मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग थंडा करके खाओ ...

उगवतीचे रंग

थंडा करके खाओ ...

आपलं जीवन म्हणजे सुखदुःखाच्या क्षणांनी व्यापलेला एक मोठा चित्रपटच असतो. त्या चित्रपटातले प्रमुख पात्र म्हणजे आपण स्वतः आणि मग आपल्या सहवासात जे जे लोक येतील ते ते सहकलाकार असतात. खरं तर कोणताही चित्रपट हे एक प्रकारचे सांघिक कार्य म्हणजेच टीम वर्क असते. त्याच्या यशातला किंवा अपयशातला वाटा हा कोणा एकाचा नसतो. पण आयुष्याचा चित्रपट आणि पडद्यावरचा चित्रपट यात एक फरक असतो. पडद्यावरचा चित्रपट यशस्वी किंवा अयशस्वी होवो, दोष सगळ्या टीमकडे जातो. पण आयुष्याच्या चित्रपटाचे असे नाही. यशस्वी झाला तर यश सर्वांचे असते. आणि अपयश आले तर त्याचे धनी मात्र आपण असतो.

असं का होतं ? तर जन्मल्यापासूनच आपण परावलंबी असतो. अगदी जन्मल्यापासून ते नोकरीला लागेपर्यंत आणि उर्वरित आयुष्यातही आपल्याला सगळ्यांचे सहकार्य लागते. आपण फक्त आपल्या स्वतःच्या जीवावर मोठे होत नसतो. म्हणून यशात समाजाचाही वाटा असतो. पण अपयशात मात्र दोष आपल्याकडेच येतो. त्याचे कारण असे आहे की आपल्या आयुष्याच्या चित्रपटाचे हिरो जसे आपण असतो, तसेच दिग्दर्शकही असतो. आणि दिग्दर्शकावर खूप काही अवलंबून असते. तो जशी दिशा देईल, तसा चित्रपट बनतो.

या आपल्या आयुष्याच्या चित्रपटात आपली भूमिका फार महत्वाची असते. समोर येणाऱ्या प्रसंगांना आपण कशी प्रतिक्रिया देतो हे खूप महत्वाचे असते. उदा. बॉसने तुम्हाला एखादे जास्तीचे काम सांगितले, आणि तुम्ही ते न चिडता केले तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण होते. पण काही लोक भडकू असतात. म्हणजे ते लगेच चिडतात. आणि चिडून प्रतिक्रिया देतात. ते प्रसंगी बॉसला सांगायला कमी करत नाहीत, ' ऑफिसची वेळ संपली आहे. मी काम करणार नाही. ' असे दोनचार प्रसंग घडले की बॉसला तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल प्रतिकूल प्रतिमा त्याच्या मनात तयार होते. त्यामुळे बॉसने तुम्हाला एखादे जास्तीचे काम सांगितले, तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. ते स्वीकारा . फार तर तुमचा एखादा तास जास्त जाईल. पण तो तुमच्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करील. आणि कदाचित पुढे येणाऱ्या  तुमच्या फायद्याचे किंवा यशाचे बीज त्यामुळे रोवले जाईल.

आता यात काही लोक असेही निश्चित म्हणतील की मी माझे काम प्रामाणिकपणे करतो. मग जास्तीचे काम मी का करावे ? आणि प्रत्येक वेळी बॉस मलाच का सांगतो ? ऑफिसात इतर लोक नाहीत का ? हे प्रश्न बरोबरच आहेत. पण कधी कधी होते असे की इतर लोकांपेक्षा तुम्ही बॉसला चांगले वाटता . म्हणूनही तो तुम्हाला सांगत असतो. याचा अर्थ असा नाही की तो सांगेल ते प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे. कधी कधी योग्य शब्दात वेळ पाहून तुम्ही ती जाणीव त्याला करून देऊ शकता. पण लगेच अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया देणे टाळा. म्हणजेच काही वेळ जाऊ द्या. वेट अँड वॉच. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ' थंडा करके खाओ. '

मी असे खूप लोक पाहिले आहेत की जे लगेच प्रतिक्रिया देतात. आणि असेही पाहिले आहेत की जे विचलित होत नाहीत. योग्य वेळी प्रतिक्रिया देतात. असे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात. कधी कधी आपले नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याला काही सल्ला देऊ इच्छितात. कधी कधी तुम्ही त्यांच्याकडून एखादी अपेक्षा केलेली असते की जी ते वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. अशा वेळी वर म्हटल्याप्रमाणे जी भडकू माणसे असतात, ती लगेच चिडून त्यांना वाटेल ते बोलायला कमी करत नाहीत. पण त्यांचीही काही अडचण असू शकते. आपण प्रत्येक वेळी त्यांना गृहीत धरू शकत नाही. पण आपल्या बोलण्यामुळे ती मंडळी मात्र कायमची दुखावली जातात. नात्यात दुरावा निर्माण होतो.

आता थोडे वेगळे उदाहरण घेऊ. समजा आपण एखाद्या महत्वाच्या मुलाखतीसाठी निघालो आहोत. आणि रस्त्यात आपली गाडी अचानक बंद पडली. जवळपास कुठेही मेकॅनिक किंवा गॅरेज नाही. तुम्हाला तर वेळेवर पोहोचायचे आहे. नाही पोहोचलो तर इंटरव्ह्यूच्या रूपाने आलेली संधी हातून निघून जाईल. अशा वेळी आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आणि मग स्वतःलाच दोष देऊ लागतो. घरून निघतानाच गाडी व्यवस्थित आहे की नाही हे आपण का पाहिले नाही. आता माझ्या हाती आलेली हीही संधी जाणार. नेमके माझ्याच बाबतीत असे का होते असे लाख विचार आपल्या मनात येतात आणि जे महत्वाचे करायचे ते राहून जाते. आपण परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया देण्यात ( रिऍक्ट होण्यात ) फार घाई करतो आणि बऱ्याच वेळा तिथेच आपले चुकते. अशा वेळी चिडून किंवा परिस्थितीला दोष देऊन उपयोग नसतो. तर डोके शांत ठेवूनच निर्णय घ्यावा लागतो.

अशा वेळी तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी तुम्ही फोन करून तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ते कळवू शकतात. गाडी रस्त्याच्या कडेला किंवा कुठे तरी लावून दुसऱ्या एखाद्या वाहनाने मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचता येईल का याचा अंदाज घेऊ शकता. अगदी टोकाचा विचार केला तर तुम्हाला दिलेली मुलाखतीची वेळ निघून जाईल आणि तुमच्या नोकरीची संधी जाऊ शकते. एवढेच होईल. पण त्याने काही जगबुडी होत नाही. आपण व्यवस्थित राहिलो तर अशा संधी पुढे पुष्कळ चालून येतील. म्हणून प्राप्त परिस्थिती स्वीकारणे आणि त्यात आपले मनोधैर्य टिकवून ठेवणे हे महत्वाचे आहे.

हे दोन प्रसंग मी उदाहरणादाखल सांगितले. खरं तर आयुष्य म्हणजे प्रचंड गुंतागुंतीचा चित्रपट असतो. त्यात येणारी संकटे, काही वेळा येणारे प्रचंड दुःख हे आपल्या संयमाची आणि धैर्याची परीक्षा घेणारे असते . पण खूप माणसे साध्या साध्या गोष्टींनी विचलित होतात. लगेच रिऍक्ट होतात. आणि स्वतःचेच नुकसान करून बसतात. मग अशा वेळी आयुष्याच्या चित्रपटाच्या अपयशाची  जबाबदारी आपल्यावरच येते.  ' जिंदगी इम्तिहान लेती है. ' त्यात ' जो जिता वही सिकंदर. '

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
       ९४०३७४९९३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...