उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दहा
स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्व लोक धर्म, जातीपाती, भाषा, प्रांतभेद विसरून एकत्र आले होते, त्याला बॅ जीनांसारख्या नेत्यांमुळे ग्रहण लागले. त्यांनी मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली लोकांना धर्माच्या नावाखाली वेगळे पडण्यास सुरुवात केली. या गोष्टीला अर्थातच ब्रिटिशांची फूस होती. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेहरू, गांधी यांच्यासारखे नेते हतबल झाले होते. व्हाईसराय वेव्हेल यांनी जीनांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना मोकळीकच दिली होती.
मुस्लिम लीगने पंजाब आणि सरहद्द प्रांतात जाणीवपूर्वक दंगे घडवून आणून रक्तपात घडवला होता. त्यांनी ' प्रत्यक्ष कृतीच्या ' नावाखाली थेट हल्ले करून अमृतसर, रावळपिंडी, मुलतान, झेलम, अबोटाबाद या शहरात भयंकर दंगे घडवून आणले. हातात घातक शस्त्रे घेऊन तीन ते चार हजार जणांचा जमाव निःशस्त्र हिंदूंवर चालून गेला. या लोकांनी अनेक निरपराध हिंदू, शिखांना ठार मारले. महिला आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केले. या काळात सरदार पटेल हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री होते. या सगळ्या प्रकाराने त्यांचे अंतःकरण तीळतीळ तुटत होते. प्रत्येक राज्यात वेगवेगळी सरकारे असल्याने पटेल गृहमंत्री असूनही फार काही करू शकत नव्हते. त्यांनी गृहमंत्री या नात्याने वेव्हेल यांना पत्र लिहून या दंगलखोरांवर कारवाई करण्याची विनंती केली. पण वेव्हेलने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. पं नेहरूंनी पण या संदर्भात वेव्हेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पण वेव्हेल नावाच्या पाषाणाला पाझर फुटला नाही.
अशा स्थितीत पटेलांसमोर दोन उद्देश होते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे ब्रिटिशांकडून लवकरात लवकर सत्ता हस्तगत करणे. एकदा का केंद्राच्या हातात सत्ता आली की त्यांना काही कारवाई करणे शक्य झाले असते. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम लीग जाणीवपूर्वक घडवून आणत असलेले दंगे आटोक्यात आणणे. जीनांना पाकिस्तानच्या नावाखाली भारताचा मोठा लचका तोडायचा होता. त्यांना संपूर्ण पंजाब, बंगाल आणि बहुसंख्य हिंदू लोकवस्ती असलेला आसामही पाकिस्तानात हवा होता. पटेलांना जास्तीत जास्त भारत वाचवायचा होता. त्यामुळे पंजाब आणि बंगालच्या विभाजनाला त्यांनी मान्यता दिली. असे केले तरच ७० ते ८० टक्के भारत ते वाचवू शकणार होते. शिवाय दंगे आणि रक्तपात आटोक्यात आणण्यासाठी त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
गांधीजींनी तर देशाचं ऐक्य आणि अखंडता कायम राहावी म्हणून सगळा देशच जीनांच्या हवाली करावा अशी सूचना नव्याने आलेले लॉर्ड माउंटबॅटन यांना केली होती. ही गांधीजींची सूचना म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशा प्रकारची होती. पटेलांना अर्थातच ही गोष्ट मंजूर नव्हती. त्यापासून त्यांना देशाला वाचवायचं होतं. शिवाय ब्रिटिशांनी भारताची सत्ता सहज सुलभतेने काँग्रेसच्या हाती सोपवावी यासाठी त्यांना काँग्रेस एकसंध दिसणे महत्वाचे होते. त्यामुळे पंजाब आणि बंगालची विभागणी मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. ही विभागणी मान्य केली नसती तर मुस्लिम लीगने देशभरात पूर्वनियोजित अशा दंगली घडवून आणल्या असत्या.
याच सुमारास इंग्लंडचे पंतप्रधानअॅटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी व्हॉइसराय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन आले. माऊंटबॅटन यांनी गांधीजी, नेहरू यांचा युक्तिप्रयुक्तीने विश्वास संपादन केला. पण भारताच्या राजकारणातील सरदार पटेल यांचे महत्व ते जाणून होते. त्यामुळे पटेलांना विश्वासात घेऊन त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पुढील पाऊले टाकायला सुरुवात केली.
देशाचं विभाजन हा माऊंटबॅटन यांच्या कार्याचा महत्वाचा आणि अखेरचा टप्पा होता. जीवनावर त्यांचाही फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे सरदार पटेलांसारख्या मातब्बर नेत्याची मदत त्यांना हवी होती. त्यांनी पटेलांवर मोठी जबाबदारी सोपवली. ती म्हणजे दोन नवीन होऊ पाहणाऱ्या देशातील मालमत्ता आणि दायित्व यांची विभागणी करणे. त्यासाठी पटेलांनी आय सी एस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यांना आपल्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले. आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत केला. त्यांच्यातील देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले आणि एक अत्यंत कठीण काम सहजगत्या पार पाडले . पटेलांच्या डोळ्यासमोर आता नव्या शक्तिशाली, एकसंध भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ते सगळे विसरून कामाला लागले होते.
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०८/०१/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा