मुख्य सामग्रीवर वगळा

रामकथा - भाग बारा ( बिभीषण )

 उगवतीचे रंग 

विश्वास देशपांडे , चाळीसगाव 

रामकथा - भाग बारा ( बिभीषण ) 

बिभीषण हे रामायणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व. रावणाचा सख्खा भाऊ असला तरी त्या दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं अंतर आहे. एक सद्वर्तनी, सदाचारी आणि धर्मपरायण आणि दुसरा विद्वान आहे, शूर आहे पण दुराचारी, अनीतीने वागणारा आहे. राक्षसकुळात जन्म घेऊन सुद्धा बिभीषण आपल्या कर्तव्याने आणि विचाराने एक वेगळी उंची गाठतो. बिभीषण हा रामाचा परमभक्त आहे, सेवक आहे.  ' दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम .' हे वचन सार्थ ठरवणारा तो आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते, पण आपल्या कर्तृत्वाने आपले मोठेपण आपल्याला सिद्ध करता येते असा या वचनाचा अर्थ आहे. 

बिभीषणावर काही लोक आक्षेप घेतात, आरोप करतात. काहींना असे वाटते की बिभीषण हा कुलद्रोही, देशद्रोही आहे. संकटाच्या काळी आपला भाऊ रावण याच्या सोबत उभे राहण्याचे सोडून तो शत्रू पक्षाला जाऊन मिळतो. तो ज्या कुलात जन्मला, त्या राक्षस कुळाला त्याने आपल्या वागण्याने कलंक लावला. आपल्या राष्ट्राशी द्रोह केला. पण या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. जे असे आरोप बिभीषणावर करतात, त्यांना रामायणच नीट कळले नाही असा त्याचा अर्थ होतो. आधी असे आरोप बिभीषणावर कोणी केले हे आपण लक्षात घेऊ. राम रावण युद्धात जेव्हा लक्ष्मण इंद्रजिताशी लढायला येतो, तेव्हा लक्ष्मणासोबत आपल्या काकाला पाहून इंद्रजित हे आरोप करतो. तो म्हणतो, ' तू काका आहेस. पण आपल्या कुळाला लाज आणली आहेस. आपल्या भावाशी, कुळाशी, राष्ट्राशी आणि धर्माशी द्रोह केला आहेस. " जो इंद्रजित आपल्या दुराचारी पित्याच्या वागण्याचे समर्थन करतो, त्याची साथ देतो, तो असे बोलणारच. त्याच्या बोलण्यावरून आपण बिभीषणाचे  मूल्यमापन करणे म्हणजे न्यायालयात लबाडाची साक्ष खरी ठरवण्यासारखे आहे. 

रावणाने केवळ सीतेला पळवून आणले होते असे नाही. त्यापूर्वी अनेक स्त्रियांवर त्याने अत्याचार केले होते. अनेक स्त्रियांना बळजबरीने आणून आपल्या अंतःपुरात ठेवले होते. या प्रत्येक वेळी बिभीषणाने त्याला भाऊ म्हणून या चुकीच्या कृत्याची जाणीव करून दिली होती. पण रावणाने त्याच्या म्हणण्याकडे काही एक लक्ष दिले नाही. रावणाच्या सीतेला पळवून आणण्याच्या कृत्याची निर्भत्सना तर कुंभकर्णाने सुद्धा केली होती. पण त्याने युद्धात रावणाची साथ दिली आणि तो मारला गेला. महाभारतात ज्याप्रमाणे पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सदाचारी माणसे होती. पण त्यांनी अधर्माची साथ दिली आणि युद्धात कौरवांसोबत त्यांनाही नष्ट व्हावे लागले. 

बिभीषणाला देशद्रोही म्हणणाऱ्यांनी बिभीषणाने आपल्या देशाची इभ्रत जाऊ नये म्हणून काही कमी प्रयत्न केले नव्हते हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याने अनेकदा रावणाला विरोध केला आहे.रावणाचे वागणे म्हणजे एकाधिकारशाही होती. त्याच्यापुढे कोणीही बोलत नसे. अशा वेळी बिभीषणाने त्याची पर्वा न करता त्याला खडे बोल सुनावले आहेत. जेव्हा अंगद हा रामाचा दूत म्हणून रावणाच्या दरबारात आला होता, तेव्हा रावणाने संतापून त्याला ठार करण्याची आज्ञा आपल्या सैनिकांना दिली होती. तेव्हा बिभीषणाने त्याला असे करणे राजनीतीच्या विरुद्ध आहे. राजदूताची हत्या कोणी करीत नाही. अशाने आपल्या राष्ट्राची बदनामी होईल हे रावणाला निक्षून सांगितले. बिभीषणाला राष्ट्रद्रोही म्हणणाऱ्यांनी आपल्या राष्ट्राचे नाव बदनाम होऊ नये म्हणून किती प्रयत्न केले होते हे लक्षात घ्यावे. राम रावण युद्धात लंकेचा विनाश होईल हेही त्याने समजावून सांगितले आहे. सीतेला परत करून रामाला शरण जा आणि आपला, आपल्या कुळाचा आणि लंकेचा विनाश टाळा असा सल्ला त्याने अनेकवेळा रावणाला दिला आहे. 

रावणाला वारंवार समजावूनही जेव्हा रावण ऐकत नाही, उलट बिभीषणाची निर्भत्सना करून त्याला हाकलून देतो, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून बिभीषण रामाला शरण जायचे ठरवतो. राम रावण युद्ध आता तोंडावर आलेले असते. अशा प्रसंगी शत्रुपक्षातील व्यक्तीला आणि तेही रावणाच्या सख्ख्या भावाला राम आश्रय देईल की नाही ही बिभीषणाच्या मनात शंका असते. परंतु शरणागताला आश्रय देणे हे रामाचे ब्रीद आहे. रामाने एकदा ज्याला आपले म्हटले त्याला तो शेवटपर्यंत सांभाळतो. तो बिभीषणाला सन्मानाने वागवतो आणि बिभीषणाच्या बाबत कुठलीही शंका न बाळगता, त्याला आश्रय देतोच शिवाय त्याला युद्धात रावणाचा पराभव झाल्यानंतर तूच लंकेचा राजा होशील म्हणून घोषित करतो. रामाला लंकेचे राज्य नको आहे. राज्याचा लोभ नाही. त्याला फक्त अन्यायी, दुराचारी अशा रावणाला दूर करून त्या जागी न्यायी, धर्माचे पालन करणारा शासक बसवायचा आहे. 

राम रावण युद्धात रावणावर विजय मिळवणे ही रामासाठी सोपी गोष्ट नव्हती. या युद्धात राम लक्ष्मणाला बिभीषणाची मोलाची मदत झाली. रावणाची आणि इंद्रजिताची अनेक रहस्ये बिभीषणाने सांगितल्यामुळे युद्धात त्यांना मारणे शक्य झाले. बिभीषण हा रामाचा एवढा एकनिष्ठ सेवक होता की त्याने आपले सर्वस्व रामाच्या ठिकाणी समर्पण केले होते. त्यामुळे युद्धात आपला भाऊ रावण मारला गेल्यानंतर त्याने त्या अन्यायी, दुराचारी, अधर्मी अशा रावणावर अंत्यसंस्कार करायला सुद्धा नकार दिला होता. पण रामाने त्याला समजावून सांगितले की मरणानंतर वैर संपते. रावण हा तुझा भाऊ आहे. तू त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करीन. तेव्हा त्याने रावणावर अंत्यसंस्कार केले. या सगळ्या प्रसंगातून राम आणि बिभीषण यांची महानताच आपल्याला दिसते. पुढे बिभीषण लंकेचा राजा झाल्यावर रामाने त्याला राज्यकारभाराबाबत मोठा सुंदर उपदेश केला आहे. बिभीषणाचे चरित्र आणि व्यक्तिमत्व दिव्य आहे. बिभीषण हा चारित्र्य आणि नीतिमत्तेचा आदर्श आहे. ज्याला रामाने आपला सखा म्हणून हृदयाशी धरले, त्याच्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण राहत नाही. 

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१२/०८/२०२० 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...