मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस 

हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेलांनी  राजस्थानातील विविध राज्यांचे एकीकरण घडवून आणले. या राजपुताना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा प्रदेश विशाल होता. या प्रदेशात बहुतांशी रजपूत राजांची राज्ये होती. हे राजे शूर आणि परंपरांचा अभिमान असणारे होते. पण त्यांच्यात आपापसात भांडणे, हेवेदावे असल्यामुळे ही राज्ये जणू एकमेकांची शत्रू असल्यासारखी वागत होती. ही एकूण एकोणीस राज्ये होती. त्यांच्या एकीकरणासाठी सुमारे साडेआठ वर्षांचा कालावधी लागला. या एकीकरणाची प्रक्रिया १८ मार्च १९४८ रोजी सुरु झाली आणि एक नोव्हेंबर १९५६ ला पूर्ण झाली. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याची या राजांची इच्छा होती. त्याचे कारणही साहजिकच होते. एखाद्या मोठ्या राज्यात आपले राज्य विलीन करणे म्हणजे आपली स्वायत्तता गमावणे हा त्याचा अर्थ होता. आपली परंपरागत सत्ता गमावण्याची या राजांची तयारी नव्हती. राजस्थानातील या राज्यांमध्ये जयपूर, उदयपूर, बिकानेर, जोधपूर इ. प्रमुख राज्ये होती. 

जीनांना भारतातील काश्मीर, हैदराबाद यांच्याबरोबरच राजस्थानातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर आदी राज्ये पाकिस्तानात सामील झाल्यास हवीच होती. पण सरदार पटेलांनी त्यांचा हा डाव आधीच ओळखून मुत्सद्देपणाने आणि युक्तिप्रयुक्तीने राजस्थानातील या सर्व राज्यांचे एकीकरण घडवून आणले. रजपूत राजांमधील आपापसातील वैर देखील या एकीकरणामुळे संपुष्टात आले. खरं तर या सगळ्या राजांना एकत्र आणणे ही अत्यंत अवघड आणि नाजूक कामगिरी होती. पण पटेलांनी ही किमया घडवून आणली. त्यामुळे राजस्थानच्या एकीकरणाचे आणि भारतातील विलीनीकरणाचे श्रेय हे निःसंशय पटेलांचेच आहे. 

 एका समारंभात एकत्र आलेल्या या राजस्थानातील राजांना पटेलांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांच्या छोटेखानी पण प्रेरणादायी भाषणाने उपस्थित राजे आणि तेथील जनता भारावून गेली. या भाषणात पटेलांनी महाराणा प्रताप यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उपस्थित राजांना उद्देशून ते म्हणाले, ' आज तुम्ही सर्वांनी मिळून महाराणा प्रताप यांचं स्वप्न साकार केलं आहे. ' राणा प्रतापांचा गौरवपूर्ण उल्लेख सरदार पटेलांच्या तोंडून ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. इंग्रजांनी भारतात राज्य करताना भारतातील राजांमध्ये, जातीजमातींमध्ये फुटीची बीजे पेरली होती. ' Divide and rule ' ही त्यांची नीती होती. सरदार पटेलांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी ही राज्ये एकत्र तर केलीच शिवाय भारतातही त्यांचा समावेश करून भारताला बलशाली केले. विशेष म्हणजे हे करताना त्यांची आपापसातील भांडणे मिटवली. या राजांवर पटेलांच्या व्यक्तिमत्वाचा एवढा प्रभाव होता की त्यांच्यापैकी अनेक जण त्यांचे कायमचे मित्र, चाहते आणि भक्त बनले. 

अशाच त्यांच्या चाहत्यांमध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सिंदिया राजांचा समावेश होता. सरदार पटेलांचा देशासाठी एवढा प्रचंड त्याग असताना पटेलांच्या मृत्यूनंतरही १९५४ पर्यंत संसदेत त्यांचे तैलचित्र लावण्यात आलं नव्हतं. १९५४ मध्ये जेव्हा मौलाना आझाद यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं तैलचित्र पं नेहरूंनी संसदेत ताबडतोब लावण्याची व्यवस्था केली. पटेलांची झालेली ही उपेक्षा पाहून सिंदिया राजेंना अतिशय वाईट वाटले. त्यांनी स्वतः सरदार पटेलांचे तैलचित्र संसदेत भेट दिले, तेव्हा कुठे ते संसदेत लावण्यात आले. 

जी राज्यं आणि संस्थानं भारतात विलीन होण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागेल असा इंग्रंजांचा अंदाज होता, ती राज्ये सरदार पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे स्वातंत्र्यानंतर केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत भारतात सामील झाली. हा चमत्कार केवळ पटेल आणि पटेलच करू शकत होते. वर्षानुवर्षे आपल्याच तोऱ्यात जगणारे राजे महाराजे पटेलांपुढे आदराने झुकले होते. पटेलांनी केलेली ही एक प्रकारची रक्तविहीन क्रांतीच होती. या क्रांतीच्या ज्वाला दहन करणाऱ्या नव्हत्या तर नवनिर्मितीची विधायक स्वप्ने साकार करणाऱ्या होत्या. या ज्वालांनी स्वतंत्र भारताची पहाट उजळून निघाली होती. स्वतंत्र भारताच्या भवितव्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. पाकिस्तानचे  घातक मनसुबे मात्र या ज्वालांनी भस्मसात केले होते.  ( पुढील लेख या सरदार पटेलांवरील लेखमालेतील शेवटचा भागअसेल. तो आपल्याला बुधवारी वाचता येईल )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

३१/०१/२०२१

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...