उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे,चाळीसगाव
भारतरत्नावली
निश्चयाचा महामेरू - महर्षी धोंडो केशव कर्वे ( भाग पाच - अंतिम )
परदेशातून मिळालेल्या या सगळ्या निधीचा चोख हिशेब
अण्णांनी ठेवला. अण्णा केवळ मदत घेणाऱ्यातले नव्हते. अण्णांची वृत्ती देणाऱ्याची
होती. विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत
जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ‘ त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून स्वतःच्या संस्थाना तर मदत केलीच पण कोठेही
चांगले काम दिसले की अण्णांचा हात देण्यासाठी पुढे असायचा. आता अण्णांचे वय झाले
होते ७८ वर्षांचे. आपल्या संस्थांचे कौतुक पहात, आपली स्तुती ऐकण्यात आणि आराम करण्यात घालवावे असे हे वय. पण स्वस्थ बसणे हा
अण्णांचा स्वभाव नव्हता. या वयात शिक्षण प्रसाराचा एक नवीन उपक्रम अण्णांनी हाती
घेतली. खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार व्हावा, मुलांनी शिकावे म्हणून अण्णांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ नावाची
संस्था काढली. खेडी शिक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावीत. खेड्यातील लोकांनीच
पैसे जमवून शाळा बांधावी, शिक्षकांचा पगार
द्यावा अशी त्यांची कल्पना होती. त्यानुसार ज्या गावात शाळा नसेल तेथे शाळा काढण्यास
त्यांच्या या संस्थेने मदत केली. पण पुढे सरकारनेच या शाळांना मदत करण्याचे
ठरविल्यामुळे अशा मंडळांची गरज राहिली नाही. समाजात जातीभेद, वर्णभेद आदी भिंती नसाव्यात. समाजात एकोपा नांदावा, समता राहावी म्हणून त्यांनी समता संघाची स्थापना केली. तसेच
या संघातर्फे ‘ मानवी समता ‘ नावाचे वर्तमानपत्र सुरु केले.
अशा या समाजासाठी चंदनासारखे झिजणाऱ्या
अण्णांना १०४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. या काळात आपण सुरु केलेल्या संस्था
बहरलेल्या पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांनी लावलेल्या ‘ इवलेसे रोपाचा ‘ वेलू आता गगनावरी गेला होता. त्यांच्या एक्काहात्तरीच्या वेळी त्यांचा सत्कार
करण्यात आला. पुण्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. तो आज कर्वे रोड
म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा ९१ वा वाढदिवस डॉ जयकरांच्या अध्यक्षतेखाली
पुणेकरांनी मोठ्या थाटात साजरा केला. पूर्वी त्यांच्यावर कधी काळी टीकेचा वर्षाव
करणारे आता त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू लागले होते. या सगळ्यात त्यांची पत्नी
आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची अनमोल साथ त्यांना लाभली. त्यांची ही सहधर्मचारिणी
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. या काळात त्यांनाही अनेक कठीण प्रसंगाला
तोंड द्यावे लागले,अवहेलना वाट्याला
आली पण त्यांनी कमालीच्या सोशिकपणे सगळे सहन करून अण्णांना साथ दिली.त्यांनी ‘ माझे पुराण ‘ या आपल्या आत्मचरित्रात आपले सगळे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. त्यांनी केवळ
आश्रमाकडे लक्ष दिले असे नाही तर आपल्या मुलांनाही उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन
घडवले. अण्णांचे मोठे चिरंजीव आणि प्रथम पत्नीचा पुत्र प्रा रघुनाथ कर्वे यांनी
अण्णांचा वारसा पुढे चालवून संततिनियमनाचा प्रसार आणि प्रचार केला. या कामात
त्यांनाही प्रचंड कष्ट, यातना आणि
मानहानी सोसावी लागली. पण तेही अविचल निष्ठेने अण्णांप्रमाणे कार्यरत राहिले.
अण्णांचे दुसरे चिरंजीव हे डॉक्टर असून ते आफ्रिकेत स्थायिक झाले होते. तिसरे चि.
डॉ दिनकरराव कर्वे हे अत्यंत विद्वान प्राध्यापक होते. ते फर्ग्युसन कॉलेजचे
प्राचार्य होते. त्यांच्या पत्नी डॉ इरावती कर्वे या प्रसिद्ध लेखिका आणि संशोधक
होत्या. अण्णांचे चौथे चिरंजीव भास्करराव आणि त्यांची पत्नी कावेरीबाई यांनी
अण्णांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या संस्था सांभाळल्या.
अण्णांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक
विद्यापीठांनी सन्माननीय डी लिट पदवी बहाल केली. डॉ राजेन्द्रप्रसाद, पंडित नेहरू, म गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वा. सावरकर या सारख्या थोर व्यक्तींनी त्यांच्या आश्रमाला
भेटी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात
आला. महर्षींचा शंभरावा वाढदिवस तर संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. हा
सोहळा ब्रेबोर्न स्टेडियम वर झाला. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे छायाचित्र असलेले
एक पोष्टाचे तिकीट जारी करण्यात आले. या वेळी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना ‘ भारतरत्न ‘ हा भारतातील
सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले.
सेवेचा अखंड तेवणारा हा नंदादीप ७ नोव्हेंबर
१९६२ रोजी केवळ पोटदुखीचे निमित्त होऊन शांत झाला. अण्णा कधी कोणाला कटू बोलले
नाहीत. कोणाबद्दल अपशब्द उच्चारले नाहीत. सतत एखाद्या योग्यासारखे कार्यरत राहिले.
स्वतः जळत राहून अनेकांची आयुष्ये त्यांनी प्रकाशमान केली. स्त्रीशिक्षणाचे
डोंगराएवढे महान कार्य केले. पण कुठेही याचा गर्व नव्हता. करून सवरून नामानिराळे !
मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा लाजवेल असे हे वागणे. अशा या थोर व्यक्तिमत्वाला
प्रणाम ! ‘ तेथे कर माझे जुळती ! ‘
२८/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा