मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा 

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री - भाग सहा 

     १९६४ मध्ये कॉंग्रेसच्या भुवनेश्वर अधिवेशनाच्या वेळी पं नेहरूंची प्रकृती ठीक नव्हती. साहजिकच या अधिवेशनातील ठराव मांडण्याची जबाबदारी शास्त्रीजींवर आली. शास्त्रीजींनी ती नेहमीप्रमाणे यशस्वीपणे पार पाडली. दुर्दैवाने २७ मे रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले. या वेळी मंत्रिमंडळात ज्येष्ठ असलेले श्री गुलझारीलाल नंदा यांची यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. परंतु कामराज यांना ही निवड पसंत नव्हती. त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांबरोबर बैठकी घेतल्या. इतर काही नावे समोर आली तरी बहुतेक सर्वांचा कल शास्त्रीजींच्या नावाकडेच राहिला. शेवटी सर्वानुमते शास्त्रीजींची पंतप्रधान पदी निवड झाली.

     देशाला स्वातंत्र्य मिळून आता सोळा वर्षे झाली होती. या कालावधीत पंडित नेहरूंच्या देशाने बरीच प्रगती केली होती. विशेषतः औद्योगिक व वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पुढे पडली होती. पण तरीही देश दुष्काळाच्या छायेत होता. अन्नधान्याचे विशेष उत्पादन नव्हते. शेतकरी हताश झाला होता. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये अस्वस्थता होती. शास्त्रीजींनी पदावर आल्याआल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा प्रचंड होता. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना त्यांनी प्रसंगी चार शब्द सुनावून आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मंत्र्यांना आचारसंहिता ठरवून दिली. त्यांची तळमळ पाहून सर्व मंत्र्यांनी सुद्धा त्यांना मनापासून साथ दिली.

     भारतातील अन्नधान्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी त्यांनी परदेशातून धान्याची आयात केली. यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. पण ते याबाबतीत समाधानी नव्हते. त्यांना देशाचा विकास करून देशाला संरक्षण आघाडीवर स्वयंपूर्ण करायचे होते. त्यांनी यासाठी देशातील जनतेला जय जवान, जय किसान असा नारा देऊन सहकार्याचे आवाहन केले. धान्याच्या खरेदीसाठी त्यांनी खरेदी विक्री संघ स्थापन केला. यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार होता. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी कालवे बांधून पाणी उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

     शेतीच्या वाढीव उत्पन्नासाठी रासायनिक खतांची गरज होती. त्यांनी यासाठी अमेरिकेची मदत घेऊन रासायनिक कारखाने सुरु केले. यात शेतीला खत उपलब्ध होण्याबरोबरच तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी तरुणांना सहकार्याचे आवाहन केले. तरुणांनी सुद्धा त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. शेतकरी, सैनिक, बेरोजगार तरुण इ. साठी त्यांनी केलेले प्रयत्न भावी काळात देशाला प्रगतीपथावर नेणारे ठरले. कारखान्यांनी औद्योगिक क्षेत्रात भारताला पुढे नेले. देशाच्या संरक्षण सिद्धतेत त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. सर्व दृष्टीने देशाला स्वयंपूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

     आपल्या पंतप्रधान पदाच्या कालखंडात त्यांनी इतर देशांशी सलोख्याचे व दृढ संबंध करण्यावर भर दिला. अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेहून परतताना त्यांनी मुद्दाम पाकिस्तानचे नेते अयुबखान यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत शस्त्रबंदी करार केला. पण पाकिस्तानने विश्वासघात केला. हजारो घुसखोर सैनिक पाकिस्तानने काश्मीरमध्ये पाठवले. पाकिस्तानच्या या कृतीमुळे शास्त्रीजी प्रक्षुब्ध झाले. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी मंत्रिमंडळ आणि सेनाप्रमुखांच्या बैठकी घेतल्या. जनतेलाही विश्वासात घेतले आणि युद्धाची जय्यत तयारी केली. पाकिस्तानला यावेळी अमेरिकेने रणगाडे पुरवून युद्धात मदत केली. पण शास्त्रीजींच्या आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावले होते. त्यामुळे भारताने या युद्धात पाकिस्तानला लक्षात राहिला असा जबरदस्त तडाखा दिला. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. अमेरिकेने पाकिस्तानला पुरवलेल्या अभेद्य अशा पॅटन रणगाड्यांचा देखील भारतीय सैन्याने धुव्वा उडवला. नेहरूंच्या मृत्युनंतर भारत कमकुवत झाला असा पाकिस्तानचा समज झाला होता. तो या युद्धाने खोटा ठरवला. 

( पुढील भाग शुक्रवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१४/१०/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )








पाकिस्तानचा समज झाला होता. तो या युद्धाने खोटा ठरवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...