उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली - लाल बहादूर शास्त्री भाग १
आजपासून या निमित्ताने भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्तिमत्वांबद्दल या लेखमालेतून आपण माहिती घेणार आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून भारतरत्न पदवी पर्यंत पोहोचलेल्या काही व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख यानिमित्ताने आपल्याला करून द्यावी आणि त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी अशा कार्यातून आपल्यालाही काही प्रेरणा घेता आली तर ती घ्यावी हा या लेखमालेचा उद्देश आहे. सुरुवातीला भारतरत्न पुरस्काराबद्दल थोडी माहिती करून घेऊ.
भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या आणि भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला जातो. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला.
हे मेडल सोनेरी पिंपळाच्या पानाच्या आकाराचे कासे धातूपासून बनवले जाते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, त्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’कोरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले.
भारतीय राजकारणात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना. या व्यक्तीची शारीरिक उंची होती फक्त पाच फुट दोन इंच. पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ही व्यक्ती हिमालायापेक्षा उंच ठरली. उज्ज्वल चारित्र्य, आपल्या तत्वांवर अविचल निष्ठा, आरपार प्रामाणिकपणा, साधा सरळ मृदू स्वभाव, नेहमी हसतमुख असलेली ही व्यक्ती होती भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. शास्त्रीजी कधीही आकांडतांडव करून वा हातवारे करून आपल्या भावनांचे उघड प्रदर्शन करीत नसत. त्यांच्या मनातील भावना त्यांच्या नजरेतून प्रकट होई. ते आपले म्हणणे मोजक्या शब्दात व्यक्त करीत. त्यांची स्नेहाळ नजर समोरच्या व्यक्तीचे मन सहज जिंकून घेत असे. एके काळी त्यांचे सचिव असलेल्या सी पी श्रीवास्तव यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांचा उल्लेख त्यांनी राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम असा केला आहे तो अगदी सार्थ आहे. पंडित नेहरूंसारखे प्रभावी व्यक्तिमत्व त्यांना लाभले नव्हते तरी आपल्या अंगभूत गुणांच्या सहाय्याने त्यांनी समोरच्यांना सहज जिंकून घेतले. एखादी उपमा देऊनच बोलायचे झाले तर पंडित नेहरु म्हणजे सुंदर असे गुलाबाचे फुल तर शाश्त्रीजी म्हणजे पांढरा शुभ्र सुगंधी मोगरा..! स्वतःच्या हाताने सुत कातून त्याचा शिवलेला पांढरा शुभ्र इस्त्रीचा कुर्ता आणि स्वच्छ पांढरे धोतर हा त्यांचा पोशाख.
खरोखरच लाल बहादूर
म्हणजे अनोखा ‘ लाल ‘ होता. २ ऑक्टोबर १९०४
रोजी मोगलसराई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शारदाप्रसाद हे अलाहाबाद येथे
शिक्षक होते आणि आई रामदुलारीदेवी. त्यांच दुसरं अपत्य म्हणजे लाल बहादूर. नियतीने
जणू बालपणापासून त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. ते केवळ दीड वर्षांचे
असताना प्लेगच्या साथीत त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना सांभाळण्याची
जबाबदारी आईवर येऊन पडली. त्यांचे आजोबा म्हणजे रामदुलारी देवींचे वडील त्यांना
आपल्याकडे घेऊन गेले. पण दुर्दैवाने त्यांचेही दोनच वर्षांनी आजारपणात निधन झाले.
अशा कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी रामदुलारी देवींचे काका दरबारीलाल
यांनी घेतली. आणि मोठ्या प्रेमाने त्यांचा सांभाळ केला. मुलाचे पाय पाळण्यात
दिसतात असे आपण म्हणतो. लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत हे प्रकर्षाने आढळून
येते. त्यांच्या लहानपणचे दोन प्रसंग थोडक्यात सांगण्याचा मोह येथे आवरत नाही.
ते आणि त्यांचा मामा पुरुषोत्तम लाल ज्याला लल्लन म्हणत असत, ते दोघे एकदा संध्याकाळी
गंगेवर फेरफटका मारत असताना त्यांना आंबे विकणारा एक म्हातारा दिसला. म्हातारा
त्यांना म्हणाला, ‘ आंबे फार गोड आहेत. खाऊन
पहा. आवडले तर घ्या. एका आण्याला शंभर देईन. दोघांनी एक एक आंबा चाखून पाहिला.
आंबा अतिशय गोड होता. दोघांनी आंबे घेण्याचे ठरवले आणि आपल्या खिशातून पैसे काढून
ते म्हाताऱ्याला दिले. म्हातारा आंबे मोजून देऊ लागला. पन्नास आंबे मोजून झाले
तेव्हा लाल बहादूर त्या म्हाताऱ्याला म्हणाला, ‘ पुरेत एवढे आंबे. ‘ म्हातारा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. तेव्हा लाल
बहादूर त्यांना म्हणाला,
‘ तुम्ही ठेवून घ्या बाकीचे आंबे. आम्हाला एवढेच पुरेत.’ म्हातारा त्यांच्याकडे
अविश्वासाने पाहत होता. त्याला पहिल्यांदाच असे कोणीतरी भेटले होते. तो त्यांचे
आभार मानून निघून गेला. लल्लनमामा लाल बहादुरला म्हणाला, ‘ तू असे का केलेस ? तो चांगला आपल्याला शंभर
आंबे देणार होता.’ यावर लाल बहादुरने मोठे
सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘ संध्याकाळची वेळ होती म्हणून तो आपल्याला एका आण्यात शंभर
आंबे द्यायला तयार झाला. त्याच्या परिस्थितीचा फायदा आपण कशाला घ्यायचा ? तो पुढे जाऊन आणखी कोणाला
तरी उरलेले आंबे विकील. त्याला दोन पैसे मिळतील. ‘ लहान वयात केवढी समज होती ही दुसऱ्याच्या
परिस्थितीची ! दुसरा एक प्रसंग ते शाळेत शिकत असतानाचा आहे. ते तेव्हा सहावीत शिकत
होते. त्यावेळी शाळेत त्यांचे वर्मा हे आडनाव लावले होते. ते आपल्या आईला म्हणाले, ‘ हे जातीवाचक आडनाव
लावण्याची माझी इच्छा नाही. मला जातीभेद आवडत नाही. तेव्हा आईने, त्यांच्या आजोबांनी आणि
आणि त्यांचा मुलगा बिंदेश्वर प्रसाद यांनी या गोष्टीला मान्यता दिली. आणि लाल
बहादुरनी आपले वर्मा हे आडनाव शाळेच्या रेकॉर्डमधून वगळण्यात यावे असा अर्ज दिला.
आणि त्याचं नाव केवळ लाल बहादूर झालं. पुढे त्यांनी बनारस येथील काशी
विद्यापीठातून ‘ शास्त्री ‘ ही पदवी मिळवली आणि त्यांच्या
नावापुढे शास्त्री ही उपाधी लागली. हे दोन प्रसंग त्यांच्या मनाची जडणघडण कशी होत
गेली हे दाखवतात. ( पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०२/१०/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा