मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येयनिश्चितीच्या मार्गावर... भाग एक

उगवतीचे रंग 


ध्येयनिश्चितीच्या मार्गावर... भाग एक


आपल्याला आयुष्यात काही करायचे असेल, तर डोळ्यापुढे काहीतरी निश्चित ध्येय असणे आवश्यक असते. ध्येयहीन माणूस म्हणजे दिशाहीन प्रवाशासारखा. एखादा माणूस प्रवासाला निघाला आहे, आणि कुठे जायचे हेच माहिती नाही, तर तो भरकटणार, त्याची फरफट होणार. म्हणून आपल्या डोळ्यांसमोर ध्येय तर असलेच पाहिजे. पण ध्येय कोणी ठरवायचे आणि ते ठरवण्याची योग्य वेळ कोणती ?

आपला साधारणपणे असा समज असतो, की लहान मुले, विद्यार्थी, युवक यांनी लहानपणीच आपले ध्येय ठरवून त्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. पण ध्येयाचा  हा  फार मर्यादित अर्थ  झाला . ज्याला असे वाटते की मला माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करायचे आहे, चांगले करायचे आहे, अशी कोणीही व्यक्ती आपले ध्येय निश्चित करू शकते. त्यासाठी वयाची अट नाही. आणि योग्य वेळ कोणती असे विचाराल तर ती आताची, या क्षणापासूनची. असं म्हणतात की '  It is never too late . '

ही ध्येयनिश्चिती कारण्याआधीची एक छोटीशी पायरी आपण समजून घेऊ या. ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची  . मी एका ठिकाणी वाचले होते की चिनी माणसे स्वतःच्या प्रतिमेचा तीन स्तरावर विचार करतात. पहिलं म्हणजे मला स्वतःला माझ्याबद्दल काय वाटतं  किंवा मी स्वतःला काय समजतो ? दुसरं म्हणजे लोक मला काय समजतात किंवा माझ्याबद्दल काय बोलतात ? आणि तिसरं म्हणजे आरसा . म्हणजे सत्य काय आहे ? आरसा तुम्हाला तुमची सत्य प्रतिमा दाखवतो. जशी असेल तशी. तो खोटं बोलत नाही. म्हणून तर एखादी एखादी गोष्ट स्पष्ट असेल तर आपण म्हणतो, की ते आरशासारखं स्पष्ट आहे, स्वच्छ आहे.

आता यातली पहिली पायरी खूप महत्वाची आहे. ती म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते किंवा तुम्ही स्वतःला काय समजता  ? कारण तुम्ही स्वतःला जे काही समजता , तसे तुमचे व्यक्तिमत्व घडत जाते. स्वामी विवेकानंद म्हणतात, ' तुम्ही स्वतःला बलवान समजाल तर बलवान व्हाल, आणि दुर्बल समजाल तर दुर्बल व्हाल. सारी शक्ती तुमच्यात दडलेली आहे. तुम्ही सारे काही करू शकता. ' म्हणून स्वतःला कमी समजू नका. आत्मविश्वास असू द्या.

आता दुसरी पायरी बघू या. दुसरी पायरी आहे ती म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, किंवा तुम्हाला काय समजतात ? हे समजून घेण्याआधी मुळात हे लक्षात घ्या की लोकांच्या म्हणण्याला किती महत्व आपण देणार आहोत ? कारण त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष दिले तर आपल्याला काम करणे कठीण होऊन जाईल. अर्थात जेव्हा आपण स्वतःचे इतरांच्या नजरेतून मूल्यमापन करतो, त्यावेळी त्यांचे मत विचारात घ्यायला हरकत नाही. लोक तुमच्याबद्दल चांगलेही बोलणारे असतात आणि कदाचित वाईटही. पण आपण जर आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलो, तर लोकांच्या बोलण्याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही.

 ' जो राह चुनी तुने उस राह पे राही चलते  जाना रे..' फिर वो कितनी भी लंबी क्यों न हो..!

आपण जर असे त्या मार्गावर चालत राहिलो , तर आपल्या विरोधात बोलणारी लोकं एक दिवस आपलं  गुणगान सुद्धा नक्कीच करतील.

आणि तिसरा स्तर म्हणजे आरसा. तो तुम्हाला तुमची सत्य प्रतिमा दाखवतो. तुम्ही असाल तसे. तुमचा चेहरा स्वच्छ असेल तर तो स्वच्छ दाखवील, आणि चेहऱ्यावर काही असेल तर तेही स्पष्टपणे दाखवील . लोकांसारखं तो फसवत नाही. म्हणजे स्तुतीही करत नाही आणि वाईटही बोलत नाही. इथे आरसा या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आपणच आपल्या प्रतिमेचा आपल्या मनाशी विचार करायचा. आपलं मन हाच आरसा. त्यात थोडं तारतम्यानं डोकावलं की आपल्यालाच आपण कुठे आहोत, कसे आहोत आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे, याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसेल. एकदा हे लक्षात घेतलं की पुढची ध्येयनिश्चिती आणि त्या मार्गावरची वाटचाल करणं सुलभ होईल. ( क्रमशः )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
     ४/५/२०२०
भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...