उगवतीचे रंग
नारायण हवेत की नारायणी सेना...?
महाभारतात एक प्रसंग आहे. कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे जणू आता ठरलेले असते. आणि या युद्धात पांडवांसमोर कौरवांचा टिकाव लागणार नाही याची कल्पना धृतराष्ट्र, शकुनी इ सगळ्यांनाचअसते. त्यांच्या मते कौरवांच्या मार्गातील मोठा अडसर म्हणजे वासुदेव, भगवान श्रीकृष्ण. म्हणून शकुनी दुर्योधनाला श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी पाठवतो. तेव्हा दुर्योधन त्याप्रमाणे आधी कृष्णाकडे जातो. आणि नंतर लगेच श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन सुद्धा येतो. अर्जुन पायाशी बसलेला असतो आणि दुर्योधन उशाला.
साहजिकच कृष्णाचे लक्ष अर्जुनाकडे आधी जाते. तेव्हा दुर्योधन म्हणतो, ' मी आधी आलो आहे.' त्यामुळे आधी मदत मागण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तसा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखण्यात अतिशय चतुर आहे. त्याला दुर्योधन आणि अर्जुन यांच्या स्वभावातील फरक चांगलाच माहिती असतो. त्यामुळे तो सांगतो, ' मी तर स्वतः युद्ध करणार नाही. हातात शस्त्रही घेणार नाही. तेव्हा एका बाजूला मी आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना .' अर्थात आधी मागण्याची संधी तो अर्जुनाला देतो.
यावर अर्जुनाने दिलेले उत्तर त्याचं प्रसंगावधान, बुद्धिमत्ता आणि त्यापेक्षाही जास्त काय असेल तर भगवंतावरील श्रद्धा याचे निदर्शक आहे. तो म्हणतो, ' मला नारायणी सेना काय करायची ? तू असल्यानंतर मला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. ' श्रीकृष्णाने आपल्या रथाचे युद्धात सारथ्य करावे अशी अर्जुनाची इच्छा असते. आणि खरं आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्याचा सारथी आहे, त्याचा रथ भरकटू शकत नाही. तो योग्य दिशेलाच जाईल. आणि जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, तिथे विजय निश्चित आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पण अर्जुनाच्या दिलेल्या उत्तराने अर्थातच दुर्योधन खुश होतो आणि त्याला हवी असलेली नारायण सेना मागून घेतो. हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो. कल्पना करून बघा की अर्जुन आणि दुर्योधन यांच्या जागी आपण आहोत. आणि आपल्याला भगवंताने संधी दिली तर आपण काय मागू ? आपल्याला हा प्रसंग माहिती आहे. त्यामुळे आपण आता हुशार झालो आहोत. आपणही नारायणालाच मागून घेऊ. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते तेही आपण बघू.
यानिमित्ताने मला श्रेयस आणि प्रेयस हे दोन शब्द आठवले. ज्यांचा उल्लेख कठोपनिषदात येतो. त्यात म्हटले आहे की ज्या मार्गाने मानवाचे कल्याण होऊ शकते तो मार्ग म्हणजे श्रेयस आणि संसारातील विविध प्रकारचे उपभोग घेण्यासाठी जो मार्ग आपण निवडतो, तो म्हणजे प्रेयस . यात आपण योग्य विचार करून निवड करायची असते.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे सगळी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे देवसुध्दा मोकळा श्वास घेत असतील. नाहीतर सगळीकडे दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. या रांगा दर्शन घेणाऱ्यांपेक्षा मागण्या मागणाऱ्यांच्या अधिक असतात. आपण हात जोडून भक्तिभावाने नमस्कार करतो. मनोभावे करतो. जवळच्या फुलमाला , प्रसाद वगैरे अर्पण करतो. पण हात जोडताना मनामध्ये काहीतरी मागणी असतेच. काहीतरी नवस असतोच. आणि आपण श्रेयस मागतो का ? नाही. आपण मागतो ते प्रेयस .
परमेश्वर त्याला फक्त भेटण्यासाठी जे येतात, त्यांना तो न मागता हवं ते देऊन टाकतो. म्हणून देवाकडे फक्त भक्तीचं वरदान जे मागतात, त्यांना सगळं काही मिळतं . हनुमंताने रामाजवळ फक्त भक्ती मागितली. पण रामाने हनुमंताला आपले सर्वस्व दिले. प्रेम दिले. असं नातं भक्त आणि भगवंतामध्ये निर्माण होतं . स्वामी विवेकानंदाना श्रीरामकृष्णांनी कालीमातेजवळ काय हवं ते माग म्हणून पाठवले. पण त्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्यच मागितलं. हेच श्रेयस.
हे श्रेयस आणि प्रेयस थोडं आणखी स्पष्ट करतो. श्रेयस म्हणजे श्रेयस्कर. आणि प्रेयस म्हणजे प्रिय असं थोडक्यात समजू. ज्या गोष्टींनी अंतिमतः आपलं कल्याण होणार आहे, अशा गोष्टी मिळवण्यासाठीचा पत्करलेला मार्ग म्हणजे श्रेयस होय. हा मार्ग खडतर असतो. या मार्गावर काटे असतात. आणि प्रेयसी म्हणजे आवडत्या किंवा प्रिय गोष्टी मिळवणे. हा मार्ग वरवर आकर्षक दिसतो. पण तो अंतिमतः हितकारक असेलच असे नाही. थोडं व्यवहारातलं उदाहरण घेऊ. अभ्यास करणं , वाचन करणं, आरोग्यदायी व्यायाम करणं या गोष्टी श्रेयस या सदरात मोडतील कारण त्या अंतिमतः आपल्या हिताच्या आहेत. तर टीव्ही, मोबाईल, बाहेरील फास्ट फूड यासारख्या गोष्टी आपल्याला आवडतात . आपण त्यांना प्रेयस म्हणू या. त्या अंतिमतः आपल्या हिताच्या नाहीत.
अर्थात हे व्यवहाराच्या दृष्टीने झालं. खरं तर श्रेयसचा मार्ग म्हणजे अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग. पण आपल्याला रोजच्या व्यवहारात श्रेयस आणि प्रेयसची सांगड घालता येऊ शकते. समर्थ रामदासांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे. ' आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका,' असं समर्थ म्हणतात ते यासाठीच. तेव्हा निवड आपल्या हातात आहे. नारायणाशिवाय नुसत्या नारायण सेनेची किंमत शून्य आहे. आपलं अंतिम लक्ष नारायण आहे. नारायणी सेना नाही, एवढं यानिमित्ताने लक्षात ठेवलं तरी पुरे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२
नारायण हवेत की नारायणी सेना...?
महाभारतात एक प्रसंग आहे. कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे जणू आता ठरलेले असते. आणि या युद्धात पांडवांसमोर कौरवांचा टिकाव लागणार नाही याची कल्पना धृतराष्ट्र, शकुनी इ सगळ्यांनाचअसते. त्यांच्या मते कौरवांच्या मार्गातील मोठा अडसर म्हणजे वासुदेव, भगवान श्रीकृष्ण. म्हणून शकुनी दुर्योधनाला श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी पाठवतो. तेव्हा दुर्योधन त्याप्रमाणे आधी कृष्णाकडे जातो. आणि नंतर लगेच श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन सुद्धा येतो. अर्जुन पायाशी बसलेला असतो आणि दुर्योधन उशाला.
साहजिकच कृष्णाचे लक्ष अर्जुनाकडे आधी जाते. तेव्हा दुर्योधन म्हणतो, ' मी आधी आलो आहे.' त्यामुळे आधी मदत मागण्याची संधी मला मिळाली पाहिजे. तसा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखण्यात अतिशय चतुर आहे. त्याला दुर्योधन आणि अर्जुन यांच्या स्वभावातील फरक चांगलाच माहिती असतो. त्यामुळे तो सांगतो, ' मी तर स्वतः युद्ध करणार नाही. हातात शस्त्रही घेणार नाही. तेव्हा एका बाजूला मी आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना .' अर्थात आधी मागण्याची संधी तो अर्जुनाला देतो.
यावर अर्जुनाने दिलेले उत्तर त्याचं प्रसंगावधान, बुद्धिमत्ता आणि त्यापेक्षाही जास्त काय असेल तर भगवंतावरील श्रद्धा याचे निदर्शक आहे. तो म्हणतो, ' मला नारायणी सेना काय करायची ? तू असल्यानंतर मला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. ' श्रीकृष्णाने आपल्या रथाचे युद्धात सारथ्य करावे अशी अर्जुनाची इच्छा असते. आणि खरं आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्याचा सारथी आहे, त्याचा रथ भरकटू शकत नाही. तो योग्य दिशेलाच जाईल. आणि जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत, तिथे विजय निश्चित आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पण अर्जुनाच्या दिलेल्या उत्तराने अर्थातच दुर्योधन खुश होतो आणि त्याला हवी असलेली नारायण सेना मागून घेतो. हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो. कल्पना करून बघा की अर्जुन आणि दुर्योधन यांच्या जागी आपण आहोत. आणि आपल्याला भगवंताने संधी दिली तर आपण काय मागू ? आपल्याला हा प्रसंग माहिती आहे. त्यामुळे आपण आता हुशार झालो आहोत. आपणही नारायणालाच मागून घेऊ. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय घडते तेही आपण बघू.
यानिमित्ताने मला श्रेयस आणि प्रेयस हे दोन शब्द आठवले. ज्यांचा उल्लेख कठोपनिषदात येतो. त्यात म्हटले आहे की ज्या मार्गाने मानवाचे कल्याण होऊ शकते तो मार्ग म्हणजे श्रेयस आणि संसारातील विविध प्रकारचे उपभोग घेण्यासाठी जो मार्ग आपण निवडतो, तो म्हणजे प्रेयस . यात आपण योग्य विचार करून निवड करायची असते.
सध्या कोरोनाच्या साथीमुळे सगळी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे देवसुध्दा मोकळा श्वास घेत असतील. नाहीतर सगळीकडे दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. या रांगा दर्शन घेणाऱ्यांपेक्षा मागण्या मागणाऱ्यांच्या अधिक असतात. आपण हात जोडून भक्तिभावाने नमस्कार करतो. मनोभावे करतो. जवळच्या फुलमाला , प्रसाद वगैरे अर्पण करतो. पण हात जोडताना मनामध्ये काहीतरी मागणी असतेच. काहीतरी नवस असतोच. आणि आपण श्रेयस मागतो का ? नाही. आपण मागतो ते प्रेयस .
परमेश्वर त्याला फक्त भेटण्यासाठी जे येतात, त्यांना तो न मागता हवं ते देऊन टाकतो. म्हणून देवाकडे फक्त भक्तीचं वरदान जे मागतात, त्यांना सगळं काही मिळतं . हनुमंताने रामाजवळ फक्त भक्ती मागितली. पण रामाने हनुमंताला आपले सर्वस्व दिले. प्रेम दिले. असं नातं भक्त आणि भगवंतामध्ये निर्माण होतं . स्वामी विवेकानंदाना श्रीरामकृष्णांनी कालीमातेजवळ काय हवं ते माग म्हणून पाठवले. पण त्यांनी ज्ञान, भक्ती आणि वैराग्यच मागितलं. हेच श्रेयस.
हे श्रेयस आणि प्रेयस थोडं आणखी स्पष्ट करतो. श्रेयस म्हणजे श्रेयस्कर. आणि प्रेयस म्हणजे प्रिय असं थोडक्यात समजू. ज्या गोष्टींनी अंतिमतः आपलं कल्याण होणार आहे, अशा गोष्टी मिळवण्यासाठीचा पत्करलेला मार्ग म्हणजे श्रेयस होय. हा मार्ग खडतर असतो. या मार्गावर काटे असतात. आणि प्रेयसी म्हणजे आवडत्या किंवा प्रिय गोष्टी मिळवणे. हा मार्ग वरवर आकर्षक दिसतो. पण तो अंतिमतः हितकारक असेलच असे नाही. थोडं व्यवहारातलं उदाहरण घेऊ. अभ्यास करणं , वाचन करणं, आरोग्यदायी व्यायाम करणं या गोष्टी श्रेयस या सदरात मोडतील कारण त्या अंतिमतः आपल्या हिताच्या आहेत. तर टीव्ही, मोबाईल, बाहेरील फास्ट फूड यासारख्या गोष्टी आपल्याला आवडतात . आपण त्यांना प्रेयस म्हणू या. त्या अंतिमतः आपल्या हिताच्या नाहीत.
अर्थात हे व्यवहाराच्या दृष्टीने झालं. खरं तर श्रेयसचा मार्ग म्हणजे अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग. पण आपल्याला रोजच्या व्यवहारात श्रेयस आणि प्रेयसची सांगड घालता येऊ शकते. समर्थ रामदासांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे. ' आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका,' असं समर्थ म्हणतात ते यासाठीच. तेव्हा निवड आपल्या हातात आहे. नारायणाशिवाय नुसत्या नारायण सेनेची किंमत शून्य आहे. आपलं अंतिम लक्ष नारायण आहे. नारायणी सेना नाही, एवढं यानिमित्ताने लक्षात ठेवलं तरी पुरे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा