उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग चार ( अंतिम )
विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचे कार्य केले आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला. याशिवाय देशभरातील विविध नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. विश्वेश्वरैयानमध्ये एक उत्तम लेखकही दडलेला होता. त्यांनी लिहिलेली ' रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया ', प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तके आजही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ' सर ' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी लिट ही पदवी देऊन गौरविले.
विश्वेश्वरैयाना भारताचा सर्वोच्च सन्मान देण्याचे भारत सरकारने ठरवले. त्यासाठी त्यांची संमती घेणारे पत्र सरकारने त्यांना पाठवले. त्या पत्राला विश्वेश्वरैय्यानी दिलेले उत्तर पुरस्कारासाठी धडपडणाऱ्या सर्वांनी मनन करावे असे आहे. सरकारला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, " देशाचा सर्वोच्च 'किताब देऊन तुम्ही माझा बहुमान करू इच्छिता त्याबद्दल धन्यवाद ! मात्र अशी पदवी दिल्यानंतर तुमच्या सरकारने जे काम केले असेल ते चांगले आहे म्हणून मी त्याची स्तुती करावी अशी जर तुमची इच्छा असेल, तर ते घडणार नाही. मी सत्याला सत्य म्हणणारा माणूस आहे. I am the man of facts. तेव्हा मला वाटले तर मी तुमच्यावर टीकाही करीन. हे तुम्हाला चालणार असेल तरच ही पदवी मला द्या. "
सुदैवाने त्यावेळी त्यांच्यासारख्या तत्वनिष्ठ व्यक्तीला समजून घेणारे पं नेहरू पंतप्रधान होते. त्यांनी विश्वेश्वरैय्याची ही अट मान्य केली आणि २४ जून १९५५ रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ' भारतरत्न ' देऊन सन्मान करण्यात आला. १५ सप्टेंबर १९६० या दिवशी त्यांचा १०० वा वाढदिवस पं नेहरूंच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना विश्वेश्वरैय्यानी पुढील काही वर्षात देशाच्या विकासाची दिशा काय असावी यावर आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे या शंभराव्या वर्षी ते उभे राहून सभेत बोलले. त्यांचा जन्मदिवस १५ सप्टेंबर हा त्यांच्या सन्मानार्थ ' अभियंता दिन ' म्हणून साजरा केला जातो. देशातल्या लाखो इंजिनिअर्सचा गौरव यानिमित्ताने त्या दिवशी केला जातो.
विश्वेश्वरैय्या हे अभियंत्यांचे रोल मॉडेल आहेत. पण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व केवळ इंजिनिअर्सचे रोल मॉडेल म्हणजे आदर्श राहून चालणार नाही. ते तुम्हा आम्हा सर्व भारतीयांचे आदर्श आहेत. राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या विधायक आणि सर्जनशील हातानी केवळ देशाच्या प्रगतीचाच ध्यास घेतला होता. स्वतःसाठी एखादे साधे घरही या व्यक्तीने बांधले नाही. त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आणि मनन करण्यासारखे आहेत. ते म्हणतात, " मी वेळेवर काम करतो. नियमित व्यायाम करतो. क्रोधापासून शेकडो कोस दूर राहतो. म्हातारपण जेव्हा मला भेटायला येते, तेव्हा त्याला सांगतो की अजून मी कार्यरत आहे. अजून वेळ आहे. पुन्हा कधीतरी ये. कष्ट करा, काम करा. कष्ट केल्याशिवाय जेवणाचा आम्हाला अधिकार नाही. मेहनत करण्यातच देशाचे हित आहे. त्याशिवाय आमचा देश पुढे जाऊ शकणार नाही. आळशीपणामुळे आम्ही मागे पडलो आहोत. अमेरिका आणि जपानसारखे देश आमच्या कितीतरी पुढे गेले आहेत, कारण तेथील लोक उद्योगी, मेहनती आहेत. "
महाराष्ट तर या विश्वेश्वरैयाना कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांच्या सेवेतील महत्वाचा आणि मोठा कालखंड महाराष्ट्रातच व्यतीत झाला. धुळे शहरात त्यांच्या गौरवार्थ आणि स्मृतिप्रीत्यर्थ ' सर विश्वेश्वरैय्या संग्रहालय ' उभारण्यात आले आहे. जिज्ञासूंनी अवश्य भेट देऊन बघावे असे ते ठिकाण आहे. शेवटपर्यंत अखंडपणे कार्यरत राहून १४ एप्रिल १९६२ मध्ये या महापुरुषाने आपली इहलोकीची यात्रा संपवली. या आधुनिक भगीरथास प्रणाम !
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा