मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )

 उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )

अटलजींसारखा नेता म्हणजे भारतमातेला लाभलेलं दुर्मिळ रत्न..! राजकारणातल्या दलदलीत राहूनही हे कमळ फुलत राहिलं. त्यांचं सगळं जीवन म्हणजे कमलपत्रासारखं निर्लेप, निर्मोही. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, चिखल, दलदलीत राहूनही त्या सगळ्यांपासून अलिप्त. केवळ आनंद देणं हेच त्याचं काम. हे कमलपुष्प भारतमातेच्या चरणी जन्मापासूनच अर्पित झालं होतं, म्हणून तर अटलजी आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य या महापुरुषाने भारतमातेच्या सेवेत व्यतीत केलं. 

अनेकांच्या जीवनात चढउतार येतात, अपयशाचे कडू घोटही घशाखाली रिचवावे लागतात. तसे अटलजींनीही रिचवले. अनेकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणिबाणीसारख्या प्रसंगी कारागृहात राहावे लागले. या काळात तब्येतीच्या अनेक तक्रारींनाही तोंड द्यावे लागले. 'की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे हे सतीचे वाण त्यांनी हेतुपुरस्सर स्वीकारले होते,  त्यामुळे कधी पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. 

परिस्थितीच्या मागणीनुसार १९७७ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण जनता पक्षात करण्यात अटलजींचा पुढाकार होता. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झाले, त्यात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. या काळात त्यांनी या पदावर अतिशय प्रभावीपणे काम करून आपल्या नेतृत्वशैलीची वेगळी छाप उमटवली. परंतु ज्या पद्धतीने जनता पक्षाचे राजकारण आणि कामकाज सुरु होते, त्यावर अटलजी नाराज होते. त्यामुळे १९८० मध्ये त्यांनी जनता पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ते अध्यक्ष झाले. अटलजींनी फार थोड्या कालावधीत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवले. अर्थात त्यांच्या जोडीला लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, पं दिनदयाळजी उपाध्याय यांसारखे दिगग्ज नेते होते. पण अटलजींच्या नेतृत्वावर सर्वांचीच मदार होती. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पं दिनदयाळजी उपाध्याय यांच्यानंतर त्यांची पोकळी भरून काढणारा एकमेव ध्येयवादी, समर्पित नेता म्हणजे अटलजी. 

अटलजी एकंदर तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र त्यांचा सुरुवातीचा म्हणजे पहिल्या पंतप्रधानपदाचा काळ अल्पजीवी ठरला. त्यांनी सरकार चालवण्यासाठी किंवा सत्तेला चिकटून राहण्यासाठी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. हे सरकार त्यामुळे फक्त तेरा दिवस चालले. पुन्हा दुसऱ्या वेळी अटलजी १९९८ मध्ये पंतप्रधान झाले. हे सरकार तेरा महिने पदावर होते. पण नियतीने पुन्हा तेरा ऑक्टोबर १९९९ मध्ये अटलजींना पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. यावेळी मात्र त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. पंतप्रधान म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे त्यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच बिगर काँग्रेसी सरकार होते. या काळात अटल सरकारने अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांचा उल्लेख पुढे येईलच. पण त्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना, परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतात. त्यातील एकदोन गोष्टी पाहणे महत्वाचे आणि रंजक ठरेल. 

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेत मदतीसाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे जेव्हा अटलजींना कळले, तेव्हा ते विचारात पडले. ते उद्गारले, ' प्रभू रामचंद्रानंतर श्रीलंकेत सेना पाठवणारे राजीवजीच निघाले. पण हे त्यांचं धोरण मला दूरदर्शीपणाचं वाटत नाही. ' अटलजींचे उदगार सार्थ होते हे नंतर सिद्ध झालं. भारत श्रीलंका संबंध सुधारले तर नाहीतच, पण या निर्णयापोटी राजीव गांधींना आपल्या प्राणांचं मोल चुकतं करावं लागलं. पण राजीव गांधींच्या अकाली निधनाने कवीमनाचा हा नेता हळहळला. ते म्हणाले, ' जन्म के साथ मरण जुडा है. लेकिन जब मृत्यू सहज नही होती... भरी जवानी में किसी जीवनपुष्प को चिता के राख मे बदल देती है... एक षडयंत्र का परिणाम होती है, तो परिवारवाले किस तरह से उस वज्रपात को सहें  '?

नरसिंहराव पंतप्रधान असतानाची एक घटना आहे. काँग्रेसच्या काही खासदारांनी काँग्रेसच्याच चार मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तसे पत्र नरसिंहरावांना पाठवून पक्षाला घरचा आहेर दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांना सरकारला कोंडीत पकडण्याची ही नामी संधी आहे असे वाटले आणि ते अटलजींकडे आले. अटलजींना ही बातमी सांगून त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा अशी विनंती केली. पण अटलजींनी त्याला नकार दिला. ते खासदार आश्चर्यचकित झाले. अटलजी असे का म्हणत आहेत हे त्यांना कळेना. संसदेतील शून्य प्रहराला अजून काही अवधी बाकी होता. अटलजी त्या खासदारांना म्हणाले, ' ज्यांनी त्या मंत्र्यांवर आरोप केले, त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटतो का ते पहा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकडून त्या पत्राची प्रत मिळवा. ' परंतु त्या खासदारांना ना ते आरोप करणारे खासदार भेटले ना त्या पत्राची प्रत मिळू शकली. एखादी बातमी केवळ वृत्तपत्रात आली म्हणून ती खरी मानून चालणाऱ्यांपैकी अटलजी नव्हते. म्हणूनच त्यांच्या शब्दाला  विश्वासार्हता आणि वजन प्राप्त झाले होते. ( अंतिम भाग रविवारी )

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

११-१२-२०२०

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...