मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग मळभ...

उगवतीचे रंग 

मळभ... 

मळभ दाटून येतं कधी कधी 
केवळ आकाशातच नव्हे तर मनातल्या आकाशातही 
आणि पादाक्रांत करतं सगळी मनोभूमी 
बटू वामनाच्या पायाने विचार, भावना व्यापून 
दशांगुळे उरतं. 

मग ते मळभ आणि त्याचा काळा तवंग पसरतो मनावर 
आणि लुप्त होतात सारी प्रकाशकिरणे . 
कधी कधी हे मळभ असतं निराशेचं 
ही निराशा येते जेव्हा विचारत नाहीत आपलीच माणसे 
खूप वेगवेगळ्या प्रवृत्तींनी मारतात ती आपल्याला 
कधी दुर्लक्ष करून, तरी कधी हेटाळणी करून 
कधी कधी आपल्याच माणसांना पाहवत नाही आपलीच प्रगती 
पण न बोलता, कौतुक न करता अनुल्लेखाने मारतात ती आपल्याला. 
आपली अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार 

कधी कधी निराश करते परिस्थिती सुद्धा 
सगळेच मार्ग असतात बंद 
आणि सुचत नाही काहीही 
दिसतो फक्त एकच मार्ग सुटकेचा 
सोपं असतं त्या मार्गाने सुटका करून घेणं 
पण आत्मघातकी असतो तो मार्ग . 
कधी कधी लता दीदींचं गाणं आठवतं आणि म्हणावसं वाटतं 
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हू मै 
तेरे मासूम सवालोंसे परेशान हू मै 
पण मग त्यांचंच दुसरं गाणं मनाची समजूत घालत असतं , धीर देतं 
आज फार जिने की तमन्ना है ... 

आपली सुटका करून घेत निखळतो एखादा सुशांत तारा 
त्याच्याकडे पाहून खचायचं नसतं 
बुलंद करायचे असतात आपले इरादे 
आठवायचं असतं शिवरायांना 
मोठ्या कष्टानं कमावलेलं स्वराज्य तहात गमावताना 
होती जिद्द ते परत मिळवण्याची 
औरंगजेबाची सत्ता असतेच ठिकठिकाणी 
जिंदादिल मनसुब्यांनी ती उधळून लावायची असते. 
कधी गनिमी काव्याने तर कधी आमनेसामने. 

आठवायचं  असतं संत ज्ञानेश्वरांना 
समाजाच्या टीकेचं हलाहल पिऊन अमृतवाणी प्रसवणारे 
जगाच्या भल्यासाठी पसायदानाचा अमृतकुंभ मागणारे 
मला तर कधी कधी शिवशंकरांपेक्षा ज्ञानदेव श्रेष्ठ वाटतात. 
शिवशंकरानी हलाहल प्राशन करून कंठातच रोखून धरलं आणि ते नीलकंठ झाले. 
माझ्या ज्ञानोबा माऊलीने मात्र ते पिऊन टाकलं आणि पचवलं 
मुखातून मात्र बाहेर पडली ती अमृतवाणी अवघ्या जगासाठी 
तिथे नव्हता थारा निराशेच्या, आत्मघातकी विचारांना . 
त्या हृदयात तेवत होती ज्योत प्रकाशाची 

शेवटी मनातलं मळभ म्हणजे अंध:कारच ना.. 
अंध:कार असा अस्तित्वात नसतोच मुळी 
अंध:कार म्हणजे काय असतं ? 
तो असतो प्रकाशाचा अभाव फक्त...! 
जेव्हा तुम्ही आशेची ज्योत पेटवता 
तेव्हा निराशेचा अंध:कार पसार होतो. 
दाही दिशा अन मनाचा कानाकोपरा जातो लख्ख प्रकाशानं उजळून 
एखादे पाडगावकर सांगत असतात 
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 
आणि असंही सांगतात ' अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. ' 

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव 
         १५/०६/२०२०
 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...