उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
रामकथा - भाग एक
परवा कोणीतरी मला व्हाट्सअँपवर एक व्हिडीओ पाठवला होता. रामायण मालिकेच्या उत्तर रामायणातील लव कुश म्हणतात ' हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की ' त्या गाण्याचा हा व्हिडीओ होता. त्याचे विशेष असे की अमेरिकेतील मुलांनी ते गीत गायिलेले दाखवले होते. त्या व्हिडिओवर कोणी असं म्हटलं की हा फेक व्हिडीओ आहे. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. तो खरा असेल किंवा खोटा. क्षणभर असे मानू या की तो व्हिडीओ खोटा आहे. पण आमची रामकथा त्यांना आपण सादर करावीअसं वाटणं हे सुद्धा खूप अभिमानास्पद आहे.
गीत रामायणातील ' स्वये श्री रामप्रभू ऐकती ' हे गदिमांचं गीत असो की रामायण मालिकेतील ' हम कथा सुनाते है ' गीत असो, ते ऐकताना माझे डोळे नकळत प्रेमभराने ओले होतात. मूळ रामायणच अतिशय गोड, त्यात या लहान बालकांच्या तोंडून ही रामकथा ऐकताना तर रामायणातील सगळा गोडवा या गाण्यात एकत्र आणून हे गाणे तयार केले की काय असे वाटावे.
या लेखात आणि पुढच्या भागात मला काही सगळी रामकथा सविस्तरपणे सांगायची नाही. रामायणावर मी काही लिहावं एवढा माझा अभ्यासही नाही. पण रामकथेतला जो भाग माझ्या मनाला भावला तो तुमच्यासमोर ठेवावा एवढाच माझा उद्देश. रामायणात विविध नात्यांची मनोहर गुंफण आहे. मग ते पिता पुत्राचे नाते, पती पत्नीचे नाते, भावाभावांचे नाते, गुरु शिष्यांचे नाते, स्वामी सेवकाचे नाते असो वा राजा आणि प्रजेचे नाते असो. ही नाती आदर्शवत आहेत. या नात्यांनी तयार झालेल्या गोष्टींनी युगानुयुगे आमच्या पिढयांना प्रेरणा दिली आहे. शिवाजी महाराजांसारखे अनेक महापुरुष या रामायणरुपी अमृताचे पान करून घडले आहेत. युगानुयुगे रामायणाने आमच्या मनावर मोहिनी टाकली आहे.
वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर अनेक श्रेष्ठ संत, लेखक आणि कवी यांना रामायणावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. विविध भाषेत, विविध देशात रामायण आपापल्या परीने लिहिले गेले. वाल्मिकी रामायणानंतर उत्तर भारतात आणि देशाच्या विविध भागात तुलसीदासांचे रामायण लोकप्रिय आहे. संत एकनाथांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिले. तामिळ भाषेत कंबन रामायण तर केरळमध्ये अध्यात्म रामायण प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की वेगवेगळी अशी तीनशे रामायणे उपलब्ध आहेत. अर्थात असे असले तरी मूळ गाभा एकच आहे.
अशी कथा आहे की वाल्मिकींनी रामायण लिहिण्याआधी मारुतीने रामायण लिहिले होते. वाल्मिकी आपण लिहिलेले रामायण दाखवण्यासाठी हनुमानाकडे घेऊन गेले. त्यावेळी हनुमानाने स्वतः लिहिलेले रामायण त्यांना दाखवले. हनुमानाने रामचरित्रातल्या सगळ्या घटना यथार्थपणे आणि भावपूर्ण भाषेत कथन केल्या होत्या. आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा पद्धतीने लिहिलेली रामकथा पाहून वाल्मिकी नाराज झाले. त्यांनी हनुमानाला विचारले की असं का झालं ? हनुमानाने मोठे सुंदर उत्तर दिले की मी रामकथा माझ्या आनंदासाठी लिहिली. तुम्ही जगाला सांगण्यासाठी लिहिली. मी लिहिलेली रामकथा माझ्या हृदयात सदैव राहील. तुम्ही लिहिलेली रामकथा जगाला कळणे आवश्यक आहे. असे म्हणून हनुमानाने स्वतः लिहिलेले रामायण स्वतःच्या हाताने नष्ट करून टाकले.
इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की रामकथा ही कोणी सांगितली ते महत्वाची नाही. तिचे तात्पर्य महत्वाचे आहे. वाल्मिकींनी सांगितलेली रामकथा ही महत्वाची आहे ती याकरिता की त्यांचा आणि श्रीरामाचा जीवनकाल एकच होता. मारुतीने लिहिलेल्या रामकथेत जशी त्याची रामप्रती भक्ती होती, तशीच वाल्मिकींची भक्ती आणि तपश्चर्या यांचे पाठबळ या रामायणामागे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे युगानुयुगे ही रामकथा अमर राहिलेली आहे. तिची गोडी, तिचे महत्व यत्किंचितही कमी झालेले नाही. आजच्या काळात तर नैतिक मूल्यांचा झपाट्याने ह्रास होत असताना, रामकथेची पारायणे होणे जरुरीचे आहे. अर्थात पारायण हा शब्द मी या ठिकाणी रूढ अर्थाने वापरला नाही. तर रामकथा आपल्या जीवनात उतरण्यासाठी वारंवार तिचे श्रवण, मनन आणि चिंतन झाले पाहिजे.
रामकथेचा आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. रामायण मालिका दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी सादर झाली होती. ती या लॉकडाऊनच्या काळात पुन्हा प्रसारित करण्यात आली, तरीही लक्षावधी लोकांनी तिच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेतला. एवढेच नव्हे तर, ही मालिका पुन्हा पाहताना त्यावेळी न कळलेल्या, लक्षात न आलेल्या काही गोष्टी नव्याने कळल्या. रामायण असो की महाभारत, ज्ञानेश्वरी असो की गीता या अशा गोष्टी आहेत, की जेवढ्या वेळा वाचू, तेवढ्या वेळा आपल्याला नवनवीन गोष्टी कळत जातात. या गोष्टी म्हणजे जणू एखाद्या समुद्रासारख्या आहेत. ज्या ज्या वेळी आपण त्यात उडी मारू, त्या त्या वेळी नवनवीन रत्ने आपल्या हाताला लागतील. समुद्राला या अर्थाने रत्नाकर म्हणतात. तसेच हे ग्रंथही रत्नाकर आहेत. ( भाग दोन - रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा