रामायणकालीन समाज, शिक्षण व शासनव्यवस्था
- विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामायणकालीन समाज आणि शासनव्यवस्थेवर लिहिताना माझा ऊर अभिमानाने भरून येत आहे. तो यासाठी की अशा प्रकारची आदर्श समाजरचना कोणे एके काळी आपल्या देशात विद्यमान होती. आज जेव्हा आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेचा, समाज व्यवस्थेचा आणि शिक्षण व्यवस्थेचा विचार करतो, तेव्हा रामायणकालीन समाजव्यवस्थेतील फरक आपल्या नजरेत ठळकपणे भरतो. हा फरक सगळ्याच बाबतीत पडलेला आहे. शिक्षणपद्धती, कुटुंबव्यवस्था, शासन संस्था या सगळ्यांमध्ये कमालीचा बदल झालेला आहे. आज जेव्हा आपली भौतिक प्रगती झाली आहे, अनेक नवनवीन शोध लागत आहेत, अशा वेळी मात्र आपल्या उज्वल, दैदिप्यमान आणि तेजस्वी संस्कृतीची पीछेहाट होताना दिसत आहे. नीतिमूल्ये हरवत चालली आहेत. तरुणांमध्ये निराशेची भावना वाढताना दिसते आहे. कालानुरूप अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी भगवद्गीता, रामायणासारखे ग्रंथ आपल्याला नक्कीच दिशा दाखवू शकतील.
रामायणकाळातील समाजाचे वर्णन स्थूलमानाने करायचे झाले तर हा समाज पापभिरू, शाश्वत अशा नैतिक मूल्यांचे पालन करणारा आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. अध्यात्म हा या समाजाचा पाया कोणत्याही कृत्याला अध्यात्मिक नैतिक अधिष्ठान होते. आज आपण अध्यात्म आणि धार्मिक या शब्दांचा अर्थ संकुचित केला आहे. देव देव करणे, जपजाप्य करणे आणि मंदिरात जाणे म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म ही प्रवृत्ती आहे. धार्मिक हा शब्दही रूढ अर्थाने वापरलेला नाही. धर्म याचा अर्थ आपले जे निहित कर्म आपल्या वाट्याला आले आहे, ते उत्तम प्रकारे करणे. आणि आपल्या कार्याला जेव्हा अध्यात्मिक आणि नैतिक अधिष्ठान असते, तेव्हा ते प्रत्येक कर्म उत्तम होते. आज कार्याच्या पाठीमागे असणारा हा पाया हरवलेला आपल्याला दिसतो. म्हणून रामायणाचा आणि रामायणकालीन समाजाचा अभ्यास आपल्याला हितावह ठरणारा आहे.
मंदिरे
त्या काळातील मंदिरे ही समाज प्रबोधनाची केंद्रे होती. सांस्कृतिक केंद्रे , स्वाध्याय केंद्रे होती. वेद उपनिषदांचे अध्ययन त्या ठिकाणी केले जात असे. आजकाल मंदिरांना जे बाजारू स्वरूप आले आहे, ते त्या काळी नव्हते. मंदिरात केवळ भक्ती आणि उपासनाच केली जात होती. नगरातील प्रजाजन सायंकाळी वा रात्री जमून त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत असत. अशा प्रकारचे धार्मिक उत्सव हे लोकांना प्रेरणा देणारे, प्रबोधन करणारे आणि मूलतःच त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या नैतिक मूल्यांना बळकटी देणारे असत. या मंदिरांच्या माध्यमातूनच वैदिक संस्कृती आणि परंपरा जिवंत राहिल्या आणि आपल्या पर्यंत पोहोचू शकल्या.
संस्कारांची विद्यापीठे
आपले आयुष्य साधारण शंभर वर्षांचे मानले तर त्या हिशेबानें आपल्या पूर्वजांनी आपल्या आयुष्याचे चार आश्रम कल्पिलेले होते. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. साधारणपणे पन्नासाव्या वर्षी सांसारिक जबाबदारीतून निवृत्त होऊन पती पत्नी वानप्रस्थाश्रम स्वीकारीत. त्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऋषीमुनींच्या आश्रमात होत असे. असे आश्रम म्हणजे तपोवन असत. वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले नागरिक अशा तपोवनांमध्ये जाऊन राहत. त्यांच्याजवळ अनुभवांचा खजिना असे. विविध कौशल्ये असत. या त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्यांचा फायदा ते आश्रमातील विद्यार्थ्यांना देत.
विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे जे ऋषीमुनींचे आश्रम असत, त्यातील ऋषीमुनी वेद, उपनिषदे , युद्धकला, राज्यव्यवस्था इ सर्व विषयांत निपुण असणारे असत. बहुतेक ऋषीमुनी हे गृहस्थाश्रमी असल्याचे उल्लेख रामायणात आढळतात. असे असूनही ते त्यागी, निरिच्छ आणि कोणाकडूनही मदतीची अपेक्षा न बाळगणारे असत. म्हणूनच ते कोणाचे लिंपित नसत. ते तेजस्वी आणि अत्यंत स्वाभिमानी जीवन जगत. समाजातील लोक आणि बऱ्याच वेळा अशा आश्रमांना राजाश्रय असायचा. पण तो मिळेल न मिळेल, प्रसंगी उपाशी राहून, काटकसर करून विद्यार्थ्यांना हे तपस्वी शिक्षण देत असत. कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नसे. सर्व शिक्षण पूर्णपणे मोफत होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर कृतज्ञता म्हणून शिष्य त्यांच्या पात्रतेप्रमाणे जी काही गुरुदक्षिणा देतील, तिचा स्वीकार केला जात असे.
या आश्रमांमध्ये म्हणजेच तपोवनांमध्ये जीवनाला उपयुक्त असे शिक्षण दिले जाई. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने स्वावलंबनाचे धडे मिळत. राजपुत्र आणि सामान्य विद्यार्थी यांच्यात भेद केला जात नव्हता. राम आणि कृष्णानेही आपल्या गुरुगृही सर्व प्रकारची कामे केल्याचे उल्लेख आपण रामायण, महाभारतात वाचतो. श्रीराम, लक्ष्मण, श्रीकृष्ण, बलराम हे राजपुत्र असूनही त्यांना कोणतीही सूट किंवा वेगळी वागणूक दिली जात नव्हती. श्रीकृष्ण आणि सुदामा या दोघांनाही एकाच पातळीवरची वागणूक दिली जात होती. विद्यार्थ्यांना आपले कपडे स्वतः धुणे, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, आश्रमाची स्वच्छता ठेवणे ही कामे करावी लागत. त्यामुळे स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये आपोआपच व्यक्तिमत्वाचा एक भाग बनत. सकाळची आपापली कामे लवकर आवरून विद्यार्जन करणे महत्वाचे असे.
आजच्या काळात हॉस्टेलमध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा, उत्तम भोजन इ गोष्टी त्या काळी विद्यार्थ्यांना मिळत नव्हत्या. स्वावलंबन, ब्रह्मचर्य पालन, सात्विक आहार या गोष्टींवर भर दिला जात होता. म्हणूनच विद्याग्रहण करण्याकडे त्यांचे चित्त एकाग्र होत असे. सूर्यकिरणांनी जर कागद जाळायचा असेल तर, विखुरलेल्या सूर्यकिरणांनी ते काम होत नाही. त्यासाठी काचेच्या भिंगात सूर्यकिरणे एकत्रित करावी लागतात तरच शक्ती केंद्रित होऊन कागद पेट घेऊ शकतो. आजकाल विद्यार्थ्यांचे लक्ष विखुरलेल्या सूर्यकिरणांसारखे मोबाईल, टीव्ही, सिनेमा आणि अन्य गोष्टींमध्ये विखुरले गेले आहे. सोयीसुविधा, सर्व गोष्टी आयत्या मिळणे, धनिक पुत्रांना वेगळी वागणूक आणि गरिबांच्या मुलांना मिळणारी वेगळी वागणूक या गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्या मनात आपल्या समाज व्यवस्थेविषयी भेदभाव आणि अढी निर्माण करतात.
त्या काळात स्त्रियांना देखील सर्व प्रकारच्या शिक्षणात तरबेज करण्यात येत असे. स्त्रिया या सर्व विद्यात पारंगत असत. रामायणकालीन स्त्रिया या सुधारलेल्या आणि प्रगत विचारांच्या होत्या. कैकेयीला युद्धकला अवगत होती. तिने दशरथाला युद्धात मदत केली होती. स्त्रियांना वेद, उपनिषदे इ बरोबरच राज्यकारभार आदींचे शिक्षण देण्यात येत असे. श्रीरामाला जेव्हा वनवासात जावे लागेल असे निश्चित झाले, तेव्हा राज्यकारभार कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी ' सीता ही सर्व ज्ञानाने परिपूर्ण असून ती राज्यकारभार सहज सांभाळू शकेल. त्यामुळे चिंता नाही. ' असा सार्थ विश्वास सीतेबद्दल व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आश्रमात बरेच वेळा गुरुमाता देखील विद्यादानात महत्वाची जबाबदारी पार पाडत असत.
आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी गृहस्थाश्रमात प्रवेश करीत असे. पण या कालात देखील तो आजन्म विदयार्थी राहील याची दक्षता गुरु घेत असत. गृहस्थाश्रमात असताना देखील वेद, उपनिषदे, शास्त्रे इ चे अध्ययन त्याने करत राहावे अशी शिकवण दिली जात होती. त्यामुळे त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींवर साहजिकच सद्सद्विवेक बुद्धीचे नियंत्रण राहून त्याच्या हातून अयोग्य गोष्टी घडत नसत. त्यांच्या या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजाला मिळत असे. श्रीरामाने गुरु वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसिष्ठानी सगळ्या शिष्याना निरोप देताना जो उपदेश केला तो फार सुंदर होता. आजही तो सगळ्यांनी लक्षात घ्यावा असा आहे. ते म्हणतात, '" आज तुमचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षात ठेवा ' सा विद्या या विमुक्तये ' अर्थात जे मुक्त करते ते ज्ञान. म्हणून मी तुम्हाला आजपासून माझ्या सर्व आज्ञातुन मुक्त करीत आहे. एखादी गोष्ट मी सांगितली म्हणून प्रमाण मानू नका. आपले ज्ञान, विचार, विवेक यांच्या साहाय्याने निर्णय घ्या. ' आत्मदीपो भव. स्वयंप्रकाशित व्हा. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात तीन ऋण फेडावे लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्यऋण. परमेश्वराची भक्ती केल्याने आणि सर्वाभूती ईश्वर पाहिल्याने देवऋण फेडता येते. आपले सुख त्यागून मात्यापित्यांची आज्ञा पाळणे आणि त्यांना सुख देणे यामुळे पितृऋण फिटते आणि आपल्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून वाटचाल करणे, मानवधर्माचा आदर्श प्रस्थापित करणे यामुळे आचार्यऋण फेडता येते. " वसिष्ठ किंवा विश्वामित्र यांच्यासारख्या ऋषींचे आश्रम म्हणजे त्या काळातील विद्यापीठे होती. ही केवळ शिक्षणाची नव्हे तर संस्कारांचीही विद्यापीठे होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा