उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग आठ
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद खूपच वाढले असा तो १९४१-४२ चा काळ होता. आज ज्यांना आपण त्याकाळातील मोठे नेते मानतो, असे नेते देखील वैयक्तिक हेवेदावे, स्वार्थ, सत्तेची आस इ च्या अधीन होऊन स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांना न कळत दुय्यम स्थान देऊ लागले होते. प्रांताप्रांतात निवडणुका होऊन महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल या त्रयींमुळे काँग्रेस सरकारे सत्तेवर आली होती. पण ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा ( डिव्हाइड अँड रुल ) या नीतीचा परिणाम दिसू लागला होता. सरकारमधील काँग्रेसचे काही डाव्या विचारांचे नेते ब्रिटिशांच्या अपप्रचाराला बळी पडले होते. त्यांनी कायदेमंडळातून राजीनामे दिले होते. यातूनच जीनांसारख्या फुटीरतावादी नेत्यांचे फावले. त्यांना ब्रिटिशांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. ब्रिटिशांनीही जीना हेच काँग्रेसला पर्याय आहेत अशी जीनांची प्रतिमा निर्माण केली.
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. या युद्धात ब्रिटनला भारताची मदत हवी होती. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद होते. पंडित नेहरू भारताने इंग्रज सरकारला सशर्त मदत करावी या मताचे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. ते इंग्रज सरकारवर आक्रमण करावे अशी भूमिका मांडत होते. गांधीजी इंग्रजांना बिनशर्त मदत करावी याबद्दल आग्रही होते. या मतभिन्नतेमुळे हे नेते मनाने एकमेकांपासून दूर गेले. काँग्रेस पक्षावर असणारा गांधीजींचा प्रभाव तात्पुरता कमी झाला. सरदार पटेलही गांधीजींच्या या मताशी सहमत नव्हते. गांधीजींचा हा सल्ला कदाचित दूरदर्शी असेलही, पण तो व्यवहार्य मात्र निश्चित नाही असे त्यांना वाटत होते.
भारतीयांकडून इंग्रजांना कोणतेही सहकार्य न मिळाल्याने इंग्रज सरकार चिडले. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिक सत्याग्रह सुरु केल्याने गांधीजी, पटेल या सारख्या नेत्यांना अटक झाली. ३ जुलै १९४० रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली . ७ ऑगस्टच्या बैठकीत ' भारत छोडो ' चा ठराव करण्यात आला. इंग्रजांना कोणतेही सहकार्य करायचे नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देऊन सरकारी कामकाज बंद पाडावे, शाळा-महाविद्यालये सुद्धा बंद व्हावीत, रेल्वे, पोस्ट इ च्या कर्मचाऱ्यांनी आपले काम करणे थांबवावे असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या काळात पटेलांची भाषणे अधिकाधिक प्रक्षोभक होऊ लागली. इंग्रज सरकारला कोणतेही सहकार्य करू नका. ' करो या मरो ' या आंदोलनात सामील व्हा. आपल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून टाका. हीच वेळ आहे. असे भावनिक आवाहन लोकांना ते करीत होते.
९ ऑगस्टला हे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली . यात महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यासह सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळे देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. दंगे, जाळपोळ सुरु झाली. या सर्व नेत्यांना स्थानबद्ध करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. तेथे त्यांचा जगापासून संपर्कच तोडण्यात आला. या काळात सरदार पटेलांमधील वेगळे स्वभावगुण इतर नेत्यांच्या अनुभवास आले. पटेल अत्यंत कमी बोलत पण त्यांचे बोलणे मुळातच वकिलीचा पिंड असल्याने मुद्देसूद असे. कोणत्याही विषयावर ते पटकन निर्णय घेत. त्यांची मते पक्की असत. पण तरीही जर त्यांना कोणी एखादी गोष्ट सुचवली किंवा लक्षात आणून दिली तर ती स्वीकारण्याची त्यांची तयारी असे. त्यांच्या बोलण्यात नेहमीच नर्मविनोदाला स्थान असे. अनेक गुजराती म्हणी त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांचा चपखल वापर करून आपले म्हणणे ते समोरच्याला मोठ्या प्रभावीपणे पटवून देत. ते तुरुंगात असल्यामुळे राजगोपालाचारी, भुलाभाई देसाई यांच्यासारख्या इंग्रजधार्जिण्या आणि काँग्रेसच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे फावले. त्यामुळे जीनांसारख्या नेत्याला अधिक बळ मिळाले.
लॉर्ड वेव्हेल यांनी सिमला कराराचा जो प्रस्ताव काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यासमोर मांडला होता, तो अयशस्वी झाला. सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांनी वेव्हेल यांच्यापुढे केलेला मैत्रीचा हात वेव्हेल यांनी झिडकारला आणि ते जीनांच्या दबावाला बळी पडले. जीनांच्या आधी ' फोडा आणि मग देश सोडा ' या मागणीला त्यांनी जणू पाठिंबा दिला. या परिस्थितीचा पुरेपूर फायदा धूर्त जीनांनी करून घेतला आणि पाकिस्तानची मागणी आपल्या पदरात पाडून घेतली. दुर्गादास नावाचे ज्येष्ठ पत्रकार त्या वेळी होते. त्यांनी जीनांना स्पष्टच विचारले की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या ऐक्याची वेव्हेल यांची योजना आपण उधळून का लावलीत ? तेव्हा जीना म्हणाले, ' मला जर एखाद्या तबकात घालून जर पाकिस्तान कुणी भेट म्हणून देत असेल तर ते नाकारण्याइतका मी मूर्ख आहे का ? ' काँग्रेसमध्ये फूट पडली नसती आणि आपल्या मागण्यांवर जर काँग्रेस ठाम राहिली असती तर कदाचित फाळणी आणि तिचे आजतागायत आपण भोगत असलेले परिणाम टाळता आले असते. या सगळ्या प्रकारामुळे सरदार पटेलांसारखा नेता मात्र मनातून अस्वस्थ आणि दुःखी होता.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
03/01/2021
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा