मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )

राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात राहूनही अटलजींनी आपली काव्यप्रतिभा कधी कोमेजू दिली नाही. त्यांच्यातला लेखक आणि कवी त्यांच्यातल्या राजकारणी व्यक्तीला सदैव मार्गदर्शन करीत राहिला. त्यामुळे इतर राजकारणी व्यक्तींप्रमाणे अटलजींनी बोलताना कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. देशभक्ती तर त्यांच्या नसानसात भिनली होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली होती. पुढे ज्या संघाचं काम ते करीत होते, त्या संघावरही बंदी आली.  पण अटलजी विचलित झाले नाहीत. आपल्या ' कदम मिलाकर चलना ' होगा या कवितेत ते म्हणतात 

बाधाए आती हैं आए, 

घिरे प्रलय की घोर घटाए 

पावोंके नीचे अंगारे 

सिर पर बरसे यदी ज्वालाये, 

निज हाथोंसे हसते हसते,

आग लगाकर जलना होगा !

कदम मिलाकर चलना होगा !

हाच बाणा आणि हीच आग त्यांनी आयुष्यभर पेटती ठेवली. वेगळे वागणे त्यांना शक्यच नव्हते. याच सुमाराला अटलजी एक प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते. आपल्या विदवत्तापूर्ण वक्तृत्वाने त्यांनी संघामध्ये एक वेगळी छाप पाडली होती. १९५७ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अटलजींसारख्या फर्ड्या वक्त्यावर संघाची मदार होती. त्यामुळे अटलजींना बलरामपूर, लखनौ आणि मथुरा या तीनही मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. घागरा नदीच्या काठी असलेले बलरामपूर हे नेपाळ यात्रेतील एक महत्वाचे ठिकाण होते. या ठिकाणी थांबून यात्रेकरू पुढे जात असत. अशा या बलरामपूरला जातीय वादाचे ग्रहण लागले होते. या ठिकाणी मुस्लिम धर्मीय जमीनदारांचे वर्चस्व होते. हे जमीनदार गोरगरीब हिंदू जनतेला भयंकर त्रास देत असत, पिळवणूक करीत असत. येथे त्यांची दहशत एवढी वाढली होती की हिंदूंना शंख, घंटा इ वाजविण्यासही बंदी होती. त्यामुळे या मुस्लिम जमीनदारांविरुद्ध जनतेत असंतोष होता. लखनौ आणि मथुरा येथील मतदारसंघात अटलजींचा पराभव झाला पण बलरामपूरमध्ये हिंदूंमधील असंतोषाचा फायदा त्यांना मिळाला आणि अटलजी १,१८,३६० मतांनी दणदणीत विजय मिळवून  निवडून आले आणि अशा रीतीने संसदेत त्यांचा प्रवेश झाला. 

यावेळी संसदेत गोविंद वल्लभ पंत, पं नेहरू, मौलाना आझाद, जगजीवन राम या सारखे दिग्गज आणि अनुभवी नेते निवडून आलेले होते. या तुलनेत अटलजी नवीन आणि अननुभवी होते. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी या नेत्यांना देखील प्रभावित केले होते. त्यांचे प्रांजळ आणि परखड विचार, ओघवती आणि मंत्रमुग्ध करणारी अभ्यासपूर्ण भाषाशैली यामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. स्वतः पंडित नेहरूंनी अटलजींचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. 

यानंतर १९६२ च्या लोकसभा निवडूणुकीत मात्र अटलजी निवडून येऊ शकले नाहीत. स्वतंत्र भारताच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत महत्वाचा होता. या काळात चीनचे आक्रमण, लाल बहादूर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याचे पंतप्रधान पदावर आरूढ होणे, ताशकंद कराराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणे या सारख्या वेगवान घटना घडत होत्या. अशा वेळी अटलजींसारखी व्यक्ती संसदेत असणे ही काळाची गरज होती. पण निवडून न आल्याने त्यांना ही संधी मिळू शकली नाही. याची खंत त्यांच्या संवेदनशील मनाला कायम होती. याची उणीव त्यांनी पुढे भरून काढली. असे असले तरी १९६२ आणि १९६८ या दोन्ही वर्षी ते राज्यसभेत सदस्य म्हणून होतेच. 

अटलजींचं वक्तृत्व श्रोत्यांना खिळवून ठेवत असे. त्यामध्ये त्यांचा रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास दिसून त्यात ते कोट्या इतक्या मार्मिक पद्धतीने करीत की समोरच्याची हसून हसून पुरेवाट होत असे. या जोडीला त्यांचे प्रभावी हातवारे यात भर घालत. मात्र श्रोत्यांना विनोदातून ते सहज गंभीर वस्तुस्थितीकडे घेऊन जात. जबाबदारीची जाणीव करून देत. विरोधी पक्षीयांच्या डोळ्यायेई. तुलसी रामायणाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भाषाशैली ओघवती असे. सभेच्या सुरुवातीपासूनच ते श्रोत्यांना खिळवून ठेवत. कोणाचेही नाव न घेता समोरचा जर चुकला असेल तर ते त्याच्या डोळयांत झणझणीत अंजन घालत आणि तेही कुठलीही मर्यादा न सोडता. त्यांच्या वक्तृत्वाचा एक किस्सा येथे सांगण्यासारखा आहे. 

१९७० च्या सुमारास पुण्यात त्यांची एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील सरकारचा एक गमतीदार किस्सा सांगितला. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. मध्य प्रदेशातील प्राथमिक वर्गात अंकलिपीचं एक पुस्तक लावलेलं होतं. त्या पुस्तकात ' ग ' गणपतीचा असं दिलेलं होता. तेव्हा काही सदस्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. कारण त्यांची तथाकथित धर्मनिरपेक्षता आड येत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्यांनी ठरवलं की गणपती हटवून दुसरं काहीतरी त्या जागी टाकायचं. मंडळाचे सदस्य त्यासाठी शोध घेऊ लागले. त्यांना शोध घेता घेता एक प्राणी आढळला. तो म्हणजे गाढव. त्यांनी गणपती हटवला आणि गाढवाला त्या जागी विराजमान केलं. वाजपेयींनी आपल्या मिश्किल शैलीत या घटनेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ' गणेशजी बुद्धी की देवता हैं और गधा मूर्खता का प्रतीक. लेकिन इनको गधा चलता हैं, गणेशजी नही. गणेशजीका  तिरस्कार और गधे का पुरस्कार...यही हैं इनकी सरकार. ' ( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०९/१२/२०२०

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...