मुख्य सामग्रीवर वगळा

आणखी एक संतोष..

*उगवतीचे रंग*

 *आणखी एक संतोष...*

परवा मी गेवराईला असलेल्या संतोष गर्जे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल ' नातं रक्तापलीकडचं ' हा लेख लिहिला होता. संतोष गर्जे यांनी अनाथ मुलांना घेऊन सहारा बालग्राम सुरु केलंय . पण आज मी तुम्हाला आणखी एका संतोषबद्दल सांगणार आहे. हा संतोष सांगलीचा. संतोष पुराणिक. कलावती आईंचा भक्त. कलावती आईंवर अपार श्रद्धा असणारा. ते त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवायचे. आणि हा संतोष आपल्या आवडत्या दैवताला म्हणजे कलावती आईंच्या उपासनेला वेळ देऊन आपल्या व्यवसायाकडे आणि सामाजिक कार्याकडे  लक्ष द्यायचा. कमालीचा धार्मिक. पारायणं वगैरे करायचा. आणि तो आणि त्याचं कुटुंब खूप आनंदात असायचं. या संतोषचं सांगलीला एक छोटंसं दुकान म्हणा की ऑफिस. ' श्रीकला एन्टरप्रायझेस ' या नावाचं. हे श्रीकला नाव कलावती आईंसाठीच दिलेलं. सगळ्या इ सर्व्हिसेस तिथे मिळायच्या.

अशा या संतोषची माझ्या लेखांमुळे फेसबुकवर ओळख झाली. त्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मग कधी मधी संतोषशी बोलणे होऊ लागले. आणि आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. तो मला काकाश्री म्हणायचा . त्याचं वय 45 च्या आसपास असेल. सावळा वर्ण आणि भरदार शरीरयष्टी लाभली होती त्याला.

जस कालच्या लेखातलं नातं रक्तापलीकडचं होतं , तसंच या संतोषचं आणि माझं नातं रक्तापलीकडचं. तो मला काकाश्री म्हणायचा, या नात्यानं तो माझा पुतण्या असला तरी तो माझा मानसपुत्रच झाला होता. कधी कधी त्याचा फोन आला नाही की मी त्याच्यावर प्रेमानं चिडायचो. तो ही मग हसून ते मान्य करायचा. म्हणायचा, ' बोला, बोला काकाश्री. आज मी सापडलोय. त्यामुळे तुम्ही बोला. मी ऐकून घेणार. ' त्यानं असं म्हटलं की माझा राग कुठल्याकुठे विरघळून जायचा आणि मग आमच्या दिलखुलास गप्पा व्हायच्या. एकदा संतोषचा फोन आला म्हटलं की किमान अर्ध्या तासाची तरी निश्चिती असायची.

प्रत्यक्षात माझी त्याची भेट व्हायचा योग आला नाही. पण माझ्या लेखांबद्द्ल तो भरभरून बोलायचा . खूप स्तुती करायचा. मला अगदी संकोचल्यासारखं व्हायचं. मग त्याला मी माझं पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक पाठवलं. त्याला ते खूप आवडलं. म्हणाला ' काकाश्री, पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया मी लिहून पाठवणार. अशी नाही सांगणार. ' मी म्हटलं हरकत नाही. तुझ्या सवडीने पाठव. पण त्याची प्रतिक्रिया आलीच नाही. संतोषचा जनसंपर्क अफाट होता. तो  मला म्हणायचा, '  तुमच्यासारखे जवळजवळ दोन तीनशे तरी काका, बाबा, आजी असतील. ' मग मी त्याला गमतीने म्हणायचो, ' त्या सगळ्यांमधला मी पण एक ना...? ' मग तो हसून म्हणायचा, ' नाही हो, काकाश्री, तुम्ही तर अगदी खास. तुमचं स्थान माझ्या हृदयात आहे. '

संतोषला स्वयंपाकाची खास आवड. रोज नवनवीन पदार्थ नाश्त्याला बनवायचा. मला सांगायचा, ' काकाश्री, आज नाश्त्याला, इडली चटणी बनवली होती. मस्त झाली होती.  तर कधी उपमा, पोहे, आणि इतर विविध पदार्थ. बनवून आपल्या बायकोला, मुलाला खाऊ घालायचा. ' मला म्हणायचा, ' तुम्ही सांगलीला आलात की मी तुम्हाला ठेवून घेणार. माझ्या हातचे नवनवीन पदार्थ तुम्हाला बनवून खिलवणार. मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही नाही म्हणायचं नाही. मग आपण वाडीला जाऊ.' असं आमचं बोलणं सुरु असायचं. संतोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी होता. त्याच्यावर सांगली तालुक्याची जबाबदारी होती. त्यातून विविध लोकोपयोगी कार्यक्रम तो घडवून आणत असे. कायम बिझी असायचा. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली इ भागात महापुराने थैमान मांडले. अशा वेळी खूप लोक बेघर झाले. संतोष त्यांच्या मदतीला धावून गेला. रोज कित्येक बेघर आणि उपाशी लोकांना जेवण तो पुरवायचा. अनेक जणांना त्याने शासकीय मदत मिळवून दिली.

याच सांगलीतले आणखी एक गृहस्थ माझे मित्र झाले होते. तेही माझ्याशी कधी कधी संभाषण करीत. ते आपल्या आजाराने आणि परिस्थितीने खूप निराश झाले होते. आणि आता या महापुराने त्यांच्या चिंतेत भर टाकली होती. ते मला त्यांच्या समस्या नेहमी सांगत. पण त्यांचे बोलणे खूप निराशाजनक असायचे. कधी कधी ते आत्महत्येची भाषा देखील करीत. मी त्यांना बऱ्याच वेळा धीर देण्याचा प्रयत्न करायचो. पण ते लांब असल्याने वेगळे काही करता येणे मला शक्य नव्हते. पण एकदा त्यांची अगदी निर्वाणीची भाषा ऐकली. मला वाटलं आता यांचं काही खरं नाही. मग अशा परिस्थितीत संतोषचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि मी त्याला त्या गृहस्थांबद्दल माहिती दिली. त्यांचा पत्ता आणि फोन नं दिला. आणि त्याला म्हटलं की तू त्यांच्याकडे जाशील का ? त्यांची मनःस्थिती ठीक नाही. ते काहीही करू शकतात. संतोषने एका क्षणात मला उत्तर दिले. ' काकाश्री, तुम्ही म्हणता ना, मग मी जाईन त्यांच्याकडे. तुमच्यासाठी काही पण करायला मी तयार आहे. '

दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच संतोष त्यांच्याकडे गेला. त्यांना त्यानं काय सांगितलं असेल ? मला विश्वास देशपांडेंनी पाठवलं आहे. मी त्यांचा पुतण्या आहे. आणि ते समोरचे गृहस्थ एकदम चाट पडले. मग त्यांची आणि संतोषची ओळख झाली. संतोषने त्यांना आवश्यक ती सगळी मदत केली. ते काका नैराश्यातून बाहेर आले. आणि दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला. ' विश्वासराव, काल तुमचा पुतण्या येऊन गेला. त्याने मला खूप धीर दिला.' मला तर संतोषला काय म्हणावे हे सुचेना. कोण कुठला संतोष ? त्याचं माझं नातं काय ? तो माझ्या शब्दाखातर जाऊन एका माणसाला मदत करतो. त्याला डिप्रेशन मधून बाहेर काढतो. खरंच, हे सुद्धा नातं रक्तापलीकडचं. बऱ्याच वेळेला जिथे रक्ताच्या नात्याची माणसं मदतीला येत नाहीत, तिथे संतोष सारखे देवदूत धावून जातात. सगळ्यांना प्रेम लावतात.

गेल्या मार्च महिन्यात माझ्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं . त्या कार्यक्रमासाठी मी संतोषला आमंत्रण दिलं होतं आणि येण्यासाठी आग्रह केला होता. त्यानेही ते मान्य केलं होतं . पण कार्यक्रम होऊन गेला तरी संतोषचा काही निरोप किंवा फोन आला नाही. मी जरा त्याच्यावर चिडलोच. आणि आता फोन करून त्याला प्रेमाने रागावू असा विचार केला. तो फोन संतोषच्या मुलाने घेतला. मी त्याला विचारले, ' बाबा कुठे आहेत ? ' तो दोन मिनिट काही बोलला नाही. मग हुंदका देत म्हणाला, ' काका, बाबा गेले. ' मी हादरलो. पायाखालची जमीन जणू सरकली. विश्वासच बसेना. तो म्हणाला, ' काका, मागच्या महिन्यातच बाबा गेले. त्यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं .' आणि फोन कट झाला. मला काही सुचेना. सुन्न झालो होतो.डोळ्यांमध्ये नकळत अश्रुनी दाटी केली होती.  निष्ठुर नियतीने संतोषला अचानकअसं उचलून नेलं होतं.  संतोष मला न भेटता, माझ्याशी न बोलता निघून गेला होता.

पण आज जरी संतोष आपल्यात नसला तरी त्याच्या प्रेमळ स्मृती आपल्यामध्ये कायम राहतील. रंगमंचावरील पात्रांसारखी अशी माणसं काही काळासाठी या जगात येतात. आपली भूमिका निभावतात आणि एक्झिट घेतात. पण प्रेक्षक मात्र अशा पात्रांना कधीही विसरत नाहीत. त्याची एन्ट्री चटका लावून गेली.  सगळ्यांना संतोष देण्यासाठीच जणू तो आला होता. तो परत येणार नाही हे माहिती आहे. तरीही वेडं मन उगीच म्हणते आहे, ' ओ जानेवले हो सके तो लौटके आना...'

©️ *विश्वास देशपांडे* *चाळीसगाव.*                 *९४०३७४९९३२*
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...