उगवतीचे रंग
आरोग्याची सप्तपदी चालताना...
एकदा अकबराने बिरबलाला तीन प्रश्न विचारले होते. घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पान का सडले ? आणि अकबराने बिरबलाला या तिन्ही प्रश्नांचं उत्तर फक्त तीन शब्दात द्यायला सांगितले. चतुर बिरबलाने पटकन सांगितले, ' वेळेवर न फिरवल्यामुळे. ' किती सुदंर उत्तर आहे नाही ..! आपण ही लहान मुलांची गोष्ट म्हणून बऱ्याच वेळेला सोडून देतो. पण त्यात किती मतितार्थ भरला आहे ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला हवी. भाकरी वेळीच फिरवली नाही, तर ती करपेल. पान सडेल आणि घोडा अडून राहील. हा न्याय आपल्या जीवनाला सुद्धा लागू होतो. आज आपले आरोग्य बिघडले आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी वाढते आहे, इतकी की नवीन पेशंटसाठी जागा नाही. अनेक आजार वाढले आहेत. कोणालाही विचार की आज असे का होत आहे ? तो लहान मुलगा असला तरी आपल्याला सांगेल की, ' अहो काका, टेन्शन किती वाढलंय हल्ली ! शिवाय प्रदूषण केवढं वाढलंय ..! मग होणारच ना आजार. ' खरे आहे. हे सांगायला काही कोणा फार मोठ्या तज्ज्ञाची जरुरी नाही. मग पुन्हा अकबरासारखाच प्रश्न मनात येतो. कोणी वाढवले हे ताणतणाव, कोणी वाढवलं प्रदूषण ? याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तज्ज्ञाची गरज नाही. कारण ते आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा चार बोटं आपल्याकडे आपसूक वळालेली असतात.
प्रदूषणाचा त्रास आपल्याबरोबरच निसर्गातील सर्व घटक, पशुपक्षी इ ना सुद्धा होतो. पण ते आपल्यापेक्षा निसर्गाच्या अधिक जवळ असतात. नैसर्गिक पद्धतीने जीवन जगतात. मुख्य म्हणजे आपल्याप्रमाणे मनावर ताणतणाव घेत नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडुनही ते बऱ्याच प्रमाणात आरोग्यदायी जीवन जगतात. आपण मात्र रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग इ विकारांनी त्रस्त झालो आहोत. दवाखान्याच्या पायऱ्या झिजवत आहोत. डॉ च्या सांगण्यावरून निरनिराळ्या तपासण्या करून त्यांच्या फाईल्स छानपैकी सांभाळून ठेवतो आहोत. आरोग्य, मनाची शांतता मात्र हरवली आहे. हरवले ते गवसेल का ? प्रयत्न केला तर मिळू शकते. अवघड आहे पण अशक्य नाही. पण कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर काहीतरी योगदान तर द्यावेच लागणार ना ? त्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल.
आपण लहान असतानाचं जीवन आठवा . आपण शाळेत जात होतो तेव्हा आपल्याला ताणतणाव नव्हते का ? परीक्षेचा तणाव असायचा. मित्रांच्या मारामाऱ्या, भांडणं व्हायची, शाळेत शिक्षक शिक्षा करायचे, कधी प्रचंड गृहपाठ तर कधी नावडत्या विषयांच्या अभ्यासात नाईलाजाने डोके खुपसावे लागायचे. पण घरी आलो की ते सगळं विसरून जायचो. मस्त खायचो, प्यायचो, उड्या मारायचो, गाणी गायचो. खेळ खेळायचो, पाऊस आला तर त्यात भिजायचो. एकूण काय तर आपण त्या सगळ्या ताणतणावात असताना सुद्धा जीवनाचा आनंद घ्यायचो. पण कुठे ते दिवस आणि कुठे आजचे दिवस ? आम्हाला आज ऑफिसमध्ये बॉसचे टेन्शन, सुनेला सासूचे, तर सासूला सून ऐकत नाही म्हणून, आईवडिलांना मुलं ऐकत नाही म्हणून. पण या सगळ्या ताणतणावातून सुटका व्हावी म्हणून आपण काही व्यायाम, योगासने, एरोबिक्स इ करतो का ? हल्ली आजारापासून दूर राहायचे असेल तर सगळे इम्युनिटी वाढवा म्हणून उद्घोष करताहेत ती इम्युनिटी या व्यायाम, योग, प्राणायामामुळे वाढतेच. मग त्यासाठी उन्हाळ्यात च्यवनप्राश नाही खाल्ले तरी चालेल. जाहिरातींना बळी पडण्याचे कारण नाही. अनेक योगासने अशी आहेत की या त्यामुळे आपली पाठदुखी, कंबरदुखी काही दिवसात नाहीशी होते. पचनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण वाढते. प्राणायामामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मेंदूला सुद्धा अधिक प्राणवायू मिळून आपल्याला उत्साह वाटतो. हृदयाची कार्यक्षमता वाढते.
योगगुरू रामदेव बाबांना लहानपणी असा आजार झाला होता की डॉ नी त्यांच्या आईवडिलांना सांगून टाकले होते की हा मुलगा पुढे आधाराशिवाय चालू शकणार नाही. पण त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान इ च्या साहाय्याने आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या सगळ्यावर मात केली आणि आज ते योगगुरू म्हणून सगळ्या जगापुढे उभे आहेत. आज व्हाट्सअँप, फेसबुक इ सारख्या समाजमाध्यमांवर योग करणाऱ्यांची अनेक उदाहरणे पाहतो. कुठल्या तरी व्हिडिओत नव्वद ब्याण्णव वर्षांच्या आजी कठीण योगासने करताना दिसतात. कुठे तरी एखादे वयोवृद्ध आजोबा योगाच्या साहाय्याने आपले आरोग्य योगाच्या साहाय्याने उत्तम राखताना दिसतात. अशी खूप उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहिले तरी सापडतील. पण आपण ते फक्त पाहतो आणि पाहून सोडून देतो. खरी समस्या ही आहे. तुम्ही लहान असा की वयस्कर, स्त्री असा की पुरुष, तुम्हाला आजार असो की नसो, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम हा प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही सप्तपदी जर प्रत्येकाने अवलंबली तर बरेचसे आजार आटोक्यात राहून निरामय जीवन जगता येईल. त्यातील पहिलं पाऊल म्हणजे सकस आणि ताजा आहार, दुसरं पाऊल म्हणजे पुरेशा प्रमाणात घेतलेली झोप अत्यंत महत्वाची आहे. कारण ती आपल्या शरीर आणि मनाला ताजतवानं ठेवते. तिसरं पाऊल म्हणजे व्यायाम मग त्यात योग , प्राणायाम, एरोबिक्स, सूर्यनमस्कार, प्राणायाम, सकाळी किंवा संध्याकाळी फिरणं हे आपल्या सोयीनुसार आणि क्षमतेनुसार करावं. जास्त काही करायला नाही जमलं तरी रोज नियमित बारा सूर्यनमस्कार जरी आपण घातले तरी त्यामुळे चांगल्या आरोग्याचा लाभ होईल. सूर्य हा शक्तिदाता, चैतन्यदाता आहे. ऊर्जा प्रदान करणारा आहे. त्याला आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. रोज थोडा वेळ तरी कोवळ्या उन्हात फिरावं. चौथं पाऊल मनाला ताजतवानं ठेवण्यासाठी संगीत ऐकणं, एखादा छंद जोपासणं, चांगल्या पुस्तकांचं वाचन या गोष्टी आपल्याला मनाची आणि विचारांची समृद्धीही देतील. त्यासोबतच मित्र जोडणे, लहान मुलांमध्ये वेळ घालवणे, मुलात मूल होऊन खेळणे या गोष्टी पण आपल्याला वाढत्या वयाची जाणीव होऊ देणार नाहीत.
पाचवं पाऊल आहे रोज थोडा वेळ तरी ध्यान करणे. ध्यान अनेक प्रकारांनी केले जाते. त्यातील कोणताही एखाद्या प्रकारची माहिती करून रोज थोडा वेळ तरी ध्यान करा. त्यामुळे तणाव कमी होऊन मनःशांती मिळेल. सहावं पाऊल आहे सकारात्मक विचारांचं. जेव्हा आपण योग, प्राणायाम, ध्यान इ करायला लागू तेव्हा नकारात्मक विचार हळूहळू कमी व्हायला लागतील. आणि निराशेचा पेला उत्साहाने, सकारात्मक विचारांनी भरायला सुरुवात होईल. सातवं पाऊल आहे प्रार्थनेचं . प्रार्थनेने मन शांत आणि एकाग्र व्हायला मदत होते. ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जग, आणि आयुष्य दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे प्रार्थना. स्वतःसह सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करणं म्हणजे प्रार्थना. सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करणाऱ्या या प्रार्थनेने लेखाचा शेवट करू या.
सर्वे ऽपि सुखिनः सन्तु ! सर्वे सन्तु निरामय: !
सर्वे भद्राणी पश्यन्तु ! माकश्चित दुःख भागभवेत !!
हे ईश्वरा, सर्वांना सुखी ठेव. सर्वांचं कल्याण होऊ दे. सर्वांना निरोगी राहू दे. सर्वांची मने शुद्ध आणि पवित्र राहू देत. कोणीही दुःखी असू नये. इतरांकडे केवळ देहभावातून न पाहता अंतःकरणातून, चैतन्यभावाने पाहण्याची दृष्टी दे. दुःखात असलेल्याला मदत करून, ज्ञान देऊन त्याची दुःखातून सुटका करण्याची प्रेरणा आम्हाला होऊ दे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२३/०६/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा