उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सहा )
सुनी गेली तेव्हा ती फक्त ४३ वर्षांची होती. जेहने नुकतेच तारुण्यात पाऊल ठेवले होते. तो साधारण १९/२० वर्षांचा असेल त्यावेळी. आर डीं ना सुनीचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही. ते आठ दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे होते. जेहच्या मनात देखील केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनिअर होण्याची इच्छा होती. आर डी परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते, ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाली होती.
आर डी आणि मुले आता एकत्र राहू लागली. आर डी म्हणजे अनेक गुणांनी विभूषित झालेले व्यक्तिमत्व होते. वक्तशीरपणा, शिस्त याबाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सर्व कामे वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असे. आर डींच्या स्वभावात एक दोष मात्र होता. ते लवकर संतापत आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडत. त्यांची ही सगळीच स्वभाववैशिष्ट्ये जेहने जशीच्या तशी उचलली होती. आर डीं चे देखणे व्यक्तिमत्व, रुबाबदारपणा हे देखील जेहमध्ये उतरले होते. जेहचेआजोबा म्हणजे सुनीचे वडील यांचेही काही गुण जेहमध्ये आले होते. सुनीचे वडील सतत हसतमुख असत. त्यांच्यात हजरजबाबीपणा कमालीचा होता. आपल्या आजोबांची आनंदी वृत्ती, खेळकरपणा, हजरजबाबीपणा जेहने उचलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू त्याला पुढील आयुष्यात फार उपयोगाचे ठरले. आर डी सुटीमध्ये मुलांना पॅरिसमध्ये आजीकडे पाठवत असत. या मुलांची आजी म्हणजे सुनीची आई यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
जमशेटजी गेल्यानंतर आर डींनी त्यांना दिलेला शब्द कसोशीने पाळला. दोराबजींबरोबर त्यांनी टाटांच्या सगळ्या व्यवसायात बरोबरीने योगदान दिले. पहिले महायुद्ध संपले होते. या काळात ब्रिटिशांना रेल्वेसाठी पोलादी रूळ पुरवणाऱ्या टाटांच्या कारखान्यात आता अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कामगारांचे पगार करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत दोराबजींनी आणि आर डींनी इंपिरियल बँकेकडे कर्जाच्या रूपात मदत मागितली. दोराबजींनी आपली मालमत्ता आणि पत्नीचे दागिनेसुद्धा त्यासाठी गहाण ठेवले. पुढे सरकारने टाटांना सहकार्य करण्याचे ठरवले. या काळात काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी टाटा कुटुंबियांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. आर डी आणि मोतिलालजी नेहरू यांची चांगली मैत्री जमली होती. मोतीलाल नेहरू आर डींच्या ' सुनीता ' बंगल्यात राहूनही गेले होते.
१९२३ ला जेहला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. तो क्रॅमर या संस्थेत केम्ब्रिजच्या प्रवेशाची पूर्वतयारी करण्यासाठी दाखल झाला. केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेऊन त्याला इंजिनिअर व्हायचे होते. त्याचा क्रॅमरमधील अभ्यासक्रम संपून केम्ब्रिजमध्ये प्रवेशाची वेळ आली तेव्हा जेहच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने एक नवीन कायदा केला होता. या कायद्यानुसार फ्रान्समधील प्रत्येक कुटुंबातील वीस वर्षे वयाच्या मुलांना सैन्यात दोन वर्षांसाठी भरती होऊन लष्कराचे प्रशिक्षण घ्यावे लागणार होते. कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलासाठी ही अट एक वर्षाने शिथिल करण्यात आली होती. जेहकडे फ्रान्सचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते. फक्त तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने त्याला एक वर्षाची सूट मिळणार होती. त्याचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न मात्र लांबणीवर पडले होते.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा