मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग नऊ

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग नऊ 

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस जरी सर्वात मोठा आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेला पक्ष होता तरी या पक्षाने त्या वेळी ज्या काही चुका केल्या, त्याची फळे देशाला आजतागायत भोगावी लागत आहेत. पण याची फारशी माहिती आपल्याला नसते. या काळात सरदार पटेल यांच्यासारख्या धोरणी आणि दूरदर्शी नेत्याला या बाबत फार काही करण्याची संधी दिली गेली नाही. अन्यथा आज चित्र वेगळे दिसले असते. 

१९४२ मध्ये गांधीजींनी जी ' चले जाव ' चळवळ सुरु केली होती, त्यामुळे इंग्रज सरकारने काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली होती. ते तुरुंगातून तीन वर्षांनी सुटले. तोपर्यंत जीनांसारख्या जातीयवादी नेत्यांचे फावले होते. त्यांनी तोपर्यंत आपली पाळेमुळे बळकट केली होती.  याच सुमारास केंद्रीय आणि प्रांताच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर या निवडणुकांमुळे कोणताही प्रश्न सुटणार नव्हता. तसेच काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते देखील तुरुंगात होते. अशा परिस्थितीत निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळणे दुरापास्तच होते. तरीदेखील मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढण्यास परवानगी दिली ही आश्चर्याची गोष्ट होती. 

या सर्व गोष्टींचा व्हायचा तोच परिणाम झाला. या निवडणुकीत जीना यांच्या मुस्लिम लीगला भरघोस यश मिळाले. काँग्रेसला फार कमी जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीतील यशामुळे जीना यांचा अहंकार आणखी बळावला. त्यांनी आपली भूमिका आणखी ताठरपणे मांडायला सुरुवात केली. काँग्रेस नेत्यांना त्यांना रोखण्यात अपयश आले. असे असले तरी अजूनही पंजाब, सिंध आणि बंगालमध्ये जीनांच्या भूमिकेला लोकांचा फारसा पाठींबा नव्हता. त्यामुळे वेळीच त्या प्रांतात जीनांसारख्या जातीयवादी नेत्याला आपले हातपाय पसरण्याची संधी न देता आवर घालणे शक्य होते. हे काम सरदार पटेलांसारखा खंबीर आणि दूरदृष्टी असलेला नेता यशस्वीरितीने पार पाडू शकला असता. पण पटेलांच्या या कार्यात मौलाना आझादांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना असे करण्याची संधी मिळू दिली नाही. 

पुढे पंजाब, सिंध, बंगाल आणि सरहद्द प्रांत या ठिकाणी झालेल्या निवडणुकात काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. मौलाना आझादांवर त्यांचा विश्वास राहिला नाही. त्यांनी या संदर्भात नेहरूंना पत्र पाठवून आझादांबद्दलचे त्यांचे मत कळवले होते. या सगळ्या परिस्थितीत गांधीजींनी हस्तक्षेप केला असता आणि मौलाना आझादांना राजीनामा द्यायला लावला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. पण गांधीजींना शक्य असूनही त्यांनी या परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप केला नाही म्हणून पटेल गांधीजींवर नाराज होते. 

पुढे परिस्थिती अगदीच हाताबाहेर जात आहे असे पाहिल्यावर गांधीजींनी आझादांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला.  त्यांच्यानंतर जो कोणी अध्यक्ष निवडला जाणार होता, त्याला स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान होण्याची नैसर्गिकरित्या संधी मिळणार होती. काँग्रेसच्या कार्यकारिणीत पटेलांच्या नावाला भरभरून प्रतिसाद होता. काँग्रेसच्या पंधरापैकी बारा प्रदेश समित्यांनी अध्यक्ष म्हणून सरदार पटेलांनाच पसंती दर्शवली होती. नेहरूंच्या नावाचा कोणताही प्रस्ताव कोणीही मांडला नव्हता. अशा परिस्थितीत सर्व संकेत झुगारून आणि सर्वांच्या मताचा अनादर करून गांधीजींनी पटेलांना नेहरूंसाठी आपलं नाव मागे घ्यायला लावलं.

 पटेलांनी नेहरूंसाठी नाव मागे घेण्याची ही तिसरी वेळ होती. ज्या व्यक्तीने तीस वर्षे आपल्या घरादारावर आणि सुखावर तुळशीपत्र ठेवून काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष मजबूत केला, जी व्यक्ती गांधी, नेहरूंमागे प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे उभी राहिली, अशा पात्र व्यक्तीला गांधीजींनी अध्यक्षपदासाठी संधी का दिली नाही हे एक गूढ आहे. पण अशा नेत्याला संधी नाकारली गेल्याने देशाचे एक प्रकारे मोठे नुकसानच झाले. काँग्रेसमध्ये एकवाक्यता राहिली नाही आणि पुढे देशाची फाळणी अटळ ठरली. 

कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्रात हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. या हंगामी सरकारच्या हातात सत्ता सोपवून भारत सोडून जायचा ब्रिटिशांचा मनोदय होता. त्यांना भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीशी काही देणेघेणे नव्हते. तर जीना आणि मुस्लिम लीग यांची मागणी अशी होती की आधी भारताची फाळणी करा आणि मगच भारत सोडा. जीना यांना मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य हवे होते. हा सुप्त हेतू मनात ठेवून त्यांनी मुस्लिम लीग मार्फत ' प्रत्यक्ष कृती ' ही योजना अमलात आणली. त्याचा परिणाम फार भयंकर झाला. देशात हिंदू मुस्लिमात दंगे घडवून आणले गेले. कलकत्त्यात सहा हजार लोकांची हत्या झाली. त्यातील सुमारे ४५०० लोक मुस्लिम होते. त्याचा बदला घेण्यासाठी नौखाली आणि तिप्पेरात प्रचंड हत्याकांड घडवून आणले गेले. यावेळी ब्रिटिशांनी काही न करता बघ्याची भूमिका घेतली. 

जीनांच्या या घातकी योजनेला लगाम घालू शकेल अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे सरदार पटेल. पण सरदार पटेल यांच्या या संदर्भातील योजनांना काँग्रेसमधूनच विरोध होत होता. म. गांधींची अहिंसेवर पूर्ण श्रद्धा होती. त्यांना रक्तपात नको होता. तर पंडित नेहरूंचे मुस्लिमांशी असलेल्या भावनिक जवळीकेमुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती. या सर्व गोष्टी जीनांच्या पथ्यावर पडल्या आणि त्यांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवला. 

( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी ) 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०६/०१/०२०२१

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )













 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...