मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा -भाग एकवीस ( कुटुंबसंस्था )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा -भाग एकवीस ( कुटुंबसंस्था ) 

विवाहसंस्था किंवा कुटुंबव्यवस्था कशी असावी याचे उत्तर रामायणात आपल्याला मिळते. कुटुंब हा समाजाचा  एक छोटा  आणि मूलभूत घटक आहे.  अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. कुटुंबातील व्यक्तींचा विकास झाला तर आपोआपच समाजाचा आणि देशाचा विकास होतो. हा विकास केवळ आर्थिक स्तरावर नव्हे तर बौद्धिक, भावनिक आणि एकूणच व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास येथे अपेक्षित आहे. असा विकास ज्या व्यक्तीचा झालेला असतो, तिला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असते. माझे कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रतीअसणारे कर्तव्य कोणते याची जाण जर मला असेल तर मी जबाबदारीने वागेन. ही जी जबाबदारीची, कर्तव्याची भावना आहे ती रामायणकालीन कुटुंबात लहानपणापासून जोपासण्यात येत असे. 

विवाहसंस्था का निर्माण झाली असावी ? तर स्त्री आणि मुले यांची काळजी घेणे, भरण, पोषण करणे आणि त्यांना संरक्षण पुरवणे त्याचबरोबर समाजाचा आणि व्यक्तीचा विकास करणे हाही विवाह संस्थेचा उद्देश आहे. केवळ व्यक्तीच्या सुखासाठी विवाहसंस्थेची निर्मिती झाली नाही. या सगळ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव रामायणकालीन लोकांना होती. त्या काळात विनिमयासाठी वस्तू आणि सोने म्हणजेच सोन्याची नाणी प्रचारात होती. आजच्या सारखा कागदी नोटांचा शोध त्या काळात लागलेला नव्हता. आजची नोटा किंवा रुपया ही कागद रूपातील करन्सी हे आपल्या प्रगतीचे प्रतीक आहे. पण यावर सरकारचे नियंत्रण असल्याने सरकार आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्याची छपाई करू शकते. त्यामुळे कधी कधी चलनवाढ किंवा मंदी यासारख्या समस्या उभ्या राहतात. 

त्या काळात स्त्रियांना जरी सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असले तरी आज जशी स्त्री पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडते, तशा प्रकारची जबाबदारी त्या काळात स्त्रियांवर नव्हती. पुरुष पैसा कमावून आणत असे. घरातील सर्व व्यवहार मात्र स्त्रिया पाहत असत. ' अतिथी देवो भव ' ही घराची परंपरा असायची. श्रीराम वनवासात असताना एकदा सीतेला ते एका ऋषींचा आश्रम दाखवतात. त्या आश्रमात आता कोणीही राहत नसते. राम सांगतात, ' पूर्वी येथे ऋषी पती पत्नी राहत असत. येणाऱ्या जाणाऱ्या अतिथींचे ते स्वागत करीत असत. पण आज त्यांचे कोणी नाही. पण त्यांनी लावलेले हे वृक्ष आज अतिथींचे स्वागत करतात. त्यांना सावली, फळे देतात. ' कुटुंबसंस्थेचे कामही असेच आहे. आल्या गेल्या अतिथींचे स्वागत करणे. पुढे ही परंपरा त्यांची मुले चालवतात. त्यातूनच समाज पुढे जात असतो. 

रामायणकाळात कष्टाने आणि प्रामाणिकपणानेच लोक पैसे कमवीत असत. गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्याला कोणीही आपली मुलगी देत नसे. समाज अशा व्यक्तीला खड्यासारखे बाजूला ठेवीत असे. त्यामुळे आपोआपच लोक नैतिकतेचे पालन करीत असत. सन्मार्गाने पैसा कमवीत असत.  आपण असे समजण्याचे कारण नाही की रामायणकालीन लोक अरसिक होते. ते जीवनाचा आनंद घेत नव्हते. ते उत्तम पोशाख परिधान करत असत. सुगंधी द्रव्ये अंगाला लावून फिरत असत. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असत. तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न बनवून खात असत आणि खाऊ घालत असत. पण या सगळ्या गोष्टीत संयम आणि धर्माचे पालन या दोन मुख्य गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांच्या जीवनात शांतता आणि आनंद नांदत होता. 

लग्न किंवा विवाह म्हणजे केवळ दोन शरीरांचे मिलन नव्हे. ते दोन मनांचे, हृदयाचे मिलन आहे. आज आपण लग्नापूर्वीचे ते प्रेम म्हणतो आणि लग्नानंतरचा जो असतो तो संसार. याचा अर्थ संसारात प्रेम असत नाही किंवा असू नये असा आहे का ? तेच प्रेम जेव्हा लग्नानंतरही पतिपत्नीत असेल, तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होईल. आजही आपल्याकडे सप्तपदी करताना जे मंत्र म्हटले जातात, त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. पण त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. भटजी मंत्र म्हणण्यात गर्क, वऱ्हाडी जेवणात गर्क आणि वधूवर त्यांच्या वेगळ्या विचारात. त्यामुळे विवाह समारंभ ही केवळ औपचारिकता होते. सप्तपदीच्या वेळी म्हटला जाणारा हा एक मंत्र बघा. 

 तीर्थव्रतोद्यापन यज्ञकर्म मया सहैव प्रियवयं कुर्या:
वामांगमायामि तदा त्वदीयं ब्रवीति वाक्यं प्रथमं कुमारी!।

वधू आपल्या पतीला म्हणते की यापुढे तीर्थयात्रेला जाताना किंवा काही धार्मिक कार्य करताना मला आपल्यासोबत घेऊन चला. म्हणजेच आपल्या सुखदुःखात मी सहभागी आहे. प्रत्येक कार्यात आपल्या डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार मला द्या. याच अधिकारात श्रीराम वनवासाला जात असताना सीता त्यांच्यासोबत गेली होती. पती आणि पत्नी असणे म्हणजे केवळ शरीरावर प्रेम असणे नव्हे. शरीर पुढे कुरूपही होऊ शकते. पण प्रेम असेल  तर संसार सुखाचा होतो. प्रेम आणि मोह, प्रेम आणि शारीरिक आकर्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम म्हणजे अस्सल सोने. मोह किंवा आकर्षण म्हणजे बेगडी सोने. चकाकते ते सर्वच सोने नसते हे आपल्याला माहिती आहे. आज प्रेम आणि मोह किंवा शारीरिक आकर्षण यात आपली गफलत होते आहे. म्हणूनच मुक्त स्त्री पुरुष संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, प्रेमभंग आणि घटस्फोट यासारख्या गोष्टी घडत आहेत. 

घरात जेव्हा सून येते तेव्हा ती म्हणजे दुसरी मुलगीच. आपल्या मुलीचे अपराध जसे आपण पोटात घालतो, तसे सूनेचेही मुलगी म्हणून घालता आले पाहिजे. तिनेही सासूसासरे म्हणजे आपले दुसरे आईवडील आहेत हे समजून वागले पाहिजे. प्रत्येकाची आपापल्या नात्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी कुटुंब म्हटले की आलीच. इंग्रजीत सुनेला डॉटर इन लॉ म्हटले जाते, सासू म्हणजे मदर इन लॉ , सासरा फादर इन लॉ. डॉटर, मदर, फादर इथपर्यंत ठीक आहे. पुढे लॉ शब्द आला की कायदा आला. कायदा म्हटलं की भांडण आली. ती सोडवण्यासाठी वकील लोक पाटया लावून बसलेलेच आहेत. 

रामायणात गृहस्थाश्रमाला ' धन्यो गृहस्थाश्रमः ' असे म्हटले आहे. पुढील अर्थाचा एक सुंदर श्लोक आहे. 
' ज्या घरामध्ये आनंद आहे, पुत्र बुद्धिवान आहेत, पत्नी मधुर भाषिणी आहे, सज्जन मित्र आहेत, धन आहे, पती पत्नीमध्ये प्रेम आहे, नोकर आज्ञापालन करणारे आहेत, जेथे अतिथींचा सत्कार होतो, ईश्वराची पूजा होते, चांगले रुचकर अन्न तयार होते आणि सत्संग होत असतो, अशा प्रकारचा गृहस्थाश्रम धन्य ' होय. खरोखरच गृहस्थाश्रमाचे हे किती सुंदर वर्णन आहे. अशाच कुटुंबातून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यासारखे सुसंस्कारित आणि त्रिखंडात कीर्ती गाजवणारे पुत्र निर्माण होऊ शकले. जनकाच्या कुटुंबात सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकिर्ती अशा आपल्या कुळाचे नाव उज्वल करणाऱ्या कन्या जन्मास आल्या. अशा सुसंस्कारीत कुटुंबातूनच स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज यासारखे महापुरुष जन्माला आले. ज्या घरात पावित्र्य आणि मांगल्य आहे, ते घर ईश्वराचे दुसरे मंदिरच आहे. घर म्हणजे खानावळ किंवा लॉज नव्हे की कोणी केव्हाही यावे आणि कसेही राहावे. जिथे सगळे एकमेकांना समजून घेतात, एकमेकांवरअकृत्रिम प्रेम करतात असे ठिकाण म्हणजे घर होय. असे घर म्हणजे दुसरा स्वर्गच...! 

घर आणि गृहस्थाश्रम रामायणकाळात खूपच नैतिक मूल्ये पालन करणारी एक मूलभूत संस्था होती. त्यामुळे रामराज्य प्रत्यक्षात येऊ शकले. आज युरोपीय देशात कुटुंबसंस्थेची वाताहत झालेली आपल्याला दिसते. ते लोक आपल्या भारतीय विवाहसंस्थेकडे आशेने पाहत आहेत. आपण या सगळ्यातून वेळीच सावरलो नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. त्यासाठी रामायणकालीन मूल्ये आणि समाज आणि कुटुंबव्यवस्था आपल्याला अंगीकारावी लागेल. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
०२/०९/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...