्ये या महापुरुषाने आपली इहलोकीची यात्रा संपवली. या आधुनिक भगीरथास प्रणाम !
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
****************************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा
१९६४ मध्ये कॉंग्रेसच्या भुवनेश्वर अधिवेशनाच्या वेळी पं नेहरूंची प्रकृती ठीक नव्हती. साहजिकच या अधिवेशनातील ठराव मांडण्याची जबाबदारी शास्त्रीजींवर आली. शास्त्रीजींनी ती नेहमीप्रमाणे यशस्वीपणे पार पाडली. दुर्दैवाने २७ मे रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले. या वेळी मंत्रिमंडळात ज्येष्ठ असलेले श्री गुलझारीलाल नंदा यांची यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. परंतु कामराज यांना ही निवड पसंत नव्हती. त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांबरोबर बैठकी घेतल्या. इतर काही नावे समोर आली तरी बहुतेक सर्वांचा कल शास्त्रीजींच्या नावाकडेच राहिला. शेवटी सर्वानुमते शास्त्रीजींची पंतप्रधान पदी निवड झाली.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता सोळा वर्षे झाली होती. या कालावधीत पंडित नेहरूंच्या देशाने बरीच प्रगती केली होती. विशेषतः औद्योगिक व वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पुढे पडली होती. पण तरीही देश दुष्काळाच्या छायेत होता. अन्नधान्याचे विशेष उत्पादन नव्हते. शेतकरी हताश झाला होता. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये अस्वस्थता होती. शास्त्रीजींनी पदावर आल्याआल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा प्रचंड होता. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रसंगी चार शब्द सुनावून आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मंत्र्यांना आचारसंहिता ठरवून दिली. त्यांची तळमळ पाहून सर्व मंत्र्यांनी सुद्धा त्यांना मनापासून साथ दिली.
भारतातील अन्नधान्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी त्यांनी परदेशातून धान्याची आयात केली. यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. पण ते याबाबतीत समाधानी नव्हते. त्यांना देशाचा विकास करून देशाला संरक्षण आघाडीवर स्वयंपूर्ण करायचे होते. त्यांनी यासाठी देशातील जनतेला ‘ जय जवान, जय किसान ‘ असा नारा देऊन सहकार्याचे आवाहन केले. धान्याच्या खरेदीसाठी त्यांनी ‘ खरेदी विक्री संघ ‘ स्थापन केला. यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार होता. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कालवे बांधून पाणी उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
शेतीच्या वाढीव उत्पन्नासाठी रासायनिक खतांची गरज होती. त्यांनी यासाठी अमेरिकेची मदत घेऊन रासायनिक कारखाने सुरु केले. यात शेतीला खत उपलब्ध होण्याबरोबरच तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी तरुणांना सहकार्याचे आवाहन केले. तरुणांनी सुद्धा त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. शेतकरी, सैनिक, बेरोजगार तरुण इ. साठी त्यांनी केलेले प्रयत्न भावी काळात देशाला प्रगतीपथावर नेणारे ठरले. कारखान्यांनी औद्योगिक क्षेत्रात भारताला पुढे नेले. देशाच्या संरक्षण सिद्धतेत त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. सर्व दृष्टीने देशाला स्वयंपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
आपल्या पंतप्रधान पदाच्या कालखंडात त्यांनी इतर देशांशी सलोख्याचे व दृढ संबंध करण्यावर भर दिला. अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेहून परतताना त्यांनी मुद्दाम पाकिस्तानचे नेते अयुबखान यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत शस्त्रबंदी करार केला. पण पाकिस्तानने विश्वासघात केला. हजारो घुसखोर सैनिक पाकिस्तानने काश्मीरमध्ये पाठवले. पाकिस्तानच्या या कृतीमुळे शास्त्रीजी प्रक्षुब्ध झाले. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी मंत्रिमंडळ आणि सेनाप्रमुखांच्या बैठकी घेतल्या. जनतेलाही विश्वासात घेतले आणि युद्धाची जय्यत तयारी केली. पाकिस्तानला यावेळी अमेरिकेने रणगाडे पुरवून युद्धात मदत केली. पण शास्त्रीजींच्या आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावले होते. त्यामुळे भारताने या युद्धात पाकिस्तानला लक्षात राहिला असा जबरदस्त तडाखा दिला. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेल्या अभेद्य अशा पॅटन रणगाड्यांचा देखील भारतीय सैन्याने धुव्वा उडवला. नेहरूंच्या मृत्युनंतर भारत कमकुवत झाला असा पाकिस्तानचा समज झाला होता. तो या युद्धाने खोटा ठरवला.
( पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
†***********************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री ( अंतिम भाग )
१९६५ च्या या भारत पाक युद्धात शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचे आक्रमण तर परतवून लावलेच पण पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय प्राप्त केला. पण इंग्लंड, अमेरिका इ. राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याबद्दल भारताला दोष दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटाघाटी घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला. भारताने पाकिस्तानवर निःसंदिग्ध विजय मिळवल्याने खरे म्हणजे या वाटाघाटींची अजिबात आवश्यकता नव्हती. पण एकंदरीत असे वातावरण निर्माण करण्यात आले की या परिषदेला जाणे शास्त्रीजींना भाग पडले. हा सगळा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच भाग होता. त्यासाठी १० जानेवारी १९६६ ला रशियात ताश्कंद करार परिषद झाली. या परिषदेसाठी शास्त्रीजी प्रकृती ठीक नसतानाही रशियाला गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान करार होऊन त्यावर सह्या झाल्या. या करारामुळे भारताला आपल्या मालकीच्या काश्मीरच्या प्रदेशातून माघार घ्यावी लागणार होती. हा भारताच्या भूमिकेचा राजनैतिक पराभवच होता. या करारामुळे भारतावर प्रचंड दबाव आला. शाश्त्रीजी अस्वस्थ झाले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि तेथेच शास्त्रीजींचे दु:खद निधन झाले. भारतमातेचा लाल हरपला. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण देश हळहळला. एका कार्यक्षम, कर्तव्यतत्पर नेत्याला भारतीय जनता मुकली होती. भारतमातेच्या रत्नहारातील एक रत्न ओघळले होते.
शास्त्रीजींचा मृत्यू मनाला चटका लावून जातो. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असं जरी म्हटलं जात असलं तरी खरं म्हणजे त्यांचा मृत्यू हे एक गूढ आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या ' द ताश्कन्द फाईल्स ' या चित्रपटात हे गूढ बऱ्यापैकी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या शीतयुद्धाच्या काळात संपूर्ण जग दोन भागात विभागले गेले होते. जगातले अर्धे देश अमेरिकेच्या बाजूने तर उर्वरित देश रशियाच्या बाजूने होते. हे दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्याच्याप्रमाणे या दोन्ही देशांच्या गुप्तहेर संघटना इतर देशांमध्ये ढवळाढवळ करून आपल्याला अनुकूल अशा घटना घडवून आणत होत्या. त्यावेळी भारतावर रशियाचा प्रभाव होता. पं नेहरू रशियातील औद्योगिक क्रांती पाहून भारावून गेले होते. भारताच्या औद्योगिक विकासासाठी रशियाची मदत अनुकूल ठरेल असे त्यांना वाटल्याने भारत रशियाकडून औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली प्रचंड यंत्रसामुग्री आयात करत होता. खरे म्हणजे यात रशियाचाही प्रचंड फायदा होता. रशिया भारताचे हित जपतो आहे असा भारतीयांचा समज दृढ करण्यात रशिया यशस्वी झाला होता. रशियाचे अनेक हस्तक भारतात कार्यरत होते. अनेक भारतीय राजकारणी आणि मंत्री रशिया आणि त्यांच्या हस्तकांच्या प्रभावाखाली होते आणि त्यांना अनुकूल असे निर्णय घेत होते. कदाचित शास्त्रीजींसारखा तत्वनिष्ठ नेता त्यांना आणि रशियन राज्यकर्त्यांना अडचणीचा ठरत असावा.
भारत पाकिस्तान युद्धानंतर खरे म्हणजे जी ताश्कन्द परिषद झाली ती आवश्यक नव्हती. पण एकंदरीत आंतराराष्ट्रीय कटाचा एक भाग म्हणून तसे वातावरण निर्माण करण्यात आले. शास्त्रीजींना त्या ठिकाणी जाणे अपरिहार्य ठरले. त्या ठिकाणी झालेला शास्त्रीजींचा मृत्यू संशयास्पद ठरला. भारतासारख्या एका महत्वाच्या देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या नेत्याचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याची योग्य ती चौकशी व्हायला हवी होती. पण शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतरचा अहवाल ना रशियाने प्रसिद्ध केला ना भारताने. त्यांचे पार्थिव भारतात आले तेव्हा ते पूर्णपणे काळे पडले होते. शरीरावर ठिकठिकाणी कापल्याच्या जखमा होत्या. त्यातून थोडे रक्तही निघाल्याचे दिसत होते. या सगळ्या गोष्टी शास्त्रीजींवर विषप्रयोग झाल्याचे सूचित करतात. त्यांच्या शरीरात विषाचा अंश सापडू नये म्हणून शरीराला जखमा करून विषाचे अंश काढून टाकण्याचा प्रयत्न झाला असावा. शास्त्रीजींच्या कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा शास्त्रीजींचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे नाकारले आहे. तसेच प्रख्यात पत्रकार कुलदीप नायर हेही त्यावेळी उपस्थित होते. त्यांचेही असेच मत आहे. शास्तीजींच्या मृत्यूसंदर्भात जे प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदार होते, त्यांचाही वेगवेगळ्या अपघातात मृत्यू होतो हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. आपल्या भूमिकेला प्रतिकूल असलेल्या व्यक्तींचा आणि संस्थांचा काटा काढण्याचे काम रशियन आणि अमेरिकन हेरखात्याने सहजपणे केले आहे, याच पार्श्वभूमीवर शास्त्रीजींच्या बळी गेला असल्याच्या शक्यतेकडे निर्देश ' द ताश्कन्द फाईल्स ' हा चित्रपट करतो.
२ ऑक्टोबरला म गांधींची जयंती असते. त्याचबरोबर शास्त्रीजींची पण जयंती असते. पण देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या भारतमातेच्या सुपुत्राची काहीशी उपेक्षाच झालेली दिसते. शास्त्रीजींनी देशासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांनी आपले खाजगी जीवन, त्यातील मौजमजा यांना तिलांजली दिली. प्रसंगी आपल्या प्रकृतीची सुद्धा पर्वा केली नाही. या माणसाचे राहणे कायमच अत्यंत साधे होते. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावरही त्यांच्या साध्या राहणीमानात फरक पडला नाही. पदाचा अहंकार त्यांच्यात कधीही आला नाही. खादीचे धोतर, सदरा आणि टोपी हाच त्यांचा पोशाख कायम राहिला. त्यांचा मनमिळावू स्वभाव सुद्धा शेवटपर्यंत कायम राहिला. कोणावरही ते कधी रागावले नाही. आपण कोणीतरी खूप मोठे आहोत असा आव त्यांनी कधी आणला नाही. कधी त्यांच्या हातून एखादी चूक झाली तर ते स्वतःला शिक्षा करीत व त्यात सुधारणा करीत असत. आपल्या भारतमातेला वैभवसंपन्न करण्यासाठी हा महात्मा आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला. ते खरोखरच भारतरत्न होते. अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय असे त्यांचे जीवन होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी, उज्ज्वल चारित्र्य, निगर्वी स्वभाव आणि देशासाठी स्वतःला वाहून घेणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. अशा या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. अशा या महान आणि आदरणीय दुसऱ्या राष्ट्रपित्याला शतशः प्रणाम.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/१०/२०२०
प्रतिक्रयेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
***************************************
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन
आपल्या शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान, संस्कार आणि आशीर्वाद घेऊन कलाम प्रत्यक्ष व्यावहारिक जगामध्ये आपली भूमिका पार पडण्यासाठी निघाले. १९५८ मध्ये बंगलोर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी विमान तयार करण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले. या संस्थेतून खूप काही आत्मसात केल्यानंतर ते पदवीधर एरोनॉटिक्स इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे भारतीय वायुदलात वैमानिक म्हणून काम करणे किंवा दुसरे म्हणजे भारताच्या संरक्षण खात्यात ( Directorate of Technical Development and Production ) नोकरी स्वीकारणे. या दोन्ही ठिकाणच्या परीक्षा त्यांनी दिल्या. हवाई दलातील परीक्षा देण्यासाठी त्यांना देहराडूनला जावे लागले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयातील संचालनालयाच्या विभागात त्यांना नेमणूक मिळाली आणि तेथे ते वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदावर रुजू झाले.
येथे रुजू होण्यापूर्वी ते देहरादूनहून ऋषिकेशला गेले होते. तेथे ते स्वामी शिवानंद यांच्या भेटीसाठी गेले. स्वामी शिवानंदांच्या व्यक्तिमत्वाने ते भारावून गेले. स्वामी शिवानंद म्हणजे जणू भगवान बुद्ध आहेत असे त्यांना वाटले. त्यांचे कलाम हे मुस्लीम नाव ऐकल्यावर स्वामीजी जराही विचलित झाले नाहीत. उलट ते कलामाना म्हणाले, “ मुला, तू निराश होऊ नकोस. तू हवाई दलात जावंस असं विधिलिखित नाही. हे अपयश तू विसरून जा. तुला पुढील मार्गावर नेण्यासाठी नियतीचा हा एक संकेत होता. “ किती सुंदर शब्दात स्वामीजींनी कलामांना सांगितले ! आणि खरेच आहे. इंग्रजीत एक वाक्य आहे, “ When God closes one door, He opens another.” खरोखर नियतीने पुढील कार्यासाठीच जणू ही योजना केली होती.
पुढे कानपूरला काही काळ प्रशिक्षण घेतल्यानंतर कलाम बेंगळूरुला एडीई ( Aeronautical Development Establishment ) या संस्थेत काम करू लागले. तेथे त्यांनी एका वर्षानंतर स्वदेशी बनावटीचे हॉवरक्राफ्टचे डिझाईन बनवले. नंतर पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रमुख डॉ एम जी के मेनन यांनी भेट दिली आणि कलाम यांच्या कामगिरीने ते प्रभावित झाले. आणि पुढे त्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेत रॉकेट इंजिनिअर या पदासाठी निवड करण्यात येऊन त्यांना थुंबा येथील रॉकेट लॉन्चिंग स्टेशनला भेट देण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या पुढील मिसाईल मॅन म्हणून गौरवल्या जाणाऱ्या करिअरची ही सुरुवात होती. त्यादृष्टीने जणू त्यांची पायाभरणी सुरु होती. या पायाभरणीत अपार कष्ट होते. समर्पित भावाने काम करायचे होते. या सगळ्यात कलाम कुठेही कमी पडले नाहीत. थोड्याच दिवसात त्यांना अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्थेत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरले. तत्पूर्वी कलामांनी आपल्या गावी म्हणजे रामेश्वरमला जाऊन आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. काही आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत घालवले आणि मग तेथून ते थेट व्हर्जिनियातील नासाच्या केंद्रात दाखल झाले.
या अमेरिकेतील नासाच्या दौऱ्यात कलामांना क्षेपणास्त्र बनवण्याची प्रेरणा प्राप्त झाली. त्यांना एके ठिकाणी एक चित्र पाहायला मिळाल. या चित्रात टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्या लढाईत टीपूने इंग्रंजावर केलेला एका क्षेपणास्त्राचा प्रयोग केलेला दाखवला होता. हे पाहून त्यांनी मनोमन निश्चय केला की भारतातून अस्तंगत झालेले हे क्षेपणास्त्र आपण पुनरुज्जीवित करायचे. आपले प्रशिक्षण संपल्यानंतर ते भारतात परतले. एव्हाना भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. यावेळी क्षेपणास्त्र क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांसोबत अमेरिका, रशिया आणि फ्रान्समधून आलेले शास्त्रज्ञ काम करीत होते. कलामांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. डॉ विक्रम साराभाई हे महान शास्त्रज्ञ या वेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी डॉ कलाम यांच्यावर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
१९६७ मध्ये रोहिणी या स्वदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. या वेळी या उपग्रहाने त्याचा पहिला टप्पा पार केला. परंतु दुसऱ्या टप्प्यात ते नियंत्रणाबाहेर गेले आणि श्रीहरीकोटापासून ५६० किमी अंतरावर समुद्रात कोसळले. परंतु या अपयशाने ते खचून गेले नाहीत. डॉ कलाम आणि अन्य शास्त्रज्ञांचे मार्गदर्शक आणि प्रमुख डॉ विक्रम साराभाई यांचे १९७१ ,मध्ये दुर्दैवाने निधन झाले. पण या सगळ्यांना आपले गुरु डॉ विक्रम साराभाई यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने वाटचाल करायची होती. निराश होऊन किंवा हिंमत हरून चालणार नव्हते. त्यामुळे कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले अथक प्रयत्न चालू ठेवले. अनेक अडचणीतून त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मनापासून प्रयत्न असले तर नियतीचे साहाय्य मिळतेच. १८ जुलै १९८० रोजी रोहिणी उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला गेला. या यशामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला.उपग्रह प्रक्षेपणाची यंत्रणा असलेल्या काही मोजक्या देशात भारत जाऊन बसला. कलामांच्या या कामगिरीची दाखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा सन्मान जाहीर केला. समस्या कोणतीही असो, ती कलाम लीलया सोडवीत. या त्यांच्या कौशल्याचा कस पुढील काळात लागला.
कलाम यांच्यावरील जबाबदाऱ्या आता वाढत चालल्या होत्या. आता स्वदेशी बनावटीचा अग्निबाण तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना त्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी ३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि बारा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला. क्षेपणास्त्र बनवण्याची रूपरेषा आखण्यात आली. सरफेस टू सरफेस मिसाईल पृथ्वी, सरफेस तो एअर मिसाईल आकाश, त्यानंतर त्रिशूळ, नाग अशी क्षेपणास्त्राची नावे निश्चित करण्यात आली. या कामासाठी कलाम यांनी स्वतःला वाहून घेतले. दिवस रात्र, खाजगी जीवन इ ची कोणतीही आठवण त्यांना या कामात गढून गेल्याने राहिली नाही. ( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग चार ( अंतिम )
कामात झोकून देणे किंवा एखादे काम किती निष्ठेने करावे याचे कलाम मूर्तिमंत उदाहरण होते. याचे एक उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. याच कालावधीत त्यांच्या प्रिय बहिणीच्या मुलीचे लग्न होते. जोहरा आणि तिचे पती यांनी कलाम यांना वेळोवेळी शिक्षणासाठी मदत केली होती. पण जोहराच्या मुलीच्या लग्नाचे देखील कलाम यांना लक्षात राहिले नाही एवढे ते आपल्या कामात गढून गेले होते. एकाएकी लग्नाच्या दिवशी त्यांना आठवण झाली. पण त्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तेथे पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. ही गोष्ट तत्कालीन संरक्षणमंत्री वेंकटरमण यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ कलाम यांच्यासाठी इंडियन एअर लाईन्सला कलामांसाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले. हे विमान त्यांना चेन्नई पर्यंत घेऊन गेले. तेथून पुढे त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले होते. अशा रीतीने कलाम आपल्या प्रिय भाचीच्या लग्नात पोहचू शकले. ही गोष्ट आपल्याला खूप काही सांगून जाते. त्यांचे आपल्या कामाप्रती असलेले समर्पण, निष्ठा याचेच हे फळ होते.
हा क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवीत असताना चारशे शास्त्रज्ञांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कलामांकडे आली. आणि त्यांनी ती उत्तम प्रकारे पार पाडली. किंबहुना नेतृत्व कसे करावे आणि आपल्या सहकाऱ्यांकडून कशा प्रकारे काम करून घ्यावे याचा आदर्शच त्यांनी घालून दिला. त्रिशूळ या मिसाइलची यशस्वी चाचणी झाली. अग्नी या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्याच्या वेळी मात्र दोनदा अडचणी आल्या. त्यातील यंत्रे काही कारणाने नीट काम करेनाशी झाली. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कलाम आणि त्यांच्या कार्यक्रमाला टीकेचे लक्ष्य केले. पण त्यामुळे कलाम विचलित झाले नाहीत. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. आणि २२ मे १९८९ ला अग्नी क्षेपणास्त्र यशस्वीपणे अवकाशात झेपावले. या वेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी त्यांचे मनापासून कौतुक केले. हे उड्डाण यशस्वी होणार हे जेव्हा निश्चित झाले तेव्हा संरक्षणमंत्री होते के सी पंत. त्यांनी कलामांना विचारले, ‘ अग्नीचे हे यशस्वी उड्डाण आपण कशा प्रकारे साजरे करावे असे तुम्हाला वाटते ?’ त्यावेळी कलाम यांनी स्वतःसाठी काहीही मागितले असते तरी त्यांना मिळाले असते. पण हा आधुनिक विज्ञान महर्षी काय उद्गारला असेल माहिती आहे ? ते म्हणाले, ‘ मला या अणू संशोधन केंद्राभोवती झाडांची एक लाख रोपे लावलेली हवी आहेत.’ अर्थातच कलाम यांची ही इच्छा तत्काळ पूर्ण आली हे सांगणे नलगे...! आज हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. याचे श्रेय कलामांना जाते. नंतर पुढच्याच वर्षी त्रिशूल या अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण झाले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या कार्यक्रमातला एक टप्पा पूर्ण झाला.
यानंतर डॉ कलामांना आपण सेवानिवृत्त व्हावे असे वाटत होते. पण नियतीला त्यांच्या हातून महान कामगिरी करून घ्यायची होती. याच सुमारास अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. आणि त्यांनी राजस्थानातील पोखरण येथील अणुसंशोधन आणि अणुचाचण्यांचा कार्यक्रम पुढे सुरु ठेवावा असा आदेश दिला. या कामाची प्रमुख जबाबदारी अर्थातच डॉ कलाम यांच्यावर टाकण्यात आली. येथे कलामांचे प्रशासकीय कौशल्य सुद्धा दिसून आले. या कामांसाठी त्यांनी तीन महत्वाच्या संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्यात सुसूत्रता निर्माण केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, संरक्षण विभाग आणि मुंबईची भाभा अणुसंशोधन संस्था या त्या तीन संस्था होत. आणि कलामांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी अणुस्फोट चाचण्या करण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले. ही भारतासारख्या विकसनशील देशासाठी फार मोठी कामगिरी होती. या अणुस्फोटाबद्दल एवढी गोपनीयता बाळगण्यात आली होती की अमेरिकेचे टेहेळणी करणारे उपग्रह देखील याची नोंद घेऊ शकले नाही. हे अणुस्फोट झाल्यानंतरच जगापुढे ही गोष्ट आली ! आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अमेरिकेसारख्या पाश्चात्य राष्ट्रांनी साहजिकच भारतावर अनेक बंधने लादली. पण आपण त्यामुळे विचलित झालो नाहीत. ही या क्षेत्रातील घोडदौड आपण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. कलामांच्या या महत्वपूर्ण कामगिरीची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ भारतरत्न ‘ प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्यावर कळस म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी या विज्ञान महर्षींची निवड झाली. २५ जुलै २००२ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. डॉ कलाम राष्ट्रपतीपदी आरूढ झाल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी त्यांचा गौरव करणारे लेख लिहिले. डॉ कलाम यांच्या रूपाने एक सुयोग्य व्यक्ती राष्ट्रपतीपदी आरूढ झाली अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ कलामांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी काही काळ चेन्नई येथील अण्णादुराई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सेवा केली. याच दरम्यान त्यांनी देशाच्या विविध भागांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. ते मुलांमध्ये आपला मोठेपणा विसरून रममाण होत असत. मुलांना बोलके करण्याचे एक मोठे कौशल्य त्यांच्या स्वभावात होते. २००२ च्या मध्यापर्यंत ते सुमारे ६०००० विद्यार्थ्यांना भेटले. एक लाख विद्यार्थ्यांना भेटण्याचा त्यांचा निश्चय होता. या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी आपल्या मनातील नव्या भारताची चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती. सुमारे दोन वर्षे ते भारतातील विविध भागात फिरले. या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांची दोन पुस्तके इंडिया २०२० आणि इग्नायटेड माइंड़्स ( प्रज्वलित मने ) त्यांनी विद्यार्थ्यांना अर्पण केली आहेत. त्यांच्या विचारांचे, अनुभवाचे सार या पुस्तकांमध्ये आहे. तरुणाईसाठी ही पुस्तके म्हणजे प्रेरणास्त्रोत आहेत.
विज्ञानाची आवड असणारा आणि विज्ञानात रमणारा हा वैज्ञानिक एक साधा,सरळ आणि सच्चा माणूस होता. मोठ्या माणसापासून ते अगदी शिपायापर्यंत कोणालाही ते अगदी सहजपणे भेटत असत. रुद्रवीणा वाजवण्याची त्यांना आवड होती. दररोज कुराण आणि भगवद्गीता ते वाचत असत. आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे ते एक लोकप्रिय राष्ट्रपती बनले. २००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. आपल्या कामकाजाची एक आगळीवेगळी छाप त्यांनी उमटवली. राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा अखंड कार्यरत राहिले. विद्यार्थ्यांना भेटत राहिले. त्यांच्यामध्ये उज्ज्वल भारताची स्वप्ने पेरत राहिले. २८ जुलै २०१५ रोजी विद्यार्थ्यांमध्ये व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच या कर्मयोग्याचा अंत झाला. उज्ज्वल भारताच्या विकासासाठी अखंड झेपावणारे एक मिसाईल आपले काम पूर्ण करून अखेर शांत झाले. २०२० मधील विकसित भारताचे स्वप्न त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. ‘ स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहा आणि स्वप्ने पाहा... कारण स्वप्नेच विचारात परावर्तीत होतात आणि विचारातूनच आपण कृतीप्रवण बनतो ‘ हा त्यांचा तुमच्या आमच्यासाठी संदेश आहे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०६/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९
कृपया लेख वाचून आपली प्रतिक्रिया कळवावी.
आपला
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
मो 9403749932















टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा