मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग रहे ना रहे हम ..

उगवतीचे रंग

रहे ना रहे हम ... 

सकाळी उठलो आणि घराबाहेर आलो. म्हणजे घराच्या पोर्चमध्ये. कुठे बाहेर नाही गेलो. घरापुढे छोटीशी बाग आहे. बागेत काही गुलाबाची झाडे आहेत. काही इतर फुलांची. काही गुलाब कुंड्यातूनही लावलेले आहेत. दोन कुंड्यांमधील गुलाबाला फार सुंदर कळ्या आल्या होत्या. एका कुंडीतील गुलाबाला पिवळ्या रंगाच्या तर दुसऱ्या कुंडीतील गुलाबाला लालभडक. कळ्या पाहूनच मन भरून गेले. थोड्या वेळाने त्या मस्तपैकी उमलल्या. आणि त्या फुलांनी आपले सौंदर्य अतिशय नाजूकपणे, तरलपणे जणू काही पेश केले. तो हळदीसारखा पिवळाधमक रंग आणि कुंकवासारखा लाल रंग. खरं तर दोन्ही भडकच..! पण निसर्गाची किमया अशी की फुलांच्या रूपात ते रंग पाहताना अजिबात भडक वाटत नाहीत. उलट मन प्रसन्न करतात. रात्र झाली की बागेत असणारी रातराणी फुलते. आणि आपल्या धुंद सुवासाने वातावरण भारून टाकते. निसर्ग त्याचे काम करीत असतो. 

 जणू सगळे जीवनचक्र थांबले आहे, असा भास होत असतानाच, निसर्ग हा संदेश देतो आहे की हे मानवा , तू कार्यरत राहा अगर नको राहूस, मी माझे काम करणार आहे. खरं म्हणजे आपण केवढी प्रगती केली नाही ? चंद्रावर पोहोचलो, मंगळावर पोहोचलो. नवनवीन शोधांनी निसर्गावर मात केली. आम्हाला स्वर्ग दोन बोटं उरला. आमच्या या प्रगतीचा आम्ही टेंभा मिरवू लागलो. निसर्गानेही काही दिवस आम्हाला हा टेंभा विनातक्रार मिरवू दिला. पण ( कदाचित ) आमच्याच कार्यकर्तृत्वातून निर्माण झालेल्या कोविड -१९ नामक क्षुद्र विषाणूजन्य आजाराने हा प्रगतीचा फुगा टाचणी लावावी तसा फोडून टाकला. आणि आमचे पाय जमिनीवर आले. 

 जगातील काही देशांनी आपल्या प्रगतीचे ध्वज लावून ठेवले होते. अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, चीन यासारखे देश प्रगत असल्याचा दावा करत होते. असतीलही ते देश प्रगत. पण करोनमुळे हे प्रगतीचे ध्वज धडाधड खाली कोसळले. या नैसर्गिक ( की मानवनिर्मित ? ) संकटाशी लढताना त्यांच्या नाकीनऊ आले. या युद्धात अनेकांना शहीद व्हावे लागले. अर्थव्यवस्था डबघाईला आली . आणि आपण सगळे या करोनपर्वातून बाहेर पडल्यावर सुद्धा अर्थव्यवस्थेची ही गाडी रुळावर यायला काही वर्षे जावी लागतील. या कालावधीत केवळ अर्थव्यवस्थेचेच नव्हे तर माणसाचे सुद्धा पुनरुज्जीवन आम्हाला करावे लागणार आहे. मने सांधावी लागणार आहेत. धीर द्यावा लागणार आहे. मानसिक बळ द्यावे लागणार आहे. 

पण या वाईटातून सुद्धा काही चांगले होणार आहे. त्यातून काही धडा आम्हाला मिळाला आहे. पुढील काळात आम्ही तो गिरवणार असू तर चांगलेच होईल. अन्यथा ' इतिहासाची पुनरावृत्ती होत असते ' या न्यायानुसार पुन्हा काळ आम्हाला कधी तरी असा जबर तडाखा दिल्याशिवाय राहणार नाही. या काळात आम्ही घरी एकत्र राहायला शिकलो. घरचे अन्न खायला शिकलो. आपत्तीत सापडलेल्याना मदत करायला शिकलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट शिकलो. सण, उत्सव, वाढदिवस यासारख्या गोष्टी घरी राहून पण साजऱ्या करता येतात  हेही आमच्या लक्षात आले. अर्थात अशी परिस्थिती येणे वाईटच. पण जशी प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते, तसा प्रत्येक अनुभव किंवा परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. 

या कालावधीत वाहने बंद असल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाली. नासाने या कालावधीत भारतात कमी झालेल्या प्रदूषणाचा, किंवा प्रदूषणमुक्त भारताचा नकाशा जारी केलेला आपण बातम्यांमध्ये पाहिला असेल. तसेच या कालावधीत काही व्हिडीओ माझ्या पाहण्यात आले. तुमच्याही आले असतील. रस्त्यावरची माणसाची वर्दळ बंद झाल्याने पशुपक्षी मुक्तपणे बागडू लागले आहेत. मोर रस्त्यांवर येऊन आपला पिसारा उभवून नाचत आहेत. मानवाने जर निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करण्याचे बंद केले तर काय चमत्कार घडू शकतो, याची ही गोष्ट निदर्शक आहे. 

काही दिवसांपूर्वी मी अमरावतीच्या ' शाश्वत स्कुल ' ला भेट द्यायला गेलो होतो. त्या शाळेत सेंद्रिय शेतीची कल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. तेथील संचालक अतुल गायगोले यांनी सुभाष पाळेकर यांची माहिती मला सांगितली. सुभाष पाळेकर हे कृषितज्ज्ञ. त्यांचे ' नॅचरल फार्मिंग ' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. शाश्वत स्कुलमध्ये पाळेकरांनी सांगितलेल्या पद्धतीने शेतीची कल्पना राबवली जाते. एकदा पाळेकरांना कोणीतरी विचारले की निसर्ग पुन्हा पूर्वीसारखा होण्यासाठी काय करावे लागेल  ? पाळेकरांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ' मानवाने काही करायचे नाही. निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ करायची नाही. निसर्ग आपले काम बरोबर करतो. ' आणि त्याचेच प्रत्यंतर या निमित्ताने आपल्याला येते आहे. कवीवर्य भा रा तांब्यांची एक सुंदर कविता आहे ' जण पळभर म्हणतील हाय हाय. ' या कवितेत ते म्हणतात, ' मी जाता राहील कार्य काय ?' खरंच आहे. मानवावाचून निसर्गाचे काही अडत नाही. अडते ते माणसाचे. म्हणून निसर्ग जपू या.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
         ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...