उगवतीचे रंग
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग चार
शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली रेल्वेची अशी वेगवान प्रगती होत असतानाच १९५६ मध्ये दक्षिण भारतात
अरियालूर येथे एक भीषण रेल्वे अपघात घडला. यात १४४ प्रवासी जागीच ठार झाले. या
अपघाताने शास्त्रीजी शास्त्रीजींना व्यथित झाले. यापूर्वीही सुमारे तीन महिने आधी
असाच एक अपघात होऊन ११२ लोक ठार झाले होते. तसा शास्त्रीजींचा या अपघातांशी
प्रत्यक्ष संबंध नव्हता. पण संवेदनशील मनाच्या शास्त्रीजींना हा धक्का सहन झाला
नाही. त्यांनी या अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
पहिल्या वेळेस पं नेहरूंनी तो स्वीकारला नाही. पण दुसऱ्यांदा मात्र
शास्त्रीजींच्या आग्रहाखातर त्यांना तो स्वीकारावा लागला. आजच्या काळात असे
स्वतःहून एखाद्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणारे
किती पदाधिकारी आणि मंत्री आढळतील ? अर्थातच आजच्या काळात अशी गोष्ट दुर्मिळ आहे.
यानंतर १९५७
च्या सार्वत्रिक निवडणुका आल्या. यात निवडणुकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी काँग्रेस
पक्षाच्या वतीने शाश्त्रींवर आली. त्यांनी अपार मेहनत घेऊन निवडणुकांचे नियोजन
केले आणि पक्षाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. स्वतःही पश्चिम अलाहाबाद
मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी झाले. यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात
दळणवळण मंत्री म्हणून शपथविधी झाला. दळणवळण मंत्री म्हणून ते फार थोडा काळ या
पदावर राहिले. पण या अल्प काळात त्यांनी विशाखापट्टणमला जहाजे बांधण्याचा कारखाना
सुरु केला. पोस्ट व तर खात्यातील कर्मचाऱ्यांनी या काळात संपाचे हत्यार उपसले
होते. त्यांच्या मागण्यांची दाखल शास्त्रीजींनी घेतली आणि संप मिटवला.
पुढे अचानक
त्यांच्याकडे व्यापार व उद्योगधंदे खात्याचे मंत्रिपद चालून आले कारण अर्थमंत्री
पदावर असलेल्या कृष्णम्माचारी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांच्या
पदावर मोरारजी देसाई यांची नेमणूक आणि मोरारजी देसाई यांचे व्यापार उद्योगधंद्याचे
महत्वाचे पद शास्त्रीजींकडे चालून आले. या पदावर आल्यानंतर शास्त्रीजींनी आपली
अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याची परंपरा सुरु ठेवली. स्वतंत्र भारतात व्यापार व
उद्योगधंद्यांची वाढ व्हावी म्हणून त्यांनी अनेक यशस्वी उपाययोजना राबवल्या.
देशाची सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर शेती आणि उद्योग यांची सांगड घातली
पाहिजे हे त्यांनी दूरदृष्टीने हेरले. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा
म्हणून शेती आणि उद्योगधंदे यांचा मेळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशाला
अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याबरोबरच देशांच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचे
योगदान महत्वाचे आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच ‘ जय जवान जय किसान ‘ हा नारा त्यांनी दिला.
त्यामुळे शेतकरी तसेच जवानांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली.
१९६१ मध्ये शास्त्रीजींकडे अत्यंत महत्वाचे पद
चालून आले. ते देशाचे गृहमंत्री झाले. अशा नवनव्या मंत्रिपदांची जबाबदारी पेलणारे
शास्त्रीजी मात्र कमालीचे साधे राहत. त्यांच्या राहणीमानात त्यांच्या पदांमुळे
कोणताही फरक पडला नाही. त्यांचा सुरुवातीचाच साधा पेहराव कायम राहिला. या
त्यांच्या साधेपणामुळे एकदा रेल्वे स्टेशनवर पोलीस त्यांना ओळखू शकले नाहीत.
त्यांच्या स्वभावातील सौजन्य, मार्दव इ गोष्टी कायम राहिल्या. नैतिकतेची आणि त्यांची
कधीही फारकत झाली नाही. स्वतःच्या फायदातोट्याचा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला
नाही.
गृहमंत्री
झाल्यानंतर शास्त्रीजींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी
अत्यंत कौशल्यपूर्वक आणि अभ्यासपूर्वक असे निर्णय घेऊन या पदाला न्याय दिला.
सुरुवातीला त्यांना आसाममधील भाषिक प्रश्नाच्या निमित्ताने सुरु झालेल्या दंगलीला
तोंड द्यावे लागले. या परिस्थितीत त्यांनी स्वतः आसाम दौरा करून महत्वाच्या
नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि चर्चेअंती समाधानकारक तोडगा काढून त्यांच्यासमोर
ठेवला. त्यामुळे नेत्यांचे समाधान झाले आणि दंगल थांबली. याच सुमाराला पंजाबमध्ये
स्वतंत्र पंजाबच्या आंदोलनाची ठिणगी पडली. आंदोलन कर्त्यांनी शाश्त्रीजींवर आपल्या
मागण्या मान्य करण्यासाठी दडपण आणले. पण शाश्त्रीजी खंबीर राहिले. कोणत्या वेळेस
काय करायचे याचे उत्तम तारतम्य त्यांच्याजवळ होते. ते त्यांच्या धमकावणीला बळी
पडले नाहीत. सरकारने त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. त्यांच्या
उपोषणालाही भीक घातली नाही. शेवटी आंदोलन हळूहळू थांबले. असा हा निश्चयाचा आणि
धैर्याचा महामेरू होता. ‘
भलेतरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ‘ या संत तुकारामांच्या
उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे होते.
१९६२ मध्ये सरकारला हिंदी राष्ट्रभाषा करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा होता. परंतु या गोष्टीला दक्षिण भारतातील लोकांचा तीव्र विरोध होता. असा निर्णय एकतर्फी घेतल्यास पुन्हा मोठे भाषिक आंदोलन उभे राहण्याची शक्यता होती. या संदर्भात शास्त्रीजींनी सखोल अभ्यास करून ‘ ऑफीशियल लँग्वेजेस बील ‘ लोकसभेत मांडले. त्यात त्यांनी हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांना स्थान देण्याचे मान्य केले. अशा रीतीने हे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच त्यांनी संपविले. दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीयांमध्ये यामुळे सलोख्याचे वातावरण निर्माण व्हायला मदत झाली. ( क्रमशः )
पुढील भाग रविवारी
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०९/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा