उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग तीन
आपल्या शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान, संस्कार आणि आशीर्वाद घेऊन कलाम प्रत्यक्ष व्यावहारिक
जगामध्ये आपली भूमिका पार पडण्यासाठी निघाले. १९५८ मध्ये बंगलोर येथे हिंदुस्तान
एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी म्हणून नोकरी स्वीकारली. येथे त्यांनी विमान तयार
करण्याचे प्रत्यक्ष शिक्षण घेतले. या संस्थेतून खूप काही आत्मसात केल्यानंतर ते
पदवीधर एरोनॉटिक्स इंजिनिअर म्हणून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या समोर दोन पर्याय
होते. एक म्हणजे भारतीय वायुदलात वैमानिक म्हणून काम करणे किंवा दुसरे म्हणजे
भारताच्या संरक्षण खात्यात ( Directorate of Technical Development and
Production ) नोकरी स्वीकारणे. या दोन्ही
ठिकाणच्या परीक्षा त्यांनी दिल्या. हवाई दलातील परीक्षा देण्यासाठी त्यांना देहराडूनला
जावे लागले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयातील
संचालनालयाच्या विभागात त्यांना नेमणूक मिळाली आणि तेथे ते वरिष्ठ वैज्ञानिक
सहाय्यक या पदावर रुजू झाले.
येथे रुजू होण्यापूर्वी ते देहरादूनहून
ऋषिकेशला गेले होते. तेथे ते स्वामी शिवानंद यांच्या भेटीसाठी गेले. स्वामी
शिवानंदांच्या व्यक्तिमत्वाने ते भारावून गेले. स्वामी शिवानंद म्हणजे जणू भगवान
बुद्ध आहेत असे त्यांना वाटले. त्यांचे कलाम हे मुस्लीम नाव ऐकल्यावर स्वामीजी
जराही विचलित झाले नाहीत. उलट ते कलामाना म्हणाले, “ मुला, तू निराश होऊ
नकोस. तू हवाई दलात जावंस असं विधिलिखित नाही. हे अपयश तू विसरून जा. तुला पुढील
मार्गावर नेण्यासाठी नियतीचा हा एक संकेत होता. “ किती सुंदर शब्दात स्वामीजींनी कलामांना सांगितले ! आणि
खरेच आहे. इंग्रजीत एक वाक्य आहे, “ When God
closes one door, He opens another.” खरोखर नियतीने पुढील कार्यासाठीच जणू ही योजना केली होती.
पुढे कानपूरला काही काळ प्रशिक्षण
घेतल्यानंतर कलाम बेंगळूरुला एडीई ( Aeronautical Development
Establishment ) या संस्थेत काम करू लागले. तेथे
त्यांनी एका वर्षानंतर स्वदेशी बनावटीचे हॉवरक्राफ्टचे डिझाईन बनवले. नंतर पुढे
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रमुख डॉ एम जी के मेनन यांनी भेट दिली
आणि कलाम यांच्या कामगिरीने ते प्रभावित झाले. आणि पुढे त्यांना भारतीय अवकाश
संशोधन संस्थेत रॉकेट इंजिनिअर या पदासाठी निवड करण्यात येऊन त्यांना थुंबा येथील
रॉकेट लॉन्चिंग स्टेशनला भेट देण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या पुढील मिसाईल
मॅन म्हणून गौरवल्या जाणाऱ्या करिअरची ही सुरुवात होती. त्यादृष्टीने जणू त्यांची
पायाभरणी सुरु होती. या पायाभरणीत अपार कष्ट होते. समर्पित भावाने काम करायचे होते.
या सगळ्यात कलाम कुठेही कमी पडले नाहीत. थोड्याच दिवसात त्यांना अमेरिकेतील नासा
या अंतराळ संस्थेत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे ठरले. तत्पूर्वी
कलामांनी आपल्या गावी म्हणजे रामेश्वरमला जाऊन आपल्या कुटुंबियांची भेट घेतली.
काही आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत घालवले आणि मग तेथून ते थेट व्हर्जिनियातील
नासाच्या केंद्रात दाखल झाले.
या अमेरिकेतील नासाच्या दौऱ्यात कलामांना
क्षेपणास्त्र बनवण्याची प्रेरणा प्राप्त झाली. त्यांना एके ठिकाणी एक चित्र
पाहायला मिळाल. या चित्रात टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्या लढाईत टीपूने
इंग्रंजावर केलेला एका क्षेपणास्त्राचा प्रयोग केलेला दाखवला होता. हे पाहून
त्यांनी मनोमन निश्चय केला की भारतातून अस्तंगत झालेले हे क्षेपणास्त्र आपण पुनरुज्जीवित करायचे. आपले प्रशिक्षण संपल्यानंतर ते भारतात परतले. एव्हाना
भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. यावेळी क्षेपणास्त्र
क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञांसोबत अमेरिका, रशिया आणि फ्रान्समधून आलेले शास्त्रज्ञ काम करीत होते. कलामांना
त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. डॉ विक्रम साराभाई हे महान शास्त्रज्ञ या
वेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी डॉ कलाम यांच्यावर अनेक
महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
१९६७ मध्ये रोहिणी या स्वदेशी उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. या वेळी या उपग्रहाने
त्याचा पहिला टप्पा पार केला. परंतु दुसऱ्या टप्प्यात ते नियंत्रणाबाहेर गेले आणि
श्रीहरीकोटापासून ५६० किमी अंतरावर समुद्रात कोसळले. परंतु या अपयशाने ते खचून
गेले नाहीत. डॉ कलाम आणि अन्य शास्त्रज्ञांचे मार्गदर्शक
आणि प्रमुख डॉ विक्रम साराभाई यांचे १९७१ ,मध्ये दुर्दैवाने निधन झाले. पण या सगळ्यांना आपले गुरु डॉ
विक्रम साराभाई यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने वाटचाल करायची होती. निराश होऊन
किंवा हिंमत हरून चालणार नव्हते. त्यामुळे कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले
अथक प्रयत्न चालू ठेवले. अनेक अडचणीतून त्यांनी मार्ग काढला आणि त्यांच्या
प्रयत्नांना यश आले. मनापासून प्रयत्न असले तर नियतीचे साहाय्य मिळतेच. १८ जुलै
१९८० रोजी रोहिणी उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला गेला. या यशामुळे भारताच्या
शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला.उपग्रह प्रक्षेपणाची यंत्रणा असलेल्या काही
मोजक्या देशात भारत जाऊन बसला. कलामांच्या या कामगिरीची दाखल घेत भारत सरकारने
त्यांना पद्मभूषण हा सन्मान जाहीर केला. समस्या कोणतीही असो, ती कलाम लीलया सोडवीत. या त्यांच्या कौशल्याचा कस पुढील
काळात लागला.
कलाम यांच्यावरील जबाबदाऱ्या आता वाढत
चालल्या होत्या. आता स्वदेशी बनावटीचा अग्निबाण तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना
त्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी ३९० कोटी रुपयांची
तरतूद करण्यात आली आणि बारा वर्षांचा कालावधी ठरवण्यात आला. क्षेपणास्त्र
बनवण्याची रूपरेषा आखण्यात आली. सरफेस टू सरफेस मिसाईल पृथ्वी, सरफेस तो एअर मिसाईल आकाश, त्यानंतर त्रिशूळ, नाग अशी
क्षेपणास्त्राची नावे निश्चित करण्यात आली. या कामासाठी कलाम यांनी स्वतःला वाहून
घेतले. दिवस रात्र, खाजगी जीवन इ ची
कोणतीही आठवण त्यांना या कामात गढून गेल्याने राहिली नाही. ( क्रमशः - पुढील भाग शुक्रवारी )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा