उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग तीन
आपल्या अभियंतेपदाच्या कारकिर्दीत विश्वेश्वरैया यांनी अनेक कामे केली. या सगळ्या कामांवर कार्यपद्धतीचा ठसा उमटला आहे. पुढे त्यांनी काही काळासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. विश्वेश्वरैया हे शिस्त आणि वक्तशीरपणा या गोष्टींचे अतिशय कटाक्षाने पालन करणारे होते. त्यांच्या अमेरिका दौऱ्यातील एक किस्सा सांगण्यासारखा आहे. ते अमेरिकेत असताना त्यांना एका ठिकाणी एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचे होते. ते स्टेशनवर आले असताना त्यांना कळले की आपल्याला ज्या गाडीने जायचे ती गाडी अचानक रद्द झाली आहे. ते लगेच जाऊन स्टेशनमास्तरला भेटले. त्यांना सांगितले की मी या देशात भारताचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. माझी साडेदहा वा मिटिंग आहे. आपण गाडी रद्द केल्याने मी मीटिंगला उपस्थित राहू शकणार नाही. मला मीटिंगला जाण्यापासून रोखणे म्हणजे मी माझ्या देशाचा अपमान समजतो. या संदर्भात मला आपल्या देशाच्या अध्यक्षांशी बोलावे लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर स्टेशनमास्तर हादरले. त्यांनी त्वरित विश्वेश्वरैयासाठी एका डब्याच्या स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था केली.
विश्वेश्वरैयाच्या या विविध देशांच्या दौऱ्यातही तेथील नवनवीन गोष्टी पाहणे, त्यांचा वापर आपल्या देशासाठी आपल्या कामात करून घेणे या धोरणावर त्यांनी भर दिला. या दरम्यान हैदराबाद शहरात इसी आणि मुसी नदीच्या पुरामुळे हाहाकार माजला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी एकच योग्य व्यक्ती होती. ती म्हणजे सर विश्वेश्वरैया. कोणत्याही समस्येवर मुळापासून विचार करून ती सोडवणे ही त्यांची खासियत होती. इंग्रज सरकार आणि इंग्रज अधिकारी याना सुद्धा विश्वेश्वरैया यांचे मोठेपण मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. विश्वेश्वरैयाना परदेश दौऱ्यावरून खास निरोप पाठवून बोलावून घेतले गेले. इसी आणि मुसी नदीवर विश्वेश्वरैयान्च्या देखरेखीखाली दोन मोठी धरणे बांधली गेली. हैदराबाद शहराची पुनर्रचना त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . हैदरबादकरांवरील पुराचे संकट टळले. हैदराबादचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला.
१९्०९च्या सुमारास हैद्राबाद संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीवरून त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे स्वीकारली. १९१२ ते १९१८ या कालावधीत ते म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी अक्षरशः प्रचंड काम केले. विश्वेश्वरैय्या हे व्यासंगी व्यक्तिमत्व होते. एक गोष्ट त्यांनी जाणली होती. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातली ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची कधीही आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. त्याची प्रगती व्हायची असेल तर दोन गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे शेतीला हमखास पाणी मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे. शेती परवडण्यासाठी शेतीवर अवलंबून राहणारी कुटुंबे किंवा व्यक्ती यांची संख्या कमी केली पाहिजे. त्यासाठी नवनवीन उद्योगधंद्यांची निर्मिती, शेतीला पूरक उद्योग यांची निर्मिती झाली पाहिजे.
या सर्व गोष्टी आपल्याकडच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळाल्याशिवाय साध्य होणार नाहीत. त्यासाठी खात्रीचे दर्जेदार आणि मोफत प्राथमिक शिक्षण सर्वाना मिळाले पाहिजे. म्हणून शैक्षणिक क्रांतीचे ते अग्रदूत बनले. मुलांसाठी प्राथमिक शिक्षणाची सुविधा त्यांनी निर्माण केली. मुलींनी शिकले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी वसतिगृहाची निर्मिती केली. म्हैसूर विद्यापीठाची स्थापना केली. त्याचप्रमाणे भारत हा शेतीप्रधान देश लक्षात घेऊन तरुणांसाठी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. बंगलोर येथील सुप्रसिद्ध संस्था ' इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या ' उभारणीत आणि जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
वृंदावन गार्डन उभारून मैसूर शहराच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर घातली. म्हैसूर बँकेची स्थापना केली. विश्वेश्वरैया यांना केवळ शैक्षणिक आणि अभियांत्रीकीचेच ज्ञान नव्हते. त्यांच्यात एक कुशल आणि कल्पक उद्योजक सुद्धा दडलेला होता. म्हैसूर सॅंडल सोप फॅक्टरी, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, रेशीम निर्मिती अशा विविध उद्योगांना त्यांनी चालना दिली. रेल्वेमार्गाचाही विकास त्यांनी घडवून आणला.
म्हैसूर राज्याच्या विकासात असे विविध प्रकारे योगदान दिल्यानंतर १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेतून ते निवृत्त झाले. तोट्यात चालणारा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स हा कारखाना त्यांनी त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि जिद्दीने नफ्यात आणून दाखवला.
हैद्राबादप्रमाणेच त्यांनी ओरिसा राज्यातील महापूराचे नियंत्रण केले. म्हैसूरजवळील कावेरी नदीवरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. ते आजही त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देते. या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना या पाठीमागे त्यांचेच योजनाबद्ध नियोजन होते. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. एकाच व्यक्तीने केलेले हे विविध प्रकारचे कार्य पाहून अक्षरशः स्तिमित व्हायला होते. ( क्रमशः - पुढील आणि अंतिम भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/११/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा