मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग सोळा ( रामकथेचे महत्व भाग एक )

उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

रामकथा - भाग सोळा ( रामकथेचे महत्व भाग एक ) 

नमस्कार रसिक वाचकहो, 

एवढे दिवस रामकथा तिच्यातील पात्रांच्या संदर्भात आपण पाहिली. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत, रावण, बिभीषण, उर्मिला आदी वेगवेगळी चरित्रे पाहिली . रामकथा म्हणजे वाल्मिकींनी गुंफलेला एक सुंदर फुलांचा हार. रामायणातील ही सगळी पात्रे म्हणजे त्यातील सुंदर फुले. त्या फुलांना एकत्र बांधून ठेवणारे सूत्र म्हणजे श्रीराम. या दोन भागात आपण आजच्या काळात रामकथा का वाचायची याचा विचार करणार आहोत. 
आपल्या या भारत देशात अनेक मौल्यवान धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ आहेत. परंतु समर्थ रामदासांना या रामकथेचीच मोहिनी पडली. सर्व कथांमध्ये त्यांना रामकथा अधिक गोड वाटते. म्हणून ते म्हणतात, ' समस्तांमधे कथा गोड या राघवाची. ' ही  रामकथा ब्रह्माण्ड भेदून पलीकडे न्यावी असं समर्थ म्हणतात. या रामकथेचा गोडवा ती कितीही ऐकली तरी कमी होत नाही. हजारो वर्षांपासून येथील लोक रामकथा ऐकत आले आहेत, सांगत आले आहेत. रामायण हे दूरदर्शनवरील धारावाहिक अनके वर्षांनी पुन्हा लागले होते. पण लोकांनी ते पुन्हा तितक्याच आवडीने पाहिले. 

रामायण मालिकेच्या संदर्भात एक किस्सा या ठिकाणी सांगावासा वाटतो. रामायण मालिका जेव्हा पहिल्यांदा सुरु झाली, तेव्हा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काही कार्यकर्ते दादांकडे आले. ते म्हणाले, ' दादा, आपल्याला तुमच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घ्यायचा आहे. कृपया नाही म्हणू नका. ' लोकांच्या आग्रहास्तव वसंतदादांनी कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. पण जाता जाता त्यांनी त्या कार्यकर्त्यांना विचारले, ' अरे तारीख सांगितलीत पण त्या दिवशी वार कोणता आहे ? ' कार्यकर्ते म्हणाले, ' रविवार आहे दादा. ' दादा म्हणाले, ' मग नाही जमणार. त्या दिवशी रामायण असते. ' अशी रामायण सिरियलची मोहिनी सर्वांवरच होती. 

गीतरामायण तर आपल्या मराठी जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. १९५५ मध्ये सिद्धहस्त कवी ग दि माडगूळकर यांनी लिहिलेल्या या अवीट गोडीच्या गीतरामायणाला आता ६५ वर्षे होत आलीत, पण त्याची गोडी कायम आहे. गीतरामायणातील गीतांना सुभाषितांचे मोल प्राप्त झाले. गदिमा उर्फ अण्णांनी लिहिलेल्या या शब्दांचे अक्षरशः सोने सुधीर फडके यांनी केले आणि गीतरामायण मराठी जनतेच्या मुखात रुळले. रामायण धारावाहिक आणि गीतरामायण यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रामकथा ब्रह्माण्ड भेदून पल्याड पोहोचली आणि समर्थ रामदासांचे शब्द खरे ठरले. 

श्रीराम आणि भारतीय संस्कृती या दोन गोष्टी इतक्या एकरूप झाल्या आहेत की जणू दुधात साखर ! त्या वेगळ्या करता येणार नाहीत. आपले वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय जीवन उजळून टाकण्याची क्षमता रामायणात आहे. जीवनाच्या या वेगवेगळ्या स्तरांवर जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे आदर्श रामायण आपल्यापुढे उभे करते. जीवनात विविध कर्तव्ये पार पाडत असताना, त्या प्रसंगांना कसे सामोरे जावे, निर्णय कसे घ्यावेत याचा आदर्श रामायण आपल्यासमोर ठेवते. श्रीरामाचे जीवन म्हणजे आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श राजा कसा असावा याचा आरसा आहे. महर्षी वसिष्ठांनी म्हटले आहे, ‘रामो विग्रहवान् धर्म:!मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचे साक्षात साकार दर्शन म्हणजे प्रभू रामचंद्र! म्हणून संतांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे कृष्णचरित्रहे उच्चारणीय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी,’ तर रामचरित्रहे आचरणीय आहे.

राम व रावण या दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्तिमत्त्वांभोवती गुंफलेली कथा म्हणजे रामायणअसून तो एक शाश्वत आरसा आहे. रामकथेतील राम-लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमंत यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून चिरंतन जीवनमूल्यांचे दर्शन आपल्याला या रामकथारूपी आरशात घडते. प्रसिद्ध रामकथाकार पू. मोरारीबापू रामायणाबद्दल बोलताना म्हणतात, "रामायण हा सांप्रदायिक ग्रंथ नसून, ते एक विद्यापीठ आहे. गीताहे योगशास्त्र आहे. भागवतवियोगशास्त्र आहे, तर रामायणहे प्रयोगशास्त्र आहे." रामचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मनुष्याने जीवनमूल्यांचे दर्शन घडवावे. त्यासाठी रामाला आदर्श मानून रामाप्रति आपल्या मनात अनन्यभाव निर्माण करावा, असे संतसाहित्य सांगते. 

प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात श्रीरामांचे पूर्वज किती तपस्वी आणि कर्मयोगी होते याचे सुंदर वर्णन आले आहे. श्रीरामाचे कुळ आजन्म शुद्ध आहे. आपल्यासारख्या सामान्य जनांची शुद्धता ही स्थल-कालसापेक्ष असते. श्रीरामांच्या कुळातील लोक निरंतर कर्मयोगी आहेत. स्वर्गातून गंगामातेला पृथ्वीवर आणण्याकरिता या वंशाच्या तीन पिढ्या झटल्या आहेत. जितके महान कार्य आपल्याला करावयाचे असेल तितकी खोल पायाभरणी जाणीवपूर्वक केली पाहिजे आणि माणसाने अखंड उद्योगी असले पाहिजे. ही शिकवण यातून आपल्याला मिळते. रामराज्य हे उगीच आदर्श ठरलेले नाही. त्याच्यामागे ही तपश्चर्या आहे. सर्वोच्च आदर्श असलेले श्रीरामांचे जीवन आताच्या काळातल्या फुटपट्ट्या लावून आपल्याला मोजता येणार नाही. त्यासाठी बुद्धी शुद्ध हवी व निदान बुद्धीने, प्रतिभेने आपल्याला त्या काळात जाऊन त्या परिस्थितीची दिव्यता-दाहकता लक्षात घ्यावी लागेल. सर्व प्रकारचे ऐश्वर्य असतानादेखील श्रीराम उपभोगशून्य जीवन जगतात. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष आहे. ( रामकथेचे महत्व - भाग दोन रविवारी ) 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२१/०८/२०२०

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...