उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग अठरा
माऊंटबॅटन यांची भारतातील कारकीर्द संपत आली होती. ते इंग्लंडला परत जाणार होते. जाता जाता हैदराबादच्या यशाचे मोरपीस आपल्या मुकुटात खोवावे अशी त्यांची साहजिकच इच्छा होती. त्यांना हैदराबाद भारतात सामील करण्याच्या बाबतीत रस नव्हता तर येनकेन प्रकारे ही समस्या मार्गी लावून त्याचे श्रेय त्यांना घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एक कराराचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यातील बऱ्याचशा अटी हैदराबादच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. या कराराची कागदपत्रे तयार करून त्यांनी पं नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद, गोपालस्वामी अय्यंगार आणि संरक्षणमंत्री बलदेवसिंह यांना आपल्या सोबत घेतले. स्वतःच्या खाजगी विमानाने ते या सर्वांना घेऊन पटेलांच्या भेटीसाठी डेहराडूनला आले. या काळात सरदार पटेल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे तेथे विश्रांती घेत होते.
माऊंटबॅटन यांनी कराराच्या कागदपत्रांची फाईल पटेल यांच्यासमोर ठेवली. पटेल ती कागदपत्रे वाचत असताना त्यांच्या हावभावाकडे माऊंटबॅटन यांचे बारीक लक्ष होते. पटेल वाचता वाचता मध्येच पुटपुटत होते. ' नाही, हे शक्य नाही. मी हे कदापि मान्य करणार नाही. ' यानंतर माऊंटबॅटन यांनी काही न बोलता तो विषय तेथेच सोडून दिला. इकडची तिकडची चर्चा झाल्यावर सगळ्या मंडळींनी एकत्र जेवण घेतले. यानंतर पुन्हा सगळ्यांच्या सुरुवात झाली. माऊंटबॅटन आता भारतातून परत जाणार हे जाणून सरदार पटेल म्हणाले, ' तुम्ही आमच्यासाठी बरेच काही केले आहे. तुम्हाला काय हवे ते मला सांगा. मला शक्य होईल ते मी तुमच्यासाठी करीन' . यावर माऊंटबॅटन यांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, ' सरदार, आपण खरंच काही देऊ इच्छिता ? ' पटेल यांनी होकारार्थी मान डोलावली. माऊंटबॅटन यांनी आपले मन घट्ट केले आणि ते पटेलांना म्हणाले, 'आपण माझ्यासाठी खरेच काही करू इच्छित असाल, तर या कागदपत्रांवर स्वाक्षरी करा. '
' हा करार आपल्याला एवढा महत्वाचा वाटतो का ? ' पटेलांनी विचारले. यावर माऊंटबॅटन यांनी होकारार्थी उत्तर दिले. सरदार पटेलांनी कागदपत्रांची फाईल आपल्याकडे घेतली आणि काही न बोलता त्यावर स्वाक्षरी केली. सर्वजण आश्चर्याने बघतच राहिले. पटेलांनी माऊंटबॅटन यांना दिलेल्या शब्दाला जागून दिलदारपणे स्वाक्षरी केली होती. पण पटेलांच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नव्हते. त्यांनी जरी स्वाक्षरी केली तरी पुढे यातून कसा मार्ग काढायचा आणि निजामाला वठणीवर कसे आणायचे याची योजना त्यांच्या मनात आकार घेत असावी.
कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्याने माउंटबॅटन मोठ्या खुशीत दिल्लीला नेहरूंसह परतले. मॉंकटनही त्यांच्यासोबत डेहराडूनला आले होते ते हैदराबादला परतले. पण एक आश्चर्य घडले आणि पटेलांच्या मनासारखे आपोआप झाले. पटेल यांच्यासोबत झालेला करार आता निजामानेच फेटाळला. भारतात सामील होण्याऐवजी आम्ही हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढू असे केले. पटेल यांच्या मार्गातले दोन अडथळे आता दूर झाले होते. निजामाने करार अमान्य केल्याने आता निजामावर कारवाई करायला ते मोकळे होते. माऊंटबॅटन इंग्लंडला गेल्याने त्यांच्या मध्यस्थीचा आता प्रश्नच नव्हता. हैदराबादमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालल्याने तातडीने कारवाई करावी अशा मताचे पटेल होते. नेहरू मात्र कारवाईसाठी अजूनही राजी होत नव्हते.
हैदराबादमधील परिस्थिती दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली होती. हिंदूंचे मनोधैर्य खचत चालले होते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक होते. पटेल यांनी त्यावेळी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ' मी हैदराबादमधील परिस्थितीबाबत अतिशय काळजीत आहे. आता आपल्याला खंबीर व्हायलाच हवे. अचूक निर्णय घेऊन कारवाई करायला हवी, तरच जनतेचे मनोधैर्य टिकून राहील. '
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२७/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा