उगवतीचे रंग
रामकथा - भाग तेरा ( हनुमान - पूर्वार्ध )
संपूर्ण रामायणाचा जर विचार करायचा झाला तर रामायणामध्ये रामाचे वनवासात जाणे, सीतेचे रावणाने हरण करणे आणि नंतर रामाने वानरांच्या आणि अन्य लोकांच्या मदतीने रावणाशी युद्ध करून रावणाला ठार मारणे आणि सीतेसह अयोध्येत परत येणे अशी महत्वाची कथा स्थूलमानाने सांगता येईल. अशा या रामायणात किष्किंधाकांडापासून हनुमानाचा प्रवेश होतो. संपूर्ण रामायणात हनुमानाच्या चरित्राला एक आगळेवेगळे महत्व आहे. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात राहत असताना, रावणाचा मामा मारीच सुवर्ण मृगाचे रूप घेऊन येतो. त्याच्या त्या मायावी रूपाची मोहिनी सीतेवर पडते. त्याच्या शोधार्थ सीता रामाला त्या सुवर्ण मृगामागे पाठवते. पुढे तो मारीच रामाचा आवाज काढून लक्ष्मण आणि सीतेला आपल्याला वाचवण्यासाठी आर्त साद घालतो. लक्ष्मणाला हा मायावी आवाज आहे हे समजते पण रामाच्या प्रेमाने व्याकुळ झालेल्या सीतेला तो आवाज खरा वाटतो आणि लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी पाठवते. या परिस्थितीचा फायदा घेऊन रावण सीतेला पळवून नेतो.
इथून पुढे रामाच्या सीतेचा शोध घेण्याला सुरुवात होते. आणि या सीता शोधात जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावत असेल, तर तो आहे फक्त हनुमान. अंजनी आणि केसरी यांच्या पोटी जन्मलेला हा वायुपुत्र सगळ्या दृष्टीने अलौकिक आहे. तो ज्ञानी आहे, प्रचंड बुद्धिमान आहे. ' अतुलनीय बलधामा ' आहे. उज्ज्वल चारित्र्य आणि दास्यभक्ती यांचा आदर्श आहे. त्याला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे आणि ती म्हणजे रामनाम. जिथे कुठे रामकथा सुरु असेल, तिथे हनुमान उपस्थित असतोच असे म्हटले जाते. रामभक्तांना राम जेवढा प्रिय आणि वंदनीय आहे, प्रातःस्मरणीय आहे, तेवढाच हनुमान हा सदैव प्रिय आणि आदरणीय असा आहे. रामायणातून हनुमानाला वगळण्याची कल्पना करून पहा. रामायणातला रस निघून जातो.
रामाच्या परिवारातील राम आणि हनुमान वगळता इतर कोणाचेही स्वतंत्र मंदिर नाही. एवढे हनुमानाचे महत्व आहे. रामाची आणि हनुमानाची स्वतंत्र मंदिरे आहेत. एवढेच नाही तर ज्या ज्या ठिकाणी रामाची मंदिरे आहेत, त्या त्या ठिकाणी हनुमानाची सुद्धा मूर्ती विराजमान आहेच. जशी रामलक्ष्मण ही अविभाज्य जोडी, तशीच राम आणि हनुमान ही देखील अविभाज्य जोडी. ही रामभक्त असण्याची जी सर्वोच्च अवस्था हनुमानाने प्राप्त केली ती उगीच नाही. त्या मागे त्याचा सेवाभाव, भक्तीची पराकाष्ठा हे गुण आहेत. रामाच्या दृष्टीने कुठलेही महत्वाचे कार्य कोणावर सोपवून निर्धास्त राहावे अशी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे हनुमान. नाजूकातले नाजूक काम आणि कठीणातले कठीण काम आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर पार पाडणारा विश्वासू दूत म्हणजे हनुमान.सुग्रीव जेव्हा रामलक्ष्मणाचा हेतू जाणून घेण्यासाठी हनुमानाला ऋष्यमूक पर्वतावर पाठवतो, तेव्हा हनुमान ज्या पद्धतीने रामाशी बोलतो ते पाहून प्रत्यक्ष राम त्याला ज्ञानी आणि वेदउपनिषदांचा जाणकार असल्याचे जाहीर करतो. . ही सोपी गोष्ट नाही. वाली वधानंतर वालीच्या पत्नीचा शोक अनावर होतो. तिचे सांत्वन करण्याचे काम हनुमान मोठ्या बुद्धिपूर्वक करतो. अंगद जेव्हा सुग्रीवाच्या विरोधात जाऊन राज्याचे दोन तुकडे करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतो तेव्हा अंगदाला समजाविण्यासाठी हनुमान जातो. अंगद हा वालीप्रमाणेच शक्तिशाली होता आणि कोणाचेही सहजासहजी ऐकणारा नव्हता. त्या अंगदाला हनुमान अशा पद्धतीने समजावतो की त्यामुळे राज्याचे दोन तुकडे तर होत नाहीतच पण अंगद हा रामाचा एकनिष्ठ सेवक बनतो.
म्हणून समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांबद्दल जे म्हटले आहे
शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे !
तेच हनुमानाला सुद्धा तंतोतंत लागू होते.
हनुमंताचे आठवावे रूप
हनुमंताचा आठवावा प्रताप
हनुमंताचा आठवावा साक्षेप, भूमंडळी.
हनुमंताचे कैसे बोलणे, हनुमंताचे कैसे चालणे, हनुमंताचे सलगी देणे कैसे असे.
पुढे तो लंकेत सीतेच्या शोधासाठी जातो. सीतेचा सर्वत्र शोध घेतो. रावणाच्या स्त्रिया असतात, तेथे अंतःपुरात जातो. त्या ठिकाणी काही स्त्रियांना तो नको त्या अवस्थेत पाहतो. पण त्याच्या मनाची जराही चलबिचल होत नाही. कारण ध्येय एकच डोळ्यापुढे. ' रामकाज करने को आतुर '. फक्त सीतेचा शोध घेणे. म्हणून तो जसा ' बुद्धिमतां वरिष्ठम ' आहे तसाच तो ' जितेंद्रिय ' देखील आहे. सीतेला पाहिल्यावर एकदम तो आपली ओळख देत नाही. तर आधी रघुकुल, त्याची परंपरा इ बद्दल बोलतो. सीतेचा विश्वास संपादन करतो. मगच आपण रामाचा दूत म्हणून आलो आहोत हे तिला सांगतो. रामाने जेव्हा वालीचा वध केला, तेव्हा वालीपुत्र अंगद हा अत्यंत संतापलेला असतो. अंगद हा अत्यंत पराक्रमी आणि बुद्धीमान असतो. अंगदाचे चातुर्य आणि बल यांची परीक्षा तो जेव्हा रामाचा दूत बनून रावणाच्या दरबारात जातो तेव्हा होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा