उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
अशिक्षित कोण...?
काल मी ' घरगाणी ...मनातली ' हा लेख लिहिला होता. त्या लेखात सुरुवातीला बहिणाबाईंच्या ' खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला..' या कवितेचा उल्लेख केला होता. नंतर बहिणाबाईंबद्दल लिहिताना असेही म्हटले होते की बहिणाबाई या अशिक्षित होत्या पण त्यांच्या प्रतिभेची झेप प्रचंड होती. वाचक म्हणून तुमचं नी माझं विश्वासाचं नातं आहे. त्याच नात्यातून तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला सांगू , बहिणाबाईंबद्दल अशिक्षित शब्द वापरताना माझा हात क्षणभर थरथरला होता. आणि नंतर काल आणि आज दिवसभर त्या शब्दानं माझा पिच्छा पुरवला. बहिणाबाईंच्या एक एक कविता आठवू लागल्या. त्या कवितांमधलं शहाणपण, त्यांचं तत्वज्ञान, एखादा विषय उदाहरण देऊन समजावून सांगण्याची पद्धत या गोष्टी मला पुन्हा जाणवल्या. मग माझं मनच मला म्हणालं की त्या केवळ शाळा कॉलेजात गेल्या नाहीत, चार अक्षरे लिहावाचायाला शिकल्या नाहीत, म्हणून तू त्यांना लागलीच अशिक्षित ठरवून मोकळा होतोस ? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अशा काही अवघड प्रश्नांची उत्तरं नाही देता येत मला.
नाहीतरी अशिक्षितांची व्याख्या आम्ही अशीच करतो ना, की जो शाळा कॉलेजात गेला नाही, लिहावाचायाला शिकला नाही तो अशिक्षित. मग या अशा अशिक्षित माणसांची तुलना माझं मन नकळत सुशिक्षित माणसांशी करू लागलं. मग आणखी लक्षात आलं की अशिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून सुशिक्षित वापरता येणार नाही. त्यासाठी ' शिक्षित ' हा शब्द वापरावा लागेल. जो शाळेत गेला आहे, ज्याने चार पुस्तकं वाचली आहेत, ज्याला आपलं म्हणणं लिहून मांडता येतं तो शिक्षित. सुशिक्षित ही त्याच्या पुढची पायरी आहे. सुशिक्षित माणसाला आपण जे काही शिकलो त्याचा वापर व्यवहारात कसा करावा याचे ज्ञान असणे, बऱ्यावाईटाची पारख करता येणे अपेक्षित असते. त्याची सद्सद्विवेकबुद्धी सांगेल त्याप्रमाणे त्याने वागणे अपेक्षित असते. सुशिक्षित शब्दाच्या आधी जो ' सु ' हा प्रत्यय लागला आहे, त्याचा अर्थच तो ! पण प्रत्यक्ष व्यवहारात बऱ्याच वेळा आपल्याला विपरीत परिस्थिती आढळते. आजपर्यंत जेवढे काही घोटाळे, भ्रष्टाचार झाले आहेत, तेवढे सगळे सुशिक्षित माणसांकडूनच झाले आहेत. एकाही अशिक्षित माणसाने असे घोटाळे केले नाहीत.अन्याय, अत्याचार, फसवाफसवी, लबाडी करणारी मंडळी बऱ्यापैकी शिकलेली असतात. मानवी मूल्ये पायदळी तुडवण्यात ही मंडळी बहुधा आघाडीवर असतात.
माझ्या प्रिय वाचक मित्रांनो, कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की सगळी सुशिक्षित माणसे वाईट आहेत. आणि सगळी अशिक्षित माणसे म्हणजे गुणांची खाण आहेत. या ठिकाणी मला सांगायचे एवढेच आहे की शिक्षणाने जे गुण, जी मूल्यं माणसात यायला हवी, ती शिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. म्हणून त्यासाठी केवळ शिक्षण देऊन उपयोगी नाही. ज्या शिक्षणाला सुसंस्कारांची जोड असेल, तेच खरे शिक्षण. जे शिक्षण आम्हाला केवळ स्वार्थ न पाहता, इतरांसाठी मदतीचा संस्कार करत असेल, ते खरे शिक्षण. म्हणून तर बहिणाबाईंना म्हणावे लागले ना ' माणसा माणसा कधी होशील माणूस ? ' शिक्षणाचे काम माणूस घडवणे आहे.
असं म्हटलं जातं की शिक्षण हे दिलं जातं आणि संस्कार हा टिपला जातो, ग्रहण केला जातो. म्हणून संस्कार ग्रहण करण्यासाठी माणसाचं मन टिपकागदासारखं असावं लागतं. तो टिपकागद सुद्धा कोरा असावा लागतो. तरच संस्कार नावाची गोष्ट त्यानं टिपली जाईल. तो जर ओला असेल, तर संस्कार शोषून घेऊ शकणार नाही. आपल्याला शिक्षणातून मुलांची मनं अशी टिपकागदासारखी तयार करता आली पाहिजेत, जेणेकरून ती पटकन चांगले संस्कार ग्रहण करू शकतील. खरं म्हणजे ती असतातच मुळात संस्कारक्षम. पण आपणच नको त्या गोष्टींचा त्यांच्यावर मारा करून तो टिपकागद ओला करून टाकतो. त्यासाठी पालकांना श्यामची आई व्हावी लागेल आणि शिक्षकांना साने गुरुजी. ' श्यामच्या आई ' मधला तो प्रसंग आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. श्याम अंघोळ करून येतो. आणि आईला म्हणतो, ' पायाला घाण लागेल. ' त्यावेळी आई म्हणते, ' श्याम, पायाला माती लागू नये म्हणून जसा जपतोस , तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. ' आईवडिलांनी ठरवलं तर बोलता बोलता किती सहज संस्कार दिले जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण, पदव्या, प्रमाणपत्र नाही. त्या शिक्षणातून नम्रतेचा, सेवेचा संस्कार देखील आला पाहिजे.
वपु काळेंच्या पुस्तकात वाचलेली एक गोष्ट आठवते. खूप छान आहे. गझनीच्या महंमदाच्या दरबारात एक पंडित होता. त्या पंडिताचा मुलगा शिकून मोठा झाला. तो त्या मुलाला घेऊन दरबारात आला आणि म्हणाला, ' खाविंद, हा माझा मुलगा सगळं शिकला आहे. त्याला आपण आपल्या सेवेत दाखल करून घ्यावं. महमंद मानसुद्धा वर न करता म्हणाला, ' एका वर्षाने त्याला घेऊन ये. ' एक वर्ष झाल्यावर पंडित पुन्हा आपल्या मुलाला दरबारात घेऊन जातो. तो म्हणतो, ' आता या मुलाने सर्व धर्मांचा अभ्यास केला आहे. गीता, कुराण, बायबल सगळं काही वाचलं आहे. आता शिकावं असं त्याच्या दृष्टीने काही राहिलं नाही. ' आता महंमदाने मान वर केली आणि त्या पंडिताला म्हणाला, ' तुझ्या मुलाचा शिष्य म्हणून स्वीकार करेल असा गुरु शोध. त्याच्याकडे त्याला पाठव. मग एका वर्षाने येऊन भेट. ' त्याप्रमाणे त्या पंडिताने बऱ्याच गुरूंकडे जाऊन पाहिले . पण कोणी त्याला शिष्य म्हणून ठेवून घ्यायला तयार होईना. कारण एवढ्या शिकलेल्या मुलाला कोण आणि काय शिकवेल ?
शेवटी एका गुरूंनी त्याला शिष्य म्हणून स्वीकाराची तयारी दर्शवली. त्यांच्याकडे मुलाला ठेवून तो पंडित घरी आला. एका वर्षाने त्या पंडिताने त्या गुरूंकडे जाऊन पाहिले , तेव्हा त्याला आढळले की तो मुलगा गुरुची सेवा करीत होता, त्यांचे पाय चेपत होता. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले सुद्धा नाही. पंडित पुन्हा महंमदाकडे गेला. त्याला सर्व हकीगत सांगितली. महमंद म्हणाला, ' आता त्याला माझ्याकडे यायची जरूर नाही. मलाच त्याच्याकडे गेले पाहिजे. ' स्वतः महंमद आणि पंडित दोघेही त्या गुरुकडे गेले. मग त्या गुरूंनीच त्या शिष्याचा हात महंमदाच्या हातात दिला आणि म्हणाले, ' आता याला घेऊन जाऊ शकता. ' तेव्हा तो मुलगा म्हणाला, ' आता मला दरबारात जायची गरज नाही. दरबारात किंवा आपल्या सेवेत राहून मला जे मिळणार होते, ते सगळे इथेच मिळाले आहे. ' ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. तिच्यावर मी काही स्पष्टीकरण द्यावं असं नाही. पण गोष्ट हे सांगते की पदव्या मिळवल्या, पुस्तके वाचली म्हणजे शिक्षण झालेच असे नाही. त्या शिक्षणाने मूल्ये कितपत अंगी रुजली, मानवतेची, सेवेची, प्रामाणिकपणाची, श्रमप्रतिष्ठेची हे त्याहूनही महत्वाचे आहे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा