मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग बावीस ( रामायणकालीन शिक्षण )

 उगवतीचे रंग 

विश्वास  देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग बावीस  ( रामायणकालीन शिक्षण )

शिक्षण ही मनुष्याच्या जीवनाला उन्नत करणारी सर्वात सुंदर गोष्ट आहे. रामायणकालीन संस्कृती ही एक अद्वितीय संस्कृती होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रामायणकालीन शिक्षण पद्धती. खाणीतून बाहेर काढलेल्या हिऱ्याला सुद्धा पैलू पाडावे लागतात. मनुष्य ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे. प्राणिमात्रातील तो हिराच आहे. रामायणकाल म्हणजे तर अशा एकापेक्षा एक सुंदर हिऱ्यांची खाणच होती. त्या काळात अशा हिऱ्यांना पैलू पडणारे कुशल हातही अस्तित्वात होते. म्हणून श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्यासारखे दैदिप्यमान हिरे निर्माण झाले. त्यांचे तेज आजही फिके झालेले नाही. 

इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणत असत. जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण रामायणकालीन शिक्षण म्हणजे जणू कामधेनूचे दूध असे मी म्हणेन. गायीला आपण कामधेनू सुद्धा म्हणतो. गायीचे दूध बालकाला बुद्धिमान आणि तेजस्वी बनवते. हीच बुद्धिमत्ता आणि तेजस्विता त्या काळातील शिक्षणाने आपल्या विद्यार्थ्यांना दिली होती. ही शिक्षण आणि संस्काराची शिदोरी त्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडत असे. 

आज शिक्षणाची आणि जीवनाची, शिक्षणाची आणि व्यवहाराची फारकत झालेली आपल्याला दृष्टीस पडते. त्या काळात जीवनासाठी उपयुक्त शिक्षण दिले जाई. साधा विचार आपण करू या की आजचे शिक्षण मुलांना परिपूर्ण बनवते का ? त्याला दैनंदिन जीवनातील कामे, कौशल्ये शिकवते का ? मुलांना कपडे धुता येतात का, भांडी घासता येतात का, स्वयंपाक करता येतो का, स्वतःच्या शरीराची नीट स्वच्छता तरी ठेवता येते का ? या सगळ्या मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव रामायणकालीन शिक्षणात होता. कारण विद्यार्थी जेव्हा आश्रमात रहात असे, तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याला स्वतःला कराव्या लागत. त्यामुळे स्वावलंबनाचा गुण आपोआपच येत असे. ' आत्मनिर्भर व्हा ' असे वेगळे सांगण्याची जरुरी नव्हती. 

त्या काळात मौंजीबंधन विधीनंतर म्हणजे साधारणपणे वयाच्या आठव्या वर्षी विद्यार्थ्याला गुरुगृही जावे लागे. गुरुगृह म्हणजे गुरूंचा आश्रम असे, ज्याला तपोवन असेही म्हंटले जाई . तपोवनात खरोखरच तप, साधना करून तेजस्वी असलेले ऋषीमुनी राहत असत. आपल्या विद्यार्थ्यांना ते तसेच तेजस्वी घडवत असत. हे गुरु वेदादि सर्व विद्यात निष्णात असत. शिकवण्यासाठी ते विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेत नसत. त्यांचे आश्रम राजाच्या किंवा समाजाच्या उदार आश्रयावर चालत. विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर यथाशक्ती गुरुदक्षिणा देत असत. 

या तपोवनांचे किंवा आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर वागवले जाई . राजाचा मुलगा असो की गरीबाचा, सर्वाना आश्रमातील कामे करावी लागत. शिवाय पहाटे लवकर उठून, स्वतःचे आवरून , स्वयंपाक करून गुरूंच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित व्हावे लागे . विद्यार्थ्यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त असायचा. गुरूंची शिस्तही असायची आणि सोबत त्यांचे आणि गुरुमातेचे अपत्यवत प्रेम आपल्या सर्व शिष्यांवर असायचे. श्रीराम, लक्ष्मणादि भावंडे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिकली तर पुढे महाभारत काळात श्रीकृष्ण, बलराम, सुदामा हे सर्व सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकले. या काळात श्रीराम, श्रीकृष्ण यांनी राजपुत्र असून देखील आश्रमातील सर्व कामे केली. श्रीरामाचे सुपुत्र लवकुश सुद्धा वाल्मिक ऋषींच्या आश्रमात अशाच पद्धतीने शिकले. लवकुश किती तेजस्वी होते, हे आपल्याला माहिती आहे. प्रत्यक्ष श्रीरामाच्या अश्वमेध यज्ञाचा अश्व अडवण्याचे सामर्थ्य या चिमुकल्या बालकांमध्ये अशा शिक्षणामुळेच आले. 

आज विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी राहिले तर होस्टेलमध्ये राहतात. या होस्टेलची जाहिरात सर्व सुखसोयींनी युक्त, सुग्रास भोजन इ प्रकारे केली जाते. रामायणकाळात विद्यार्थ्यांना साधकाचे कठोर जीवन जगावे लागे . सर्व सुखसोयी आणि सुग्रास भोजन या गोष्टींना महत्व नव्हते. विद्यार्जन करणे हा प्रमुख हेतू होता. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्याचे पालन करणे अपेक्षित आणि आवश्यक असे. त्यामुळे आजसारखे इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होत नसे. एखाद्या भिंगातून सूर्यकिरणे एकत्रित केली तर त्यांची शक्ती वाढते. विखुरलेल्या सूर्यकिरणांमध्ये ती शक्ती नसते. तशी एकाग्रतेमुळे त्या काळातील विद्यार्थ्यांची वाढत असे. त्या काळात आजच्या सारखे छापील ग्रंथ उपलब्द्ध नव्हते. त्यामुळे पाठांतराला खूप महत्व होते. हजारो श्लोक विद्यार्थ्यांचे पाठ असत. सर्व ज्ञान मुखोद्गत असे. पाठांतराने स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते. 

आजच्या शिक्षणपद्धतीत पाठांतराच्या या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पाठांतरामुळे अनेक गोष्टी लहानपणीच पाठ होतात. मग त्या चांगल्या कविता असतील, पाढे असतील. काही जागरूक पालक आजही आपल्या मुलांकडून स्तोत्रे, कविता इ गोष्टी पाठ करून घेतात. मनाचे श्लोक, रामरक्षा इ सारखी स्तोत्रे, भगवद्गीता इ गोष्टी लहानपणी सहज मुखोद्गत होऊ शकतात. त्याचा उपयोग वाणीचे दोष घालवणे, शुद्ध उच्चार करणे इ साठी सुद्धा होतो. 

त्या काळात स्त्रियांना देखील सर्व प्रकारच्या शिक्षणात तरबेज करण्यात येत असे. स्त्रिया या सर्व विद्यात पारंगत असत. रामायणकालीन स्त्रिया या सुधारलेल्या आणि प्रगत विचारांच्या होत्या. कैकेयीला युद्धकला अवगत होती. तिने दशरथाला युद्धात मदत केली होती. स्त्रियांना वेद, उपनिषदे इ बरोबरच राज्यकारभार आदींचे शिक्षण देण्यात येत असे. श्रीरामाला जेव्हा वनवासात जावे लागेल असे निश्चित झाले, तेव्हा राज्यकारभार कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी ' सीता ही सर्व ज्ञानाने परिपूर्ण असून ती राज्यकारभार सहज सांभाळू शकेल. त्यामुळे चिंता नाही. ' असा सार्थ विश्वास सीतेबद्दल व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आश्रमात बरेच वेळा गुरुमाता देखील विद्यादानात महत्वाची जबाबदारी पार पाडत असत. 

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असे. पण या कालात देखील तो आजन्म विदयार्थी राहील याची दक्षता गुरु घेत असत. गृहस्थाश्रमात असताना देखील वेद, उपनिषदे, शास्त्रे इ चे अध्ययन त्याने करत राहावे अशी शिकवण दिली जात होती. त्यामुळे त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींवर साहजिकच सद्सद्विवेक बुद्धीचे नियंत्रण राहून त्याच्या हातून अयोग्य गोष्टी घडत नसत. त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला मिळत असे. गुरु वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसिष्ठानी श्रीरामासह सगळ्या शिष्याना निरोप देताना जो उपदेश केला तो फार सुंदर होता. आजही तो सगळ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे.  ते म्हणतात, '" आज तुमचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा ' सा विद्या या विमुक्तये ' अर्थात जे मुक्त करते ते ज्ञान. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञातुन मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट मी सांगितली म्हणून प्रमाण मानू नका. आपले ज्ञान, विचार, विवेक यांच्या साहाय्याने निर्णय घ्या. ' आत्मदीपो भव. स्वयंप्रकाशित व्हा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीन ऋण फेडावे लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण. परमेश्वराची भक्ती केल्याने आणि सर्वाभूती ईश्वर पाहिल्याने देवऋण फेडता येते. आपले सुख त्यागून मात्यापित्यांची आज्ञा पाळणे आणि त्यांना सुख देणे यामुळे पितृऋण फिटते आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करणे, मानवधर्माचा आदर्श प्रस्थापित करणे यामुळे आचार्यऋण फेडता येते. " 

आजच्या काळात सुद्धा वसिष्ठानी केलेला हा उपदेश गुरु आणि शिष्य दोघांना मार्गदर्शक आहे. राम आणि लक्ष्मण वसिष्ठांच्या आश्रमातून घरी जाण्यासाठी जेव्हा निघतात, तेव्हा श्रीराम आपल्या गुरुमातेला म्हणतात, " माते, या आश्रमात तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिले. आईची आठवण येऊ दिली नाही. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. " किती हा नम्रपणा...! धन्य ती प्रेमळ गुरुमाता आणि धन्य ते शिष्य. जणू समसमा संयोग जाहला. म्हणून रामायण आमच्या मुलांना शिकवणे, सांगणे आवश्यक आहे. अशा प्रकारची सुंदर शिक्षण व्यवस्था त्या काळी अस्तित्वात  होती. वसिष्ठांसारखे तपस्वी, निस्पृह गुरु होते.  गुरूंचा आदर करणारी राजसत्ता आणि प्रजाजन होते. 

वसिष्ठ, विश्वामित्र, याज्ञवल्क्य, आदी ऋषींचे आश्रम म्हणजे संस्कारांची विद्यापीठे होती. हे सगळे गुरु बुद्धिमान आणि ईश्वरावर श्रद्धा असणारे तर होतेच. पण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याबरोबरच कर्तव्यपालनाचे मोठे शिक्षण दिले. लेचेपेचे शिष्य निर्माण केले नाही. त्यामुळेच रावणासारख्या अन्यायी, अत्याचारी आणि बलाढ्य व्यक्तीला पराभूत करणारे श्रीरामासारखे तेजस्वी शिष्य आणि राजे निर्माण झाले. आज काळानुसार आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक बदल झाले आहेत. रामायणकालीन शिक्षण पद्धतीबद्दल बोलताना आपल्याला आजच्या काळाचे भान ठेवून त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतील, आजच्या शिक्षणपद्धतीतील दोष दूर करता येतील. जेव्हा असे तेजस्वी, बुद्धिमान आणि कर्तव्यदक्ष विद्यार्थी निर्माण होतील, तेव्हाच तेजस्वी समाज निर्माण होऊ शकेल. ज्या रामराज्याबद्दल आपण बोलतो,  रामराज्याची स्वप्ने आपण पाहतो ते प्रत्यक्षात येऊ शकेल. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०४/०९/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...