मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पाच )

  उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पाच )

मुलांच्या शिक्षणासाठी सुनीला वारंवार घर बदलावे लागे. तिची खूप धावपळ होत असे म्हणून सुनीच्या आणि मुलांच्या सोयीसाठी आर डी नी फ्रान्समध्ये हार्डलॉट येथे स्वतःचे घर विकत घेतले. हे घर फ्रान्समधील प्रसिद्ध वैमानिक लुई ब्लेरिओ याच्या घराजवळच होते. १९०९ मध्ये आपल्या विमानाने इंग्लिश खाडी पार करणारा लुई हा पहिला वैमानिक होता. जेहला मुळातच मोटारी आणि विमाने यांची आवड होती. एका प्रसिद्ध वैमानिकाच्या घराजवळ राहायाला मिळणे ही जेहसाठी सुवर्णसंधीच होती. लुईच्या विमानांची उड्डाणे आणि लँडिंग जेह मोठ्या उत्सुकतेने बघत असायचा.

१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अनेक सैनिक जखमी होत होते. या कठीण प्रसंगी देशाची सेवा करता यावी या उदात्त भावनेतून सुनीने पॅरिसमधीलच एका अमेरिकन हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्या कामात व्यत्यय येऊ नये तसेच मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिने आपल्या मुलांना तिच्या आईकडे पाठवले. हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली. सुनीला देखील कामाचा ताण वाढू लागला. तिच्या नाजूक प्रकृतीला हा ताण झेपत नव्हता. तशातच तिला क्षयाची बाधा झाली आणि तिची प्रकृती ढासळत गेली.

तशातच महायुद्धामुळे पॅरिसमधील परिस्थिती धोकादायक झाली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरवर बॉम्बहल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते. तशातच खाण्यापिण्याची सुद्धा आबाळ होत होती. हे आर डीं ना कळल्याबरोबर त्यांनी तातडीने सुनी आणि मुलांना मुंबईत आणण्याची व्यवस्था केली. त्या वेळी समुद्रप्रवासाला पर्याय नव्हता. महायुद्धामुळे समुद्रप्रवासही धोक्याचा बनला होता. पाणबुडी आणि जहाजांवर हल्ले होत होते. पण हा धोका पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने सुनी आणि मुले सुखरूप भारतात आले. दरवेळी सुनी भारतात आली की आर डी भाड्याने नवीन घर घेत. पण आता तिची प्रकृती नाजूक झाली होती. तिला ताण नको म्हणून आर डींनी सुनी आणि मुलांची व्यवस्था मुंबईच्या ताज हॉटेलमध्येच केली. आता पॅरिसपेक्षा जेवण चांगले मिळू लागले पण मुंबईची दमट हवा सुनीच्या प्रकृतीला मानवत नव्हती. त्यामुळे आर डींनी तिला समशीतोष्ण हवामान असलेल्या जपानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. व्यापारानिमित्ताने जपानमध्ये आर डींचे संबंध होतेच.

जपानमध्ये सुनी आणि मुलांनी साधारण दीड वर्ष वास्तव्य केले. या काळात मुलांच्या शिक्षणाची जरा आबाळच झाली. महायुद्धाचे ढग जसे विरळ होऊ लागले तसे सुनीने मुलांसह भारतात परतण्याचे ठरवले. यावेळी जेह साधारण १४ वर्षांचा झाला होता. येताना परतीच्या प्रवासात जेहला टायपिंग शिकण्याची संधी मिळाली. त्या जहाजावर एक जुने रेमिंग्टनचे टायपिंग मशीन होते. नवीन गोष्टी शिकण्याची आवड असलेल्या जेहने तेवढ्या काळात टायपिंगचे ज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान त्याला पुढे अत्यंत उपयोगी पडले. या ज्ञानाचा त्याला कसा उपयोग झाला ते पुढे येईलच. या जहाजाने मुले आणि सुनीला भारतात सोडले आणि ते पुढे इंग्लंडकडे रवाना झाले. पण पुढील प्रवासात हे जहाज सुरुंगस्फोटाने उध्वस्त होऊन समुद्रात बुडाले व त्यावरील सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली. सुदैवाने टाटा कुटुंबियांवरील हे गंडांतर टळले.

मुंबईत काही काळ राहून सुनी आणि मुले पुन्हा फ्रान्सला रवाना झाली. त्यांचे साधारणपणे पाच वर्षे तेथे वास्तव्य झाले. हा काळ बऱ्यापैकी शांततेचा गेला. जेहचे शिक्षणही तेथे Janson De Sailly या नावाच्या शाळेत उत्तम प्रकारे झाले. ही शाळा जेहला अतिशय आवडली. या काळात आर डी आपल्या कुटुंबापासून दुरावले होते त्यामुळे १९२२ मध्ये त्यांनी सुनी आणि मुलांना भारतात परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे होते. आर डींचे आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होते. आता तिच्यासाठी भाड्याचे घर घ्यावे लागू नये म्हणून त्यांनी तिच्यासाठी आणि मुलांसाठी मलबार हिलच्या निसर्गरम्य परिसरात आलिशान बंगला बांधण्याचे ठरवले. ते हा बंगला सुनीला परके वाटू नये म्हणून फ्रेंच पद्धतीची डिझाईन, फर्निचर असलेला तयार करत होते. सुनीलाही आपल्या या नवीन घराबद्दल उत्सुकता होती. तिच्या डोळ्यात आपल्या नव्या घरात आपण आपल्या पती आणि मुलांसह राहण्याची स्वप्ने तरळत होती. या बंगल्यासाठी तिने स्वतः पॅरिसमध्ये फिरून वस्तू गोळ्या केल्या होत्या.

पण दैवाच्या मनात दुसरेच काही असावे. सुनीचे पाय या घराला लागायचे नव्हते. तिची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. इकडे टाटा स्टील आणि टाटा इंडस्ट्रियल बँक हे टाटांचे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. आर डी त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यात मग्न होते. त्यांच्या मनात आपल्या प्रिय पत्नीला भेटायला जाण्याची तीव्र इच्छा होती. मुलांनाही भेटण्यासाठी पित्याचे हृदय तळमळत होते. शेवटी त्यांनी तिच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला. पण निघण्यापूर्वीच त्यांच्या हातात सुनी गेल्याची दुःखद बातमी तारेद्वारा येऊन पडली. जड अंतःकरणाने ते फ्रान्सला गेले. सुनीची आणि त्यांची अंतिम भेट ( अंत्यदर्शन ) देखील होऊ शकले नाही. मुलांना घेऊन ते मुंबईला परतले. यथावकाश त्यांच्या बंगल्याचे काम पूर्ण झाले पण जिच्यासाठी एवढा सुंदर बंगला बांधला, तीच आता या जगात नव्हती. सुनी वाचून घर सुने होते. तिची आठवण म्हणून आर डी नीं घराला ' सुनीता ' हे नाव दिले.

( क्रमशः पुढील भाग बुधवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...